बोधकथा हा उद्वोधनाचा एक फार मोठा मार्ग. इसापपासून ओशोंपर्यंत अनेकांनी तो वापरला. अशीच एक लबाड लांडग्याची गोष्ट बाळासाहेबांनी १९७७ साली चितारलेली आहे. जनता पक्षाची राजवट होती. काँग्रेसविरोधाच्या छत्रीखाली एकवटलेल्या अनेक पक्षांच्या त्या कडबोळ्यामुळे जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्षांसारखे राष्ट्रीय राजकारणात तुलनेने बेदखलच असलेले पक्षही तरारले होते. जनता पक्षाने मिळवलेल्या पाठिंब्याची हवा यांनी आपल्या शिडात भरून घेतली होती. यातला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा लांडगा जनता पक्षाच्या बोकडाचा वापर करून कसा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी विहिरीतून, बोकडाच्या पाठीवरून उडी मारून बाहेर पडतो, याचं चपखल चित्रण बाळासाहेबांनी या चित्रात केलं आहे. हे चित्र पाहिल्यावर आजच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष नावाच्या लांडग्याचे तमाम मित्रपक्ष आठवल्याशिवाय राहणार नाहीत. गोदी मीडियाने कितीही वाढवून सांगितले तरी वास्तवात भाजपचं संख्याबळ किती, इकडून तिकडून वाटमारी करून आणलेले किती, याचा हिशोब लावला, तर १२ वर्षांच्या निरंकुश सत्तेनंतरही भारतीय जनतेने या पक्षावर विश्वास टाकलेला नाही. वर आणखी इकडच्या तिकडच्या बोकडांना गोळा करून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी तो विहिरीबाहेर उडी मारू पाहतो आहे… पण, स्वत:ला ‘शेणापती’ समजणार्या बोकडांना हे कळतं का?

