– डॉ. विद्याधर वाटवे
दोन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्यामुळे पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांमध्ये या महिलेचा कोरोना बळावला, त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. १५ दिवसांनी त्या कोरोनामधून बाहेर पडल्या खर्या, मात्र त्यांना छातीत दुखण्याचा नवीन त्रास सुरु झाला. हे कशामुळे होतंय म्हणून त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या, पण त्यात या त्रासाशी संबधीत काहीच सापडले नाही. अखेरीस हे कशामुळे होतंय याचा शोध घेण्यासाठी हा सगळा विषय मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी याचा शोध घेतला तेव्हा कोरोना झालेल्या महिलेला होणारा हा त्रास मानसिक कारणामुळे होत असल्याचा निष्कर्ष समोर आला. कोरोना झाल्यापासून ही महिला घरच्या मंडळींपासून दूर होती. हॉस्पिटलमध्ये तिच्या आजूबाजूला असणारे डॉक्टर, परिचारिका पीपीइ किट घालून वावरत होते, त्यामुळे अनेक दिवसांपासून या महिलेचा कोणाशीच संवाद झाला नव्हता. त्यामुळे तिला सुरु झालेला मानसिक त्रास हा छातीच्या दुखण्यातून बाहेर पडत असल्याचे निदान झाले. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांनी उपचार केले, तिचे समुपदेशन केले, महिलेला तिचे नातेवाईक भेटले, त्यांच्याबरोबर संवाद झाला. आतापर्यंत बिघडलेली या महिलेची घडी पुन्हा पूर्वपदावर आली आणि कोरोनामुळे जडलेल्या मानसिक आजारातून तिची सहीसलामत सुटका झाली.
हा अनुभव सांगण्यामागचे कारण म्हणजे कोरोना झाल्यानंतर मानसिक स्वास्थ बिघडते का असा प्रश्न अनेकांना पडतोय, काही दिवसांपूर्वी विदेशात याबाबत एक सर्वेदेखील झाला होता, त्यामध्ये त्याचा मनावर परिणाम होत असल्याचे समोर आले असले तरी कोरोना झालेल्या प्रत्येकाचेच मन:स्वास्थ बिघडतेच असे नाही.
व्यक्तिमत्व महत्वाचा घटक
कोरोनानंतर संबधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी त्याचे व्यक्तिमत्व हा घटक सर्वात महत्वाचा ठरतो. ज्या व्यक्तींना वास्तवाची चांगली जाण असते, समोर निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असते, अशा मंडळींना मानसिक त्रास होत नाही. आपले व्यक्तिमत्व हे पूर्णपणे स्वभावावर अवलंबून असते. काही जणांचा स्वभाव हा अतिकाळजी करणारा असतो तर काहीजण हे भिडस्त असतात, त्यांना कशाचीच काळजी नसते. होईल तेव्हा बघू अशी वृत्ती काहीजणांमध्ये असते. त्यामुळे मानसिक स्वास्थाचा ९० टक्के भाग हा आपल्या व्यक्तिमत्वावर अवलूंबून असतो असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.
अवाजवी काळजी, चिंता आणि भीती
आतापर्यंत अनेक संसर्गजन्य आजार आले होते. त्यामध्ये प्लेग, कॉलरा, स्वाईनफ्लू, इन्फ्लुएंझा अशा अनेक आजारांचा समावेश होता. हे आजार झाल्यानंतर माणसांना कोणत्या मानसिक आजारांचा सामना करावा लागला होता का, याची नोंद कुठेही उपलब्ध नाही. मात्र, आता आलेल्या कोरोनामुळे काहीजणांना मानसिक आजारांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कोरोनामुळे प्रत्येकाच्या मनात असुरक्षेततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे साधी सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणं असणारी मंडळी चिंता आणि भीती यामध्ये ग्रासलेली आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतर काहीजणांच्या मनावर अचानक वाढणारा ताण, तीव्र नैराश्याची भावना, चिंता आणि भीती वाढल्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. कोरोनामुळे बदललेली जीवनशैली, लॉकडाऊन अशामध्येच कोरोनामुळे एखाद्या आप्तेष्टाचा मृत्यू झाल्यानंतर कोसळेल्या दुःखाचा डोंगर यामधून बाहेर पडण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे, त्यातून अनेकांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत आहे, त्याचा परिणाम मानसिक स्वास्थावर होत असून त्यातून डिप्रेशन सारख्या समस्या निर्माण होत आहेत.
कोरोना काळात मानसिक स्वास्थ हरवण्यासाठी या बाबी प्रमुख कारणे ठरत आहेत..
कोरोनाच्या काळात अनेकांना दीर्घकाळ नेहमीच्या वातावरणापासून दूर राहावे लागत आहे. या खेरीज लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अचानकपणे काम बंद झाल्यामुळे किंवा नोकरी गेल्यामुळे समोर बेरोजगारीची समस्या निर्माण झाल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कोरोना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंतच्या काळात खास करून झोप, काळजी आणि नैराश्य याचे प्रमाण सुमारे २५ ते ३० टक्यांपर्यंत गेल्याची शक्यता आहे.
मानसिक स्वास्थ ठीक ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून करा!
– आपल्या समोर निर्माण झालेली वस्तुस्थिती मान्य करा. वास्तव स्वीकारा आणि त्यानुसार कृती करा.
– आपल्या भावनिक वेदनांवर नियंत्रण ठेवा.
– पुढे काहीतरी चांगला मार्ग निघणार आहे, अशी भावना मनात ठेवा.
– कायम सकारात्मक विचार करत असताना मन आनंदी ठेवा.
– दुःखात फार काळ अडकून न बसता नवे मित्र जोडा आणि नातेसंबंध घट्ट करा.
– मानसिक स्वास्थ बिघडतेय असे वाटले तर शास्त्रीय निकषावर आधारित असणारे उपचार घ्या. कौन्सिलिंगची मदत घ्या.
– बाहेर काय सुरु आहे याची जाणीव ठेवा. चुकीची माहिती वाचून मनातला संभ्रम वाढवू नका.
भविष्याच्या काळजीत भर टाकू नका
सध्या आपले जे काम सुरु आहे, ते खंड न पडता सुरु ठेवा. उगाच भविष्याची काळजी करत मानिसक त्रास वाढवण्याचे काम करू नका. कोरोना येण्यापूर्वी काही पालकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचे नियोजन केले होते, त्याची तयारीदेखील अनेकांनी केली. मात्र, आता पुढे काय होणार या चिंतेत अनेकजण सापडले आहेत. त्याचा विचार आता करण्याची काही गरज नाही. ही परिस्थिती निवळेल आणि आपल्याला योग्य मार्ग सापडेल असाच सकारात्मक विचार करणे आता गरजेचे आहे, त्यामुळे मानसिक अवस्था चांगली राहण्यास मदत होईल.
माईंडकुलनेसकडे ध्यान द्या!
कोरोनामुळे बिघडत असणारे मानसिक स्वास्थ ठीक ठेवायचे असेल तर आपण माईंडकुलनेसकडे ध्यान देणे आवश्यक आहे. आपली जीवनशैली सध्या बदललेली आहे, त्यामुळे ध्यान, योगा याबरोबरच थोडे वेगळ्या विषयांवरील अवांतर वाचन किंवा लिखाण करणे, वेगळ्या छंदात मन रमवणे, नवा एखादा उपक्रम करता येईल का याचा विचार करणे. नेहमीच्या कामाबरोबरच अन्य गोष्टींमधून स्वतःला गुंतवून ठेवणे, यामुळे आपले मन:स्वास्थ चांगले आणि आनंदी राहण्यास मदत होईल.
– डॉ. विद्याधर वाटवे
( लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत )
सहयोग – डॉ. सायली खरे (मानसतज्ज्ञ), डॉ. ज्ञानदा देशपांडे (मानसोपचारतज्ज्ञ)
(शब्दांकन : सुधीर साबळे)