करबचतीचे हे सर्वोत्तम-सुरक्षित साधन आहे. म्हणजे जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा त्या रकमेवर आयकराची वजावट मिळते, यावर जे व्याज दिलं जातं तेही आयकरमुक्त असतं, तसंच मुदतीअंती किंवा जेव्हा आपण रक्कम काढून घेऊ तीसुद्धा आयकर मुक्त असते. अशी तिन्हीवेळा करबचत करणारी ही योजना आहे.
– – –
पीपीएफची बहुतेकांना माहिती असेल आणि अनेकजण त्यात गुंतवणूकसुद्धा करत असतील. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी). ही केंद्र सरकारची योजना आहे, त्यामुळे यात कसलीच जोखीम नाही. हिला बहुगुणी, आखूडशिंगी म्हणण्याचं कारण यात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. पोस्ट ऑफिसच्या काही योजना, विमा, म्युचुअल फंडाच्या ईएलएसएस योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम), बँकेच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवी इत्यादी काही योजनांत एकूण रुपये १,५०,००० गुंतवणूक करून सेक्शन ८०-सी अंतर्गत करबचत करता येते, त्यातच पीपीएफमध्ये केलेल्या गुंतवणुकीचाही समावेश होतो. करबचतीचे हे सर्वोत्तम-सुरक्षित साधन आहे. करबचतीसाठी सर्वोत्तम म्हणण्याचं कारण ही योजना एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट (ईईई) प्रकारात येते, म्हणजे जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा त्या रकमेवर आयकराची वजावट मिळते, यावर जे व्याज दिलं जातं तेही आयकरमुक्त असतं, तसंच मुदतीअंती किंवा जेव्हा आपण रक्कम काढून घेऊ तीसुद्धा आयकरमुक्त असते. अशी तिन्हीवेळा करबचत करणारी ही योजना आहे. विमा योजनांवर असे आयकराचे फायदे असले तरी त्या योजनांचा व्यवस्थापन खर्च पीपीएफपेक्षा जास्त आहे. पीपीएफ योजनेची माहिती घेऊ.
पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला पोस्टात किंवा बँकेत पीपीएफचे खाते उघडावे लागते. बहुतेक सर्व सरकारी बँका व काही खाजगी बँका यांच्या बहुतेक शाखांमध्ये, तसेच ऑनलाइनही हे खाते उघडता येते. कोणीही निवासी भारतीय हे उघडू शकतो. हे खाते एकाच्याच नावावर सुरू करता येते, संयुक्त नावाने नाही. एक व्यक्ती फक्त एकच खाते उघडू शकते. आपल्या अल्पवयीन पाल्याच्या वतीने किंवा मनोरुग्ण व्यक्तीच्या वतीने पालकही खाते उघडू शकतात. अनिवासी भारतीय पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत, पण कोणी खाते उघडले व नंतर अनिवासी भारतीय झाला तर मुदत संपेपर्यंत नॉन-रिपॅट्रीएशन तत्वावर यात तो गुंतवणूक करत राहू शकतो.
दरवर्षी कमीत कमी ५०० रुपये भरून हे खाते सुरू ठेवावे लागते. एका वर्षात जास्तीत १ लाख ५० हजार रुपये आपण यात जमा करू शकतो. तसेच एका आर्थिक वर्षात ५० रुपयांच्या पटीत ते जास्तीत जास्त १,५०,००० रुपये या मर्यादेपर्यंत कितीही वेळा आपण पैसे जमा करू शकतो. आर्थिक वर्षाच्या सुरवातीला एकदाच मोठी रक्कम त्यात जमा करणे हे फायद्याचे आहे. महिन्याच्या १ ते ५ या तारखेच्यादरम्यान पैसे जमा करावेत, कारण ५ तारखेला जी रक्कम जमा असेल त्याआधारे त्या महिन्याचे व्याज मिळते. ६ तारीख व त्यापुढे महिना संपेपर्यंत पैसे भरले तरी त्या रकमेवर त्या महिन्याचे व्याज मिळत नाही. अल्पवयीन पाल्याच्या खात्यात जी गुंतवणूक केली जाते तीसुद्धा ह्या १,५०,००० रुपये मर्यादेतच येते, ती वेगळी गुंतवणूक समजली जात नाही. जर १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली तरी फक्त १,५०,००० रुपयांवरच व्याज दिले जाते. तसेच एकापेक्षा जास्त खाती सुरू केली तर फक्त एकच खाते सुरू ठेवून इतर बंद करण्यात येतात व त्यातील फक्त मुद्दल परत केले जाते, व्याज दिले जात नाही. जर एखाद्या वर्षात आपण खात्यात कमीत कमी ५०० रुपये रक्कम जमा केली नाही, तर आपले खाते बंद होते. खाते बंद पडले तर त्याआधारे कर्ज मिळू शकत नाही किंवा त्यातून रक्कम काढता येत नाही. अशा बंद राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये प्रमाणे दंड, तसेच त्या प्रत्येक वर्षाची कमीत कमी वर्गणी ५०० रुपये भरून आपण हे खाते पुन्हा सुरू करू शकतो. एका वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आजच्या काळात काहीच नाहीत, तेही ५० रुपयाच्या हप्त्याने भरता येतात, त्यामुळे दरवर्षी ते भरावेत व अशी वेळ येऊच देऊ नये. आर्थिक वर्षात जमा केलेली एकूण रक्कम विचारात घेताना त्यात मागील वर्षांची जमा केलेली थकीत रक्कमही धरली जाते.
यातील रकमेवर व्याजाचा दर किती ते केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय दर त्रैमासिक कालावधीने जाहीर करते व तो कमी जास्त होत असतो. १९६८मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा व्याजदर ४.८ टक्के होता तो वाढत जाऊन एप्रिल १९८६मध्ये १२ टक्के झाला व तो १४ जानेवारी २००० पर्यंत म्हणजे १४ वर्षे कायम होता, नंतर तो कमी होत गेला. सध्या मे २०२२ मध्ये हा व्याजदर ७.१ टक्के आहे, तरीही हा बँक मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा १.५० टक्केने जास्तच आहे. खात्यावर मासिक तत्वावर व्याज देय होते, पण ते आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यात जमा केले जाते. यात चक्रवाढ पद्धतीने व्याज म्हणजे व्याजावर व्याज मिळत असल्याने मुदतीअंती मोठी रक्कम हातात येते. मध्यमवर्गीय माणसांवर सहसा अशी वेळ येत नाही, पण पीपीएफ खातेधारकाची संपत्ती जप्त करण्यासाठी कोर्टाची ऑर्डर आली तरी यातील गुंतवणूक कोर्टाच्या अटॅचमेंटपासून मुक्त आहे, आयकर खाते मात्र ती अटॅच करू शकते. या खात्याला नामांकनाची स्ाुविधा उपलब्ध आहे. आपल्याला पीपीएफचे पासबुक दिले जाते, त्यावरच नामांकनाची (नॉमिनेशन) नोंद केली जाते. केलेले नामांकन नंतर बदलताही येते.
यातील गुंतवणुकीला १५ वर्षांचा लॉकइन असतो, म्हणजे १५ वर्षे झाल्याशिवाय खाते बंद करता येत नाही. हा दीर्घ कालावधी खरे तर आपल्या फायद्याचाच आहे, कारण आपण नियमित बचत करत राहतो व निवृत्तीनंतर त्याचा लाभ मिळतो. परंतु आकस्मिक कारणासाठी पैसे हवे असतील तर खाते सुरू केल्यानंतर कर्ज मिळू शकते. सोप्या भाषेत त्याचे नियम असे; ज्या आर्थिक वर्षात खाते सुरू केले आहे, ते धरून तिसर्या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यंत कर्ज मिळू शकते (उदा. २००९-१०मध्ये खाते सुरू केले असेल, तर २०११-१२ पासून ते २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपेपर्यंतच कर्ज मिळू शकते). याचं कारण या कालावधीनंतर काही प्रमाणात रक्कम काढून घेण्याची सोय आहे. ज्या वर्षात कर्ज घ्यायचं आहे त्याच्या मागील दोन वर्षाच्या शेवटी जी रक्कम शिल्लक असेल त्याच्या २५ टक्के कर्ज मिळू शकते. २०१२-१३मध्ये कर्ज घ्यायचे असेल तर ३१-०३-२०११ला जी रक्कम खात्यात होती त्याच्या २५ टक्के कर्ज मिळू शकते. एका आर्थिक वर्षात एकदाच कर्ज घेता येते. पहिल्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय दुसरे कर्ज मिळत नाही. घेतलेले कर्ज ३६ महिन्याच्या आत परत केले तर दरवर्षी १ टक्का ह्या दराने व्याज असते. ३६ महिन्यानंतर परत केले, तर मात्र दरवर्षी ६ टक्के ह्या दराने व्याज असते. एक टक्का व्याजदर व तारणाशिवाय कर्ज हे अगदी आकर्षक दिसते, परंतु त्यात गोम अशी की कर्ज म्हणून जी रक्कम घेतलेली आहे, त्या कर्जाची व्याजासह परतफेड केल्याशिवाय त्यावर व्याज मिळत नाही. पीपीएफवर सध्या ७.१ टक्के व्याज मिळते, ते ह्या कर्जाच्या रकमेवर तितका काळ मिळणार नाही. म्हणजेच जे आयकरमुक्त व्याज मिळणार आहे ते गमावतो. पीपीएफवर चक्रवाढ व्याज मिळते हे लक्षात घेतले, तर ह्या व्याजावर जे व्याज मिळाले असते तेही गमावतो.
खाते सुरू केल्याच्या सातव्या वर्षापासून यातील रक्कम अंशत: काढून घेता येते, खाते २०१०-११मध्ये सुरू केले असेल तर २०१६-१७ पासून अंशत: रक्कम काढून घेता येते. एका आर्थिक वर्षात एकदाच रक्कम काढता येते. ज्या आर्थिक वर्षात रक्कम काढायची आहे, त्याच्या मागील चार वर्षाच्या शेवटी किंवा मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी, यापैकी जी कमी आहे त्याच्या ५० टक्केपर्यंत रक्कम काढता येते. २०१६-१७मध्ये रक्कम काढायची आहे तर ३१-०३-२०१३ किंवा ३१-०३-२०१६ला जी रक्कम जमा होती, त्यापैकी जी कमी असेल त्याच्या ५० टक्के रक्कम काढता येते.
हे खाते १५ वर्षांच्या मुदतीआधीच बंद करायचे असेल तर सहाव्या वर्षापासून व त्यानंतरच्या काळात पुढील अटींवर बंद करता येते- खातेधारकाला, त्याच्या वैवाहिक जोडिदाराला किंवा पाल्याला जिवाला धोकादायक गंभीर आजार झाला, खातेधारक किंवा त्यावर अवलंबून असलेल्या पाल्याच्या उच्चशिक्षणासाठी, खातेधारकाचा निवासी दर्जा बदलला, उदा. तो अनिवासी भारतीय झाला. खाते मुदतीआधी बंद करताना खाते सुरू केल्यापासून १ टक्का व्याज कापण्यात येते.
ज्या आर्थिक वर्षात खाते सुरू केले ते सोडून १५ आर्थिक वर्षे संपल्यावर खात्याची मुदत संपते. त्यावेळेस तीन पर्याय असतात. खाते बंद करून पैसे व्याजासह काढून घेणे हा एक पर्याय. दुसरा पर्याय खात्यात पुढे रक्कम न भरता खाते सुरू ठेवणे. त्यावर व्याज मिळत राहते, संपूर्ण रक्कम कधीही काढता येते किंवा दरवर्षी एकदा कितीही आंशिक रक्कम काढता येते. तिसरा पर्याय पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदत वाढवत हे खाते आपण पुढे अनेक वर्षे सुरू ठेऊ शकतो. मात्र मुदत संपल्यानंतर एक वर्षाच्या आत हा पर्याय स्वीकारावा लागतो, त्यासाठी फॉर्म द्यावा लागतो. अशा खात्याला दरवर्षी कमीत कमी ५०० रुपये भरणे असे नियम लागू होतात. तसेच अशा खात्यातून एका वर्षात एकदाच रक्कम काढता येते आणि मुदत वाढवताना जी रक्कम जमा होती त्याच्या फक्त ६० टक्के काढता येते.
महत्वाचा नियम असा की कोणता पर्याय निवडला ते १५ वर्ष पूर्ण झाल्यावर एका वर्षाच्या आत कळवलं नाही तर दुसरा पर्याय म्हणजे खात्यात पुढे रक्कम न भरता खाते सुरू ठेवणे स्वीकारला असे गृहीत धरले जाते. त्यात पैसे जमा केले तरी त्यावर व्याज मिळत नाही.
या तीनपैकी कोणता पर्याय निवडायचा यावर विचार करू. निवृत्त होताना मुदत पूर्ण होत असेल व पैशाची गरज असेल तर पहिला पर्याय निवडू शकतो. गरज नसेल तर पर्याय दोन निवडून पैसे पीपीएफ खात्यात ठेवणे व त्यावर जे व्याज मिळते तितकीच रक्कम वर्षातून एकदा काढणे असे करू शकतो. समजा ५० लाख रुपये मुदत संपतेवेळी जमा झालेले आहेत. आजच्या ७.१ टक्के व्याजदराने त्यावर वार्षिक ३,५५,००० रुपये व्याज मिळेल. हे महिन्याचा काही खर्च भागवायला उपयोगी पडू शकतात. जोखीम नसलेल्या इतर गुंतवणुकीवर पीपीएफइतके व्याज मिळत नाही, त्यामुळे पीपीएफमध्येच रक्कम ठेवणे फायद्याचे आहे. जोखीम घेऊन इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर त्यावर यापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते, मात्र जोखीम घेण्याची क्षमता हवी. दुसरा मार्ग आहे सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम अकाउंटवर ७.४ टक्के व्याज मिळते, त्यात फक्त १५ लाख रुपये गुंतवू शकतो. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे ते किंवा ५५ पेक्षा जास्त वय असलेले एका अटीसह यात गुंतवणूक करू शकतात. पीपीएफमधून १५ लाख काढून यात गुंतवून थोड्या जास्ती व्याजाचा फायदा घेऊ शकतो. तसेच सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम अकाउंटमध्ये गुंतवणूक करताना जो व्याजदर ठरलेला असतो तो मुदतपूर्तीपर्यंत कायम असतो. प्रधानमंत्री वय वंदना योजना ही सरकारची पेन्शन योजना आहे, यातही सध्या मे २२मध्ये ७.४० टक्के व्याज मिळते व ते १० वर्षाची मुदत संपेपर्यंत कायम असते. यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते, ती करू शकतो.
हे साठीच्या आसपासच्या लोकांसाठी, पण वय ३० असताना पीपीएफ खाते सुरू केले तर वय ४६ असताना मुदत संपते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा घर घेण्यासाठी जर पैशाची गरज नसेल तर फार लवकर मोठी रक्कम हातात येईल. इथेही जोखीम घेऊन इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर त्यावर पीपीएफपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. जोखीम नको असेल तर पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदत वाढवत राहणे व त्यात गुंतवणूक करत राहणे योग्य आहे. ह्यामुळे निवृत्तीच्या वेळेस मोठी रक्कम हातात येईल.
किती रक्कम मिळेल बघू,
१,५०,००० रुपये दरवर्षी याप्रमाणे पीपीएफमध्ये गुंतवणूक केली व ७.१ टक्के हाच व्याजदर कायम राहिला, गृहीत धरले तर पंधरा वर्षात आपण गुंतवतो २२ लाख ५० हजार, त्यावर व्याज मिळते १८ लाख १८ हजार म्हणजे एकूण ४० लाख ६८ हजार मिळतील. १५ वर्षानंतर नवीन गुंतवणूक केली नाही पण रक्कम पीपीएफमध्येच ठेवली, तर २० वर्षांनी एकूण ५७ लाख ३२ हजार मिळतील व २५ वर्षानंतर एकूण ८० लाख ७७ हजार मिळतील. हा साधारण हिशेब आहे कारण व्याजदर बदलत असतो.
(क्रमश:)