श्रीधरपंत टिळकांच्या सामाजिक कार्याचा इतिहास आज फारसा कुणाला माहीत नाही. त्याचबरोबर त्यांच्या प्रबोधनकारांशी असलेल्या घट्ट मैत्रीचाही कुणाला मागमूस नाही. प्रबोधनकारांच्या लिखाणात आपल्याला हा ऋणानुबंध शोधता येतो. तसंच प्रबोधनमध्ये छापून आलेला श्रीधरपंतांचा एक लेखही त्याचा साक्षीदार आहे.
– – –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता समाज संघाच्या कार्यात श्रीधरपंत टिळकांचं योगदान आपण पाहिलं. लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या ट्रस्टींनी केलेल्या छळाला कंटाळून त्यांनी तरुणपणातच आपलं आयुष्य कसं संपवलं, तेही पाहिलं. आज त्यांनी लिहिलेलं साहित्य हीच त्यांची आठवण आहे. माझा व्यासंग हे त्यांच्या लिखाणाचं पुस्तक आहेच. शिवाय इतरत्रही त्यांनी काही लेखन केलेलं आढळतं. त्यातला एक लेख प्रबोधनच्या जून १९२७च्या अंकातही वाचता येतो. प्रबोधनकारांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदुजनांचा र्हास आणि अध:पात’ या पुस्तकाचं परीक्षण श्रीधरपंतांनी लिहिलं आहे. बहुजन समाजाविषयी असलेल्या त्यांचा कळवळा या लेखातून आपल्यासमोर येतो. त्याचबरोबर काही बाबतीत प्रबोधनकारांशी असलेली मतांतरंही वाचता येतात. त्यांच्या निधनाच्या जवळपास वर्षाआधी त्यांनी हा लेख लिहिला होता. पुढील वर्षभरात ही मतांतरंही संपली असावीत, असं श्रीधरपंतांच्या क्रांतिकारक वाटचालीवरून दिसतं.
‘प्रबोधन’चे जुने अंक वगळता हा लेख कुठेही पुस्तकरूपाने उपलब्ध नाही. त्यामुळे हा लेख पुनर्प्रकाशित होऊन नव्या पिढीसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणून या लेखाचा हा संपादित भाग पुढे देत आहे.
‘हिंदुजनांचा र्हास आणि अध:पात’
याविषयी श्रीयुत श्रीधर बळवंत टिळक यांचे ग्रंथपरीक्षण…
रा. रा. ‘प्रबोधन’ कर्ते यांस,
वि. वि. आपण नजर केलेल्या ‘हिंदुजनांचा र्हास आणि अध:पात’ या अनुवादात्मक प्रबंधाचे मी काळजीपूर्वक परिशीलन केले. आपल्या हीन दीन समाज बांधवांच्या सर्वस्वी परावलंबी व अनुकंपनीय जीवनार्थ कलहाकडे पाहून यापूर्वी कित्येक प्रसंगी डोक्यात जे खेदजनक पण स्वतंत्र विचारांचे काहूर उठले त्याचे यथातथ्य शब्दचित्र त्यात वाचण्यास सापडले. आपल्या हिंदु समाजाची अवनति किंवा अध:पतन झाले आहे खरेच; पण त्यांतूनहि डोके वर काढून भविष्यकाळीं भरतखंडास पुन: सुखाचे दिवस येतील असें पुनरुज्जीवन कसें घडवून आणता येईल, इकडे अधिक लक्ष पुरविले पाहिजे. त्यासाठीच प्रथम आपणांस जातिभेद मोडावयाचे आहेत. परंतु जातिद्वेषाच्या पैâलावास आळा घातल्याखेरीज जातिभेदाची बंधने शिथिल व्हावी कशी? येवढ्यासाठी प्रत्येक लेखकाने मग तो कोणत्याहि जातीचा असो, परजातीस अनुलक्षून लेखणी चालवितांना भाषा फार जपून वापरली पाहिजे. इतर जातींच्या आनुवांशिक भावनांना जबरदस्त धक्का बसेल अशी असहिष्णु, तुटस, किंवा चावरी शब्दयोजना शक्य तितकी टाळली पाहिजे. विचारसरणी उच्च, निर्दोष व प्रतिपक्षास निरुत्तर करणारी असणें यांतच नवमतवादी पक्षाची खरी बळकटी आहे, लेखनशैली जलाल किंवा बोचणारी प्रसृत करण्यांत नाही. कारण –
Many a shaft at random sent,
Finds mark the archer little meant!
And many a word, at random spoken,
May soothe or wound, a heart that is broken
दुसरें असें कीं, शेकडो शतकांचे ऐतिहासिक विहंगावलोकन करतांना ही गोष्ट विशेष लक्षांत घेतली पाहिजे कीं, जेव्हां जेव्हा हिंदु समाज नीतिमान व सदाचार संपन्न अतएव उत्कर्षाभिमुख होता, तेव्हां तेव्हां चातुर्वर्ण्य रचनेतील चारीहि वर्ण सारखेच नीतिमान- सदाचारी असले पाहिजेत; व याच्या उलट जेव्हां जेव्हां आपला समाज व्यसनाधीन व विषयलंपट बनून अवनत स्थितीप्रत पोहोचला असेल त्या त्या काळी वर्णाश्रम व्यवस्थेपैकी सर्वच जातींचे सारख्या प्रमाणांत नैतिक अधःपतन झाले असले पाहिजे. अशी स्थिति संभवनीय असता प्राचीन काळी भरतखंडांत जेवढ्या कांहीं चांगल्या गोष्टी घडल्या तेवढ्यांचे श्रेय बौद्ध धर्माला व जेवढ्या अनिष्ट गोष्टी घडल्या त्या पातकाचे खापर मात्र सनातन वैदिक धर्माचे माथी, हा लेखकाचा अजब कोटिक्रम शांत व समचित्ताच्या नि:पक्षपाती वाचकवर्गास पटणार नाहीं.
वास्तविक पाहातां श्री. मुकर्जींच्या निबंधाचा खरा रोख धर्मकृत्ये अंधपरंपरेने चालविणार्या भिक्षुकी वृत्तीवर (Bigoted and apathetic Priesthood) आहे, सरसहा ब्राम्हण जातीवर नाहीं. परंतु ही गोष्ट कांही थोड्या सुशिक्षित वाचकवर्गांसच आकलन होईल. अल्पशिक्षित बहुजन समाजास ते कसे कळावे? आपण आपल्या प्रास्ताविक ‘ग्रंथपरिचयांत’ हा फरक असंदिग्ध शब्दांत मांडणे अत्यावश्यक होते असे मला वाटते. एरव्ही सामान्य वाचकवर्गाचा कदाचित असा गैरसमज व्हावयाचा कीं हे भाषांतरवजा पुस्तक म्हणजे एकंदर ब्राम्हण समाजाची उठल्या बसल्या टवाळी व नालस्ती करणार्या चळवळ्या वाङ्मय सांप्रदायांपैकीच एक होय. आपणास हे मान्य करावे लागेल की आज आमच्या या ब्राम्हण जातींत अशी अनेक कुटुंबे सांपडतील कीं ज्यांचा भिक्षुकी वृत्तीशी अर्थाअर्थी काहींच संबंध नसून ज्याच्या अंत:करणांत इतर जातीविषयी पूर्ण न्याय, समता व बंधुभाव वसत आहे.
भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचे मार्गातील हे अनर्थसूचक खाच खळगे समाज-सुधारणेच्छु वक्त्यांनी लेखकांनी आत्मसंयमनात्मक दूरदर्शीपणाने टाकले पाहिजेत. मुसलमानांचा प्रश्न घटकाभर बाजूस ठेविला तरी प्रथम आपल्या हिंदू हिंदूमध्येच एकराष्ट्रीयत्वाची भावना उत्पन्न होण्यासाठी सनातन चातुर्वर्ण्य समाज रचना मोडणे इष्ट आहे. सालोसाल असवर्ण किंवा संकर विवाह जितके जास्त होत जातील त्या प्रमाणांत उत्क्रांतितत्त्वानुरूप ‘आस्ते कदम’ ती ढिली पडणार ही गोष्ट निर्विवाद आहे. असले हे विवाह अर्थातच स्वयंनिर्णयाचे तत्त्वाबरहुकुम प्रौढ प्रीतिविवाहच झाले पाहिजेत. कालचक्राच्या प्रगतिपर व आशाजनक प्रवाहाची गती कोणी केवढाहि पराक्रमी व कर्तबगार वीर झाला तरी कमी अगर अधिक करू शकत नाहीं. म्हणून उगाच मारून मुटकून कोणातरी कुळकर्ण्याची अजाण मुलगी दुसर्या फलाण्या पाटलाच्या पोराचे गळ्यांत बळजबरीने अडकवून चातुर्वर्ण्याचा डोलारा कोसळून पाहूं पाहणें हास्यास्पद होय.
जातिभेद मोडून रोटी-बेटी व्यवहाराचे देवघेवीवर हिंदू समाजात समता व भ्रातृ भाव पुन: जागृत करावयाचा असेल तर माझे मतें एक समाजोद्धारक मध्यवर्ति मंडळ स्थापन करून त्यांच्या शाखा म्हणून समाजसुधारणेच्या चर्चेसाठी गांवोगांव Free Thinkers Associations स्थापन व्हावयास पाहिजेत; आणि जेथे हरघडी अल्पश्रमांत, अल्पावधीत व बिनखर्चात सर्व प्रकारचे संकर विवाह, पुनर्विवाह, प्रीतिविवाह वगैरे कायदेशीररीत्या लावण्यांत येऊन त्यांची साक्षी पुराव्यानिशी पद्धतशीर नोंद ठेविली जाईल असे Hindoo Marriage Halls सदर संस्थेला जोडूनच गांवोगांव उभारले गेले पाहिजेत. या विसाव्या शतकांतील सद्यःस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतां हिंदूंच्या सामुदायिक प्रगती प्रीत्यर्थ विचारक्रांतीची मोठी लाट उपस्थित करण्याची आवश्यकता भासमान होऊ लागल्यामुळे नव्या मनूच्या उषःकालास पोषक अशा मतप्रतिपादनार्थ उपरिनिर्दिष्ट दोन संस्था शहरोगणिक निर्माण करून त्यांत प्रत्येक स्थानिक सुधारणेच्छु तरुणाने सक्रिय भाग घेतला पाहिजे.
दिलदारपणाने प्रत्येक जातीच्या अभिजात अंत:करणाचा बिनचूक ठाव घेतला पाहिजे. हा सरळ व प्रामाणिकपणाचा मार्ग पत्करावयाचा येवढे कबूल झाल्यावर मग एकमेकाविषयीं झाल्या-गेल्या भल्याबुर्या गोष्टी, कोल्हे स्मशानांतील खोल पुरलेले मुडदे उकरून काढतात त्या प्रमाणे, ऐतिहासिक काळांत बुड्या मारंमारून वर उकरून काढण्यांत काय हशील? गतकालिन हजारो वर्षांच्या इतिहासासंबंधी हल्ली जे तुटपुंजे ज्ञान उपलब्ध आहे, त्यांतील सर्व गोष्टी त्याच्या कारकिर्दीत बरोबर तशाच घडल्या असतील हे तरी खरे कोणी मानावे? एवढंच काय की, माजी घडामोडींना मूठमाती देऊन भावी पिढीच्या सुस्थितीसाठी प्रस्तुतचे गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या न काढता प्रेमाने, सलोख्याने व एकविचाराने सोडविण्यांतच खरी चिरस्थायी समाजसुधारणा आहे.
मी स्वत: शिस्त, नीति, इमान, सचोटी, सदाचार, भूतदया, स्पष्टवक्तेपणा, निष्काम कर्मप्रवृत्ति, नि:स्वार्थ, पराक्रम इ.इ. सद्गुणांचा भोक्ता असल्यामुळे, त्यापुढे मला कोणत्याच धर्माची विशेष मातब्बरी वाटत नाही. किंबहुना या धर्मकल्पनेच्या खुळावर अखिल दुनिया झुकत असून प्रत्येक राष्ट्रांतील शारीरिक, मानसिक व बौद्धिक शक्तीचा आणि विविध संपत्तीचा धर्माचे नांवाखाली अमर्याद दुरुपयोग जगाचे सुरुवातीपासून होत आला असल्यामुळे, हे असेच आणखी किती शतकें पुढे चालू राहणार याबद्दल मात्र विषाद वाटतो. धर्मकृत्यांवर अनाठायी होणार्या खर्चाची बचत करून दरमहाचे दरमहा प्रत्येक संसारी मनुष्याने तो आरोग्यावर खर्च केला, तर कौटुंबिक सुखासमाधानांत तेवढीच अधिक भर पडेल. निरपेक्षपणे चालू ठेविलेली अविश्रांत समाजसेवा हाच खरा धर्म होय.
विचार करा कीं, आज जगांत जेवढी देवळे, मशिदी, चर्चेस, पॅगोडे किंवा त्याहून भिन्न सांप्रदायाची वैभवशाली प्रार्थनामंदिरें उभी आहेत तेवढ्या श्रमांत व शिल्प सामुग्रीत किती गोरगरीबांची विनीत घरेदारे उभारली गेली असती बरें! तसेच धर्माचे नांवाखालीं जेवढे वस्त्रप्रावरण देवदेवतांच्या अगर धर्मगुरूच्या अंगावर पडते व क्षेत्रस्थ अन्नछत्रांतून अहर्निश जेवढी अन्नसंतर्पणे झडतात तेवढ्यांत किती दीन दुबळ्या अनाथांची लाज रक्षण होऊन गोळाभर अन्न नियमितपणे त्यांचे पोटांत जाईल बरें!
तात्पर्य काय की, धर्माचे नांवाखाली चालूं असलेल्या बेसुमार अविवेकी खर्चिकपणाला जरा व्यावहारिक युक्तायुक्ततेच्या नियंत्रणाचा पायबंद लावला की मजूरांच्या बेकारीचा प्रश्न सुटलाच म्हणून समजावे.
‘हिंदुजनांचा र्हास आणि अध:पात’ हे पुस्तक वाचून संपविल्यावर मला सर्वांत मोठा अचंबा वाटला तो असा की, विसाव्या शतकांतील पाश्चात्य संस्कृतीच्या झगझगीत प्रकाशांत कांहीं काळ घालवून परत आलेल्या बॅरिष्टर साहेबांनी भौतिक उन्नति हेंच जीवित-साफल्य मानणार्या उपयुक्ततावादाचा चष्मा डोळ्यावर चढवून आमच्या गतेतिहासाचे निरीक्षण करतांना शेकडो शतकापूर्वीच्या अज्ञानांध:कारांत चांचपडणार्या ब्राम्हणी संस्कृतीवर किंवा भिक्षुकशाहीवर ज्या ग्रंथद्वारे चांगले झणझणीत कोरडे ओढले व शक्तीच्या उपासकांचा उपहास केला, त्यांनी स्वत:त्यांतच केवळ भाविक व श्रद्धाळु बहुजन समाजाचे मनोभूमिकेवर आपल्या तार्किक व निरंकुश लिखाणाचा तात्काळ परिणाम व्हावा येवढ्याचसाठी स्वप्नसृष्टीतील भारतमातेचा दृष्टांत, साक्षात्कार, आकाशवाणी इत्यादि ढोंगाची बतावणी करावयास नको होती.
येथपर्यंत थोडेफार दोष दिग्दर्शन झाले. परंतु एकंदरीनें श्री. मुकर्जी यांच्या प्रबंधांतील जुन्या रूढींच्या पोकळपणावर स्वच्छ प्रकाश पाडणारा निर्भिड उहापोह मला मान्य आहे. जातिभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतील भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय, ही सर पी. सी. रॉय यांची निस्पृह वाणी आणि राष्ट्र या नात्याने हिंदूंचा जो र्हास आणि अध:पात झाला आहे, त्याची सर्व जबाबदारी ब्राम्हण भिक्षुकशाहीवरच आहे, हे श्री. मुकर्जी यांचे सत्यकथन खरोखरच मननीय आहे. ग्रंथाचे शेवटीं भरतवाक्य म्हणून भारतमातेचा जो संदेश छापला आहे त्यांतील राष्ट्रीय दुर्दैवाची मीमांसा, क्षेत्रानिहाय भिक्षुकशाहीची दक्षिणा उपटण्यासाठी अहर्निश चालू असलेली धडपड, शक्तिदेवांचे ध्यान व तिच्या गळ्यातील नररुंडमाळेचा गूढार्थ, स्त्री जातीच्या आत्मतेजाची शक्ति व त्यांच्या जन्मसिद्ध हक्कांचे संरक्षण स्त्री-शिक्षण-प्रसाराची आवश्यकता, कर्मन्यायाच्या कडक शिस्तीचा दण्डक, प्रौढ विवाहांतील प्रेमजीवनाची बहार, अखिल मानव जातिमात्राच्या हितवादाची महत्त्वाकांक्षा, वगैरे उपदेश कोणाही विचारवंत वाचकाचे डोक्यांत व भावनाप्रधान वाचकाचे अंत:करणात क्षणभर कल्लोळ ऊर्मी उठवून तरुणांना कर्तव्योन्मुख करील, असाच चैतन्यपूर्ण आहे.