हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला २०२३ हे वर्ष लाभदायक ठरलं. सिनेमातून निवृत्ती पत्करायला हवीस, असे सल्ले सोशल मीडियावर ज्या हीरोला दिले गेले त्या शाहरूख खानने जवान, पठाण, डंकी असे एकापाठोपाठ तीन चित्रपट सुपरहिट करून बॉयकॉट बॉलिवुड या हॅशटॅगची हवाच काढून टाकली. शाहरूखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या दोन्ही सिनेमांनी जागतिक पातळीवरील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत एक हजार कोटीचा रूपयांचा टप्पा पार केला.
शाहरूखच्या जोडीला रणबीर कपूर (अॅनिमल/ ८५० कोटी), सनी देओल (गदर-२ / ६८७ कोटी) या सिनेमांनी गतवर्षात कोटीच्या कोटी उड्डाणे करून यशाला गवसणी घातली. ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने तिकीटबारीवर ९०.५ कोटी कमाई करत सैराटसारखं मोठं यश मराठी सिनेमा पुन्हा मिळवू शकतो हे दाखवून दिलं. भारतातील नेट बॉक्स ऑफिसचा विचार करता, आज अनेक हिंदी आणि दक्षिणेतील चित्रपट पाचशे कोटी रूपयांची कमाई सहज करताना दिसतात.
भारतीय माणसाच्या डीएनएमध्ये सिनेमा आणि क्रिकेट सामावलेलं आहे. म्हणूनच सिनेमाच्या यशाचं प्रमाण मोजताना ‘सेंच्युरी’ या मानकापासून सुरूवात करायला हवी. भारतीय सिनेमाच्या खेळपट्टीवर पहिली सेंच्युरी झळकावण्याचा मान आमीर खानला जातो. २००८च्या नाताळमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या हिंदी सिनेमाने पहिल्यांदा शंभर कोटी रूपयांची कमाई करून दाखविली. गजनी’ने शंभर कोटीचा टप्पा गाठल्यावर प्रत्येक अभिनेत्याच्या करीयरमधे १०० कोटी हा मैलाचा दगड ठरू लागला. पूर्वीच्या काळी चित्रपट यशस्वी झाला, याचं यश तो चित्रपट किती आठवडे सिनेमागृहात ठाण मांडून बसला यावर ठरत होतं. सिल्वर ज्युबली (पंचवीस आठवडे), गोल्डन ज्युबली (पन्नास आठवडे), डायमंड ज्युबली (साठ आठवडे), प्लॅटिनम ज्युबली (पंचाहत्तर आठवडे) या दिवसांच्या मापदंडाने यश मोजलं जात असे. राजेंद्र कुमारला ज्युबली कुमार या नावाने ओळखलं जायचं. मराठीत दादा कोंडके यांना सलग सात चित्रपट सिल्वर ज्युबली यश मिळालं होतं.
पूर्वीच्या काळी सिनेमाची रिळं बनविण्याचा खर्च जास्त होता. एका सिनेमागृहात दाखवून झाला की तिथून सिनेमाची रिळं घेऊन ती दुसर्या सिनेमागृहात न्यावी लागायची. २०००च्या दशकात उपग्रह दळणवळण तंत्रामुळे एकाच वेळी हजारो स्क्रीनवर चित्रपट दाखविण्याची व्यवस्था उपलब्ध झाली. यामुळे सिनेमा यशस्वी झाला हे सांगणारे मापदंड बदलले गेले. ज्युबली कुमारची जागा शंभर कोटी क्लबने घेतली. गजनीच्या आमीरनंतर, सलमान, अक्षय, शाहरूख… अशा प्रत्येक स्टार अभिनेत्याची शंभरी गाठायला अहमहमिका लागली. नवनवीन सेलिब्रिटी निर्माण करणार्या पेज थ्री मीडियानं त्यांच्या फायद्यासाठी हे शंभर कोटी प्रकरण खूपच उचलून धरलं. मालिकांची लोकप्रियता मोजण्याचं परिमाण जसं टीआरपी असतं तसंच हिंदी सिनेमातील हिरोची लोकप्रियता मोजण्याचं परिमाण हिरोच्या सिनेमाने शंभर कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे का यावर ठरायला लागली. यातूनच एखादा अभिनेता जोपर्यंत १०० कोटीच्या भोज्ज्याला स्पर्श करत नाही, तोपर्यंत तो स्टारपदाला पोहचत नाही असं चित्र उभं राहू लागलं. बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करण्यासाठी काय लागतं? सुपरस्टार अभिनेता, एक उत्तम संहिता, मोठं बजेट आणि भरपूर प्रसिद्धी. याच जोरावर आमीर खान, सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगण हे हिरो सुपरस्टार झाले.
तिकीटबारीवरील आकड्यांच्या बाबतीत आमीर खान हा हिंदी सिनेमाचा सेहवाग आहे. २००८ साली ‘गजनी’ सिनेमाने पहिलं शतक (१५२ कोटी) ठोकल्यावर थांबेल तो आमीर कसला! समकालीन अभिनेते बॉक्स ऑफिसवर धापा टाकत शंभरी पार करत असताना, आमीरने पुढील वर्षी ‘थ्री इडियट्स’मधून (२७३ कोटी) डबल सेंच्युरी झळकावत नवा टप्पा गाठला आणि ‘धूम-३’ने (३४८ कोटी) ट्रिपल सेंच्युरी मारण्याचा महाविक्रम केला. यानंतर २३ डिसेंबर २०१६ साली आलेल्या ‘दंगल’ने तर जगभरात तब्बल २००० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला. आजही हा विक्रम अबाधित आहे. भारतात जवळपास पाचशे कोटी रूपयांचा व्यवसाय केलेल्या या सिनेमाने केवळ चीनमध्ये तब्बल १५०० कोटींची कमाई करत हिंदी-चिनी भाई-भाई या घोषणेचा खरा अर्थ दोन्ही देशातील प्रेक्षकांना समजावून सांगितला. चीनमधे आमीर खान या नावाची लोकप्रियता इतकी वाढली की ४० कोटीपेक्षा जास्त वेळा चिनी जनतेने ओटीटी माध्यमावर दंगल सिनेमा पाहिला. आमीरचे ‘गजनी’, ‘थ्री इडियट्स’, ‘धूम-३’, ‘पीके’, ‘दंगल’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ असे सहा चित्रपट आजवर शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. इतर अभिनेत्यांच्या तुलनेत आमीरचे खूप कमी चित्रपट या क्लबमध्ये आहे याचं प्रमुख कारण आमीर खान अपवाद वगळता वर्षाला एकाच चित्रपटात काम करतो हे आहे. उत्तम पटकथेची निवड, रिस्क घेण्याची तयारी, दर्जेदार अभिनय आणि अफलातून मार्केटिंग यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करून आमीरने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी ते दोन हजार कोटींची मजल मारली आहे.
शंभर कोटी क्लबचा अनभिषिक्त सम्राट सलमान खान आहे. आजवर १७ चित्रपटांतून शंभरी पार करत तिकीटबारीवर पैशांचा पाऊस पाडणारा ‘मीच तो’ हे सलमानने दाखवून दिलं आहे. २०१० साली आलेल्या दबंग सिनेमापासून दक्षिणेचा मसाला हिंदी सिनेमात घालून कोट्यधीश बनायचा फॉर्म्युला सलमानला चांगलाच जमलाय. ‘दबंग’ सिनेमात चुलबुल पांडेने डान्स करताना कमरेचा पट्टा असा काही फिरवला की सिनेमातील ‘मुन्नी बदनाम हुई’ म्हणता म्हणता फेमस झाली. या यशानंतर सलमानने बॉक्स ऑफिसवर दबंगगिरी चालू केली. ‘रेडी’ (१२० कोटी), ‘बॉडीगार्ड’ (१४८ कोटी), ‘एक था टायगर’ (१९८ कोटी), ‘दबंग-२’ (१५५ कोटी), ‘जय हो’ (११७ कोटी) अशा प्रत्येक सिनेमातून सलमान क्रिकेटपटूने सामन्यात शतक ठोकावं तसं शंभरी पार यश मिळवत होता. यानंतर २०१४ साली बॉक्स ऑफिसवर ‘किक’ (२३१ कोटी) मारून त्याने डबल सेंच्युरी ठोकली. त्यानंतर लागोपाठच्या तीन वर्षात ‘बजरंगी भाईजान’ (३२० कोटी), ‘सुलतान’ (३०० कोटी) आणि ‘टायगर जिंदा है’ (३३९ कोटी) या तिन्ही सिनेमांनी ‘ट्रिपल सेंच्युरी’ ठोकून सलमान खानला बॉक्स ऑफिसचा भाईजान बनवलं. या सिनेमाचं यश फक्त पैशात मोजता येणार नाही. कारण सलमानच्या प्रेक्षकवर्गात मल्टिप्लेक्सपेक्षा पन्नास शंभर रूपयांचं तिकीट काढून सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जाणारे जास्त आहेत. म्हणूनच हे तिन्ही सिनेमा पाहणार्या प्रेक्षकांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहेत. २०१७ सालातील ‘टायगर जिंदा है’नंतर ‘रेस-३’, ‘भारत’, ‘दबंग-३’, ‘राधे’, ‘अंतिम’, ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमांत प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा सलमान दिसला नाही. वाईट पटकथा, चांगल्या दिग्दर्शकांची वानवा यामुळे गेली अनेक वर्षे सलमानला आपल्या नावाला साजेसं यश संपादन करता आलं नाही. शेवटी या वर्षी दिवाळीत सलमानच्या मदतीला ‘टायगर-३‘ धावून आला आणि ही बोट बुडता बुडता वाचली.
‘बाजीगर’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या सिनेमांनी शाहरूखला बॉक्स ऑफिसचा किंग खान बनवलं, पण शंभर कोटी क्लब रेसमध्ये आमीर खान आणि सलमान खान यांच्या तुलनेत शाहरूखचा करिश्मा थोडा फिका पडला. त्याच्या सिनेमांचा शंभर कोटीचा प्रवास २०११ साली ‘रा-वन’पासून (११६ कोटी) सुरू झाला. पुढे डॉन २ (१०८ कोटी), जब तक है जान (१२० कोटी) हे यश मिळालं. २०१३ साली चेन्नई एक्सप्रेस (२२७ कोटी) सिनेमाचा अपवाद वगळता २०२४पर्यंत शाहरूखच्या कोणत्याही सिनेमाला दोनशे कोटी रूपयांची मजल मारता आली नाही. हॅपी न्यू इयर (१९९ कोटी), रोहित शेट्टी दिग्दर्शक असतानाही चेन्नई एक्सप्रेससारखं दिलवाले (१४८ कोटी) सिनेमा मिळवू शकला नाही. बिग बजेट रईस (१६४ कोटी) देखील ठीकठाक चालला. यानंतर जब हॅरी मेट सेजल, झिरो सपशेल आपटले. आता संपला असं म्हणत असताना शाहरूखने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत २०२३ सालात पठाण (५४३ कोटी), जवान (६४० कोटी) आणि डंकी (२२६ कोटी) असे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
हिंदी सिनेनिर्मात्यांचा मागील पंधरा वर्षातील सर्वात लाडका अभिनेता कोण असा प्रश्न विचारला गेला, तर एकच नाव समोर येईल, ते म्हणजे अक्षय कुमार. शाहरूख एकतर स्वतः निर्माता असलेल्या सिनेमात काम करतो किंवा यशराज, धर्मा अशा मोठ्या निर्मात्यांसोबत. सल्लू भाईजानचे नातेवाईक आणि जुनी मित्रमंडळी इतकी आहेत की नवीन निर्मात्यांना इथे प्रवेश नाही आणि आमीर खान दोन-चार वर्षातून एखादा चित्रपट करतो. त्यामुळे नवीन आणि शंभर कोटीपेक्षा कमी बजेट असलेल्या निर्मात्यांना अक्षयकुमार देवासारखा वाटतो. वेळेवर सेटवर येणं, फार टाईमपास न करता वेळेत काम पूर्ण करणं, मार्वेâटिंग आणि प्रमोशनला वेळ देणं या अक्षयच्या जमेच्या बाजू. यामुळेच इतर मोठ्या हिरोंचे वर्षाला एक चित्रपट प्रदर्शित होत असताना त्याचे एकाहून अधिक सिनेमे प्रदर्शित होत असतात.
अक्षय कुमारची १०० कोटी क्लब एन्ट्री त्याच्या समकालीन अभिनेत्यांच्या तुलनेत थोडी उशिराच झाली, पण नंतर मात्र अक्षयने हिट चित्रपट बनवायचा कारखाना सुरू केला. त्यामुळे आतापर्यंत अक्षयच्या तब्बल १६ चित्रपटांनी शंभरी पार केली आहे. या शतकी खेळीची सुरूवात एप्रिल २०१२मध्ये (हाऊसफुल-२/ ११२ कोटी) या सिनेमाने झाली. पुढील एका महिन्याने ‘रावडी राठोड’ने (१३३ कोटी) बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा शतकी धडक दिली. २०१४मध्ये हॉलिडे (११२ कोटी) साजरा केल्यावर २०१६ साली एअरलिफ्ट (१२८ कोटी), रूस्तम (१२७ कोटी) आणि (हाऊसफुल-३/ १२८ कोटी) अशा तीन शतकी खेळी खेळल्यावर अक्षयच्या करीयरने झेप घेतली. २०१७ साली जॉली एलएलबी-२ (११७), टॉयलेट एक प्रेमकथा (१३४ कोटी), २०१८ साली गोल्ड (१०९ कोटी), २.झीरो (१९० कोटी) अशा दोन वर्षात बॉक्स ऑफिसवर चार सेंच्युरी मारल्यानंतर २०१९ साली अक्षयने हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात आजवर कुणालाही शक्य झालं नाही तो चमत्कार केला. २१ मार्च (केसरी/ १५४ कोटी), १५ ऑगस्ट ( मिशन मंगल २०३ कोटी), २५ ऑक्टोबर हाऊसफुल-४ (२१० कोटी) आणि २७ डिसेंबर (गुड न्यूज २०५ कोटी) तिकीट बारीवर अशी यशाची हंडी रचली. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चार चित्रपटांनी केलेल्या कमाईची एकत्रित रक्कम सातशे बहात्तर कोटी इतकी होते. एक वेळ अशी होती की अक्षय कुमारचे वर्षाला चार चित्रपट प्रदर्शित होत होते. आजवर अक्षयचा एकही सिनेमा तीनशे कोटीला पोहोचला नसेल, पण शंभर कोटी क्लब रेसमध्ये १६ चित्रपट शंभरी पार करून अक्षयकुमार दुसर्या क्रमांकावर आहे. शूटिंगदरम्यान खर्च होणारे वायफळ पैसे वाचवून, कमीत कमी दिवसात सिनेमा पूर्ण करणारा अक्षयकुमार काही दिवसांपूर्वी निर्मात्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.
दोन चालत्या बाईकवर उभं राहून सिनेसृष्टीत दिमाखात एन्ट्री घेणार्या अजय देवगणला शंभर कोटी क्लबमधे एन्ट्री घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागली. २०१० साली रोहित शेट्टीच्या गोलमाल ३पासून (१०६ कोटी) अजयच्या सिनेमांची गाडी शंभर कोटीच्या दिशेनं धावायला लागली. सिंघम (१०० कोटी), सन ऑफ सरदार (१०५ कोटी), बोल बच्चन (१०३ कोटी), सिंघम रिटर्न्स (१४० कोटी), गोलमाल अगेन (१०५ कोटी), रेड (१०३ कोटी), टोटल धमाल (१५५ कोटी) दे दे प्यार दे (१०४ कोटी) या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण अजय देवगणच्या बॉक्स ऑफिसवर नजर टाकली तर सिंघम वगळता सिंगल हिरो म्हणून मोठी कमाई केलेले चित्रपट फार आढळत नाहीत. कमी आहेत. २०२० साली ही कमतरता अजयने तान्हाजी सिनेमाने २७९ कोटी कमाई करत भरून काढली. अजय देवगणने आजपर्यंत एक डझन चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पाठवले आहेत.
नवीन पिढीचा महानायक अॅनिमल किंग रणबीर कपूरचे तोंड ‘बर्फी’ने (११२ कोटी) गोड केलं. ये जवानी है दिवानी (१८८ कोटी), ऐ दिल है मुश्किल (११३ कोटी), संजू (३४२ कोटी), ब्रह्मास्त्र (२६८ कोटी), तू झूठी मैं मक्कार (१४७ कोटी) आणि अॅनिमलमधून ५५३ कोटी रूपयांची कमाई करून रणबीर कपूर हा पुढील सुपरस्टार बनू शकतो अशी चाहूल लागली आहे. या सात सिनेमांनी शंभर कोटी क्लबमध्ये रणबीर कपूरला मानाचं स्थान मिळवून दिलं.
गोलियों की रासलीला रामलीला या सिनेमाने रणवीर सिंग या अभिनेत्याला शंभर कोटी क्लबमध्ये स्थान आणि दीपिका पदुकोणसारखी सुपर स्टार अभिनेत्री बायको मिळवून दिली. बाजीराव मस्तानी (१८४ कोटी), पद्मावत (३०२ कोटी), सिंबा (२४० कोटी), गली बॉय (१३९ कोटी) आणि मागील वर्षी रॉकी और रानी (१५२ कोटी) या सात सिनेमांनी रणवीर सिंगला सप्ततारांकित यश मिळवून दिलं.
कहो ना प्यार है या सिनेमातून पदार्पण केलेल्या हृतिक रोशनला सुरूवातीला मिळालेलं यश टिकवून ठेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. २०१२ साली अग्निपथ (११८ कोटी) सिनेमानं हृतिकची शतकमहोत्सवी वाटचाल सुरू झाली. नंतर क्रिश ३ (२४४ कोटी), बँग बँग (१८१ कोटी), काबील (१०४ कोटी), सुपर थर्टी (१४७ कोटी), २०१९मध्ये वॉर सिनेमातून (३१८ कोटी) तिहेरी शतक झळकावून हृतिकने मी पुन्हा आलो आहे याची जाणीव त्याच्या स्टार कलाकार मित्रांना करून दिली. नुकताच प्रदर्शित झालेल्या फायटर चित्रपट धरून हृतिक रोशनच्या कारकिर्दीत शंभर कोटी क्लबमध्ये आतापर्यंत सात चित्रपट सामील झाले आहेत.
चित्रपटाचा आशय कितीही चांगला असला तरीही त्याचं यश त्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे यावर ठरतं. म्हणूनच या शंभर कोटी क्लबला सिनेमधंद्यात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. तिकीटविक्रीतून जमा झालेल्या एकूण रकमेला ‘ग्रॉस कलेक्शन’ असं म्हणतात. यातून सरकारद्वारा आकारला जाणारा मनोरंजन कर वगळून जी शिल्लक राहील ती रक्कम म्हणजे चित्रपटाने केलेली खरी कमाई. अर्थात ‘नेट कलेक्शन’. जास्त कमाई म्हणजे चांगला सिनेमा असा आपल्याकडे समज आहे. यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही निर्माते सिनेमाच्या नेट कलेक्शनऐवजी ग्रॉस कलेक्शन जाहीर करतात.
शोले सिनेमात गब्बर विचारतो, अबे ओ सांबा, सरकार कितना इनाम लगाया हैं हम पर, सांबा म्हणतो, पूरे पचास हजार! इथेच प्रेक्षकांची खात्री पटते की गब्बर हा कुणीतरी मोठा डाकू आहे. कारण शोले १९७५ साली प्रदर्शित झाला, तेव्हा तेव्हा सोनं ५४० रूपये तोळा मिळत होतं. पन्नास हजार ही रक्कम तेव्हाच्या काळात भली मोठी होती. म्हणूनच २००८ साली गजनी सिनेमाने जेव्हा १०० कोटींचा टप्पा गाठला तेव्हा सिनेसृष्टीसाठी तो सुखद धक्का होता. पण आज या संख्येचे परिमाण बदललं आहे. कारण आजच्या काळात भव्य चित्रपटनिर्मितीचा खर्चच १०० कोटीपेक्षा जास्त असतो. अशा वेळी सुपरस्टार सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त ११० कोटी कमाई करतो, तेव्हा या चित्रपटाची गणना फ्लॉप सिनेमाच्या यादीत करायला हवी, भले या सिनेमाने शंभर कोटी क्लबमध्ये प्रवेश केलेला का असेना. आज एखाद्या सिनेमा कमीत कमी पाचशे कोटी रूपयांची कमाई करेल तेव्हाच त्या सिनेमाला ‘ब्लॉकबस्टर’ हा दर्जा दिला जायला हवा.
बॉक्स ऑफिस आकडे खरे असतात का? एका वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये शाहरूख खानला काय प्रश्न विचारशील असा प्रश्न काजोलला विचारला गेला होता, त्यावर काजोलने गमतीनं विचारलं, ‘पठाण सिनेमाचे खरे आकडे काय आहेत?’ यातील गमतीचा भाग सोडला तरी सिनेमा कमाईचे सांगितले जाणारे आकडे खरे आहेत का यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. कारण ज्याप्रमाणे एखाद्या टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांची निवड प्रेक्षकांच्या मतांनी होते असं मानलं जातं; पण ही मतमोजणी करण्याचा अधिकार त्याच वाहिनीला असतो, ते सांगतील त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय प्रेक्षकांकडे दुसरा पर्याय नसतो, त्याचप्रमाणे सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे चित्रपटनिर्माते किंवा सिनेमा डिस्ट्रिब्युटर देतात. निर्मात्यांना आकडे कितीही फुगवून सांगण्याची मुभा असली तरीही आज माहिती तंत्रज्ञान युगात पाच हजार स्क्रीनवर दाखविल्या गेलेल्या मोठ्या सिनेमाने किती गल्ला जमवला हे सांगताना फार तफावत करून चालत नाही.
हल्ली राजकीय वरदहस्त किंवा कॉर्पोरेट बुकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात तिकिटे विकत घेऊन बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढविण्याचे प्रकार देखील होताना दिसतात. हिंदीच्या तुलनेने कमी स्क्रीनवर प्रदर्शित होणार्या लहान मराठी सिनेमाने किती गल्ला जमवला याचे खरे आकडे गुलदस्त्यात असतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक फिरकत नाहीत हे पाहून काही मराठी चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा वेधून घेण्यासाठी माध्यमात आणि समाजमाध्यमात खोट्या आकड्यांची पेरणी करतात. खरं किती नुकसान झालंय हे त्या चित्रपटाच्या निर्मात्याला माहीत असतं. सैराट (१०४ कोटी) किंवा बाई पण भारी देवासारखं (९०.५ कोटी) उत्तुंग यश बॉक्स ऑफिसवर मिळतं तेव्हा यशस्वी सिनेमांचे आकडे बर्यापैकी खरे असतात.
जगाच्या नकाशावर भारतीय वंशाच्या नागरिकांचा टक्का लक्षवेधी आहे. या लोकांना मायदेशाशी बांधून ठेवण्याचं काम भारतीय सिनेमा करतो. नाम सिनेमातील ‘चिठ्ठी आयी है वतन से चिठ्ठी आयी है’ या गाण्याने अनिवासी भारतीय जनतेची भावना उलगडून दाखवली. भारतीय संस्कृती हीच वाट पकडून हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे या सिनेमांनी भारतासोबतच परदेशातही उत्तम कमाई केली. परदेशी बॉक्स ऑफिसवर इथून पुढे आमीर खानचं राज्य सुरू झालं थ्री इडियट (१८६ कोटी), धूम (२१७ कोटी), पीके (३०४ कोटी) या सिनेमांनी परदेशात भरघोस यश संपादन केलं. दंगलने घडवलेला इतिहास सर्वांना माहीतच आहे. परदेशी वितरकांसाठी आमीर खान हे नाव डॉलरसारखं सर्वकालीन चलन आहे. केवळ १५ कोटी रूपयांत निर्माण झालेल्या आणि पाहुणा कलाकार असलेल्या आमीरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाने देशाबाहेर आठशे पंचवीस कोटी रूपयांची कमाई केली होती.
जागतिक सिनेमांचा विचार करता, मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड चित्रपटांपैकी ‘ओपनहायमर’चे बजेट ८२० कोटी (कमाई ८००० कोटी) तर ‘बार्बी’चे बजेट १२०० कोटी (कमाई ११००० कोटी) होते. हॉलिवुडचा सिनेमा जगभर विकला जातो म्हणून त्यांना सिनेनिर्मितीत जास्त पैसे खर्च करून वेगवेगळे प्रयोग करता येतात. आपला भारतीय सिनेमा कालपर्यंत जागतिक पातळीवर स्पर्धा करायला घाबरत होता पण, दंगल (२००० कोटी), बाहुबली (१७८८ कोटी), पठाण (१०५५ कोटी) आणि जवान (११६० कोटी) या बिग बजेट सिनेमांनी जागतिक बाजारपेठेत घेतलेल्या कोटीच्या कोटी उड्डाण्णांचा विचार करता, आपला भारतीय सिनेमा देखील एक दिवस आठशे, एक हजार कोटी रूपयांचे बजेट असलेला चित्रपट निर्माण करेल आणि तो सिनेमा दहा हजार कोटी रूपयांचा व्यवसाय करेल ही शक्यता अगदी अशक्य ‘कोटी’तील वाटत नाही.