भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि दिलीप कुमार यांचे खूप प्रेमाचे नाते होते. लंडनमधील विख्यात विद्वान लॉर्ड मेघनाद देसाई यांनी २००४ साली ‘नेहरूज हिरो : दिलीप कुमार इन दी लाईफ ऑफ इंडिया’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. मेघनाद देसाई यांनी या पुस्तकात दिलीप कुमार हे नेहरूंचे हिरो आहेत, अशी मांडणी केली होती. उदयतारा नायर यांनी ‘द सबस्टन्स अँड द शॅडो’ या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात हा संदर्भ देत म्हटले आहे की, नेहरू हेदेखील दिलीप कुमार यांचे नायक होते. आपण सार्वजनिक जीवनात पडलो पंडितजीमुळे, असे दिलीप कुमार यांनी या पुस्तकात म्हटले आहे. त्यांनी सगळीकडे पंडितजी असा शब्दप्रयोग केला आहे. विशेष म्हणजे नेहरू त्यांना युसूफ या नावाने हाक मारत आणि त्यांच्याशी बोलत.
लोकसभा निवडणुकीत १९६२ साली मुंबई मतदारसंघातून तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन हे निवडणुकीला काँग्रेसतर्फे उभे होते. निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध पूर्वीचे काँग्रेसचेच पण आता प्रजा समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवणारे ज्येष्ठ नेते आचार्य जे. बी. कृपलानी हे उभे होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात जाऊन मेनन यांना भेटावे आणि तिथेच रजनी पटेल यांच्याशी बोलावे, असे नेहरूंनी दिलीप कुमार यांना कळवले. वडिलांच्या खालोखाल पंडितजींना आदरस्थानी मानत असल्यामुळे त्यांची आज्ञा स्वीकारून दिलीप कुमार जुहू येथील काँग्रेसच्या कार्यालयात गेले. तिथे रजनी पटेल त्यांना भेटायला आले, त्यानंतर मेनन आले. आणि मग या प्रचारामध्ये आपण काय काम केले याची माहिती दिलीप कुमार यांनी आत्मचरित्रात दिली आहे. या निवडणुकीत प्रचंड बहुमताने मेनन निवडून आले. दिलीप कुमार यांच्या लोकप्रियतेचा काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यात मुंबईतील यशात मोठा वाटा राहिला.
रजनी पटेल आणि दिलीप कुमार यांची दोस्ती वाढत गेली आणि त्यातूनच पुढील काळात शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईचे शेरीफ म्हणून काम करण्याची संधी दिलीप कुमार यांना मिळाली. शेरिफ असताना दिलीप कुमार यांनी एका खूप चांगल्या गोष्टीसाठी लक्ष घातले आणि त्याचे एक सुंदर प्रत्यंतर आजही मुंबईत येते आहे.
एका भेटीत दिलीप कुमारांनी रजनी पटेल यांना सांगितले की, मुंबईसारख्या महानगरात एका सांस्कृतिक, विज्ञान केंद्राची गरज आहे; जिथे कलावंत कला सादर करू शकतील, तरूण वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर करू शकतील, लेखक, संगीताचे साधक असे सगळे एकत्र येऊन विविध कलांची देवाण-घेवाण करू शकतील.. अशी एक सुंदर जागा निर्माण केली पाहिजे. विशेष म्हणजे रजनी पटेल यांनी ही गोष्ट पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर त्याने ताबडतोब त्याला हिरवा कंदील दाखवला आणि आज मुंबईतील वरळी येथे उभ्या असलेल्या नेहरू सेंटरची सुरुवात झाली.
दक्षिणेतील एक दिग्दर्शक ‘पैगाम’ हा चित्रपट करत होते आणि त्यात नायक दिलीप कुमार होते. त्यावेळी पंडित नेहरूंना या दिग्दर्शकांनी व त्यांच्या कंपनीने निमंत्रित केले होते. नेहरू आल्यानंतर दिलीप कुमार दूर उभे असल्याचे दिसले. नेहरू चालत त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोलू लागले. अशा अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात.
भारतातला हा एक दिग्गज अभिनेता, पहिला सुपरस्टार! डॉ. जब्बार पटेल आणि सत्यजित रे यांच्या भाषेत सांगायचे तर भारतीय चित्रसृष्टीतील पहिला मेथड अॅक्टर म्हणजे दिलीप कुमार. जब्बार पटेल यांच्याशी दिलीप कुमार यांचे छान स्नेहसंबंध होते. एक चित्रपट निर्माते ए. आर. करदार यांनी काही चुकीचे आरोप करून दिलीप कुमार यांना एका खटल्यात अडकवले होते, त्या पाच वर्षांच्या काळात सार्वजनिक जीवनातून जणू संन्यास घेतलेले दिलीप कुमार विविध विषयांचा अभ्यास करत होते. अनेक चित्रपट निर्माण करण्याची त्यांची कल्पना त्याच काळात साकार होत होती. याच काळात ‘काला आदमी’, ‘बाबाजान’ अशा काही चित्रपटांची स्क्रिप्ट्स तयार झाली होती. ‘बाबाजान’ चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी करावे अशी दिलीप कुमार यांची इच्छा होती. त्यासाठी जब्बार पटेल यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्याची नोंदही त्यांनी आत्मचरित्रात केली आहे. नंतर मात्र हे सगळे बारगळले. कारण मनोज कुमार यांनी ‘क्रांती’ चित्रपटाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आणि मग ते पुन्हा गुंतून गेले.
पुण्याच्या लष्कर भागातील आर्मी क्लबमध्ये तारुण्यात ते काम करत होते. अचानक एका प्रसंगात त्यांना पोलिसांनी अटक केली. झाले असे… तो दुसर्या महायुद्धाचा काळ होता. बहुदा चले जाव आंदोलन सुरू झाले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात सरदार पटेल आणि अन्य नेते बंदिवासात होते. आर्मी क्लबमध्ये दिलीप कुमार यांनी उस्फूर्तपणे भाषण केले. अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू असताना समोर पोलीस येताना दिसले. त्यांनी हातकड्या घालून त्यांना नेले येरवडा तुरुंगामध्ये टाकले. आपल्याला तेथील जेलरने तेथे गेल्यावर हा गांधीवाला, असे म्हटले. दिलीप कुमार यांना ही गोष्ट खूप अभिमानाची वाटली. दुसर्यां दिवशी आर्मी क्लबचे अधिकारी त्यांना सोडवून घ्यायला आले, तेथून जातानाही घ्या तुमचा गांधीवाला, असे तो जेलर परत म्हणाला. आपण गांधीजींच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून एक दिवस का होईना तुरुंगवास सोसला, याचा आनंद आणि आपण निर्भयतेने त्यामुळेच बोलू शकतो, हा विश्वास जागा झाला असे दिलीप कुमार यांनी यात म्हटले आहे.
खूप मोठा अभिनेता, त्याहून मोठा माणूस, अलौकिक असा जणू हिराच! या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सायरा बानो यांनी माझा कोहिनूर, असा त्यांचा प्रेमाने उल्लेख केला आहे. दिलीप कुमार अजून काही काळ थांबले असते तर पुढील वर्षी सा-या देशाने त्यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस किती आनंदाने साजरा केला असता!