क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या शाळकरी मित्रांची भेट. तिचं कवित्व अद्याप टिकलंय. भावनिकतेच्या हिंदोळ्यावरील सचिन-विनोद भेटीनिमित्त हॅरिस शिल्डमधील ऐतिहासिक भागीदारीपासून ते आतापर्यंतच्या या मैत्रीपर्वातील कडू-गोड आठवणींचा हा कॅलिडोस्कोप.
– – –
तीभेट तशी अपेक्षित आणि स्वाभाविक. त्याची उत्कटता भरतभेटीपेक्षा तीव्र. पण उपस्थित प्रत्येकाच्या नजरेनं टिपलेली; तर कालांतरानं समाजमाध्यमांवर ती पुन्हा पुन: पाहिली गेलेली. भावनिकतेचा ओलावा निर्माण करणारी. प्रखर सूर्यप्रकाशात वडाच्या झाडाखाली मिळणार्या दिलाशासारखी. एक मित्र यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करून आता देशातील यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून रूबाबात वावरतोय, तर दुसरा मित्र आयुष्याची संघर्षयात्रा अनुभवतोय. पण मैत्रीला रूप नसतं, रंग नसतो, भाषा नसते आणि असे कुठलेही नियम नसतात. त्यामुळेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट संस्मरणीय. डोळ्यांच्या कडा ओलावणारी.
अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवणारे सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत ठरली, ती सचिन-विनोद यांची भेट. सचिन आणि विनोद हे दोघं गुरूबंधू. विनोद डावखुरा फलंदाज, तर सचिन उजव्या हाती फलंदाजी करणारा. पण कार्यप्रणालीत सचिन डावरा आणि विनोद उजव्या हातानं काम करणारा. हे त्यांच्यातलं एक परस्परविरोधी आगळं वैशिष्ट्य. सचिन शांत, कडव्या शिस्तीचा, तर विनोदची वृत्ती बिनधास्त. आचरेकर सरांनी दोघांवर पैलू पाडले. दादरची शारदाश्रम विद्यामंदिर शाळा हे त्यांच्या घडवणुकीचं केंद्रस्थान. अजित तेंडुलकर या भावाच्या स्वप्नांतून सचिन नावाचा क्रिकेटपटू घडला. त्याआधी सचिन वांद्रे येथील आयईएस शाळेत शिकायचा. परंतु दीड महिन्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणानंतर आचरेकरांनी त्याची शाळा बदलायचा निर्णय घेतला. सचिन साहित्यिक प्राध्यापक रमेश तेंडुलकरांचा सुपुत्र. त्यामुळे वांद्रे येथील साहित्य सहवासमध्ये त्याचा निवास. शिवाजी पार्कचा क्रिकेट सराव जपता यावा, म्हणून एका नातलगाकडे काही वर्षं तो निवासाला होता.
दुसरीकडे, विनोदचा निवास कांजूरमार्गच्या चाळीतला. कुटुंबात सात जण आणि हलाखीची स्थिती. त्याचे वडील गणपत कांबळी हे मॅकेनिक. पण क्लब क्रिकेटमध्ये त्यांच्या वेगवान मार्याचा दबदबा होता. विनोदला लोकल ट्रेनचा प्रवास करून शाळा आणि शिवाजी पार्क गाठण्याचं आव्हान त्यावेळी असायचं.
वर्ष होतं १९८८. हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य सामना आझाद मैदानावर खेळला जात होता. संभाव्य विजेत्या शारदाश्रमची गाठ पडली सेंट झेवियर्स शाळेशी. सचिनचं वय होतं १४ वर्षं, तर विनोदचं १६ वर्षं. या दोघांनी शालेय वयात केलेल्या नाबाद ६६४ धावांच्या ऐतिहासिक विक्रमी भागीदारीनं सर्वप्रथम क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधलं. सचिननं नाबाद ३२६ आणि विनोदनं नाबाद ३४९ धावा केल्या. या खेळींनंतर दोघांचंही आयुष्य बदललं. ते शाळेत यायचे, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या असायच्या. याच दिवसांत सचिनला चक्क सुनील गावस्कर यांनी पॅडची जोडी भेट म्हणून दिली होती. याच वर्षी डिसेंबरमध्ये सचिननं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गुजरातविरुद्ध पदार्पणात शानदार शतक झळकावलं, तर विनोदनं पुढच्याच वर्षी त्याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून पदार्पण केलं. १९८९मध्ये सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ केला. पाकिस्तानच्या भूमीवर इम्रान खान, वसीम अक्रम हा त्यांचा वेगवान मारा आणि अब्दुल कादिरची फिरकी यांचा सामर्थ्यानं सामना केला. याच काळात विनोदची आशियाई युवा चषक स्पर्धेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झालेली. विनोदसोबत संघात सौरव गांगुली, अजय जडेजा, आशिष कपूर यांचा समावेश होता. दोन वर्षांनी विनोदनंही भारतातर्फे खेळण्याचं स्वप्न साकारलं.
सचिनची कारकीर्द एकीकडे बहरत होती. विक्रमांची एकेक शिखरं तो सर करीत होता. १९९३च्या पूर्वार्धात विनोदनं लक्षवेधी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये दोन सलग द्विशतकं त्यानं नोंदवली. यापैकी पहिलं म्हणजे २२४ धावा त्यानं वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध साकारल्या, तर दुसरं म्हणजे २२७ धावा दिल्लीच्या फिरोझशाह कोटलावर झिम्बाब्वेविरुद्ध केल्या. सचिनच्या खेळीतलं सातत्य कायम टिकलं, ते २०१३पर्यंत. पण विनोदच्या धडाकेबाज बॅटची नजाकत फार काळ टिकली नाही. १९९५मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. १९९६चा विश्वचषक सामना आठवला की विनोद नक्की आठवतो. सामना होऊ दे, अशी प्रेक्षकांना साद घालणारा. ईडन गार्डन्सवर त्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेनं २५१ धावांचं आव्हान उभं केलं. सचिनच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं १ बाद ९८ अशी दमदार सुरुवात केली. परंतु सचिन बाद झाल्यावर काही काळात भारताची फलंदाजी कोसळली आणि ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली. भारताची ही केविलवाणी स्थिती सहन झाल्यानं क्रिकेटरसिकांनी हुल्लडबाजी आणि जाळपोळ करीत सामना थांबवला. अखेर या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आल्ां. मैदानावरील विनोदला त्यावेळी आपले अश्रू आवरणं कठीण गेलं. तो भावनिक प्रसंग क्रिकेटचाहत्यांना आजही ठसठसून आठवतोय. २०००नंतर हा तारा एकदिवसीय क्रिकेटच्या क्षितिजावरूनही लुप्त झाला. दर्जेदार वेगवान मार्यासमोर विनोदच्या फलंदाजीचं तंत्र अपयशी ठरू लागलं, तर दुखापतींचा ससेमिरा पिच्छा पुरवू लागला. त्यानंतर विनोद क्रिकेटेतर घडामोडींमध्येच चर्चेत राहिला.
२०१३मध्ये वानखेडेवर सचिनच्या निवृत्तीच्या भाषणात आपला उल्लेख न केल्यानं विनोदनं नाराजी प्रकट केली होती. ‘‘मी अतिशय दुखावलोय. सचिनच्या निरोपाच्या भाषणात माझं नाव अपेक्षित होतं. शालेय दिवसांतील विश्वविक्रमी भागीदारीनं आम्हा दोघांच्या कारकीर्दीला महत्त्वाचं वळण प्राप्त झालं. सचिन आणि विनोद या नावांची दखल लोक घेऊ लागले. किमान त्या भागीदारीचा तरी त्याने उल्लेख करायला हवा होता,’’ अशा शब्दांत विनोदनं आपली वैâफियत मांडली होती.
एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडवणार्या आचरेकर सरांनी दर्जेदार प्रशिक्षकसुद्धा घडवले आहेत. मुंबईतील आताच्या यशस्वी प्रशिक्षकांमध्ये आचरेकरांच्या शिष्यांचे प्रमाण अधिक आहे. बलविंदर संधू, लालचंद रजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, दिनेश लाड, अमोल मुझुमदार, सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत अशी ही नामावली मोठी आहे. विनोदचं मैदानाशी नातं टिकावं म्हणून २०१७मध्ये सचिननं जिवापाड प्रयत्न केले. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट अकादमीत विनोद प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. इतकंच नव्हे, तर पहिल्यावहिल्या मुंबई ट्वेन्टी-२० प्रीमियर लीगमध्ये विनोद शिवाजी पार्क लायन्स संघाचा प्रेरक (मेंटॉर) होता. २०१८मध्ये सचिननं आचरेकरांचं क्रिकेटपटू घडवण्याचं कार्य पुढे चालू ठेवावं, या हेतूनं नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील अकादमी येथे तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीची निर्मिती केली. या अकादमीत २०२२पर्यंत मुख्य प्रशिक्षक विनोदच होता.
सचिन आणि विनोद यांची क्रिकेटमय जीवनगाथा पुस्तकरूपातही अस्तित्वात आहे. विनोदचं आत्मचरित्र एक जानेवारी २०११ या दिवशी ‘विनोद कांबळी : द लॉस्ट हिरो’ नावानं प्रकाशित झालं, तर ५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ‘सचिन तेंडुलकर : प्लेइंग इट माय वे’ प्रकाशित झालं. सचिनच्या क्रिकेट प्रवासावर चित्रपटाचीही निर्मिती झालीय. २०१७मध्ये ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चरित्रपट प्रदर्शित झाला.
समाजकारणाच्या व्यासपीठावरही या दोघांनी स्वत:ला आजमावलं. एप्रिल २०१२मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सचिनला राज्यसभेची खासदारकी बहाल केली. कारकीर्द चालू असताना हा मान मिळवणारा सचिन हा पहिलाच क्रीडापटू. मी मुंबईत राहात असल्यानं हा पैशांचा अपव्यय होईल, असं मत मांडून त्यानं नवी दिल्लीत उपलब्ध करण्यात आलेला बंगला नाकारला. हे त्याचं कृत्य मनं जिंकणारं. पण २०१८पर्यंतची त्याची खासदार म्हणून कारकीर्द फारशी समाधानकारक ठरली नाही. त्याची उपस्थिती अत्यंत कमी असायची आणि कोणत्याही प्रश्नावर त्यानं कधीच आवाज उठवला नाही. विनोदनं २००९मध्ये विक्रोळी येथून लोकभारती पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली. पण तो अयशस्वी ठरला. २०११मध्ये विनोद अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी अभियानात सामील झाला होता.
खेळाचा आदर राखा, हे ब्रीद आचरेकर सर आपल्या शिष्यांवर नेहमी बिंबवायचे. खेळ हा कोणाही वैयक्तिक व्यक्तीपेक्षा कित्येक पटीनं मोठा आहे आणि संघ हा सर्वात महत्त्वाचा असतो, ही त्यांची शिकवण. आचरेकर सरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात असंख्य दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या आठवणी जागवल्या. विनोद आचरेकर सरांचं आवडतं गाणं ‘सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये, काहे घबराये…’ हे गाणं गायला. तर सचिननं आचरेकर सरांकडील मार्गदर्शनाचा प्रवास आणि आयुष्य घडवण्याचं सामर्थ्य अधोरेखित केलं. कार्यक्रमाअखेरीस झालेल्या सचिन-विनोद भेटीकडे सर्वांनी भावनिकतेनं पाहिलं. विनोदनं सचिनच्या डोक्यावरून हात फिरवला. या प्रसंगाचं वर्णन करण्यासाठी अनंत राऊत यांच्या गझलगीतातील ओळी पूरक ठरतात.
दु:ख अडवायला उंबर्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…