सकाळी सकाळी मोबाइलचा अलार्म बंद करायचा, आणखी दहा मिनिटे लोळायचे आणि मग उठायचे, अशी सवय असलेल्या माणसाला पहाटे पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली, तर त्या आनंदाचे वर्णन काय करावे? त्याच आनंदात सागर पारवेने फटाफट दाढी उरकली, मस्त गार पाण्याने अंघोळ केली आणि चहा उकळायला लावला. मिस्टर सागर पारवे आज अधिकृतरीत्या खामगाव पोलीस स्टेशनचा चार्ज घेणार होते. बदली झाल्याची थोडी रुखरुख होती, पण बढती मिळाल्याचा आनंद देखील वेगळा होता. सकाळी सकाळी आलेली सुरेख जाग, त्यात बढतीचा दुहेरी आनंद अशा उत्साहात ड्रेस चढवून सागरने बुलेटला किक मारली आणि सहा फुटाचा तो तगडा देह सावरत बुलेटने खामगाव पोलीस स्टेशनचा रस्ता पकडला.
‘इन्स्पेक्टर सागर पारवे’ नावाची नवी कोरी पाटी कौतुकाने न्याहाळत आणि स्टाफने दिलेला पुष्पगुच्छ एका हाताने सावरत सागरने खुर्चीत देह कोंबला. या नव्या आलेल्या इन्स्पेक्टरविषयी स्टाफने बरेच काही ऐकले होते. एक तर त्याचा तो भक्कम देह आधी काळजात धडकी भरवणारा आणि त्यात त्याच्याविषयी ऐकलेले एक एक किस्से. एका पळणार्या गुंडाला सागरने शिडीवरून असे काही खाली ओढले होते की त्या गुंडाचा पाय पार खुब्यातून निखळला होता, इथपासून ते स्वत:च्या सीनिअरच्या लाचखोरीची तक्रार त्याने स्वत: कशी केली होती, असे अनेक किस्से तो यायच्या आधी खामगाव चौकीत पोहोचलेले होते. म्हणतात ना, तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधी तुमची कीर्ती तिथे पोहोचलेली असते, तोच प्रकार!
हवालदार शेळकेंनी सर्वांची ओळख करून दिली आणि सागरने स्वत:हून सर्वांसाठी चहा आणि भजी मागवली. पहिल्याच दिवशी स्वत:च्या खिशात हात घालणारा दिलदार साहेब एका झटक्यात सगळ्यांना मनात घर करून बसला.
‘शेळके, अहो किती वेळ झाला सुतारांना जाऊन! काय कांद्याचे पीक लावून, कांदे पिकवून मग त्याची भजी बनवणार आहेत का काय?’ सागरने विचारले आणि चौकीत एकच हशा पिकला. या आडदांड देहामधला मेंदू तितकाच सुपीक आणि मिश्किल आहे हे सगळ्यांना जाणवले.
‘कुंभार मॅडम, फोन लावा जरा सुतारांना. कुठे अडकलेत बघा, का झाला त्यांचा पण अब्दुल?’ शेळकेंनी वाक्य संपवले आणि चौकीत प्रचंड हशा पुन्हा एकदा पिकला. अर्थात या कोणा अब्दुलला सागर ओळखत नसल्याने, त्याच्या चेहर्यावर प्रश्नाचे जाळे उभे राहिले.
‘शेळके, सांगा सांगा… साहेबांना अब्दुलची कथा सांगा. लवकरच भेट होणारच आहे त्यांची,’ कुंभार मॅडम डोळे मिचकावत म्हणाल्या आणि त्या कोणा अब्दुलविषयी सागरची उत्सुकता उगाच वाढली.
‘साहेब, आम्ही हसतोय खरे, पण या अब्दुलची कहाणी तशी दुर्दैवी आहे बघा. सात वर्षांपूर्वी त्याच्या बायकोचा खून झाला. ज्याच्यावर खुनाचा संशय होता तो आरोपी बिहारमध्ये त्याच्या गावाला पळाला तो आजवर सापडलेला नाही. अख्खे बिहार पालथे घालून झाले, आजूबाजूची राज्येसुद्धा धुंडाळली गेली. स्थानिक पोलिसांची अनेकदा मदत घेतली गेली. पण गोलू म्हणजे तो बिहारी मजूर जणू हवेत गायब झाला म्हणा ना! काही काळाने पोलिसांचा तपास देखील थंडावला. त्यावेळी हे गाव तेवढे पुढारलेले देखील नव्हते. अब्दुलच्या बायकोच्या म्हणजे रेश्माच्या वडिलांची आणि भावांची गावावर एका हाती सत्ता होती आणि आजही आहे. त्यांनी पण शासन दरबारी अनेक प्रयत्न केले, पण हातात एक पुरावा म्हणून लागला नाही. बरं, तो गोलू ज्या गावाला म्हणून पळाला, तिथे गोलू नावाची दोनच माणसे होती, जी वेगळीच निघाली. या गोलूचा ना फोटो, ना काही पक्का पत्ता कोणापाशी होता. एक स्केच बनवले होते, पण त्याचा देखील काही फायदा झाला नाही. आता हा अब्दुल सात वर्षे झाली शासन दरबारी खेटे घालतो आहे. पुन्हा कोर्टाच्या चकरा मारत आहे की, ही केस पुन्हा ओपन करावी आणि नव्याने तपास करावा.’
‘सात वर्षे हा माणूस प्रयत्न करतोय? शेळके, खरे तर हे आपले अपयश आहे,’ उद्विग्नपणे सागर म्हणाला. त्यावर शेळकेंनी देखील मान डोलावली, पण एखाद्याचे दु:ख हे कोणासाठी विनोद कसा बनते, ते सागरला आज नव्याने उमगले होते. त्या कोण कुठल्या अब्दुलविषयी त्याला उगाचच ममत्व वाटू लागले होते.
– – –
सागर आता नव्या जबाबदारीत चांगलाच गुंतला होता. गावात गुन्हे तसे किरकोळ, मुख्यत: शेतीसंदर्भातले, त्यामुळे फार दगदग अशी नव्हती; पण प्रत्येक कामाचे कागद व्यवस्थित तयार करून ठेवायची सागरला सवय होती. त्यामुळे चौकीच्या हाताला देखील चांगलेच काम मिळाले होते. अशा धावपळीत अब्दुलचा विषय डोक्यातून हद्दपारच व्हायचा, पण कोण ना कोण त्याची आठवण काढायचे आणि पुन्हा एकदा चर्चेला उसळी मिळायची. हा अब्दुल लवकरच आपल्या धावपळीत दुपटीने भर घालणार आहे, याची तेव्हा सागरला पुसटशी देखील जाणीव नव्हती.
– – –
टेबलावर पडलेल्या त्या लिफाफ्याकडे सागर एकटक बघत राहिला होता. तो लिफाफा एक प्रकारे त्याच्यासाठी आनंद देखील घेऊन आला होता आणि आव्हान देखील. आनंद याचा होता की अब्दुलच्या केसची पुन्हा नव्याने तपासणी करावी असा आदेश कोर्टाने दिला होता आणि आव्हान होते ते उशिरा का होईना, अब्दुलला न्याय मिळवून देण्याचे.
‘शेळके, आता काही दिवस विश्रांती हा शब्द विसरायचा. इथे आल्यापासून माझ्या मनाला जी रुखरुख लागली होती, ती दूर करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. अब्दुलच्या केससंदर्भातला प्रत्येक कागद मला दोन तासांत माझ्या टेबलवर हवा आहे. रेश्माची हाडे पुन्हा तपासणीसाठी बाहेर काढावी लागतील, त्यासाठी कागदपत्रे बनवा, तिच्या नातेवाईकांच्या परवानगीची सही लागेल, ती लवकरात लवकर मिळवा. आता उशीर करायचा नाही,’ बोलता बोलता सागरने मोबाइल हातात घेतला आणि चिंचोळे साहेबांचा नंबर लावला.
‘बोल सागर, कोर्टाचा आदेश मिळाला?’
‘येस सर! त्या संदर्भातच मला तुमच्याशी बोलायचे आहे.’
‘काय मदत हवी आहे तुला?’
‘सर, मी रेश्माची हाडे तपासणीसाठी पुन्हा एकदा बाहेर काढतो आहे. फोरेन्सिकसाठी जया सलगर मॅडम मिळू शकल्या तर बरे होईल.’
‘कसे शक्य आहे सागर? अरे इथे इतक्या केसेस पेंडिंग असताना तिला कसे पाठवता येईल? मुळात हातात असलेली कामे सोडून ती यायला तयार होईल का?’
‘ते तुम्ही माझ्यावर सोडा सर.’
‘वेल, मी प्रयत्न करतो,’ साहेबांनी आश्वासन दिले आणि सागर सुखावला. जया सलगर मॅडम म्हणजे ‘फोरेन्सिक’ मधला शेवटचा शब्द. त्यांच्या नुसत्या रिपोर्टच्या आधारावर सरकारी वकिलांनी भल्या भल्या केस फिरवून दाखवण्याचा पराक्रम अनेकदा केलेला होता. नुसत्या कवटीवरून मृताचा चेहरा कसा दिसत असेल हे नुसते न सांगता, तो बनवून देखील दाखवण्याचे कसब असलेली जया सलगर म्हणजे पोलीस दलातला एक हिरा होती. तिची आणि सागरची कॉलेजपासून मैत्री. त्यामुळे ती नकार देणार नाही याची सागरला खात्री होती. मुख्य म्हणजे, सागरप्रमाणेच जयालाही आव्हानाला सामोरे जायची प्रचंड आवड होती. अब्दुलची केस आव्हानच तर होती!
– – –
‘थँक्स जया, इतक्या शॉर्ट नोटीसवर तू मदतीसाठी धावलीस,’ सागर कौतुकाने म्हणाला.
‘हो हो… आता जरा, मला आणि रेश्माला एकांत देशील का?’ समोरच्या कवटीचे निरीक्षण करत जया गमतीने म्हणाली आणि सागर तिच्या डोक्यावर एक टपली मारून बाहेर पडला.
चहाची ऑर्डर देत सागरने रेश्मा केसची फाइल पुन्हा एकदा समोर ओढली. दोन दिवसात तो तिसर्यांदा ही फाइल वाचत होता. त्यावेळच्या तपास अधिकार्याने फाइल उत्तम तयार केलेली होती. पण दुर्दैवाने त्याच्या हाताला एक छोटा पुरावा देखील लागलेला नव्हता. अब्दुलने घराच्या सफाईचे काम काढले होते आणि ते काम त्याने हसनला दिले होते. गोलू या हसनकडेच कामाला होता. तो सलग चार दिवस अब्दुलकडे कामाला येत होता. शेवटचे दोन दिवस तो एकट्याने काम करत होता. त्यामुळे घराची त्याला चांगली माहिती झाली होती. अब्दुल घरी नसल्याची संधी त्याने साधली आणि रेश्माच्या डोक्यात हातोडी मारून, घरातले दागिने घेऊन पसार झाला. या गोलूचा अनेक मार्गांनी तपास घेण्यात आला, पण दुर्दैवाने प्रत्येक मार्ग बंद पडला होता. गोलू नावाचा मनुष्य जणू अदृश्य झाला होता.
‘सर, तुम्हाला काय वाटतंय? काही फायदा होईल पुन्हा तपासाचा?’
‘विश्वास पे दुनिया कायम है शेळके. आपण पूर्ण जोर लावायचा, यश नक्की चालत येईल.’ तेवढ्यात सागरचा फोन वाजला आणि जयाच्या बोलवण्यावरून सागर धावत निघाला. जयाचा फोन म्हणजे नक्की काहीतरी हाताला लागले असावे.
‘वेल सागर, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण रेश्माचे पोस्टमार्टम त्यावेळी व्यवस्थित झालेले नव्हते हे नक्की.’
‘त्यावेळी इथल्या पाच सहा वस्त्यांमध्ये मिळून एक सरकारी हॉस्पिटल होते. स्टाफ कमी आणि अनुभव देखील कमी. त्यामुळे कदाचित…’ सागरने आपला तर्क लावला.
‘हा कवटीला गेलेला तडा बघ सागर. अत्यंत त्वेषाने कमीत कमी दोन वेळा वार करण्यात आलेला आहे. असा वार एखादी व्यक्ती तेव्हाच करते, जेव्हा ती प्रचंड रागात असते किंवा समोरच्याचा प्राण घ्यायचाच हे ठरवलेले असते. या गोलूचा उद्देश फक्त चोरी असता, तर इतका द्वेष त्याने दाखवला असावा?’
‘अब्दुल किंवा रेश्मा या दोघांपैकी कोणीतरी एकाने तो दुखावेल असे नक्की काहीतरी केले असावे किंवा त्याला काहीतरी वाईट शब्द वापरले असावेत.’
‘बरोबर! पण अब्दुलने असे काही घडल्याचे सांगितले होते का जबानीत?’
‘मुळीच नाही. अब्दुल तातडीच्या कामाने तालुक्याला गेला होता. तो घरी आला आणि रेश्माला आवाज देत बेडरूममध्ये शिरला तर समोर बेडजवळ रेश्मा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.’
‘मला वाटते, आपण मर्डर सीन पुन्हा एकदा रिक्रिएट करून बघावा,’ जयाने सुचवले आणि जणू तिने सागरच्या मनातले ओळखले होते असा सागर हसला.
अब्दुलच्या बेडरूममध्ये प्रसंगाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. रेश्माचे दोन्ही भाऊ, अब्दुल तिथे उपस्थित होते. जया रेश्मा तर सागर गोलू बनले होते. साधारण ज्या अवस्थेत रेश्मा बसली होती, त्या अवस्थेत जया बसली आणि बाहेरून रबराची हातोडी घेत सागरने प्रवेश केला.
‘काय काम आहे तुझे इथे?’ रेश्मा उर्फ जयाने चढ्या आवाजात विचारले. काही न बोलता गोलू उर्फ सागरने हातातली हातोडी उचलली आणि जयाच्या डोक्यात आडवी मारली. जया खोटी खोटी खाली कोसळली. सागरने पुन्हा एकदा एक घाव तिच्या डोक्यावर केला.
‘काहीतरी चुकते आहे सागर. रेश्मा खाली कोसळल्यावर गोलू आणि तिच्यातले अंतर वाढले असणार, म्हणजे गोलूला खाली वाकून पुन्हा दुसरा वार करावा लागला असेल. तो तितक्याच ताकदीने पुन्हा करणे अवघड वाटते आहे.’
‘किंवा मग गोलूने हातोडी दोन्ही हातांनी धरली असेल,’ अब्दुलने शंका बोलून दाखवली आणि सागरची एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर बसली. अब्दुलचे दोन्ही मेव्हणे त्याला वाचवायला धावले, मात्र इतर पोलिसांनी त्यांना अडवले.
‘सात वर्षे तग धरली होतीस अब्दुल… एका वाक्याने माती खाल्लीस बघ,’ रागारागात सागर ओरडला आणि एक अजून थप्पड त्याने अब्दुलला चढवून दिली. नक्की काय चालले आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. जया आणि सागर मात्र शांत होते. अब्दुलने आता जमिनीवर बसकण घेतली होती आणि दोन्ही हातांनी कपाळ बडवून घेत होता.
– – –
‘तुम्हाला त्या नालायक अब्दुलचा संशय कसा आला साहेब?’ रेश्माच्या भावाने डोळ्यात पाणी आणत प्रश्न केला.
‘खरे तर मला आधी अब्दुलविषयी सहानुभूती वाटत होती. त्याला न्याय मिळावा असे वाटत होते. त्याची केस रिओपन झाली आणि मी तपासाला लागलो. अगदी सहज म्हणून मी अब्दुलच्या गेल्या सात वर्षाच्या आयुष्याची देखील माहिती काढायला सुरुवात केली. आधी संशय येईल असे काही आढळले नाही. पण एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले की, सात वर्षे बायकोच्या दु:खात हरवलेल्या या माणसाचे दोन दिनक्रम मात्र कधी चुकत नाहीत. एक म्हणजे शनिवारी तालुक्याला जाऊन चित्रपट पाहणे आणि रविवारी दोन्ही वेळेला बोकडाचे मटण ओरपणे. अर्थात, रेश्माला या दोन्ही गोष्टी आवडायच्या म्हणून मी त्या करतो असा आव त्याने आणला होता. पण रेश्माला दर महिना दर्ग्याला पैसे द्यायला आणि तालुक्यातील मदरशात कपडे वाटायला देखील आवडायचे. मग ही पुण्याची कामे सोडून हा मनुष्य फक्त मटण आणि चित्रपटालाच कवटाळून बसला आहे हे मला चांगलेच खटकले. दुसरे म्हणजे गोलूचे अचानक असे नाहीसे होणे. गोलू काही फार श्रीमंत नव्हता. अगदी त्याच्याकडे रेश्माचे चोरलेले दागिने असते, तरी ते विकायला का होईना त्याला उघड्यावर यावेच लागणार होते. दागिने नंतर विकू असे त्याने ठरवले असते, तरी निदान रोजच्या पोटापाण्यासाठी काहीतरी काम तर शोधावे लागणार होतेच ना? याचाच दुसरा अर्थ म्हणजे बहुदा गोलू देखील या जगात नसावा. पण अशा वर्णनाची कोणतीही बॉडी पोलिसांना मिळाल्याची नोंद नाही. अब्दुलवरचा संशय वाढत असताना सकाळी नेमका तो नको ते बोलून गेला आणि अलगद जाळ्यात अडकला.’
‘पण हे सगळे का केले त्याने साहेब? आणि गोलूचे काय?’
‘अब्दुलने आज दिलेल्या जबाबाप्रमाणे, तो तालुक्याला निघाला होता पण पोटात दुखायला लागल्याने अर्ध्या वाटेतून परत आला. घराचा दरवाजा आतून बंद पाहून त्याला शंका आली. स्वत:चे घर असल्याने, कोपर्यात हात सारून कडी कशी उघडायची हे त्याला चांगले माहिती होते. दार उघडून तो आत आला आणि त्याला वरच्या मजल्यावरून, जी रेश्मा आणि अब्दुलची खोली होती, गोलू उतरताना दिसला. त्याच्यामागे पदर सावरत रेश्मा हसत हसत दार लावताना दिसली आणि अब्दुल पेटून उठला. तो तिथेच जिन्याखाली लपला आणि गोलू खाली उतरताच तिथला मोठा दगड त्याने गोलूच्या डोक्यात घातला. खाली पडलेला दगड उचलायला तो वाकला आणि त्याला तिथेच पडलेली हातोडी मिळाली, ती घेऊन तो तसाच संतापाच्या भरात वरती चढला आणि…’
‘पण साहेब मग इतकी वर्षं हे नाटक कशासाठी?’
‘रेश्माचे भाऊ अर्थात तुम्ही आणि तुमच्या अब्बुंची दहशत. जरा देखील शंका आली असती, तर तुम्ही अब्दुलचे तुकडे तुकडे केले असते. भानावर आलेल्या अब्दुलच्या हे लक्षात आले आणि त्याने थंड डोक्याने पुढचा प्लॅन आखला. घरात आयताच तयार असलेल्या खड्डा वापरला आणि त्यात गोलू, हातोडी आणि तो दगड पुरून टाकला. वरती जाऊन त्याच हातोडीने त्याने आधी लाकडी कपाटाचे कुलूप तोडले होते. त्यानंतर घरातल्याच दुसर्या खड्ड्यात त्याने दागिने पुरले आणि रडत भेकत चौकीकडे धाव घेतली. पुढच्या महिन्याभरात त्याने दागिने काढून घेतले आणि रेश्माचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली लगोलग फरशी बसवून घेतली. गोलूचा शोध हा विषय कायमचा संपवला.’
रेश्माच्या भावांना त्यांच्या डोळ्यातल्या पाण्यासह एकांत देऊन सागर बाहेर पडला आणि घाईघाईने बुलेटकडे धावला. यशाची दुसरी मानकरी जया त्याची वाट बघत होती ना…