सिंधी कुटुंबात जन्माला येऊनही मराठी संस्कृतीशी एकरूप झालेल्या, मराठी भाषा आणि वाङ्मयावर प्रभुत्व असलेल्या ‘स्वातंत्र्यपूर्वकालीन समाजधुरिणांच्या निबंध वाङ्मयातील स्त्री सुधारणावादाचे दर्शन’ हा प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवणार्या डॉ. उषा चं. रामवाणी-गायकवाड यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी म्हणजे त्यांचं ‘निर्वासित’ हे आत्मकथन. लेखन, संपादन, मुद्रितशोधन, प्रकाशन व्यवसाय या व्यवसायात त्यांनी प्रचंड अपमान आणि मन:स्ताप सहन केला, पण अखेर ध्येयपूर्ती केलीच.
– – –
भारताची फाळणी ही आपण सर्वांच्याच मनात दीर्घकाळ ठसठसणारी वेदना आहे. राजकीय आणि धार्मिक हेतूंनी प्रेरित होऊन झालेल्या या फाळणीचा निखारा तळहातावर घेऊन शतकानुशतकं शांततामय जीवन जगणार्या असंख्य निष्पाप सिंधी बांधवांचा नरसंहार होऊन उर्वरित लोक जगभरात वणवण भटकत राहिले. राखेतून पुन्हा उड्डाण करण्याच्या विजिगिषू वृत्तीमुळे या विस्थापित बांधवांना नव्या अपरिचित वातावरणात रुजण्यासाठी अनंत यातना भोगाव्या लागल्या. पाकिस्तानात सगळा जमीनजुमला, मालमत्ता सोडून अंगावरच्या कपड्यांनिशी कित्येक सिंधी बांधवांना यावं लागलं. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेल्या कित्येक सिंधी बांधवांना सर्वस्व गमावल्याने दुर्दैवाचे दशावतार साहून शून्यापासून नवी सुरुवात करावी लागली. उद्यमशील वृत्तीमुळे ते भक्कमपणे उभे राहिले, लढले, जिंकले. गरिबी, असहायता, अगतिकता, गुन्हेगारी त्यांना सहसा माहीतच नसते. कुशल व्यवहारी, सरळमार्गी, उदार, दिलदार, कोणाच्या अध्यात मध्यात नसलेले, पापभीरू असलेले हे लोक दैववादी नाहीत, त्यांच्यात देवपूजा नाही. मिठास वाणी हा या समूहाचा विशेष गुणधर्म. सिंधी समाज प्रामुख्याने ओळखला जातो तो व्यापार-उदीम यासाठी. त्यांच्यात शेती कमी असते. सिंधी लोकांची झोपडपट्टी नसते. ते भिकारी नसतात, श्रमांची त्यांना लाज नसते. दोन नंबरचा काळा पैसा त्यांच्याकडे असेलही, पण ते व्यापारी असल्याने ही बाब उघडकीला येते, एवढंच! भ्रष्टाचार कमी अधिक प्रमाणात सगळीकडे छुपेपणाने असतोच!
सिंधी समाजातही चातुर्वण्य व्यवस्था असली तरी अमुक समूह उच्च किंवा कनिष्ठ असा जन्माधारित वर्गभेद मात्र इथे नाही. जातींची उतरंड नाही. ‘ब्राह्मण’ इथेही आहेत. तरी सार्वत्रिक विकासाच्या दृष्टीने काही जमाती खूप उंचीवर आहेत. साधारणपणे पाकिस्तानातल्या ज्या ठिकाणी पूर्वजांच्या वसाहती होत्या त्या शहरांवरून पोटजातींची नावं रूढ झाली. उदा. शिकारपुरी, हैद्राबादी वगैरे. स्थलांतरित बहुसंख्य समाज उल्हासनगरला स्थायिक झाला.
कागदोपत्री मागास नसलेल्या, आधुनिक विचारांचे कुठलेही संस्कार न झालेल्या ‘लासी’ नामक तळागाळातल्या जमातीतून मी ‘वर’ आले. संख्येने मूठभर असलेल्या या जमातीबद्दल इतर ‘उच्चवर्णीय’ सिंध्यांनाही सहसा माहीत नसतं. ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल अशा अप्रगत व विकासाच्या प्राथमिक अवस्थेतली ही जमात! पाकिस्तानच्या लसबेला शहरात स्थायिक असलेल्या या जमातीची जगाच्या पाठीवर जेमतेम तीनशे कुटुंबं अस्तित्वात असतील. त्यापैकी उल्हासनगरात सुमारे अडीचशे, शहापुरात (माझं गाव) २५-३०, मुंबईत ४-५च कुटुंबं आहेत. या मूठभर समाजातला प्रत्येकजण साधारणपणे जवळून, लांबून प्रत्येकाचा नातेवाईक असतो. वंजाराणी, थेराणी, मलवाणी, आसवाणी, तारवाणी, सेवकानी, मजेठिया, चोहिथाणी, कारिया ही आमच्यातली मोजकी आडनावं. समाजात वावरणारे इतर सिंधी आमच्या तुलनेत ‘उच्चवर्णीय’. अडवाणी, लालवाणी वगैरे आमच्याकडची एलिट आडनावं. विशेषत: पुढारलेल्या इतर सिंधी लोकांना याची कल्पनाही नसेल की सामाजिक दृष्टीने अशी मागास जमात आपल्यात आहे! लासी जमातीची नकारात्मक पार्श्वभूमी इथल्या पांढरपेशांच्या खिजगणतीतही नसते. सिंधी लोकांमध्ये लासी सोडून सगळे ‘मी’ या शब्दासाठी ‘मां’ हा शब्द वापरतात. लासींमध्ये ‘मी’साठी ‘आऊं’ प्रचलित आहे.
अठरा विश्व सामाजिक आणि वैचारिक मागासलेपण हे तर आमच्या पाचवीला पुजलेलं! पिढ्यानपिढ्या रूढीप्रियतेमुळे अपेक्षित विकास व सामाजिक परिवर्तन इथे होऊ शकलं नाही. आज बाह्य समाजात आमची कोणतीच ओळख नाही. भौतिकतेचा अतिरिक्त सोस, वैज्ञानिक व सुशिक्षित मानसिकतेचा अभाव, कमालीची स्त्रीपुरुष असमानता; शिक्षण, कला, ज्ञान, सामाजिक भान यांपासून दूर असणं, उत्सवप्रियता, चंगळवाद ही या जमातीची ठळक वैशिष्ट्य. माझ्या समाजातली मुलांचीही पहिली पिढी नुकतीच कॉलेजला जातेय. मुलं पारंपरिक व्यवसाय सांभाळतात. विशेषत: कापड-कपडे विकणं हा आमच्याकडचा पारंपरिक व्यवसाय. पक्का व्यापारी दृष्टिकोन रुजल्याने नोकर्या करत नाहीत; त्यामुळे शिकत नाहीत. परिणामी, मुलीही शिकत नाहीत. अजूनही एक टक्काच पुरुष नोकरी करत असतील. एखादाच डॉक्टर किंवा वकील असतो. पण अशा मूठभर सुशिक्षितांत सामाजिक जाणीवा आढळत नाहीत. व्यवसाय करायला किती शिक्षण लागतं, ते नसलं तरी कुठे बिघडतं असा दृष्टिकोन इथे आढळतो. सगळाच सिंधी समाज व्यवसायावर पोसलेला. व्यावहारिक व व्यावसायिक मूलगामी दृष्टिकोन पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेला. माझ्या समाजातली गावात असलेली दोन मुलं माझ्या आगेमागे दहावीला पहिली आलेली. पण इच्छा असूनही पुढे न शिकता ती मुलं पारंपरिक व्यवसायात पडली.
लासी समाजातलं स्त्रीजीवन कस्पटासमानच असतं! बाईला लिहिता वाचता यावं, ती अगदीच अक्षरशत्रू असू नये, तिला व्यवहारापुरतं तरी ज्ञान असावं एवढाच आमच्याकडे स्त्रीशिक्षणामागचा उद्देश असतो. गृहिणी असणं हेच इथल्या स्त्रीचं अंतिम ध्येय असतं. गृहकृत्यदक्षतेचे बाळकडू, प्राथमिक शिक्षणापासूनच तिला दिले जातात. पापड ही आमच्याकडची खासियत. प्रत्येकाच्या घरात ते असतातच. हे पापड किंवा पुरी पातळ लाटता येणं आणि पापड गॅसवर हाताने भाजता येणं ही आमच्याकडे गृहकृत्यदक्षतेची पावती समजली जाते. हे दोन्ही प्रकार लहानपणापासूनच मला उत्तम जमत. शिवणकला अवगत असणं हेही आमच्याकडे महत्त्वाचं मानलं जातं. माझी आई आणि समाजातल्या अन्य स्त्रियाही जास्तीत जास्त सातवीपर्यंत शिकलेल्या. माझ्या समवयीन स्त्रिया सातवीच्या पुढे अपवादानेच शिकल्या असतील. मॅट्रिक म्हणजे आमच्याकडे आता आतापर्यंत सर्वोच्च शिक्षण समजलं जाई. कॉलेजचं एखाददुसरं वर्ष झालेली मुलगी अपवादच! अशी मुलगी आमच्याकडे ‘पढी लिखी’ असते. शिकलेल्या मुलीचं लग्न समाजात होत नाही. अगदी शहरात आधुनिक कुटुंबांत वावरणार्यास, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या मुलींनाही कॉलेजचा मार्ग मोकळा नसतो. कॉलेजची एखाददुसरी पायरी चढलेल्या मुलींसाठी जातीत वरसंशोधन दुरापास्त असतं. क्वचित आज पदवी मिळवलेल्या मुलीही रूढीशरण होऊन मग कमी शिक्षित मुलाशी लग्न करून ‘सुखी’ संसार थाटतात! ठाणे, पुणे अशा शहरांत वाढलेल्या माझ्या दोन मावस बहिणी दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्या. दहावीनंतर लग्न होऊन दोघींना तीनतीन मुली झाल्या, मुलगा व्हायचे प्रयत्न त्यांनी सोडले! मुलाच्या प्रतीक्षेत पाच मुली झाल्या, अखेर नातलगांकडून मुलगा दत्तक घेतला, असंही उदाहरण समाजात आहे. ठरवून एकच मुलगी किंवा एकच मुलगा जन्माला घातलेली अपवादात्मक कुटुंबं आमच्याकडे आज आढळतात. माझ्या पिढीतल्या मुली चाळिशीच्या आत सर्रास आज्या होत.
माझ्या नात्यातल्या एका वकिलाची उल्हासनगरला असलेली एक मुलगी हुशार, महत्त्वाकांक्षी होती. दहावीला पहिली आलेली. पुढे शिकायची तिची खूप इच्छा होती. तिच्या वडिलांनाही तिला शिकवायचं होतं. पण आई आणि आजी त्याविरुद्ध होत्या. अकरावीनंतर तिचं शिक्षण बंद झालं. ती खूप रडली. काही उपयोग झाला नाही. तिला जाड भिंगाचा चष्मा होता. त्यामुळे तिचं लग्न होत नव्हतं. मग माझ्याच गावातल्या एका वेडसर पण श्रीमंत मुलाशी तिचं लग्न लावून दिलं गेलं. नाशिकच्या एका वकिलांना चार मुली होत्या. हुशार होत्या. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या. पण एकीलाही कॉलेजात जाता आलं नाही. अनेक पुरुषांना वाटतं, आपल्या मुलींनी शिकावं, कमवावं. पण त्यांच्या व्यावहारिक आया वा आज्यांपुढे बिचार्या पुरुषांचीही डाळ शिजत नाही! कॉलेजमध्ये मुलं-मुली बिघडल्या तर, शिकलेल्या मुलीशी लग्न कोण करणार? मुलींना शिकून नोकर्या कुठे करायच्यात? असे त्यांचे विचार असत. सासुरवासात पिचणार्या अशा कितीतरी अर्धशिक्षित जातभगिनींची आयुष्यं उद्ध्वस्त झाली असतील.
आमच्याकडच्या दोन महिला एकत्र आल्यावर त्यांच्या गप्पांचे विषय असतात- लग्नं, कोण गरोदर आहे? कोणाला कितवा महिना लागला? सोनं, पैसे वगैरे असलेल्या मुलींबाबत घटस्फोट, हुंडाबळी, विवाहबाह्य प्रेमप्रकरणं क्वचित आढळतात. विभक्त कुटुंबपद्धती आमच्याकडे विरळाच. लग्नपद्धत तर पूर्ण ओंगळवाणी असते. आमच्याकडचे लग्नसमारंभ म्हणजे श्रीमंतीचं किळसवाणं प्रदर्शनच! सगळाच नको इतका थाटमाट, झगमगाट, रोषणाई, छानछोकी… मुलामुलींची लग्नं जमली, की ग्रूप मॅरेजेसची संकल्पना राबवली जाते. त्यामुळे नात्यातल्या इतरांची लग्नं जमेपर्यंत काहींची लग्नं खूपदा रखडवली जातात. एका मांडवात जास्तीत जास्त लग्नं उरकण्याची पद्धत आजही बर्याच ठिकाणी आढळते. आमच्याकडे ‘मुहूर्त’ नसतात. त्यामुळं लग्नं अनिर्बंध लांबली जाऊन लोकांना खूप वाट पाहावी लागते. आमच्याकडे मुलीला मुलांकडून मागणी यावी लागते. सुंदर असलेल्या, श्रीमंत आईबापांच्या मुली पटकन ‘खपतात’. मुलींसाठी चांगलं स्थळ म्हणजे मुलगा श्रीमंत, सुंदर आणि निर्व्यसनी असणं इतकंच. ती, तो काय करतात असे प्रश्न आमच्याकडे कधीच चर्चिले जात नाहीत. कमी शिक्षण कशाच्याच आड येत नाही. उलट, शिकून मुलींची लग्नं होत नाहीत. एकूणच, सगळ्यांसाठीच लग्न हे एकमेव करीअर! वयात आल्यावर ठरवून दिलेल्या जोडीदाराशी मुलामुलींची लग्नं लावून आईवडील मोकळे होतात. आधुनिक शहरी, मनाने अपरिपक्व मुलींनी नियोजित वराचं मुखही पाहिलेलं नसतं. माझी एक भाची सतराव्या वर्षी जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडली. तो एकोणीस वर्षांचा होता. भाची अठरा वर्षांची होईपर्यंतच वाट पाहिली गेली नाही!
आपलं शाश्वत सुख, स्वातंत्र्य आणि आत्मभान यांचा साधा अर्थसुद्धा माहिती नसणार्या असंख्य महिला माझ्या अवतीभोवती आहेत! कायम आर्थिकदृष्ट्या परतंत्र, नटणार्या, नाचणार्या, प्रचंड कष्ट करणार्यास गृहिणी पाहातच मी वाढले. भौतिक सुखाच्या कोशात, लौकिक वातावरणात या महिला तर इतक्या अडकून पडतात की त्यामुळे शिक्षण, विचार, कर्तृत्त्व, सामाजिक जाणिवांचा त्यांच्यात अभाव दिसतो. स्वान्तसुखाय शिकावं, कमवावं, ‘काही’ करावं अशी गरज या महिलांना बहुधा वाटत नाही. टिपिकल बाईचा ‘सुखासीन’ संसार त्या करतात. मग कुठल्याही कारणाने संसारात क्वचित बेबनाव निर्माण झाला, जोडीदाराचा मृत्यू झाला की कळवळायला होतं. आज या भगिनी शिक्षित असत्या तर! मुलींनी नोकरी करणं आजही कमीपणाचं समजलं जातं. कपड्यांची विक्री, ब्युटीशियन असे उद्योग परिस्थितीवश अपवादानेच काहीजणी करतात. अनेकींना सुप्तपणे नक्की वाटतं, त्यांनी एकतर वास्तव स्वीकारलेलं तरी असतं किंवा पालकांना विरोध करायची त्यांच्यात हिंमत तरी नसते. अनिष्ट रूढी, परंपरांविरुद्ध ब्र उच्चारण्याची कोणाचीही टाप नसते. हेही खरं की, बंडखोरी त्या कशाच्या बळावर करणार? मुली महत्त्वाकांक्षी निपजाव्यात अशी इच्छा असणारे आईबाप आमच्याकडे अजून निपजायचेत. पालकही व्यवस्थेचेच गुलाम! सगळंच दुष्टचक्र… भौतिक सुखासीनतेच्या कोशात असलेल्या या अर्धशिक्षित जातभगिनींना आजच्या स्त्रीसमानतेच्या युगातही आपल्यावर अन्याय होतोय हेच मुळी अजूनही कळत नाही. त्यामुळे मानसिक मुक्ती, शैक्षणिक व वैचारिक जागृती वगैरे फारच दूरची बाब! स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेच्या आसपास यायला काही पिढ्या जातील. कोणाला आवश्यकताच वाटत नाही. किंबहुना हा शब्दच कानांवरून गेलेला नसेल.
आमच्याकडे हुंडापद्धत नसते, तरी मुलीचं लग्न म्हणजे आईबापांचं मरणच असतं! ठरलेल्या रिवाजांप्रमाणे लग्न व्हावंच लागतं, त्यात गरीब-श्रीमंत असा भेद नसतो. ‘बडी’ लोकं त्यांच्या सोयीनुसार लग्नपद्धतीत बदल घडवत असतात. मुलीला ठरावीक रकमेची एखादी वस्तू द्यायची अशी पद्धत असेल तर बडी धेंडं दिखाऊपणाचं प्रदर्शन म्हणून अधिक रकमेची वस्तू खरेदी करतात. मग स्पर्धा म्हणून सामान्यांतही तीच पद्धत रूढ होऊन त्यांचा बळी जातो. मुलीच्या लग्नानंतरही आईवडिलांच्या जबाबदार्या संपत नाहीत. आर्थिक देवाणघेवाण आयुष्यभराची असते. अज्ञान व पैशांच्या देवाणघेवाणीवर आधारित रूढींचं इतकं प्राबल्य असतं की त्या जपणंच सुखवस्तू समाजातल्या या लोकांचं ध्येय बनतं. ‘गिफ्ट’ या अर्थी देण्याघेण्याऐवजी पैसे देण्याघेण्याची पद्धत आमच्याकडे अजूनही रूढ आहे. विशिष्ट सणाला मुलगी, जावई, व्याही किंवा अन्य कोणाला किती पैसे द्यावेत हे ठरलेलं असतं. परिस्थितीनुसार किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव फरक पडलाच तर खूप गाजावाजा होतो. कित्येक दिवस अनेक घरांत तेच विषय चर्चिले जातात. रुसवे फुगवे घडतात. एखाद्या श्रीमंत पार्टीने काही जास्त दिलं, घेतलं तर स्पर्धा म्हणून तेच रिवाज पडतात. मग मध्यमवर्गीय नाडले जातात, भरडले जातात. आमच्याकडे ज्येष्ठांच्या सर्रास पाया पडलं जातं. अशा वेळी ज्येष्ठांनी पैसे देण्याची पद्धत असते. (अविवाहित मुलींबाबत ही पद्धत नाही.) लग्नकार्यात तर पैसे सर्रास ओवाळले जातात. चमचमाट, दागिने, मेकअप, सौंदर्यप्रसाधनं, छानछोकी, सिनेमे पाहणं, अरबट-चरबट खाणंपिणं, मनोरंजन, नाचगाणी, फॅशन, अध्यात्म हेच या लोकांचं विश्व! सुखसमृद्धीच्या या चौकटीपलीकडच्या व्याख्या इथे नाहीत.
हे लोक जातीवर अतोनात प्रेम करतात. मुलामुलींची जातीतच लग्न करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. मुलामुलींचं जातीत लग्न नाही तरी बेहत्तर, पण इतर सिंध्यांत करणार नाही, अशीच मानसिकता आजही इथे आढळते. आपल्या जातीत लग्नं करण्यात ‘गोडी’ असते असं यांचं मत. आईबाप समाजाला घाबरतात. ते बाहेर ‘फेकले’ जातात. क्वचित, शििक्षत वृत्तीचं कुटुंब असलं किंवा शिक्षित पुरुषाने अन्य जातीतल्या शिक्षित स्त्रीशी लग्न केलं तर असे लोक समाजाशी फटकून राहतात, समाजाच्या सुखदु:खांशी त्यांना देणंघेणं नसतं.
आमच्याकडे बुद्धिवंत, विचारवंत, अभिजात रसिक नाहीत. कर्तृत्त्ववान अशा किती सिंधी स्त्रीपुरुषांची नावं डोळ्यांसमोर येतात? ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वत्र अंध:कारच आढळतो. कला, साहित्य, संगीत, नृत्य, क्रीडा अशा सिव्हिलायजेशनबाबत इथे ठणठणाटच आढळतो. सामाजिक भान असलेली व्यक्ती तर आमच्याकडे नाहीच. माझ्या आत्याचे अमेरिकेत डॉक्टर असलेल्या दिराने एका गरजू जातभगिनीच्या लग्नकार्यासाठी ५०,००० रुपयांची मदत केली होती. पण त्यापलीकडे त्यांचं समाजकार्य दिसलं नाही. पूर्वजांत एखाद्या क्षेत्रात चमकून नावलौकिक मिळवलेली एकही व्यक्ती माझ्या समाजात नाही. पाल्याने महत्त्वाकांक्षी, कर्तृत्त्ववान निपजावं असं वाटणारा, शिक्षणाचं योग्य महत्त्व जाणणारा आमच्याकडचा पालक मला तरी माहीत नाही. त्यामुळे पाल्यासाठी राबणं, झिजणं, खस्ता खाणं, कोंड्याचा मांडा करणं, पोटाला चिमटा घेणं, पाल्याला वळण, शिस्त लावून त्याला सुसंस्कारित करणं, परस्पर सुखासाठी झटणं वगैरे त्यागाचे प्रकार आमच्याकडे दिसत नाहीत. त्यासाठी व्यक्तिश: खूप किंमत मोजावी लागते, स्वार्थत्याग करावा लागतो. मुलांना कोवळ्या वयात प्रेम, विश्वासाने, कठोरपणे, धाकधपटशाने ऐकणं भाग पाडलं नाही तर मोठेपणी मुलं डोक्यावर बसतात. आमच्याकडच्या पालकांना या सगळ्याच महत्त्व शेवटपर्यंत कळत नाही. माझ्या समाजात ‘नातेसंबंध’ हा प्रकार आढळतच नाही. नाती पूर्ण व्यवहारी असतात. ती जगायला आधारभूत ठरत नाही. नात्यातले बंध, जिव्हाळा निखळ नसतात. जवळची नाती हाही उपचारच असतो. मग जगायचा आधार म्हणून तरुण मुलंमुलीही देवदेव करतात. माझा समाज सिव्हिलाइज्ड नसणं ही ‘पोकळी’ही खूप अस्वस्थ करणारी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत सुती कपडे घालणं आमच्याकडे कमीपणाचं मानलं जाई. अगदी घरातले गाऊन, साड्या, परकरही सुती नसत, सिंथेटिक असत.
कधीतरी एखाद्याच्या वैयक्तिक प्रश्नांच्या न्यायनिवाड्यासाठी ‘पंचायत’ बसते. तिच्या प्रमुखाला ‘मुखी’ म्हणतात. ‘लासी पंचायत’ किरकोळ ‘सामाजिक’ कार्य करत असते. जगाच्या पाठीवरची अशी ही एकमेव जमात असेल. अशा या जमातीत जन्माला आल्याचं मला प्रचंड वैषम्य वाटतं. मुलगी शिकली प्रगती झाली असा काळ आमच्याकडे यायला किती शतकं जातील, माहीत नाही. आमच्याकडे ‘शल दियु न जमन…’ (नको तो मुलीचा जन्म!!) असा वाक्प्रचार आहे. त्याची कल्पना कोणीही करू शकणार नाही.