• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शुद्धनिर्मला… रसगुल्ला!!

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in चला खाऊया!
0

मध्यंतरी आमच्या पश्चिम बंगालच्या सहलीचा फोटो बघण्यात आले आणि त्या सगळ्याच मधुर आठवणी जाग्या झाल्या. अलिबागच्या मठाच्या भक्तमंडळींनी सहकुटुंब केलेला तो दौरा अविस्मरणीयच आहे. सगळे मिळून साधारण पस्तीसएक जण होतो, अगदी कडेवर बसणार्‍या लेकरांपासून एकदुसर्‍याच्या हाताला धरून चालणार्‍या ज्येष्ठांपर्यंत. हावरा स्टेशनवर उतरल्यावर महाराजांनी पाठवलेली बस आम्ही ताब्यात घेतली ती आठ-दहा दिवसांनी पुन्हा तिथेच सोडली. बेलुरमठ, कामारपुकूर, जयरामवाटीबरोबर कलकत्यामधली व आजुबाजूची मठाची अनेक केंद्रे बघायचा अनुपम योग आलेला, खरं तर सर्वांवरच्या कृपेचाच एक भाग तो.
सगळीकडे चोख व्यवस्था असायची, जयरामवाटीला आमच्या बरोबरीच्या सगळ्या स्त्रीभक्त माहेरवाशिणी असल्यागत प्रसादी साड्या मिळाल्याने सुखावल्याच, पण जाऊ तिथे प्रत्येकालाच मिळणारे महाराज लोकांचे अहेतुक प्रेमही विशेष होते. आम्ही म्हणजे एकदम एवढी मंडळी येणार म्हणून तेही तयारीतच असायचे. दर्शन, सत्संग वगैरे झाला की वेळेनुसार प्रसाद मिळायचा, कधी भोजन कधी नाश्ता तर कधी दुपारचे मधल्या वेळचे खाणे. ह्या सगळ्यात एक गोष्ट हमखास असायचीच… बरोब्बर, रसगुल्ले!! त्या त्या ठिकाणच्या सर्वोत्तम हलवायाकडचे जवळपास लाडवाच्या आकाराचे ताजेताजे शुभ्र व लुसलुशीत रसगुल्ले पाहिले की लहानांच्या बरोबरीने मोठेही खूश व्हायचे!! कधी मातीच्या मडक्यात तर कधी स्टीलच्या बादलीत आणलेले रसगुल्ले, आम्हाला खाऊ घालून संपवल्यावरच त्या महाराजांना चैन पडायची जणू!!
आपल्याकडेही हवाबंद रसगुल्ल्याचे डबे सहज उपलब्ध असतात नाही का? अर्थात आता ताजी बंगाली मिठाई पण जागोजागी सहज मिळते. मला काका हलवाईंकडचे सगळेच प्रकार मनापासून आवडतात, पण रसगुल्ले तर अहाहा… विशेषच असतात!! तसं बघायला गेलं तर फार कठीण नसतं बरं रसगुल्ले बनवणं, साहित्य पण खूप काही लागत नाही. पूर्ण स्निग्धांश असलेलं दूध, लिंबाचा रस, थोडा मैदा, साखर नि पाणी, बस!! दुधाला उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळायला सुरुवात करायची, दूध मंद आचेवरच ठेवायचे, दूध फाटलं की सुती कापडाने गाळून छेना म्हणजेच पनीर बाजूला काढून घ्यायचं. हा ताजा छेना दोन-तीन वेळा साध्या पाण्यात स्वच्छ धुवायचा म्हणजे लिंबाच्या रसाची आंबट चव निघून जाते. मग त्या छेन्यात चमचाभर मैदा मिसळून गोळा तळहातानी छान मळून घ्यायचा. अगदी एकजीव झाला गोळा आणि हाताला ओशटपणा जाणवायला लागला की झालं. मग मोठ्या पातेल्यात साखरेच्या पाचपट पाणी घालून पाक बनवायचा, खरं तर हा पाक नसतोच, साखरेचं गरम पाणी म्हणता येईल फार तर!! या पाण्याला उकळी आली की छेन्याचे लहान लहान गोळे करून त्यात सोडायचे.
पारंपरिक पद्धतीनुसार पाकाला फेस यावा व त्यायोगे रसगुल्ले हलके व्हावेत म्हणून थोडं रिठ्याचं पाणी मिसळतात म्हणे. एकदा का गोळे तरंगून वर आले व त्यांना तकाकी आली की झाले रसगुल्ले तयार. मग हवा तो स्वाद, जसे वेलदोड्याची पूड किंवा गुलाबजल मिसळले की झालेच. आजकाल झटपट होण्यासाठी रसगुल्ले प्रेशर कुकरमध्ये करतात. मस्त होतात अगदी!!
हे असे ताजे पांढरेशुभ्र व मुलायम रसगुल्ले न आवडणारा माणूस विरळाच, पण ह्या मधुर चवीबरोबर मला भावते ती रसगुल्ल्यांची अंतर्बाह्य असलेली शुभ्रता, शुचिता!! कुठेच काही डाग नसलेले हे रसगुल्ले साधकाच्या जीवनाचे एक मर्म जगतात, नाही का ? मनात कोणतेही किल्मिष, कटुता न ठेवता केवळ नामाचा गोडवा असतानाच आपोआप बाह्यरूपही उजळून निघते जणू!! माताजी श्री सारदादेवी प्रार्थना करत, चंद्रावर जरी डाग असले तरी माझ्या मनावर कोणताही डाग पडणार व राहणार नाही, अशी कृपा असावी. मनाच्या शुद्धीला जपण्याची परंपरा त्याच्यांकडून पुढे प्रवाहित झाली असा ठाम विश्वास वाटतो मला.
‘भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा’ या उक्तीनुसार कर्मकांडांच्या अवडंबरापेक्षा देवाला प्रिय असतो भक्ताच्या अंतरंगीचा शुद्ध भाव. त्या पहिल्या टप्प्यातूनच निर्मिते अहेतुक शुद्ध भक्ती आणि तोच मार्ग ठरतो पुढची वाटचाल सुकर होण्याचा. अनेक संतमहंतांच्या चरित्रात आपण या शुद्ध भावाच्या दैवी परिणामांचे दाखले बघतोच की. मनःपूर्वक वाहिलेलं एक तुलसीदलही पुरेसं असतं त्या प्रेमळाला.
सत्यभामेच्या गर्वाचे हरण करण्यासाठी जेव्हा नारदमुनींच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी तुलेचा प्रसंग घडवला तोही या निर्मल भावाचेच महत्व ठसवतो मनांवर. आपले सगळे दागदागिने, सगळी संपत्ती पारड्यात टाकली तरी कृष्णाची तुला होतच नाहीये आणि तो नारदाचा दास बनेल या भयापोटी अखेरीस रुक्मिणीसह सर्व राण्यांना शरण जाणारी सत्यभामा आणि जिच्या केवळ एका तुळशीपत्राने भगवंताची तुला झाली ती रुक्मिणी नकळत अहंकारशून्य व शुद्ध मनाचे महत्व सांगून जातात नाही का? परमेश्वरप्राप्तीसाठी बाह्योपचारांपेक्षा गरज असते ती निर्मळ मनाची व शुद्ध भावाची, त्यायोगेच रुक्मिणीला जसा श्रीकृष्ण लाभला तसाच तुम्हाआम्हालाही लाभो हीच सदिच्छा!!

Previous Post

कोण चूक, कोण बरोबर?

Next Post

राशीभविष्य

Next Post

राशीभविष्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.