त्या दिवशी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथरावांना भेटायला गेला, तेव्हा ते आपल्याच तंद्रीत मोठ्या आवाजात एक गाणे गात होते. हातवारे करीत त्या गाण्याची हावभावासकट तालीम करत होते. बालभारतीच्या पुस्तकातली कविवर्य भा.रा.तांबे यांची लोकप्रिय कविताच होती ती. मी पोक्याला म्हटलं, तू ती नक्कल करून दाखवच मला; आणि पोक्याने सुरुवात केली.
या बालांनो या रे या!
लवकर भरभर सारे या!
मजा करा रे! मजा मजा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे, तोचि फसे
नवभूमी! दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया
त्यांचे गायन ऐकून पोक्याने त्यांना दादच दिली नाही, तर त्यांची मुलाखतही घेतली.
-एकनाथराव, हे गाणे गाण्याचा तुमचा हेतू काय होता?
-मी माझ्या राजकीय दृष्टिकोनातून या गाण्याकडे पाहतो. सचिनभाऊ तुमच्या दृष्टीने नकली असलेल्या आमच्या पक्षात आले तेव्हापासून मी या गाण्याचे रसग्रहण का काय म्हणतात ते करतोय. त्यांचेच अनुकरण इतरांनीही करावे, म्हणून त्यांना मी आवाहन करतोय. आमच्याकडे या आणि मजा मजा करा. काही कमी पडणार नाही तुम्हाला. हवे ते हवे तितके मिळेल. बर्याच पक्षात फिरून आला असलात तर तुमचा अनुभवही तितकाच मोठा असेल याची जाणीव आहे मला. म्हणून तर दोन्हीकडून फायद्याचा सौदा करताना मी भरभरून देतो. विचारा कुणाही आमच्याशी गट्टी केलेल्या आमदार खासदारांना. काही लोक मला आमदार-खासदारांचे बेपारी म्हणतात. ते उगाच नव्हे. जो आपल्यात आला तो आमचा झाला. तो पुन्हा इकडे तिकडे जाणार नाही, याची काळजी घेऊ आम्ही.
– त्या कवितेच्या गाण्यात `नवभूमी! दाविन मी’ असं म्हटलंय. ही नवभूमी कुठली?
-आमच्याकडे आल्यावर काय काय बघायला मिळेल, हे मी तुला कशाला सांगू? पण एक सांगतो, तुम्ही आयुष्यात कधी बघितलं नसेल ते आमच्या पक्षाच्या भूमीत भरपेट बघायला मिळेल. पैसा अडका, पेट्या, खोके या गोष्टी आमच्या दृष्टीने क्षुल्लक आहेत. त्या पलीकडे जे सुखाचे भांडार आहे, त्यात लोळता लोळता आमच्या दिल्लीश्वरांच्या चरणी तुमची दिव्य समाधी लागेल.
-` सुंदर ती दुसरी दुनिया’ म्हणजे भाजपाचीच दुनिया ना!
-अगदी बरोब्बर. आपली काय वट आहे तिकडे! माझा शब्द झेलायला इतके तत्पर असता ते दोघे, काय सांगू! मला म्हणतात मागाल ते मिळेल, पण व्यापार आणखी मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. म्हणून तर रोज मासे गळाला लागतात. माझी आणि माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांची काय बडदास्त ठेवली होती त्यांनी गौहातीला. मुख्यमंत्रीपद दिलं मला. एवढं मोठं पद जुन्या संसारात राहून मिळालं असतं मला? किडुक-मिडुक घ्या आणि गप्प बसा! मनासारखं मिळत नव्हतं म्हणून तर गौहातीचा गेम केला ना मी! डायरेक्ट मुख्यमंत्रीपद. त्यांना गद्दारांची किंमत आहे हो! तेव्हापासून त्यांच्या नव्या मिठाला जागून त्याना गद्दारांचे नजराणे बहाल करत आलो मी. ईडीचा धाक दाखवून, आर्थिक घोटाळ्यांचे गुपित फोडण्याची धमकी देऊन आमदार, खासदार फोडले मी. मोदीजी आणि शहाजींचं मन मोठं आहे. मला म्हणाले, त्यांना आमच्या भाजपात नका पाठवू. तुमच्या नकली पक्षातच ठेवा त्यांना. शेवटी, तुमचाही पक्ष वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. असे विशाल मनाचे नेते पाहिले की मन कसं भरून येतं. म्हणूदेत आम्हाला कोणी गद्दार, फितूर, कृतघ्न पर्वा नाही त्याची. सचिनभाऊंना कल्पना आहे त्याची. त्यांच्यावर केव्हापासून डोळा होता माझा. त्यांना सांगितलं, तिथे सडत, रडत राहू नका. आमच्याकडे या. विधान परिषदेचं उपसभापतीपद देतो तुम्हाला. तुम्ही इतर पक्षातून उड्या मारत आमच्याकडे येत असलात तरी तुमच्या अनुभवाची कदर आहे आम्हाला. त्याचा योग्य वापर करून घेऊ आणि जगाला दाखवून देऊ की फोडाफोडी म्हणजे आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. सचिनभाऊसाठी मी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी टपून बसलेल्या आमच्या नीलमताईंनाही बाजूला सारलं. त्याही इतक्या समंजस की त्यांना एका महामंडळाच्या अध्यक्षपदाचं गाजर दाखवल्यावर त्या चूपचाप बसल्या. खूप आज्ञाधारक आहेत त्या. महामंडळाचं अध्यक्षपदच काय, आणखीही बरंच काही मिळेल त्यांना. त्यांना दिल्ली बघायचीही इच्छा आहे. होईल कधीतरी तरी तीही पुरी. मी बोलत नसतो, करून दाखवतो. धक्कातंत्र म्हणतात त्याला. मी सर्वांनाच सांगतो, निष्ठा बिष्ठा या सार्या गोष्टी झूठ आहेत. कुणाची कशावरही निष्ठा नसते. जो तो आपला स्वार्थ साधायला टपलेला असतो. आम्ही तो उघडपणे साधतो एवढंच् हल्ली मी पत्रकारांना खुली मुलाखत देताना जोक पण करायला शिकलोय. अगदी ठरवून करतो. परवा सचिनचा षटकार बघितला ना.
-लोक म्हणतात की, तुम्ही मोदीजी आणि अमितजी याचे कृत्रिम नकली स्तुतिपाठक आहात म्हणून.
-त्यात कसल स्तुती? जे खरंय ते खरंय. उद्या साष्टांग लोटांगण घालायची पाळी आली तरी घालीन मी. ज्यांनी एवढं स्वातंत्र्य दिलंय मला की माझ्या कातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी त्यांनी केलेले उपकार या जन्मात नव्हे तर पुढल्या जन्मातही फिटणार नाहीत.
-ते जाऊंदे. तुम्ही बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेचे कितीही लोक फोडलेत तरी स्वार्थाने जो आपले इमान कुठेही गहाण टाकत नाही असा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक व्ाâधीही फुटू शकत नाही. त्याला कितीही कशाचीही लालूच दाखवली तरी! जनतेला तुमचा खरेदी-विक्रीचा आणि बेईमानीचा धंदा-व्यापार अजिबात आवडलेला नाही. २०२९च्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या या लाजिरवाण्या तमाशाची नक्कीच सव्याज परतफेड करतील असा माझा एक्झिट पोल सांगतोय. मग बोंबला!

