हिंदुत्वाच्या मुद्द्यावर १९८७ साली लढवलेली विलेपार्ले पोटनिवडणूक शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांनी जिंकली. या मुद्द्यावर निवडणुका लढवून जिंकता येतात हे शिवसेनेने दाखवून दिले. या विजयामुळे शिवसेनेवर कौतुकाचा वर्षाव झाला, तशी टीकाही झाली. तथाकथित सेक्युलर राजकीय पक्षांनी तर या विजयाचा धसका घेतला. मग शिवसेना जातीयवाद फोफावते, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचवते, तेव्हा तिच्यावर बंदी घाला, अशी मागणी झाली. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले होते की, हिंमत असेल तर प्रथम मुस्लीम लीगवर बंदी घाला, मग शिवसेनेचा बंदीसाठी विचार करा. पण सरकारची दोन्ही करण्याची हिंमत झाली नाही.
हिंदुत्वासाठी लढणार्या शिवसेनेवर असे आरोप चालू असताना जानेवारी १९८८मध्ये एक गंभीर स्वरुपाची घटना घडली. राजकारणात कोणती घटना केव्हा गंभीर स्वरुप धारण करील हे सांगता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘रिडल्स इन् हिंदुइझम’ या पुस्तकातील ‘रिडल्स ऑफ रामा अॅण्ड कृष्णा’ या परीशिष्टामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या होत्या. हे परिशिष्ट पुस्तकातून वगळावे अशी आग्रहाची मागणी शिवसेना आणि मराठा महासंघाने केली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपासह सर्व पक्षांनी परिशिष्टाला पाठिंबा दिला. शिवसेनेने हिंदू देवदेवतांची विटंबना झाली असल्यामुळे कडाडून विरोध केला.
हे वादग्रस्त परिशिष्ट ग्रंथात समाविष्ट करू नये या मागणीसाठी शिवसेनेतर्पेâ विराट मोर्चा काढण्यात आला. त्याआधी मराठा महासंघाचा मोर्चा निघाला होता. त्यानंतर दलित नेते प्रकाश आंबेडकर आणि रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.
‘हिंदू विरुद्ध दलित’ असे वातावरण महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली. तेव्हा या शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथातील वादग्रस्त परिशिष्ट पुस्तकात ठेवण्यास अखेर शिवसेनेने मान्यता दिली. प्रकरणाच्या शेवटी मात्र या प्रकरणाशी शासन सहमत नाही अशी तळटीप टाकण्याची अट शासनाने मानली. एका बैठकीत शिवसेना आणि डॉ. आंबेडकर विचारसंवर्धक समितीच्या नेत्यांनी हा समझोता मान्य केला, त्यामुळे तेव्हा महाराष्ट्रात होऊ घातलेला संघर्ष टळला.
‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी ‘वाद संपला, संवाद ठेवा’ अशी विनंती अग्रलेखातून केली. बाळासाहेबांच्या अग्रलेखाचे सर्वत्र कौतुक झाले. बाळासाहेबांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे दोन्ही समाजांत शांतता प्रस्थापित करण्यास मदत झाली.
रिपाईने शिवसेना आणि मराठा महासंघावर बंदी घालण्याची मागणी केली. तर रिपाईचे प्रकाश आंबेडकर यांनी रिडल्सची लढाई आता दिल्लीत लढण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी तयार रहावे, असे मोर्चातील लोकांना आवाहन केले. हा मोर्चा संपल्यानंतर परत जात असताना काही कार्यकर्त्यांनी अर्वाच्य शिव्या दिल्या, तर काही कार्यकर्त्यांनी फ्लोरा फाऊंटन येथील संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्मा स्मारकाची विटंबना केली, तोडफोड केली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र शब्दातच या घटनेचा निषेध केला. प्रकाश आंबेडकर यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या मोर्चातील ज्या ज्या रिपब्लिकन नेत्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर जहरी टीका केली, ते नंतर शिवसेनेचे मित्र पक्ष झाले तर काहींची शिवसेनाप्रमुखांशी वैय्यक्तिक मैत्री झाली.
दरम्यान, पंजाबात सुरू असलेले हिंदूंचे शिरकाण थांबवावे आणि शीख धर्मगुरुंनी अतिरेकी खलिस्तानवाद्यांना शीख पंथातून काढून टाकावे, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुखांनी शीखांवर आर्थिक बहिष्कार पुकारण्याचा निर्णय मार्च १९८८मध्ये एका पत्रकार परिषदेत घेतला. शिवसेनेची भूमिका नेहमीच राष्ट्रहिताची राहिली आहे. तरी देखील चौफेर टीका झाली. देशात प्रतिसाद उमटले. लोकसभा व राज्यसभेतही चर्चा झाली. बाळासाहेबांच्या या घोषणेची दखल शीख समुदायाने गंभीरपणे घेतली. हिंदूंच्या निरपराध हत्यांचा निषेध करून शीखांवरील बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी बाळासाहेबांना केले. महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांविरुद्ध गुन्हाही दाखल केला, पण बाळासाहेब डगमगले नाहीत. शेवटी प्रश्न अधिक चिघळू नये म्हणून शीख समुदायाच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीला मान देऊन शीखांवरील आर्थिक बहिष्काराचा निर्णय पुढे ढकलला.
बौद्ध समाजातील नेत्यांनी जेव्हा हिंदू दैवतांच्या भावनेला ठेच पोहोचवली आणि शीख नेत्यांनी हिंदू अस्मितेवर घाला घातला तेव्हा शिवसेनाप्रमुख आणि त्यांची शिवसेना हिंदूरक्षक म्हणून खंबीरपणे उभी राहिली.
शिवसेनेने मराठी माणसाच्या प्रश्नाइतकेच हिंदुत्वाला महत्त्व देणे सुरू केले. शिवसेनेचे हिंदुत्व जहाल होते, कडवे होते. त्यावेळी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी शिवसेनेवर आरोप केला की, हिंदू जागरणाच्या नावाखाली शिवसेना राजकीय फायदा उठवू पाहते. ते पुढे असेही म्हणाले की, ‘शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करणे किंवा न करणे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ही युती शक्य नाही.’ पण पुढे भाजपने राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेशी युती केलीच.
दरम्यान, सातार्यामध्ये एका जाहीर सभेत बोलताना शिवसेनाप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘आज हिंदुत्व संकटात असून त्याला वाचवण्यासाठी देवळं उभारण्याची गरज नाही तर हिंदुत्वाला विरोध करणार्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.’ सातार्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना त्यांनी हिंदुत्वाबद्दलची आपली जहाल दिशा स्वच्छ शब्दात मांडली. त्यानंतर झालेल्या दादरच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात ते म्हणाले, ‘हिंदुत्वाचा प्रचार न्यायालये रोखू शकणार नाहीत. न्यायालयाचा निकाल काहीही लागो, देशहितासाठी यापुढील सर्व निवडणुका शिवसेना हिंदुत्वाच्या विषयावरच लढेल.’ बाळासाहेब यापुढे एक पाऊल टाकून डोंबिवली येथील सभेत इशारा देताना म्हणाले, ‘शिवसेनेला न्यायालयाने जात्यंध, धर्मांध ठरवून निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केला तर शिवसेना महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही.’
शिवसेनेने हिंदुत्वाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य दाखवले. महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसेनाप्रमुख जात होते तिथे तिथे हिंदुत्वाचा प्रसार करत होते. शिवसेनेचे जहाल, कडवे हिंदुत्व सातारा, डोंबिवली आणि दादर मधील त्यांच्या भाषणाने ते अधोरेखित होत होते.
ज्या संघाने आणि भाजपाने हिंदुंवरील अन्यायाच्या बाजू पेटून उठायला हवे होते त्यांनी शेपूट घातले. शिवसेना मात्र परिणामाची पर्वा न करता हिंदूंच्या बाजूने उभी राहिली. हे हिंदू पाहत होते, अनुभवत होते. या सगळ्या घटनांमुळे बाळासाहेब ठाकरे आता हळूहळू ‘हिंदुत्वरक्षक’ म्हणून पुढे येऊ लागले होते.
शिवसेनेने मराठी धोरण सोडून राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाचा स्वीकार केला असा आरोप त्यावेळी झाला, तो बिनबुडाचा आणि द्वेषमूलक होता. मराठी अस्मितेचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने धोरणांमध्ये किंचितही बदल न करता हिंदुत्वाचे शिवधनुष्य काळाचे आव्हान म्हणून उचलले. या सर्व घटनांनी शिवसेनेचे हिंदुत्व तावून-सुलाखून निघाले.