भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या पार्श्वभूमीवर खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे, याची वाच्यता केल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकरच्या टिप्पणीने पुन्हा धुरळा उडवला आहे. एकीकडे खेळाच्या ताणाबाबत ‘बीसीसीआय’ सावध असतानाच मांजरेकरच्या प्रतिक्रियेने खेळातले वास्तव मांडले आहे. या निमित्ताने या जटील विषयाचा घेतलेला वेध.
– – –
‘‘जरा विसावू या वळणावर…’’ अशा शब्दांचे एक गाजलेले मराठी गाणे आहे. अशा प्रकारचा विसावा क्रिकेटपटूंना मिळणे हल्ली दुरापास्त झाले आहे कोणत्याही वळणावर. या स्पर्धेनंतर ती स्पर्धा, त्यानंतर ती स्पर्धा, असे खेळाडूंचे वेळापत्रक भरगच्च झाले आहे. आयपीएलच्या निमित्ताने या विषयाला तोंड फुटले आहे.
खेळाडूंना दुखापत झाली तर वैद्यकीय निर्देशांनुसार नमूद केलेल्या कालावधीसाठी आणि अपरिहार्य कौटुंबिक कारण असेल तर एखाद-दुसरा सामना किंवा एखाद्या मालिकेपुरतीच विश्रांती मिळते. सरकारी-खासगी कर्मचार्यांच्या सुटीच्या धोरणानुसार सांगायचे तर प्रासंगिक रजा (कॅज्युअल लीव्ह) खेळाडूंना मिळते. पण त्यांना मोठी रजा घेता येते का? खेळाडूंचे ‘वर्क लोड मॅनेजमेंट’ म्हणजेच त्यांच्यावरच्या खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करायला राष्ट्रीय क्रिकेट मंडळे उत्सुक असतात का? देशोदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन भरपूर मानधन मिळवून देणार्या लीग भरवल्या जातात, अशा वेळी खेळाडू सुद्धा पैसे कमावण्यासाठी क्वचित प्रसंगी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून लीगला प्राधान्य देताना दिसत आहेत. तरीही खेळाचा ताण सांभाळणे आणि त्यानुसार खेळाडूंचा आराम आणि खेळ यांचा समतोल राखणारे खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे खरेच शक्य आहे का?
माजी क्रिकेटपटू आणि परखड समालोचक संजय मांजरेकर याच्या या विषयावरच्या टिप्पणीने या विषयावर धुरळा उडवला आहे. खेळाच्या ताणाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संदिग्ध सावधगिरी बाळगलेली असतानाच मांजरेकरच्या प्रतिक्रियेने खेळातले वास्तव मांडले आहे. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर सर्वप्रथम भारताचा कर्णधार रोहित शर्माने या विषयावर भाष्य केले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीच्या दृष्टीने आम्ही गंभीर आहोत. या सामन्यात खेळणार्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे आम्ही बारकाईने निरीक्षण करीत आहोत, असे रोहितने म्हटले होते. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १६वा अध्याय सुरू होण्याआधी ‘बीसीसीआय’ने सर्वच फ्रँचायझींना निर्देश दिले की, खेळाडूंवरच्या खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन कसे करता येईल, यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) लक्ष ठेवून आहे. मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेतही त्यांचा कर्णधार असलेल्या रोहितने काही सामन्यांमध्ये विश्रांतीचे संकेत दिले. पण खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन किती अवघड आहे आणि ते ‘आयपीएल’मध्ये का करावे, याची कल्पना मांजरेकरच्या प्रतिक्रियेतून येते. ‘‘आयपीएलचे यश मुख्यत्वे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार खेळतो. चाहत्यांना ही लीग खूप आवडते, ती खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्वचषक खेळता यावा, म्हणून लीगमध्ये विश्रांती देण्याची मी पाठराखण करीत नाही. कारण आंतरराष्ट्रीय सामन्यांतही खेळाडूंना दुखापत होऊ शकते, काहीही होऊ शकते,’’ असे मांजरेकरने म्हटले आहे. मांजरेकरची आणि क्रिकेटरसिकांची अपेक्षा रास्त आहे. सर्वांच्या आवडत्या लीगमध्ये खेळाडूंनी खेळावे, असे त्यांना वाटते. कारण कुठेही खेळाचे यश खेळाडूंवर अवलंबून असते. स्थानिक क्रिकेट स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळतानाही दुखापत होऊ शकते. मग दुखापतीच्या भीतीने ‘आयपीएल’पुरतेच खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन कशासाठी, असा सवाल मांजरेकर करतो.
आज परिस्थिती काय आहे? भारताच्या वेगवान मार्याचा सूत्रधार जसप्रीत बुमरा आणि मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघेही महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. ते कधी सावरतील, याची खात्री नाही. ७ ते ११ जून या कालावधीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धासुद्धा होते आहे. या महत्त्वाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. ‘बीसीसीआय’ने चिंता प्रकट केली आहे, ती त्यांच्या करारबद्ध खेळाडूंबाबत. म्हणजेच चर्चेच्या केंद्रस्थानी या आगामी आव्हानांचे शिलेदार आहेत. अन्यथा, प्रसिध कृष्णाही दुखापतीतून आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत कार अपघातामध्ये झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. पण बीसीसीआयला त्यांची फिकीर नाही.
काही खेळाडू खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन आपल्या सोयीने करतात. जसप्रीत बुमरा गेल्या वर्षी भारतासाठी फक्त पाच ट्वेन्टी-२० सामने खेळला. मात्र मुंबई इंडियन्ससाठी तो १४ सामने खेळला. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. जसप्रीत ‘बीसीसीआय’च्या ताज्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत ए-प्लस श्रेणीत आहे. आणखी एक उदाहरण हार्दिक पंड्याचे देता येईल. दुखापती आणि विश्रांती यांचे अधिक प्रमाण त्याच्या कारकीर्दीत दिसते. काही जण माजी कर्णधार कपिल देवशी त्याची तुलना करतात. लीग आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्राधान्याने खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू किती कसोटी सामने खेळला आहे? कपिल हे अनेक वर्षे अथकपणे राष्ट्रीय संघाकडून खेळले होते.
२००८मध्ये प्रारंभ झालेल्या ‘आयपीएल’च्या रूपाने आधीच श्रीमंत असलेल्या ‘बीसीसीआय’ला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी सापडली. गेल्या १६ वर्षांत या स्पर्धेने टेलिव्हिजन-डिजिटल प्रसारण, खेळाडूंवरील बोली आणि लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडीत काढले. म्हणजेच प्रâँचायझी आणि जाहिरातदार यांची आर्थिक गुंतवणूक येथे मोठ्या प्रमाणात होते. अर्थात मूळ उद्देश म्हणजेच प्रेक्षक. मैदानावर येणार्या आणि त्याहून कित्येक पटीने टीव्ही किंवा डिजिटल माध्यमाद्वारे घरोघरी सामने पाहणार्या प्रेक्षकांवरच स्पर्धेचे यश ठरते. प्रâँचायझींनी कोट्यवधी रुपये मोजून खेळाडूला लिलावात खरेदी केले आहे ते आपला संघ जिंकावा या उद्देशाने. संघरचना हा त्यातील महत्त्वाचा घटक. प्रेक्षकसुद्धा सामने पाहतात, ते त्यांना खेळाडू आवडतात म्हणून. मग खेळाच्या ताणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयपीएलनेच का स्वीकारावी? मांजरेकर नेमके हेच तर मांडतो आहे.
आयपीएल’च्या वेळी खेळाडू
बिळातून बाहेर येतात!
खेळाचा ताण हा विषय आता येतो आहे. २०२१ आपण वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इंग्लंडमध्ये मालिका खेळायला गेलो होतो, तेव्हा आपण मालिकेत २-१ असे आघाडीवर होतो. भारतीय संघ तेव्हा रुबाबात खेळत होता. केएल राहुलने लॉर्ड्सवर शतक झळकावले, तर रोहित शर्मानेही शतक साकारले. नंतर ऑगस्टमध्ये सर्वांना खडाडून जाग आली. बर्याच खेळाडूंच्या मनात क्लबचे महत्त्व देशापेक्षा अधिक होते. आधी दुबई ‘आयपीएल’ खेळायचे आणि मग ट्वेन्टी-२० विश्वचषक हे निश्चित होते. यातही प्राधान्य फ्रँचायझी संघाला होते. परिणामी, ‘आयपीएल’ खेळून झालेल्या दुखापतींमुळे काही खेळाडूंना विश्वचषकाला मुकावे लागले. नंतर पुढील वर्षी झालेल्या उर्वरित कसोटी सामन्यात भारत हरला आणि इंग्लंडने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे असते, याची जाणीव तेव्हा भारताला झाली. ‘आयपीएल’ आल्यावरच हा विषय का येतो? वर्षभर याची चर्चा का होत नाही? रोहितला आताच कशी जाणीव होते की काही सामन्यांत खेळू शकणार नाही? त्यामुळे ‘आयपीएल’ समाप्तीनंतर दोन प्रकारच्या दुखापती होऊ शकतात. एक प्रकार मैदानावर झालेल्या आणि दुसर्या बनावट दुखापती. या बनावट दुखापती १० किंवा त्याहून जास्त षटके टाकायची नसली की होतात. मग खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन हा विषय येतो कुठून? ट्वेन्टी-२० लीग आली की, हे काही खेळाडू बिळातून बाहेर येतात, हेच चिंताजनक आहे. या खेळाडूंना ‘आयपीएल’ खेळून कोट्यवधी रुपये मिळत असतील, तर जास्त षटकांचा ताण ते कशासाठी घेतील? त्यामुळेच खेळाच्या ताणाच्या व्यवस्थापनाचा खेळाडू सोयिस्कर अर्थ लावतात.
– सुलक्षण कुलकर्णी,
माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक