• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कवितेचा रांधाप…

कवींना दुखावणं सोपी गोष्ट नाही. ते कशावरही कविता करून तुम्हाला जेरीला आणू शकतात!

सई लळीत by सई लळीत
July 14, 2021
in मी बाई विचारवंतीण
0

पावसाळ्यात कवितेची एक विलक्षण सुरसुरीत अशी साथ येते. साथच ती.. तिचा संसर्ग आजूबाजूला होतच राहतो. मास्कबिस्कला ओलांडून तो मनामनात शिरतो. तिला आजवर व्हॅक्सिन आलेलं नाही आणि कोणाची व्हॅक्सिन आणण्याची हिंमतही होणार नाही. कवींना दुखावणं सोपी गोष्ट नाही. ते कशावरही कविता करून तुम्हाला जेरीला आणू शकतात!
—-

पाऊस आवडत नाही, असं म्हणणारा माणूस आजतागायत कुणाला सापडला नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. आणि समजा कुणाला भेटला तर तो माणूस नाही. तशा आमच्या कोकणातल्या बायका कधीतरी वैतागून बोलतात, ‘जा चालतो हो तुया त्वांड घेवून… फटकी येवंदेत हेच्यावर’ म्हणून हाकलायला बघतात. कपडे सुकत नाहीत, लाकडं थंडेली की पटकन पेटत नाहीत, कांडापेटी शेळेली म्हणून किंवा चिखलात काम करून पाय कुसले म्हणून करवादतात… पण ते आपलं असंच…! बडबडल्याशिवाय वेळ जात नाही म्हणून! पण पाऊस येणार आहे म्हणून त्यांची दोन महिने आधी तयारी बघितली तर म्हणाल, पाऊस येणार आहे की जावई येणार आहे? पावसाची कोकणात प्रचंड बडदास्त ठेवली जाते. घरांना पुढे दर्शनी भागात पावळ्या गळतात तिथे करड नावाच्या सोनेरी गवताच्या झडी बांधल्या जातात. मला तर त्या घरांच्या पापण्या आहेत असं वाटतं.
पावसाळ्यात गरम सामायन घातलेल्या मसालेदार आमट्या करून मोठी चैन केली जाते. कोकणी माणसाच्या ताटात थोडे पण चवीचे पदार्थ भेटतात. कोकणी माणूस कधीही आडवा पडून आग्रह करत नाही. एकदाच अमुक तमुक होया काय, असं विचारतो आणि कर्तव्य पार पाडतो. प्रत्येकजण आपल्या पोटाक होया तितक्या खातलो..! या मतावर त्याची श्रध्दा आहे आणि तिला तो कधीही तडा जावू देत नाही.
पाऊस आल्यावर मला सगळ्यात एक गोष्ट आवडते ती म्हणजे तळपाय छान तुळतुळीत गुळगुळीत गुलाबी आणि मुलायम होतात. मला माझ्या पायांना पदकमलं असं म्हणावसं वाटतं. कोणी पाया पडायला आलं तर त्या योग्यतेचे पाय वाटतात… फक्त पावसाळ्यात! अशावेळी पाय तळहातापेक्षा छान दिसायला लागतात. (हे म्हणजे दासीने राणीपेक्षा सुंदर दिसण्यासारखं आहे.) यावेळी मला पावसाचे नुस्ते उपकार वाटतात. कारण पायावर उभं राहायला शिकल्यापासून आपण पायाला फारशी किंमत देत नाही. दुसर्‍याचे पाय असल्यासारखं त्यांच्याशी परकेपणाने वागतो.
थंडीत भेगाळलेले, उन्हाळ्यात रखरखलेले पाय पावसात माहेरी आल्यासारखे निवांत होवून जातात. मला तर तळपायांना नक्षीदार मेंदी कोरून लावावीशी वाटते. पण मग मेंदी सगळ्यांना दिसण्यासाठी शीर्षासन करावं लागेल म्हणून हा बेत मी कॅन्सल करते. आता मला एवढं वाटतंय तर माझ्या पायांना किती कृतज्ञता वाटत असेल? तुम्ही फक्त कल्पना करून बघा. बघा जमतंय का?
बाकी पावसात सर्दीतापासारखी कवितेची एक विलक्षण साथ येते. हा एक वेगळाच प्रकार आहे. मुळात पाऊस हाच मला एक विलक्षण दैवी चमत्कार वाटतो (काही कविताही त्यामुळे चमत्कारिक होतात).
पूर्वी (म्हणजे आमच्या लहानपणी, असं नाही) सर्दी अत्यंत निरुपद्रवी वाटायचं; ती काहीजणांना त्रासदायक वाटत असली तरी… खूप जण त्यानिमित्ताने आपले लाड-कोडकौतुक करून घ्यायचे. वाफ घे. काढा घे. डोकं चेपून घे. नाक पुसून घे… उठसूट मांजरासारखं लोळत रहा आणि ते दिवसभर अव्याहत रिपोर्टिंग… आलं लक्षात? सिच्युएशन लक्षात घ्या.
डोक्यात हातोड्याचे घण बसल्यासारखं वाटतंय… (चेपून दे)
डोळे जळतायत रसरसलेत… (गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेव)
घसा फुललाय नुस्ता आतून… (वेलचीचा काढा दे)
जीभ कडुजार झालीय… (लिंबू सरबत कर)
डोळे म्हणून उघडववत नाहीयेत… (अजून आराम करायचाय)
तोंडाची चव साफ गेलीय… (काहीतरी चवीचं चटपटीत कर)
बसून का राहिलीयस? (चहा कर जरा कडकडीत… सुंठ गवती चहा टाकून)
लय लाड. सर्दीचा त्रास पेशंटपेक्षा बाकीच्यांनाच जास्त होतो.
काहीजणांना वर्षभर काहीच होत नाही… आपण दगड आहोत की काय असा अल्पसा संशय त्यांना यायला लागतो. अशावेळी सर्दी झाली की आपण पण माणूस आहोत अशी त्यांची खात्री पटते. मग ते आनंदाने चला ब्वा, मी सुटलो, मला सर्दी झाली, मला सर्दी झाली, असं सगळ्यांना सांगत सुटतात. आपल्या आयुष्यात एक घटना घडली याचा तो आनंद असतो.. असो. (आता सर्दीचा सावत्र भाऊ आल्यामुळे जरा या कोडकौतुकाला आळा बसलाय! मी काही त्यांना नावं ठेवत नाही.. तसा कोणताच उद्देश माझ्या मनात नाही. माझ्या अंतर्मनाने एक हलकीशी नोंद घेतलीय एवढंच..) कंस जरा मोठाच झाला.
तर पावसाळ्यात कवितेची एक विलक्षण सुरसुरीत अशी साथ येते. साथच ती.. तिचा संसर्ग आजूबाजूला होतच राहतो. मास्कबिस्कला ओलांडून तो मनामनात शिरतो. तिला आजवर व्हॅक्सिन आलेलं नाही आणि कोणाची व्हॅक्सिन आणण्याची हिंमतही होणार नाही. कवींना दुखावणं सोपी गोष्ट नाही. ते कशावरही कविता करून तुम्हाला जेरीला आणू शकतात!
शेवटी पाऊस हा सृजनाचा राजा.. त्यामुळे कविता मनात सुचली की कोणाला तुम्ही दोषी समजू शकत नाही.
पाणी, ढग, गवत (तृणपाती) खळखळणारे झरे (यू मीन निर्झर) थेंब, बिंदू (हे आपल्या आवडीनुसार पावशेर अच्छेर घ्यायचे), जलधारा, शहारा, क्षितिज (खूप प्रतिभा असल्यास) इंद्रधनु, जलाशय, धरा, धरणी (चवीनुसार), गारा (एक काचेची मोठी बरणी अर्धी भरलेली), पागोळ्या मूठभर… मोड आलेल्या आणि हळवं बिळवं, तरल बिरल झालेलं मन अशा काही मोजक्या वस्तूंच्या बखोटीला धरून कवितेची पाककृती रांधली जाते. कविता रांधण्यात पुरुष पण मागे नसतात. ते पण हिरीरीने कविता ढवळतात.. भानशेरं घेवून टोप उतरवतात, शिळंपाकं तव्यावर शेकून घेतात.. चमचाभर तेल टाकून परततात. कधी कधी नवीन पण करतात.
आणि मी म्हणते का नये रांधू? कारण काय ते सांगा ना!
यानिमित्ताने मनं मोकळो होतात. सातशे खिडक्या आणि आठशे दारं प्रत्येक मनाला साधारणपणे असतात असं आपण मानतो किंवा आपली श्रद्धा आहे. तर अशा हजारो मनांच्या लाखो कोट्यावधी खिडक्या मोकळ्या होतात. जर या लाखो खिडक्या आणि दरवाजे बंदच राहिले असते, तर किती बिजागरी गंजून खलास झाली असती, याचा मी विचारही करू शकत नाही.. म्हणजे मला हा विचार झेपणारच नाही.. असं अत्यंत प्रामाणिकपणे सद्गतित होवून मला म्हणावसं वाटतं, कविता हा एक कवींसाठी मानसोपचार आहे.. हे कोणी लक्षातच घेत नाहीये.. ही सगळ्यात मोठी हजारो पायांची गोम आहे.
आणि एकदा बिजागरी गंजून खल्लास झाली की मानसोपचारवाले पुढे सरसावणार! त्यांच्या गोळ्या घ्या. मजबूत फिया भरा आणि वर दिवसभर झोपून राहा. त्यापेक्षा सरळ कविता लिहून मोकळं व्हायचं.. साचलेलं मळभ कागदावर उतरवलं की कसं हलकं वाटतं आणि कोणतरी तावडीत सापडलं की परवानगी बिरवानगी न विचारता कविता ऐकवायची.. (नाही ऐकेनात.. ऐकली नाही तरी चालते) आणि कवी वेडे यावर सणसणीत शिक्का मारून घ्यायचा. हा शिक्का साहित्यिक असतो. असं आपण पुटपुटपुटायचं बाकी कसलाच विलाज नाही.
जसा पाऊस कमी होत जातो.. तशी ही साथ आटोक्यात येत जाते. मग थंडी पडल्यावर कधीकधी साथ उलटते.. पण पावसाळ्यासारखा जोर नसतो.. चार ऊन्हं पडली की साथ काढता पाय घेते. उन्हाळ्यातल्या कविता बहुधा फिकट रंगाच्या गुलबट कुसुंबी किंवा बहावी रंगाच्या असतात.. त्या साथीने झुंडीने येत नाहीत. सेप्रेट सेप्रेट धरतात.. आणि कडक उनात वाळून खडखडीत होतात.

– सई लळित

(लेखक खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)

Previous Post

उकड, मोकळ भाजणी, खिचू

Next Post

एका अनोख्या चोरीची गोष्ट

Next Post

एका अनोख्या चोरीची गोष्ट

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.