ज्येष्ठ कवी, विडंबनकार, लेखक अशोक नायगावकर यांची पंचाहत्तरी नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने ग्रंथालीतर्फे त्यांचा सत्कार केला गेला आणि वाटेवरच्या कविता, कवितेच्या वाटेवर व नायगावकर वगैरे वगैरे या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले गेले. या सोहळ्यात ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केलेले हे भाषण नायगावकरांची सामाजिक भाष्यकार कवी ही प्रतिमा स्पष्ट करणारे आहे. नायगावकरांना टाळीबाज मंचीय हास्यकवी ठरवून मोकळे होणार्यांच्या डोळयांत अंजन घालणारे हे भाषण, खास मार्मिकच्या वाचकांसाठी…
– – –
अशोक नायगावकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्तानं आज आपण इथं जमलो आहोत. मला खरं तर अशोक पंच्याहत्तर वर्षांचा वगैरे झालाय हे खरंच वाटत नाही. त्याला मी ओळखते ते, मी विशीपंचविशीत असल्यापासून. तो आमच्या घरी यायचा. बाबांना भेटायला येणार्या अनेक कवींमधलाच तो एक असला तरी त्याच्या कवितेनं तेव्हाच लक्ष वेधलं होतं. मला आठवतं, लोक मला कवयित्री म्हणून थोडफार ओळखायला लागल्यावर ग्रंथालीनं महात्मा फुले शाळेत नव्या कवींच्या मालिकेत माझी मुलाखत ठेवली होती आणि ती अशोकनं घेतली होती. त्यावेळी खूप छान वाटलं होतं. तेव्हापासून अशोकच्या कविता वाचत ऐकत, वाचत आणि त्याच्यासोबत अनेक कवितांचे कार्यक्रम करत आज या टप्प्यावर आपण आलो आहोत.
अशोकला मुख्यत्वे आपण सगळे ओळखतो ते समकाळाचा, तसेच या काळावर नेमकं भाष्य करणारा कवी म्हणून. अशोक एक कवी म्हणून ना भूतकाळात रमला ना पानाफुलात, रंग आणि निसर्गात. अशोकची कविता ही निसर्गात रमणं शक्यच नाही, कारण तो आजूबाजूला जे पाहतो आहे ते पाहताना होणारी तगमग त्याला पानंफुलात रमू देत नाही. साध्या साध्या गोष्टींत दिसणारी हिंसा असो, जगण्याचे प्रश्न असो की महापुरुषांच्या नावानं राजकारण करणारे लोक असोत, अशोक बोलतो तो या सगळ्यांविषयी आणि जगण्यातल्या विसंगतींविषयी.
अशोकच्या ‘वाटेवरच्या कविता’ या संग्रहातील प्रत्येक कविता ही आजच्या जगण्यातला विरोधाभास दाखवते आणि तेही उपरोधातून. सटायर हा त्याच्या कवितेचा आत्मा आहे आणि त्याचा उपयोग अशोक अत्यंत सशक्तपणे करतो.
त्यामुळेच अशोक टिळकांना ठणकावून सांगतो. तुम्ही चौपाटीवर इथं कशासाठी उभे आहात…
..तुमचं बी इथे रुजणं कठीण आहे.
ज्योतिबांचे आभार मानून तो म्हणतो,
तुम्ही तिला उंबरठ्याच्या बाहेर आणून
त थ द ध
प फ भ म
शिकवलेत
आणि कितीतरी फरक पडला.
आता तिला
सही निशाणी
डाव्या अंगठ्यासाठी
शाई फासावी लागत नाही.
आता ती स्वतःच लिहू शकते
घासलेट ओतून घेण्याआधी
(मागे राहिलेल्या चिमण्यांना कष्ट होऊ नयेत म्हणून.)
मी स्वखुशीनं जाळून घेतेय.
आणि बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून तो म्हणतो,
भीमा तुझ्या शताब्दीचा फेस फसफसतोय…
तुला भोज्या बनवलाय आम्ही
आणि काय घाई उडालीय तुला शिवून घ्यायची..
संस्कृतीचा पू वहातोय तुझ्या अदृश्य जखमांतून
तुझा ब्रॉन्झ देह काळा ठिक्कर, उन्हात
भीमा
एक तारेचा खरखरा ब्रश घे
घास संस्कृतीचं अंगांग
आणि ओतत राहा फिनेल कन्याकुमारीपर्यंत…
असं म्हणताना अशोक पुढे म्हणतो
मी सुरक्षित हिंदू कॉलनीत
तुझ्यावर कविता लिहिताना
तू सांडपाण्यासारखा वहात असतोस शहराखालून
रस्ता खोदतोस
माती उपसतोस स्वतःसाठी
मेन होलमधून मुडदा होऊन बाहेर पडतोस
जातीचा स्टिकर लावून बंद केलेलं असतं तुला..
शोषणावरचं इतकं अस्वस्थ करणारं भाष्य अशोकशिवाय कोणी केलं असेल असं मला वाटतं नाही.
समाज म्हणून आपण नेमके कुठं उभे आहोत हे तो सतत त्याच्या कवितेतून सांगत राहतोय आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राला आपण राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक र्हासाकडे घेऊन जातो आहोत यावर तो तीव्रतेनं भाष्य करत राहतो.
भिंत धर्माची जाड घट्ट झाली
आणि रक्ताची सवय होत गेली
किंवा
देवाच्या जखमेवरती हे मीठ चोळले आता
अन् कमंडलूतील तीर्थ बघ रक्त जाहले आता
संताच्या कमरेलाही तलवार लटकते आता
अन् आशीर्वच हातांनी बघ मुठी वळवल्या आता.
या ९२ साली आलेल्या संग्रहातल्या कविता वाचल्यावर त्या कशा कालातीत आहेत, याची जाणीव होते. त्या आज तर जास्त चपखल बसताहेत असं वाटतं.
‘शाकाहारी’सारखी त्याची कविता ही अशीच आजच्या हिंसेविषयी बोलणारी. अशोक ती अलिकडे वेगळ्या प्रकारे वाचतो. महिला किती क्रूरपणे स्वयंपाकघरात कापत चिरत असतात याचं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करत तो ती वाचतो आणि लोक हसतात. सादरीकरण करताना अनेकदा अशोक ज्या प्रकारे ते सादर करतो, त्यानं लोक हसत असले तरी त्या कवितेतल्या प्रत्येक शब्दात खरं तर आत रडणारा विदूषक असतो. तो हसवत राहातो पण त्याच्या कवितेतल्या ओळी या कारूण्यानं भरलेल्या असतात, कोरडे ओढणार्या असतात, डोळे खाडकन उघडणार्या असतात. अशोकची गंभीर कविता ऐकताना लोक हसतात, तेव्हा मला खूप त्रास होतो. ‘शाकाहारी’सारखी कविता अशोकनं मला पहिल्यांदा ऐकवली तेव्हा अशोक इतका द्रष्टा असेल असं मला वाटलं नव्हतं. पण कवी दिक्कालातून पहातो असं केशवसुतांनी म्हटलं आहेच.
पंधरा एक वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता आजचं हिंसक वातावरण उभं करते. शाकाहारी असणारे लोक किती वेगवेगळ्या प्रकारे हिंसक होऊ शकतात, हे त्यानं तेव्हा लिहिलं होतं. तुम्ही कोणता आहार घेता यावरून तुमची संस्कृती तुमची वृत्ती ठरत नाही, तर ती तुमच्या कृतीतून दिसत असते. आज शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना बिल्डिंगमध्ये जागा देत नाहीत, मांस बाळगल्याच्या संशयावरून एखाद्याला मारूनही टाकतात, लिंचिग करतात. शाकाहारी संतमहंत एखाद्या नटाला आव्हान देऊन म्हणतात, तू आमच्या समोर आलास, तर तुला जिवंत जाळून टाकू. म्हणूनच कदाचित अशोकनं उद्वेगानं या कवितेच्या शेवटी म्हटंल आहे ‘हे काय चाललंय शाकाहारी युगानुयुगे?’
आपल्या सरकारी कामांवर, सरकार या व्यवस्थेवर अशोकनं त्याच्या अनेक कवितांत नेमकी टिपण्णी केली आहे. सरकार ही अशी व्यवस्था आहे की मुख्य प्रश्नांना बगल देऊन छोट्या छोट्या गोष्टींनी प्रजेला खूश करत असते. सुलभ शौचालयं बांधली जात होती त्या काळावर भाष्य करताना अशोक संपत गायकवाडसारख्या कवितेत म्हणतो, सरकारनं जगायची नाय पण हगायची सोय केली आहे. हे असं म्हणताना झोपडपट्टीत राहाणार्या संपत गायकवाडसारख्या हजारो गरीब, वंचितांची करूण कहाणीच उभी करतो. अशोकचा एक एक शब्द म्हणजे आपल्या अंगावर ओढलेले कोरडेच असतात.
दुसर्या एका कवितेत अशोक म्हणतो,
सरकारच्या डोक्यात आलं की
डोक्याला खूप ऊन लागतंय
तर सरकार झाडं लावू शकतं.
अथवा सरपण हवं असेल तर
सरकार झाडं तोडूही शकतं…
सरकारला समजा वाटलं की रद्दी कमी पडतेय
तर ते पुस्तकं छापू शकतं…
सरकारला वाटलं की लोकांनी आनंद करावा,
धुंद व्हावं तर
ते रस्त्यारस्त्यावर गल्लोगल्ली
बिअरबारची दुकानही उघडू शकतं…
…सरकारला आई नसते
त्यामुळे कुशीतल्या ओक्साबोक्शी मायेला
पारखं झालेलं असतं सरकार
आणि बाप नसल्याने
जाब विचारणारंही कुणी नसतं सरकारला…
…सगळी सरकारं एकत्र आली तरी
त्यांना समजून चुकतं
हेच करणं अटळ असतं आपपाल्या देशात
हेच करणं अटळ असतं…
सत्तेचे हे खेळ आणि आपल्यासारख्या माणसांची, जनतेची हतबलता यावर तो त्या काळात सहज बोलत होता आणि आजही बोलतो आहे. पण त्याच वेळी हे सगळं निमूट पहाणार्या आणि केवळ स्वतःच्याच जगण्याची फिकीर करणार्या मध्यमवर्गीय माणसावर आणि कवीवरही नेमकं भाष्य करतो.
हे डोळे माझे, उघडे होते
खूप पाहिले काहीबाही
या कानांनीही खूप ऐकले
पण गप्प राहिलो, वदलो नाही
मी लढलो नाही.
मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही.
मी लढलो नाही.
हे म्हणताना माणसाची हतबलताही व्यक्त करतो.
अलिकडेच लिहिलेली ‘कशाचा कशाशी काही संबंध नाही’ ही त्याची कविता अगदी स्पष्ट बोलते. त्याचा शेवट तर त्यानं थेट केलेला आहे.
कशातच लक्ष लागेना म्हणताना
शेवटी घरचे म्हणायला लागले
एकदा डॉक्टरला तरी दाखवा
म्हणून गेलो तर
त्यांनी स्टेथस्कोप खिशालाच लावत
काय होतं विचारल्यावर
सारखं भाजपमध्ये जावंसं वाटतंय सांगितलं…
हा शेवट आहे त्याच्या कवितेचा. अशोकच्या कवितेत अशा पंचलाइन्स असतात. शेवट तर ठासून भरलेल्या बारासारख्या चिंध्याच करतो मेंदूच्या. प्रचंड अस्वस्थ करतो. अर्थात तुम्ही संवेदनशील असाल तर.
मध्यमवर्गाचा पळपुटेपणा, बोटचेपेपणा यावर तो नेमकं बोट ठेवतो आणि त्याच वेळी सामाजिक आणि राजकीय विरोधाभासांवरही बोलतो.
असा हा कवी, माणूस म्हणूनही निर्मळ आणि स्वच्छ आहे. कविसंमेलनांच्या आणि इतर अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं अशोक नायगावकरांबरोबर प्रवास केला आहे मी. मला आठवतं, एकदा तर त्याच्या घरी जाऊन जेवून वगैरे आम्ही सगळे, म्हणजे वहिनीला देखील, पिंपरीला सोबत घेऊन गेलो होतो. परभणीच्या मुशायरासाठी मी त्याच्यासोबत गेले होते. ज्या माणसांबरोबर आपण निवांत जाऊ शकतो अशा माणसातला एक माणूस आहे अशोक. बाबांविषयी त्याला खूप प्रेम होतं. बाबांवर मनापासून प्रेम करायचा अशोक. त्यांचं ‘लांबा उगवे आगरी’ वाचल्यावर फोन आला होता त्याचा. खूप भरभरून बोलत होता. बाबा गेल्यावर त्यानं त्यांच्याविषयी लिहिलं होतं.
खारेपाटाला
कोंब फुटले
त्यातून
म. सु. उगवले.
दारिद्र्याचे सोने झाले.
हे असं सहज सुचायचं त्याला. त्यांच्याविषयी त्याच्या मनात आतबाहेर असं काही नव्हतं निव्वळ स्नेह. माझ्याविषयीही तेच. सुरुवातीच्या काळात खूप फेर्या व्हायच्या त्याच्या बाबांकडे. चर्चा व्हायच्या कवितेवर. त्याच्या कविता ऐकणे ही पर्वणी असायची आमच्यासाठी.
बाबांना साहित्य अकादमी मिळालं तेव्हा मुलुंडला त्यांच्या सत्कार झाला होता. तोही अशोकच्या हस्ते. आपल्या हातून म. सु. पाटलांचा सत्कार होतो आहे याचं खूप अप्रूप वाटलं होतं त्याला आणि खूप आनंदही झाला होता. मला फोन करून त्यानं सांगितलं होतं. फोटोही पाठवले होते. मी नव्हते त्या कार्यक्रमाला. असते तर ते हृद्य क्षण डोळ्यात साठवता आले असते. पण अशोक आज सांगते, त्यावेळी तुझ्या ज्या भावना होत्या त्याच आज माझ्या आहेत. तुझ्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात आज मला तुझ्याविषयी बोलायला मिळतं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अप्रूप वाटण्यासारखीच गोष्ट आहे. तू आज पंच्याहत्तरीचा झाला असलास तरी तू आमच्याच वयाचा आहेस. तू कदाचित या पंच्याहत्तरीवरही काही लिहून ठेवलं असशील याची मला कल्पना आहे. ते लवकरच ऐकायला मिळेल. असाच लिहीत राहा आणि लोकांना विचार करायला भाग पाड.
तुला आरोग्यदायी आणि लिखाणासाठी समृद्ध आयुष्य लाभो आणि तुझे विचार लोकांच्या मनात रूजोत हीच प्रार्थना करते.