चोराच्या उलट्या बोंबा

- अभिजित पेंढारकर (पंचनामा)

सुखनिवास सोसायटीमधल्या पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांमधून वारंवार काही ना काही वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात होत्या. पहिल्या तक्रारीच्या वेळीच पोलिसांनी चौकशी सुरू केली होती, आजूबाजूच्या वस्तीत पाहणीही केली होती. संभाव्य चोरांच्या टोळ्यांकडे तपास करून माहिती काढायचा प्रयत्न केला होता, तरीही तक्रारी काही थांबल्या नव्हत्या. दर दोन ते तीन आठवड्यांनी एक तरी तक्रार यायची आणि पोलिसांचं काम वाढायचं. सुखनिवास ही उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सोसायटी होती. राजकीय क्षेत्रातील काही व्यक्ती, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, अशा अनेक प्रकारच्या व्यक्तींची या सोसायटीत घरं असल्यामुळे पोलिसांवरही दबाव वाढत होता. सोसायटीत सीसीटीव्ही बसवून घेण्यासाठी पोलिसांनी आग्रह धरला होता, मात्र अजूनही सोसायटीतल्या अंतर्गत वादांमुळे ती कार्यवाही होत नव्हती.
“हे बघा, आत्ताच्या काळात आधुनिक यंत्रणांचाही पोलिसांना वापर करावा लागतो. तुम्ही पोलिसांना सहकार्य केलंत, तर आम्हालाही वेगाने तपास करता येईल. खरे चोर कोण आहेत, ते शोधायला मदत होईल,” इन्स्पेक्टर शानभागांनी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना आधी प्रेमानं, नंतर अधिकारवाणीनं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी होकार दिला, पण सीसीटीव्हीचं काम एवढ्या लवकर तरी सुरू होईल, याबद्दल त्यांना स्वतःलाच खात्री नव्हती. दोन महिन्यांत पाचव्यांदा तक्रार दाखल झाली, तेव्हा मात्र शानभाग वैतागले.
“दामगुडे, यावेळी काय म्हणणं आहे सोसायटीतल्या माणसांचं? काय काय चोरीला गेलंय?” त्यांनी विचारलं.
“एक लॅपटॉप, दोन कार टेप, सीट कव्हर्स आणि गाडीतल्या काही सजावटीच्या वस्तू, परफ्यूम, अशा गोष्टी चोरीला गेल्यायत, साहेब. तीन चार गाड्यांमधून हा माल लंपास झालाय,” दामगुडेंनी माहिती दिली.
“ह्या माणसांनी अजून सीसीटीव्हीचं मनावर घेतलेलं नाही आणि पार्किंगमधल्या चोरीच्या तक्रारी करतायत. पोलिसांनी किती आणि कुठे कुठे लक्ष ठेवायचं?” शानभाग खरंतर वैतागले होते, पण चोरीची तक्रार दाखल करून घेणं आणि चोरांचा शोध लावणं, हे त्यांचं कामच होतं. त्यांनी यावेळी या तक्रारींची जरा जास्तच गांभीर्याने दखल घेतली.
“तुमचा कुणावर संशय आहे का? बाहेरून सोसायटीत येणारी माणसं, दूध पार्सल देणारे, पेपर विक्रेते, फेरीवाले, लाँड्री सेवा पुरवणारी माणसं, सोसायटीतल्या महिला कर्मचारी यांच्यापैकी कुणी?” त्यांनी तक्रार घेऊन आलेल्या सोसायटीतल्या रहिवाशांना विचारलं.
“नाही साहेब, तसा आमचा कुणावरच संशय नाही.”
“कुणाला इकडेतिकडे कारणाशिवाय फिरताना बघितलंय? कारपाशी, पार्किंगमध्ये रेंगाळताना बघितलंय?”
“नाही साहेब, तसं काहीच घडलेलं नाहा,” या उत्तरानंतर मात्र शानभाग आणखी चक्रावून गेले. रहिवाशांचा कुणावर संशय नाही, कुणाला काही संशयास्पद करताना कुणीही पाहिलेलं नाही, अशा परिस्थितीत चोरांचा माग काढणार कसा?
याच गोंधळात असताना सोसायटीतल्या राजेश मोहिते या रहिवाशाने थोडी अतिरिक्त माहिती पुरवली. त्याच्या मते, जवळच्याच झोपडपट्टीतली काही मुलं सोसायटीजवळच्या मोकळ्या जागेत खेळतात, कधी बॉल आत आला, तर भिंतीवरून उड्या टाकून आत येतात आणि काही वेळ इथेच असतात. कदाचित त्यांच्यापैकीच कुणीतरी चोर असावा किंवा ही एक टोळीच असावी, ते बॉलच्या निमित्ताने येऊन चोरी करून जात असावेत.
या गोष्टीत तथ्य होतं. शानभाग अनुभवी होते, वेगवेगळ्या प्रदेशांत अतिशय अवघड अशा गुन्ह्यांचा त्यांनी माग काढला होता. साधी साधी वाटणारी मुलंही किती सराईतपणे गुन्हे करू शकतात, याची त्यांना कल्पना होती.
“दामगुडे, जरा ह्या मुलांवर लक्ष ठेवा. ती कुठली आहेत, किती वयाची आहेत, कुठे राहतात, त्यांचे आईवडील काय करतात, दिवसभर काय उद्योग करतात, जरा बारकाईनं बघा. ही मुलं भिंतीवरून उड्या टाकून आत येऊ शकत असतील, तर वॉचमनला लक्ष ठेवायला सांगणं, भिंतीची उंची वाढवणं, या सूचना मी सोसायटीच्या माणसांना करतो,” शानभागांनी सांगितलं. दामगुडे कामाला लागले.
“ए पोरांनो, इकडं या!” सोसायटीच्या जवळच्या मैदानावर चक्कर मारून त्यांनी तिथे खेळणार्‍या मुलांना हाकारलं. मुलं थोडी घाबरत घाबरत त्यांच्यापाशी जमली.
“राहायला कुठं आहात तुम्ही?”
मुलांनी पलीकडच्या वस्तीकडे बोट दाखवलं. नाल्याच्या बाजूलाच वसवलेली झोपडपट्टी होती. रिकाम्या वेळेत ही मुलं मैदानावर खेळायला येत असणार. मग दामगुडेंनी एकेकाला नावं विचारली. त्यात काहीच अर्थ नव्हता, पण त्यांना थोडा धाक दाखवण्याची गरज होती.
“दिवसभर काय करता? ह्या सोसायटीत उड्या मारून जाता की नाही? आत गेल्यावर काय करता? तिथून माल कसा उडवता? काय करता त्या मालाचं पुढे?” त्यांनी एकामागोमाग एक प्रश्न विचारले. मुलं कावरीबावरी होऊन एकमेकांकडे बघायला लागली.
“साहेब, सोसायटीत आम्ही काय बी केलेलं नाही.” त्यातलं एक धीट पोरगं पुढे येऊन म्हणालं.
“काही केलेलं नाही? सोसायटीतल्या एका फ्लॅटमधूनं बराच माल चोरीला गेलाय. तुमच्यातला कुणी उचलला तो? व्ाâाय केलं त्याचं?” दामगुडेंनी पुन्हा दरडावून विचारलं. फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचं त्यांनी उगाचच सांगितलं होतं, त्या मुलांचा गोंधळ उडवण्यासाठी.
“आत जाऊन काय काय केलं, ते नीट सांगा, नाहीतर एकेकाला सोलून काढतो!” त्यांनी आवाज चढवल्यावर पोरं जरा टरकली.
“साहेब, कुठल्याच घरात शिरलेलो नाही आम्ही. आम्ही फक्त त्या कारपाशी…” एक पोरगं बोलता बोलता अचानक थांबलं. इतरांकडे घाबरून बघायला लागलं. दामगुडेंचे कान टवकारले.
“कारपाशी काय? काय केलं कारपाशी जाऊन? काच उघडून चोरी केली? काय उडवलं कारमधलं? आता सांगतोस, की….!”
“नाही साहेब, कारपाशी जाऊन ब्लेड मारलेलं फक्त.”
“काय?”
“होय साहेब. चरे पाडून ठेवलेले.”
“का?”
“त्या कारवाल्याला लई माज आहे साहेब. त्यानं एकदोनदा आमच्या अंगावर गाडी घालायला बघितली होती. कायम जोरात गाडी नेतो इथनं. चिखल उडवतो, धूळ उडवतो. म्हणून राग आलता त्याचा.” मुलानं सांगून टाकलं.
दामगुडेंना जरा विचित्रच वाटलं. सोसायटीतला कुणी रहिवासी इथून जोरात गाडी नेतो, त्याचा राग आला म्हणून या मुलांनी त्याची गाडी खराब करण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ त्याच्या किंवा कुणाच्याच गाडीत चोरी केली नव्हती. म्हणजे, निदान त्यांचं तरी असं म्हणणं होतं. सोसायटीतले रहिवासी मात्र याच मुलांवर संशय व्यक्त करत होते.
“साहेब, तो चौकातला टायरवाला