राजू केतकर, महेंद्र वैती किंवा मंगल अंजारिया यांच्यासारख्या शिवसैनिकांनी आजपर्यंत आपली निष्ठा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी तर राखलीच, पण साहेबांच्या जाण्याने जी पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली ती त्यांनी पक्षात राहूनच भरून काढायचा प्रयत्न केला. या शिवसैनिकांना कोणताच पक्ष विकत घेऊ शकला नाही.
—-
एके काळी ज्याला ‘करिश्मा’ म्हणतात तो साठ, सत्तर ते ऐंशीच्या दशकातल्या तरूण पिढीने अनुभवला. शिडात वारा भरलेल्या जहाजासारखी एक तरूण पिढी आपल्या शक्तिनिशी कोणाच्या तरी आदेशावर, मराठी माणसांचा द्वेष करणार्यांवर, तुटून पडायला उत्सुक होती. पण त्या तोलामोलाचे आदेश निघत नव्हते… आणि मग १९६६ सालच्या मध्यावर शिवाजी पार्कला शिवतीर्थावर तशा गर्जना होऊ लागल्या आणि मराठी माणसाला जागे करणार्या ‘मार्मिक’सारख्या व्यंगचित्र साप्ताहिकातून जंगलच्या राजाच्या ‘चित्रमय डरकाळ्या’ त्या तरुणांच्या कानी पडल्या.
‘मार्मिक’चे संपादक आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असे भारतीय व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून व्यंगचित्रांच्या लडी लावून तरुणांच्या कानांचे दडे बसवले… त्या आवाजाच्या दिशेने झुंडीच्या झुंडी शिवतीर्थावर जमल्या आणि भिरभिरलेल्या त्या तरुणांनी व्यंगचित्रकार आणि संपादक असलेल्या ‘बाळ ठाकरे’ यांना ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ असा महान किताब अर्पण करून, त्यांनी दिलेले आदेश पाळायला सुरुवात केली. मग ‘हटाव लुंगी, बाजव पुंगी’ या घोषणेसह मराठी तरूण पेटून उठला आणि ‘शिवसैनिक’ नावाची एक फळी महाराष्ट्रात उभी राहिली.
माझ्यासारखी अनेक शाळकरी मुलंसुद्धा त्या व्यंगचित्रांनी भारावली होती आणि स्वत:च्या वाडीत किंवा वस्तीत त्या चित्रांची जाहीर प्रदर्शने, वाचने करून ती चित्रे पाहून, हसून त्या राजकारण्यांची आपल्या परीनेसुद्धा खिल्ली उडवत होती. आम्ही शेवटपर्यंत चाहतेच राहिलो. पण कित्येक तरूण त्या भारावलेल्या अवस्थेत जे शिवसैनिक म्हणून उदयास आले ते आजपर्यंत शिवसैनिक म्हणवून घेण्यातच धन्यता मानतात. असे शेकडो, हजारो शिवसैनिक असतील पण माझ्या माहितीतले मी जवळून पाहिलेले शिवसैनिक, ‘मार्मिक’ साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त आठवले.
राजू केतकर (मुलुंड पश्चिम) आणि वानखेडे स्टेडियम
शिवतीर्थावरच्या एका सभेतील भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या सीमेवरील खोडसाळपणाचा खरपूस समाचार घेतला. इतकेच नव्हे, तर भारत-पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेट सामने बंद करा, नाहीतर शिवसेना आक्रमक होईल, असेही त्यांनी ठणकावले. त्यावेळी मुंबईत भारत-पाकिस्तान सामना होणार होता. ‘या पाकड्यांना मुंबईत पायही ठेवू देणार नाही…’ अशी घोषणाही त्यांनी केली… झालं… साहेबांची एवढी घोषणा शिवसैनिकांना पुरेशी होती. दुसर्या दिवशी मुलुंड पूर्वेला विभागप्रमुख शिशिर शिंदे यांनी मोजक्या सक्रिय कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी आपण सर्वांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भेटायचे, साहेबांनी एक मोठी घोषणा केली आहे, त्याचं पालन करायचे आहे… म्हणजे आदेशच पाळायचाय. नक्की काय करायचे याबाबत शिशिर शिंदे यांनी प्रचंड गुप्तता ठेवली. फक्त राजू केतकरला त्यांनी सांगितले की उद्या येताना कुदळ आणि फावडा घेऊन ये. तेव्हा राजू केतकरला जाणवले की काहीतरी वेगळे करायचे आहे. तशात दुसर्या दिवशी सकाळी ११ वाजता बाळासाहेबांची सेंटॉर हॉटेलवर पत्रकार परिषद होती, त्यापूर्वी सर्व कार्यभाग आटोपायचा होता.
सकाळी नऊ वाजता वानखेडे स्टेडियमच्या मेन गेटच्या बाहेर चार गाड्या लागल्या… दोन मोठ्या व्हॅन आणि दोन फियाट. पन्नासेक शिवसैनिक जमले होते. काही ट्रेनने येऊन पोहोचले होते. शिशिर शिंदे यांच्या गाडीतून राजू केतकर, संजय घागरे आणि दोघेजण होते. वानखेडे स्टेडियमवर प्रचंड पहारा होता. कारण पुढच्या आठवड्यात भारत पाकिस्तान मॅच होती. आणि त्या दिवशी भारत-वेस्ट इंडिजची मॅच टीव्हीवर सुरू होती. त्यामुळे घराघरात टीव्ही सुरू होते. शिशिर आणि राजू केतकर यांनी आधी जाऊन गुपचुप स्टेडियमची रेकी केली. त्यात त्यांना आढळले की एक छोटासा गेट उघडा आहे आणि बाकी सर्व गेट बंद आहेत. त्या छोट्या गेटमधून आत जायचे ठरले. राजू केतकर हा तसा अंगापिंडाने मजबूत, शक्तिशाली, आणि प्रेरित होऊन आदेश पाळणारा. शिशिर शिंदे यांनी गाडीच्या डीकीतून क्रूड ऑइलचा डबा काढला, आणि राजूने कुदळ-फावडा काढला. सगळे मिळून सातेक शिवसैनिक त्या छोट्या गेटमधून गुपचूप आत शिरले. कोणीही बघितले असते तर त्याला वाटले असते की ही सर्व कामगार मंडळी आहेत आणि मैदानावर काम करायला चालली आहेत. गेटमधून आत शिरता शिरता सर्वांना सांगण्यात आलं की आपण मैदानाच्या मध्यभागी असलेली विकेट उखडायला चाललो आहोत. विकेट उखडली की दहाएक दिवसांनी नियोजित असलेला भारत-पाकिस्तान सामना होणारच नाही, हे स्पष्ट होतं. म्हणजे बाळासाहेबांनी भाषणात केलेली घोषणा यशस्वी झाली असती. असे केले नसते तर बाकी सर्व भावना झुगारून पाकिस्तान संघ भारतात आला असता आणि सामना झाला असता. पिचजवळ पोहोचताच राजू केतकरने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देत त्यावर जोरदार कुदळ हाणली. पण खेळपट्टी इतकी टणक होती की त्या फटक्याने खेळपट्टीला फक्त बारीक भोक पडले आणि कुदळीचे दोन तुकडे झाले. वेळ कमी होता. त्या तुकड्याने खेळपट्टी खणायला सुरुवात केली गेली… तोंडात घोषणा होत्या, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’, ‘शिवसेना.. झिंदाबाद..’ खड्डे पडताच त्यावर शिशिर शिंदेनी क्रूड ऑइल टाकले.. क्रूड ऑइल खेळपट्टीत मुरू लागले.. त्यांनी केलेल्या रिसर्चमध्ये त्यांना कळलं होतं की क्रूड ऑइल खेळपट्टीत मुरलं तर महिना दोन महिने तरी खेळपट्टी खेळण्याजोगी राहणार नाही.
कार्यभाग उरकून सर्व शिवसैनिक बाहेर पडत होते… पोलिसांना कळत नव्हतं की नक्की काय चाललंय… आफ्टरनून या इंग्रजी वर्तमानपत्राचा एक छायाचित्रकार तिथे योगायोगाने हजर होता… त्याने झूम लेन्स वापरून पटापट फोटो काढले आणि प्रेसवर फोन करून झाली घटना सांगितली. शिशिर शिंदे यांनी तोपर्यंत ही घटना मातोश्रीवर कळवली की शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उद्ध्वस्त केली असून त्यामुळे आपोआपच भारत-पाकिस्तान सामना होऊ शकणार नाही. सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कागाळ्यांना उद्देशून साहेबांनी जे भाषण केले होते तो आदेश मानून शिवसैनिकांनी त्याचे पालन केले आहे. बातमी वार्यासारखी पसरली. दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हेडलाइन्स होत्या. ‘शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे शिवसैनिकांकडून आगळे वेगळे पालन’.
अर्थात शिवसैनिकांच्या दृष्टीने ते आंदोलन होते. रीतसर सर्वांना अटक झाली. त्यात राजू केतकर हा नंबर दोनचा आरोपी ठरला. चर्चगेट पोलिस स्टेशनमध्ये सर्व अटक झालेले शिवसैनिक ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देऊन पोलिस स्टेशन दणाणून सोडत होते. साहेबांच्या आदेशावरून मनोहर जोशी, वामनराव महाडिक आदि नेते मंडळीनी खटपट करून जामीन मिळवला आणि ती केस पुढे चारपाच वर्षे चालली. पुढे १९९५नंतर जेव्हा सेना-भाजप युतीचे राज्य आले, तेव्हा या केसचा निकाल लागला आणि सर्व शिवसैनिक निर्दोष सुटले. बाळासाहेबांना हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर भेटायला गेले तेव्हा साहेबांनी सर्वांना प्रेमपूर्वक जवळ घेतले. आणि एक वॉर्निंगही दिली. ‘यापुढे असा वेडेपणा जिवावर उदार होऊन करू नका’. पण ऐकतील तर शिवसैनिक कसले? अशा प्रेमळ धमक्या पण त्यांच्यासाठी आदेशच होते.
आज इतक्या वर्षांनी राज केतकर साहेबांच्या आठवणीने भावुक झाला होतात. अनेक आंदोलने झाली. साहेबांनी प्रत्येक वेळी यांचा वेडेपणा स्वत:चा आदेश होता असे भासवून सांभाळून घेतले. पण शिवसैनिकांना कुठे खाली पडू दिले नाही. अगदी बाबरी मशिदीपर्यंत.
महेंद्र वैती… शिवसैनिक आणि माजी नगरसेवक, मुलुंड
शिशिर शिंदे यांच्याच विभागप्रमुखत्वाखाली बाळासाहेबांचा आदेश पाळणारा आणखी एक शिवसैनिक म्हणजे महेंद्र वैती… मुलुंडच्या शाखेने जेवढी म्हणून आंदोलने केली त्यात अग्रेसर असणारा शिवसैनिक- मग ते रास्ता रोको असो वा ट्रेन रोको असो.
शाखेतर्फे जनतेसाठी अनेक उपक्रम राबवले जात. त्यात कधी धान्यवाटप असे तर कधी वह्या पुस्तकांचे वाटप असे. त्यावेळचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते प्रिन्सिपल मनोहर जोशी यांच्या हस्ते स्वस्त दरात पाम तेलाचे वाटप होणार होते. आणि अगदी ऐन वेळी मुलुंडमधल्या हिंदुस्तान ऑइल डेपोने तेलाचे डबे गायब केले. खरे तर शिवसैनिकांनी रीतसर ड्राफ्ट पेमेंट देऊन तेल विकत घेतले होते, फक्त डिलिव्हरी घ्यायची होती. मनोहर जोशी सर येणार आणि तेलच गायब हा प्रकार शिवसैनिकांना मानवणारा नव्हता. पुन्हा सर्व शिवसैनिकांचा मोर्चा हिंदुस्तान ऑइल डेपोकडे आला. महेंद्र वैती सर्वांत पुढे. शाखाप्रमुख मंगल अंजारिया, राजू केतकर, शिशिर शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभे ठाकले. महेंद्र वैतीने मालकांच्या गळ्यावर प्रेमाने हात ठेवला आणि गोड (?) भाषेत धमकी दिली, तरीही तो ऐकेना. अखेर गोडाऊनमधले तेलाचे डबे ट्रकमध्ये टाकण्यात आले आणि घोषणांच्या जयघोषात मनोहर जोशी सर येण्यापूर्वी मंडपात आणून ठेवण्यात आले. अत्यंत स्वस्त दरात सर्व सामान्य जनतेला त्याचे वाटप करण्यात आले. दुसर्या दिवशी महेंद्र वैती आणि मंगल अंजारिया आणि इतर शिवसैनिकांना अटक झाली. ‘शिवसैनिकांनी यांचे गोडाऊन लुटले,’ अशी तक्रार झाली.
पण गंमत अशी की पोलिसांनी हिंदुस्तान ऑइलच्या शेटला सांगितले की त्यांनी तुम्हाला ड्राफ्ट दिला होता, तो तुम्ही बँकेत जमा करून पैसे पण घेतलेत ना? मग ही लूटमार कशी? किंमतीपेक्षा जास्त पैसे मिळालेला तेलवाला शेट थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसून निघून गेला. त्यानंतर शिवसैनिकांनी तुटवडा निर्माण करणार्या या व्यापार्यांना सळो की पळो करून सोडले. ‘धारा’ या स्वस्त तेलाचा तुटवडा निर्माण करून ते काळ्या बाजारात साठा करून चढ्या भावाने विकू लागले. त्यावरही शिवसेनेने मोठे आंदोलन छेडले.
मंगल अंजरिया शिवसैनिक आणि माजी शाखाप्रमुख
शाखाप्रमुख मंगल अंजारिया यांची पत्नी तेल आणायला गेली असता तिला ते नेहमीपेक्षा जास्त भावाने घ्यावे लागले. याची तक्रार तिने नवर्याकडे केली. मंगलभाईंनी ही गोष्ट विभागप्रमुख शिशिर शिंदे यांच्या कानावर घातली. शिंदे यांनी पुढाकार घेऊन शाखेतल्या शिवसैनिकांसह ‘धारा’ आंदोलन छेडले आणि मुळात स्वस्त किंमत असलेल्या या तेलाचा, व्यापार्यांनी करून ठेवलेला छुपा साठा शोधून तो बाहेर काढला आणि जनतेला ओरिजनल भावात विकून त्याचे पैसे व्यापार्याना देऊन टाकले. या आंदोलनाचे बाळासाहेबांनी प्रचंड कौतुक केले तेवढेच जनतेनेही केले.
मंगल अंजारिया म्हणजे मुलुंड पश्चिम येथील कच्छी समाजाचे प्रतिनिधी. १९६६ साली ऐन तारुण्यात बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या वेळेचे मुलुंड पश्चिमचे शाखाप्रमुख सनत जोशी या मित्रासमवेत शिवसेना शाखेत त्यांनी प्रवेश केला, तेव्हापासून आजतागायत एक शिवसैनिक म्हणून ते कार्यरत आहेत. शाखाप्रमुख असताना अनेक आंदोलनात सक्रिय असलेल्या मंगलभाईंनी मुलुंडमध्ये झालेल्या ‘मार्मिक रजनी’तही हिरीरीने भाग घेतला होता.
बाबा शिंदे- शिवसेनाप्रमुखांचा अंगरक्षक आणि शिवसैनिक
सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधील माझा वर्गमित्र हेमंत शिंदे कॉलेजला असताना शिवसेनेचे प्रचंड गुणगान गायचा. आज बाळासाहेब ठाकरे पुण्याला गेले, आज त्यांची ठाण्यात सभा आहे, आज गिरगावात आहेत, अशा बातम्या तो वारंवार देत असे. त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याचा मोठा भाऊ बाबा शिंदे हा बाळासाहेब ठाकरे यांचा अंगरक्षक आहे. शिवाय तो त्यांची स्पेशल व्हॅनही चालवतो, जी मुंबईच्या माणिकलाल आणि सन्स यांनी खास साहेबांना प्रवासासाठी दिलेली आहे. बाबा शिंदे हा कट्टर शिवसैनिक तर होताच, पण बाळासाहेबांबरोबर अखेरपर्यंत त्यांच्या सावलीसारखा वावरला. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळात बाबा शिंदे, भाल्या ठाकूर, दिना सावंत, नायडू बंधू हे साहेबांबरोबर सावलीसारखे असायचे. काय बिशाद आहे कोणाची दगाफटका करायची! अनेक असे बांके प्रसंग आले, ज्यामधून साहेबांना सही सलामत सभा घेण्याची हमी या लोकांनी अत्यंत खाजगीत संरक्षण देऊन कायम ठेवली. बाबा शिंदेना शिवसैनिक म्हणून कुठच्या मोहिमेत उतरावे लागले नसले तरी साहेबांचे त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत त्यांचा अंगरक्षक म्हणून जवळ रहाण्याची संधी मिळाली.
आजचं राजकारण अनेक आलोभने, प्रलोभने, आकर्षणे यांनी भरलेलं आहे. कित्येक कार्यकर्ते, नेते यांना आपण सध्या कुठल्या पक्षात आहोत हे रोज सकाळी चेक करावे लागते. काल ज्याच्याविरुद्ध बोललो त्याचेच आज गुण गावे लागतात आणि तो नक्की कोण आहे हेही लक्षात ठेवावे लागते. वर उल्लेखलेल्या शिवसैनिकांनी आजपर्यंत आपली निष्ठा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी तर राखलीच, पण साहेबांच्या जाण्याने जी पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली ती त्यांनी पक्षात राहूनच भरून काढायचा प्रयत्न केला. अनेक पक्षांना असे झोकून देणारे कार्यकर्ते हवे असतात, काहींना कदाचित ते विकत घ्यावे लागतात, त्यांना पोसावे लागते. पण राजू केतकर, महेंद्र वैती किंवा मंगल अंजारिया यांच्यासारख्या शिवसैनिकांना कोणताच पक्ष आपल्या दावणीला बांधू शकला नाही की विकत घेऊ शकला नाही. आजही या वर्षी आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राजू केतकर चिपळूणमध्ये ठाण मांडून होता. आजही कित्येक शिवसैनिक बाळासाहेबांनी कधीकाळी दिलेल्या शाबासकीच्या आधारावर अथवा टाकलेल्या विश्वासाच्या आधारावर शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. म्हणून तर आज केतकर आणि महेंद्र वैतीला मी शेवटी विचारलेल्या प्रश्नावर मला एकच उत्तर मिळाले ‘आमची निष्ठा बाळासाहेबांकडे आहे आणि म्हणूनच शिवसेनेकडे आहे आणि तितकीच उद्धव साहेबांबरोबर आहे…’ या सर्व शिवसैनिकांच्या मनाच्या एका कोपर्यात मात्र या सर्वांइतकेच ठाण मांडून बसले आहे त्यांचे दुसरे प्रेरणास्थान ‘मार्मिक’ साप्ताहिक…
शिवसेनेत मोठ्ठा ब्रेक देणार्या त्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाला आणि या आणि अशा असंख्य शिवसैनिकाना, मार्मिकच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)