तुम्हाला फेसबुक भारतात आले तो काळ आठवतो का?
साधारण २००७-०८चा सुमार असेल. आपण जे लिहितो ते असे सर्व लोकांसमोर येते या कल्पनेने जाम एक्साईट व्हायला झालं होतं. कारण याआधी व्यक्त व्हायचे म्हंजे एसएमएस किंवा मेल किंवा पत्रे… पण आपण काहीही लिहिले की त्याला पोच मिळते, आपण मित्र करू शकतो हे भारतातील अनेक इच्छुक जनतेच्या लक्षात आले आणि आज बघताय काय चाललेले आहे.
फेसबुकनंतर अनेक प्लॅटफॉर्म वा सोशल मीडिया अवतरले आणि त्यातून एक जमात उदयाला आली, ट्रोल, जल्पक…
वास्तविक टीका करणे हा मनुष्य स्वभाव, कधी खाजगीत कधी चार चौघात, कधी स्वत:शीच पण अशा टीकेचा मारा मर्यादित असायचा, तथापि सोशल मीडियातून टीका करायची की तिला जगभर प्रसिद्धी मिळते. इतकेच नव्हे, तर त्यातून आपल्याला भक्त वा फॉलोअर्स मिळतात हे धूर्त लोकांच्या, त्यातूनही राजकारणी डोक्यात येऊन ट्रोल करणे हे पुरस्कृत होऊ लागले, २०१३पासूनच्या पोस्ट बघा.
मुद्दा काय की तुम्ही काहीही लिहा, व्यक्त करा तुमच्यावर टीका होणारच होणार… थोडक्यात ओढवून घेतलेला डोक्याला शॉट.
ऊर्फी जावेद, राखी सावंत, कंगना यांसारखे लोक ट्रोलना बिलकुल भीक घालत नाहीत, कारण बदनाम भी गर होंगे तो क्या नाम ना होगा??
पण तुलनेने साध्या सरळ लोकांच्या पोस्ट्स असतात, त्याला पण हे ट्रोल लक्ष्य करून उच्छाद मांडतात, तेव्हा मात्र वैताग येतो. खरे तर आपण भारतीय मुळात ट्रोल मनोवृत्तीचे आहोत हा माझा समज दिवसागणिक दृढ होत चाललाय. अगदी जुने दिवस आठवा, कोणी काहीही वेगळे केले, वागले की आजूबाजूच्या लोकांच्या जिभा स्वैर सुटायच्या. कारण काहीही असो… नेसलेली साडी, कापलेले केस, मुलांचे मार्क, नोकरीतील बढती (ही जर बाईला मिळाली असेल तर तिचे पूर्ण चारित्र्यहनन), नवीन वाहन खरेदी, सुना, जावई, लेकी हे सर्वच्या सर्व टीकेचे धनी. माणूस हा अतिशय मत्सरी आहे याचा पूर्ण पुरावा अशा वागण्यातून यायचा. आज ट्रोल तेच करतात आणि अनेकदा त्याला पैसे पण मिळतात. पगारी ट्रोल!!!
तर मुद्दा काय की आजकाल हे पगारी किंवा बिनपगारी ट्रोल नवा ताप झालाय.
यांच्या तावडीतून कोणीही सुटत नाही, अगदी लहान मुले ते वृद्ध माणसे. सर्वांना टीकेचे धनी व्हावे लागते. राजकारणी अथवा प्रसिद्ध व्यक्तीचे सोडा, पण तुलनेत साध्या लोकांना पण जहरी टीकेला सामोरे जावे लागते तेव्हा नवल वाटते.
एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, खाणे पिणे या बाबतीत त्यांच्या पोस्ट्स असतात, अगदी सुरेख आणि समर्पक अशा, त्या व्यक्तीने एक दिवस चिकन रसम कृती टाकली आणि जो गहजब उडाला म्हणताय, अगदी ‘पठाण’मधील दीपिकाच्या चड्डीवरून उडालेला गहजब कमी म्हणावा लागेल! तमाम शुद्ध शाकाहारी चवताळून उठले होते. त्या व्यक्तीच्या समंजस भूमिकेमुळे फार घोळ झाला नाही, पण आपण किती उथळ आहोत याची चुणूक मिळाली.
मला तर हल्ली मूळ पोस्टपेक्षा असल्या कॉमेंट्स वाचायला मजा येते. माणूस किती विखारी होऊ शकतो ते प्रत्येकवेळी नव्याने कळते.
आणि गंमत अशी की हे ट्रॉल्स पुरोगामी, विचार स्वातंत्र्य मानणार्या, स्त्रीवादी, पोस्टवर तुटून पडतात, पण इंदुरीकर महाराज, अथवा जग्गी बाबा अशा लोकांचे बुरसटलेले विचार, त्यांची पितृसत्ताक मानसिकता मात्र डोक्यावर घेऊन नाचतात.
बाहेर देशातील ट्रोल आणि आपले यांच्यात हाच मूलभूत फरक दिसून येतो. इथली टीका वैयक्तिक आणि गलिच्छ पातळीची असते, राजकारणी अथवा त्यासारख्या पोस्ट सोडा, साध्या व्यक्तीच्या रील्सवरही घाण शेरेबाजी होते, ‘कांदा कापताना बोटं सुरीतून वाचवली’ हे गाणे सध्या धुमाकूळ घालते आहे, एक अगदी साधी बाई घरातल्या गाऊनवर मस्त नाचत नवर्याला जेवायला देते, आता ते बघा!! नाही आवडले, सोडून द्या! पण नाही, आपण ऐकू तर काय… त्या बाईला मिळालेले शेरे इतके खालच्या पातळीचे आहेत, तुमचे घर किती घाण, गाऊन किती घाण, हे करण्यापेक्षा घराकडे जरा लक्ष द्या, अशा कॉमेंट्स. हे एक प्रातिनिधिक उदाहरण, अशी शेकडो दिसतील. मला अशावेळी राहुल गांधी यांची कमाल वाटते, जवळपास दहा वर्षे अशा जीवघेण्या टीकेला झेलत ते ठाम उभे आहेत. आपले माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार, कितीतरी व्यक्तिमत्वे सांगता येतील.
अर्थात हे लोक आणि सामान्य माणसे यांच्यात फरक आहे. कोणत्याही पोस्टला अशी टीका मिळाली तर अनेकांना ते सहन होत नाही आणि त्या भावनेच्या भरात वेडेवाकडे पाऊल उचलले जाते. खास करून तरूण आणि किशोरवयीन मुले.
वास्तविक ट्रोल याआधी पण होतेच की! रामायणातील श्रीरामावर टीका करणारा परीट एक ट्रोलच होता. पाण्यात घसरून पडलेल्या दुर्योधनाला हसणारी द्रौपदी ट्रोलच होती. मुद्दा काय की टीका ही आजच्या युगाची देणगी नाहीये, तो माणसाचा मूळ स्वभावधर्म आहे, कोणी कितीही सांगो, माणूस हा आजही मनातून जंगली आदिम आहे.
अर्थात सगळ्यात जास्त गम्मत तेव्हा येते, जेव्हा ट्रोलला ट्रोल केले जाते. फेसबुकवर एक कट्टर भोंदू धर्मरक्षक, सनातनी ललना आहे. तमाम पुरोगामी, डावे, उदारमतवादी यांच्यावर स्वैर आरोप या ताई अतिशय ओंगळ आणि गलिच्छ भाषेत करतात. मजा अशी झाली की आपण किती समतोल टीका करतो हे दाखवण्याचा अट्टाहास करत त्यांच्याच विषारी सापांच्या पिलावळीला न पटणारे काहीतरी लिहिले आणि त्यांना त्यांच्याच औषधाचा रेचकसमान डोस मिळाला. तीच पिलावळ त्यांच्यावर उसळली. ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया…’ आजपर्यंत या बाईने जितक्या लोकांना छळले होते त्याचे माप तिच्या पदरात भरभरून टाकले गेले आणि ते पण तिच्याच समविचारी कट्टर अनुयायांनी… काव्यगत न्याय तो हाच… अर्थात त्यातून त्या काही शिकतील अशी शक्यता शून्य आहे.
असे ट्रोल हा आधुनिक जगातील डोक्याला शॉट होऊन बसलाय. आधी चावडी, बाजारपेठ, धार्मिक जागा, अशा ठिकाणी असणारे ट्रोल सोशल मीडियावरून प्रयेकाच्या घरात घुसून थैमान घालत आहेत. त्यांना शिंगावर घ्यायचे की आपण कन्नी कापून बाजूला व्हायचे ते प्रत्येकाने ठरवायचे…