• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सामान्य माणसांचे थरारक साहस

- युवराज माने (मार्मिक प्राइम)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 16, 2023
in मनोरंजन
0

भोपाळवासीयांसाठी २ डिसेंबर १९८४ची रात्र ही काळरात्र ठरली. ‘युनियन कार्बाईड’ या कीटकनाशक बनवणार्‍या कंपनीतून अत्यंत घातक अशा मिथाईल आयसोसायनाईट या विषारी गॅसची गळती होऊ लागली. बघता बघता हा गॅस शहरभर पसरला आणि साखरझोपेत असलेले अनेक नागरिक खडबडून जागे झाले. डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेताना होणारा त्रास अशी लक्षणं सगळीकडे दिसू लागली. यावर काय इलाज करावा याची कल्पना सामान्य जनतेला नव्हती. त्यामुळे अनेक लोक दुर्दैवाने श्वास कोंडून मृत्युमुखी पडले. सगळीकडे अनागोंदीचं वातावरण होतं. मृत्यूचं भीषण तांडव सुरू असताना असेही काही लोक होते ज्यांनी या कठीण समयी आपला जीव धोक्यात घालून कित्येक जणांचे प्राण वाचवले. हे लोक एखाद्या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स किंवा कोणी प्रशिक्षित तज्ञ नव्हते, तर रेल्वेत काम करणारे सामान्य लोक होते. कसलीच साधनं हाताशी नसतांना आणि परिस्थिती हाताबाहेर जात असतांना या लोकांनी हार न मानता केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने हजारो जीव वाचवले. त्यांच्या या थरारक साहसावर आधारित असलेली ‘द रेल्वे मेन’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली आहे.
सीरिजचे मूळ कथानक सत्य घटनेवर आधारित असलं तरी त्यात काल्पनिक प्रसंग रचले गेले आहेत. भोपाळ जंक्शनचा स्टेशन मास्टर इफ्तिकार सिद्दीकी (केके मेनन) इमानेइतबारे नोकरी करतोय. आपल्या मुलानेही सरकारी नोकरी करावी अशी त्याची इच्छा असली तरी मुलगा मात्र ‘युनियन कार्बाईड’मध्ये काम करण्याचं स्वप्न बघतोय. इमाद रियाज (बाबिल खान) याची कहाणी मात्र अगदी याच्या उलट आहे. आधी ‘युनियन कार्बाईड’मध्ये काम करणारा इमाद आता तिथली नोकरी सोडून रेल्वेत काम करण्यासाठी प्रयत्न करतोय. भावासारख्या असणार्‍या मित्राला कंपनीच्या गलथानपणामुळे इमादने गमावलंय. कामगारांच्या सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवल्यामुळे मोहम्मद अन्सारी या इमादच्या जवळच्या मित्राचा वायुगळतीमुळे मृत्यू होतो आणि इमादला हा गॅस किती जीवघेणा आहे याची प्रचिती येते. मित्राच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी इमाद कंपनीच्या बेपर्वा वृत्तीचा पर्दाफाश करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या पत्रकार जगमोहन कुमावतला (सनी हिंदुजा) मदत करू लागतो. या मोहिमेला कंपनीत कामाला असणार्‍या कमरुद्दीनची (दिब्येन्दू भट्टाचार्य) त्यांना साथ मिळते. दुसरीकडे भोपाळ जंक्शनमध्ये असणार्‍या तिजोरीतले एक कोटी रुपये लुटण्यासाठी एक कुख्यात लुटारू (दिव्येन्दू शर्मा) पोलिसाच्या वेशात दाखल होतो. हे सर्व जण आपापल्या व्यापात व्यस्त असतानाच कंपनीत वायुगळती सुरू होते आणि संपूर्ण शहरावर मृत्यूचं सावट पसरायला लागतं. स्टेशनवरून पळ न काढता इफ्तिकार शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचा निर्णय घेतो. इमाद स्वमर्जीने तर लुटारू नाईलाजाने त्याला सामील होतो. भोपाळपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या इटारसी स्टेशनला तपासणीसाठी आलेल्या जनरल मॅनेजर रती पांडे (आर. माधवन) याला भोपाळमध्ये काहीतरी दुर्घटना घडल्याची कुणकुण लागते. रेल्वेची अधिकारी राजेश्वरी जांगलेला (जुही चावला) सगळी परिस्थिती समजावून पांडे जीव धोक्यात घालून मदतीसाठी भोपाळच्या दिशेने रवाना होतो. राजेश्वरी भोपाळकडे तातडीने मदत पाठवण्यासाठी मंत्रालयात विनंती करते. परंतु सरकारी लाल फितीचा कारभार आडवा येतो. भोपाळकडे धावणार्‍या गोरखपूर एक्सप्रेसमधले हजारो लोक विषारी गॅसच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असते. त्या ट्रेनमधला टीसी (रघुबीर यादव) एका शीख महिलेला (मंदिरा बेदी) दंगलखोरांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. इफ्तिकार, इमादपासून ते रती, राजेश्वरी यांच्यापर्यंत रेल्वेत नोकरी करणारे अनेक जण भोपाळमधील लोकांना वाचवण्यासाठी पुढे सरसावतात. ‘द रेल्वे मेन’ याच लोकांचं साहस सीरिजच्या चार भागांत प्रेक्षकांसमोर सादर करते.
अभिनयात सर्वच कलाकारांनी चोख काम केलं आहे. इफ्तिकारची कामाप्रति असणारी निष्ठा, स्टेशनमध्ये अडकलेले प्रवासी आपली जबाबदारी आहेत असं समजून त्यांना वाचवण्यासाठी केलेली धडपड, भूतकाळात हातून घडलेल्या एका चुकीचं ओझं अशा विविध भावभावना केके मेनन प्रभावीपणे साकारतो. दिब्येन्दू भट्टाचार्यने कंपनीत काम करणारा हतबल कामगार आणि वायुगळती झाली असताना शहराला वाचवण्यासाठी जिवावर उदार होणारा कमरुद्दीन उत्तम वठवला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुरक्षेकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष जगासमोर आणण्यासाठी इमादला महत्वाची कागदपत्रं देण्याचा निर्धार दिब्येन्दूच्या चेहर्‍यावर दिसून येतो. इमादच्या भूमिकेतील विविध छटा बाबिल खान दृढपणे पडद्यावर रंगवतो. आपल्यामुळे मित्राचा मृत्यू झाल्याची सल, वायुगळती झाल्यावर वाटणारी भीती, काहीही झालं तरी कंपनीचा खरा चेहरा उघडा पाडण्याचा निश्चय बाबिल लीलया साकारतो. इरफान खानचा मुलगा असला तरी हळूहळू बाबिल खान आता स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करतोय हे दिसून येतं.
‘मिर्झापूर’मधून लोकप्रिय झालेला तरुण अभिनेता दिव्येन्दू शर्मा याची व्यक्तिरेखा खलनायकी बाजाची असली, तरी कालांतराने ती सकारात्मकतेकडे झुकते. दिव्येन्दू हा बदल परिणामकतेने दाखवतो. रती पांडेची भोपाळ दुर्घटनेबद्दलची काळजी, रेल्वे कर्मचार्‍यांना भोपाळवासीयांची मदत करण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन आणि नोकरीवर गदा येऊ शकते हे माहिती असूनही उचललेलं धाडसी पाऊल हे प्रसंग आर. माधवन अनुभवाच्या जोरावर दमदारपणे साकारतो. रघुबीर यादव कळकळीने व्यक्तिरेखा साकारतो. जुही चावलाची भूमिका फार लांबीची नसली तरी महत्त्वाची आहे. अनेक प्रसंग जुही आपल्या नैसर्गिक अभिनयाने जिवंत करते. इतर लहान भूमिकेत असणार्‍या अभिनेत्यांची कामेही चांगली झाली आहेत.
सीरिजचं लेखन आयुष गुप्ता यांचं आहे तर दिग्दर्शन शिव रवैल यांनी केलंय. मोठमोठ्या कंपन्यांच्या बेफिकरीमुळे होणारी सामान्य जनतेची ससेहोलपट सीरिजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. भोपाळकडे मदत पाठवण्याच्या राजेश्वरीच्या धडपडीला राजकारण्यांचा मुर्दाड प्रतिसाद पाहून खेद वाटतो. एका परदेशी संशोधकाकडे या बिकट परिस्थितीवर ताबा मिळवू शकेल असा उपाय असताना आणि तो स्वत:हून मदतीसाठी तयार असतानाही त्याच्याकडे केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष पाहून प्रेक्षकांचा संताप होतो. एकीकडे मृत्यूचं थैमान सुरू असताना सरकारी यंत्रणा लालफितीचा बाऊ करत दिरंगाई करत राहते, हे सीरिजमध्ये परखडपणे दाखवलं जातं. इतरही काही वादग्रस्त घटना दाखवताना सीरिज हात आखडता घेत नाही. यासाठी यशराजचं कौतुक करायला हवं. वेबसीरिज प्रकारात त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असूनही त्यांनी कथानकाचा चांगला अभ्यास केलेला दिसून येतो. पटकथेला अनुसरून त्या काळातील दूरदर्शनवरील बातम्यांचे तुकडेही सीरिजच्या चित्रीकरणाबरोबर जोडण्यात आले आहेत. तसेच काही बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेल्या खर्‍या फुटेजसारखे सेटही उभारण्यात आलेत. व्यक्तिरेखांची वेशभूषाही तंतोतंत तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे एकूणच सीरिजच्या अस्सलपणात भर पडण्यास मदत झाली आहे. सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स वापरण्यात आले आहेत. खासकरून धावत्या रेल्वेची आणि वायुगळतीची अनेक दृश्य व्हीएफएक्स वापरुन चित्रित करण्यात आली आहेत. याशिवाय पार्श्वसंगीताचाही खुबीने वापर करण्यात आला आहे.
भोपाळ वायुगळतीची दुर्घटना ही जगातील सर्वात विध्वंसक औद्योगिक दुर्घटना मानली जाते. भोपाळमध्ये राहणार्‍या जवळपास पाच लाख नागरिकांचा जीव वायुगळतीमुळे धोक्यात आला होता. सरकारी आकड्यांप्रमाणे साधारण दोन हजार लोक यात मृत्यूमुखी पडले तर पस्तीस हजारांवर लोक जखमी झाले. त्यातील कित्येकांना तर कायमचं अपंगत्व आलं. सर्वात दु:खद बाब म्हणजे यानंतर अनेक पिढ्यांना या विषारी वायूचे दुष्परिणाम भोगावे लागले. यानंतर जन्मलेली कित्येक बाळं काही ना काही आजार किंवा अपंगत्व घेऊनच जगात आली. एका शहराच्या वस्तीला लागून असणार्‍या जागेत एका केमिकल बनवणार्‍या कंपनीला विषारी गॅस साठवून ठेवण्याची परवानगी कशी मिळाली आणि सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवणार्‍या या कंपनीच्या मुख्य अधिकार्‍यांना इतकी संहारक दुर्घटना होऊनही भारतातून बाहेर जाण्यापासून सरकारने का रोखलं नाही असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रकरणात दोषी असणार्‍यांना सर्व लोकांना शिक्षा मिळाली आणि ज्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांना न्याय मिळाला असं आजही म्हणता येणार नाही. ‘द रेल्वे मेन’ याच कटू सत्याला समोर आणत त्या भीषण रात्री अविश्वसनीय कामगिरी करत हजारो जीव वाचवणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांचं थरारक साहस प्रेक्षकांसमोर सादर करते.

Previous Post

वजनदार

Next Post

चल उड जा रे पंछी…

Next Post

चल उड जा रे पंछी...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.