हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मी मातोश्री येथे जाऊन भेटत असे. मातोश्री ते कलानगर फाटक एवढ्या रस्त्यावर फेर्या! मारत आमच्या गप्पा चालत. त्यात सहसा महाराष्ट्र, मराठ्यांची दुफळी, त्यामुळे दिल्लीकडून महाराष्ट्रावर होणारा अन्याय याबाबत ते बोलत असत. गटप्रमुख, शाखाप्रमुख मग पुढे नगरसेवक वगैरे लोकप्रतिनिधी अशी शिवसेना संघटनेची बांधणी होती. पण जसजसा काळ जातो, संघटना मोठी होत जाते, कार्यकर्ते बदलतात, त्यांचे हितसंबंध, नातेसंबंध बदलतात. आणि या सर्वांचा मुख्य धोरणावर परिणाम होऊन ते बदलते, त्याला फाटे फुटतात. मूळ संघटना हळूहळू खिळखिळी होऊ लागते, संघटना फुटते, तिच्या अनेक चिरफळ्या उडतात आणि मूळ संघटनाही नष्ट होऊ शकते. त्यामुळे संघटनेवर एकछत्री हुकूमत असणे आवश्यक असते. लोकशाही येथे अयशस्वी ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य सर्व हिंदुस्थानभर पसरले. दिल्लीच्या बादशहाचे आणि बादशाहीचे रक्षण मराठे करत होते. पण पुढे मूळ धोरण मराठेशाहीच्या विस्तारामुळे बदलावे लागले. मोठमोठे मराठे सरदार आपापल्या अंमलाखालील प्रदेशाचे राजे झाले. मुख्य गादी फक्त मुजर्यापुरती उरली. शेवटी तर मराठी सरदारानेच पुणे लुटले, अशी चर्चा आमच्यात चाले आणि शिवसेना या दोषांपासून मुक्त कशी राहील याबद्दल साहेब बोलत असत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चांगल्या राजाची हुकूमशाही हवी, असा आमच्या एकूण चर्चेचा निष्कर्ष असे.
एकदा संध्याकाळी गेलो असताना ते गच्चीत होते. तेथे मला बोलावले आणि म्हणाले, ‘प्रभुदेसाई तुम्ही मला इथे ज्युदो शिकवाल का? या सर्व कुंड्या आपण बाजूला काढून ठेवू.’
मी त्यांना म्हटलं, ‘साहेब, ज्युदो-कराटेची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तुमची करारी, ऊग्र मुद्रा, जरब असलेला करडा स्वर आणि निर्भय, बेधडक वृत्ती हेच तुमचे ज्युदो नि कराटे आहेत.’ ते मिश्किलपणे हसले. त्यावेळी ब्रुस लीच्या चित्रपटांची लाट होती. त्यांनी ते चित्रपट पाहिले होते. माझ्याकडचे ब्रुस लीचे एक छोटे चरित्र मी त्यांना वाचायला दिले होते. साहेबांचे वाचन, त्यांची दृष्टी अशी चौफेर फिरत असे. त्यांचे निरीक्षणही तसेच असे. एकदा ते मला म्हणाले, ‘प्रभुदेसाई, तुम्ही कुस्ती खेळता, ज्युदो शिकवता, बॉक्सिंग शिकता, शरीरसौष्ठवाचा व्यायाम करता, मग तुम्ही ते असे का चालत नाही?’ ‘असे म्हणजे?’ या माझ्या प्रश्नावर ते उभे राहिले. दोन्ही हात शरीरापासून लांब धरले आणि वर आकाशाकडे पाहात दोन चार पावले चालले. त्यांचे ते प्रात्यक्षिक पाहून मी व तेही खूप हसले (हल्ली एका लेखिकेने या चालण्याचे वर्णन ‘दोन बगलेत दोन कलिंगडे धरून चालणे’ असे केले आहे). साहेबांचे हे निरीक्षण!
एकदा एक लेख द्यायला गेलो, तेव्हा ते पहिल्या मजल्यावर होते. लेख पाहिल्यावर त्यांनी तेथेच असलेल्या श्रीकांत ठाकरेंना हाक मारून सांगितले, ‘श्री, हे आपले प्रभुदेसाई, ‘मार्मिक’मध्ये लिहितात. त्यांचे अक्षर बघ किती सुंदर आहे.’ लहानपणी बोरू झिजवून कित्ता गिरवला होता, त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आमच्या लहानपणी गवताचा हा एक प्रकार उगवत असे. हल्ली ‘फुलझाडू’च्या जशा गोल जाड काड्या असतात किंवा वेताच्या छडीप्रमाणे, तर त्यास स्वत: टोक काढायचे, टोकाला तिरका छेद द्यायचा आणि मग त्या टोकाला उभी चीर द्यायची. म्हणजे हल्लीचे ‘नीब’ तयार करायचे. मग ते शाईत बुडवून मराठी अक्षर गिरवायचे! नंतर मग ‘मराठी नीब’ तयार मिळू लागले आणि इंग्रजी लफ्फेदार लिपी (कर्सीव्ह) लिहिण्यासाठी ‘नऊ नंबर’चे नीब मिळू लागले. ते टोकाला लावून शाईत बुडवून लिहायचे. म्हणजे बरोबर शाईची दौत बाळगायला लागे. नंतर शाईची पेने आणि मग बॉल पेने आली. असो.
नंतर मी विचार करू लागलो, प्रथम आपण दादरला ‘कृष्णकुंज’मध्ये लेख द्यायला जात होतो. त्यावेळी आपला श्रीकांत ठाकरेंशी परिचय झाला होता. साहेब नसले तर लेख त्यांच्याकडे देत होतो. म्हणजे मी ‘मार्मिक’मध्ये लिहीत होतो, हेही त्यांना माहीत होते. आणि हे सर्व बाळासाहेबांनाही माहीत होते. तरी वेळ मिळताच त्यांनी माझ्यासमोर ते सर्व श्रीकांतजींना सांगितले. काय कारण असावे?
त्याचवेळी त्यांनी मला विचारले होते, ‘प्रभुदेसाई, लेखाच्या पानांवर डाव्या हाताला कोपर्यात तुम्ही आकडे लिहिता ते कसले?’ ‘साहेब माझे लेख ५-६ किंवा त्यापेक्षाही जास्त पानांचे असतात. तेव्हा त्या लेखात एकूण पाने किती हे शेवटचा आकडा सांगतो, तर अशा एकूण पानांपैकी ते पान कितवे हे पहिला आकडा दाखवतो. उदा. ५/६ म्हणजे एकूण पाने ६ आणि त्यातले ते ५वे पान. म्हणजे पाने उलटसुलट होण्याची किंवा गहाळ होण्याची भीती नाही.’ साहेबांचे समाधान झाले. नोकरीच्या ठिकाणी मी इंग्रजी पत्रे टाईप करत असे त्याची ती सवय होती.
बाळासाहेबांनी शेवटच्या काळात जो पोषाख धारण केला तोच ज्यांनी पाहिला त्यांना बाळासाहेब कधीकाळी पाईप, चिरूट, गुडगुडी आणि सिगारेट ओढत असत असे सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही. सुरुवातीला ते पाईप ओढत. त्यासाठी तो अगोदर साफ करायचा. मग त्यात सुगंधित तंबाखू अंगठ्याने चेपून बसवायचा. मग सुरुवातीला आगकाडीने व नंतर लायटर आल्यावर त्याने तो पेटवायचा. अंगठा आणि पहिली दोन बोटे यात स्टाईलने धरून ते पाईप तोंडाला लावताहेत, तोपर्यंत कुणीतरी यायचे, बोलणे चालू व्हायचे, पाईप विझून जायचा! मग परत साफ करण्यापासून सुरुवात! त्यावेळी बोलणेही चालू असायचे. चिरूट ओढताना पण असेच होत असे. एकेकाळी चिरूट म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल असे एक समीकरणच त्यावेळी झालेले होते. बाळासाहेबांनी एक मोठा चिरूट आणि त्याच्या धुरातून चित्रित झालेले चर्चिल असे एक व्यंगचित्रही बहुदा काढले होते. तसाच भला मोठा चिरूट अंगठा आणि पहिले बोट यात धरून ते ओढत. त्याची गत पाईपसारखीच होत असे. शिवाय तो पेटायला फार वेळ घेत असे. नंतर बाळासाहेबांनी ‘गुडगुडी’ ओढायला सुरुवात केली (हल्ली ‘हुक्का’ शब्दाला वाईट दिवस आले आहेत म्हणून तो शब्द वापरला नाही). गड्याकडून गुडगुडीची साफसफाई, पाणी भरणे, निखारे ठेवणे वगैरे सर्व साग्रसंगीत होत असे. एकदोन वेळा ते ओढत त्यावेळी ‘गुडगुड’ असा आवाज आणि एक मस्त सुगंध तेथे पसरे. एकदा निखारे विझले की परत आणायचे वगैरे फार कटकटीचे असायचे! नंतर त्यांनी पातळ पांढर्या सिगारेटसाठीच असलेल्या कागदात तसाच उंची, सुगंधी तंबाखू भरून त्याची सुरळी करून सिगारेट बनवून ओढायला सुरुवात केली होती. याची सर्व साग्रसंगीत माहिती त्यांनी मला सांगितली होती.
हे सर्व प्रकार पाहिल्यावर मी त्यांना म्हटले होते, ‘साहेब, हे तुमचे धूम्रपानाचे व्यसन फार चांगले आहे.’ त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘हे सर्व सव्यापसव्य करण्यातच तुमचा एवढा वेळ जातोय की त्या व्यसनाचा नि तुमचा, व्यसन लागण्याइतका निकटचा आणि सततचा संबंधच येत नाही. शिवाय आम्हाला सर्वांना एका मस्त सुगंधी वातावरणाचा लाभ होतो.’ ते खळखळून हसले.
‘साहेब, शिवाजी पार्कला तुम्हाला एक चिरूटवाले शेजारी होते.’
‘कोण हो?’
‘माधव मनोहर. रस्त्यावरून जाताना सहज डोकावून पाहावे तर गॅलरीत बसलेल्या माधव मनोहरांचे वाचन-लेखनाचे ज्ञानसत्र आणि चिरुटाचे अग्निहोत्र सतत चालू असे.’
‘बरोबर आहे प्रभुदेसाई, तुमचे निरीक्षण चांगले आहे हो.’
‘एवढ्या वर्षांत मी तुमच्याकडून एवढेही शिकलो नाही तर मग माझा काय उपयोग?’
माझ्या या उत्तरावर बाळासाहेबांचे तेच मिश्किल हास्य!