महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या आठवड्यात दिवंगत गायिका आशा भोसले यांना सभागृहात श्रद्धांजली वाहताना मराठी भाषेची कशी आयझेड केली त्यावर महाराष्ट्राच नव्हे तर देशभर बरेच चर्वितचर्वण झाले आहे. मराठी भाषेची अशी अवहेलना या पदावर बसलेली व्यक्ती करत असेल तर त्या पदाची शान ती काय राहिली, असा प्रश्न इतरांप्रमाणेच माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या यालाही पडला. पण भाजपने अशीच रेम्या डोक्याची माणसे देशभर पोसली आहेत, असे मानून त्याने स्वत:चीच समजूत काढली तेव्हा मी त्याला सुनावले की पोक्या, तुला वाटते तेवढी ही क्षुल्लक गोष्ट नाही. एक वेळ रिक्षावाले भय्ये अस्खलित मराठीत बोलतील पण नार्वेकरांसारखी उच्चपदावर बसलेली माणसे सुधारणार नाहीत. कारण मुळात आपले काय चुकले हे समजण्याच्या पलीकडे ती गेली आहेत. प्रसंग काय, त्याचे गांभीर्य काय हे जर त्यांना कळत नसेल तर मराठी भाषेच्या पंडिताची शिकवण लावूनसुद्धा ती सुधारणार नाहीत. आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? आपल्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार तू काही नामचीन नेत्यांच्या या विषयावरील प्रतिक्रिया घे, असे मी पोक्याला सुनावल्यावर चार दिवसात त्याने ज्या काही गोळा केल्या त्यापैकी या काही निवडक प्रतिक्रिया.
फडणवीस : मला वाटतं, नार्वेकरांच्या चष्म्याचा नंबर बदलला असेल त्यामुळे कागदावरील अक्षरे त्यांना धुरकट दिसली असतील. त्यांनी वेळीच डोळे तपासून नवीन चष्मा लवकरात लवकर घ्यावा अशी सूचना मी त्यांना नम्रपणे करू इच्छितो. मुळात नार्वेकर वाचत असलेल्या कागदावर कुणीतरी त्यापूर्वीच गुपचूप काही रासायनिक प्रक्रिया करून ती अक्षरे धूसर केली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. गृहमंत्री या नात्याने त्या कागदाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्याचे आदेश मी राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला देत आहे. पुढच्या हिवाळी अधिवेशनात त्याचा अहवाल मी सभागृहात सादर करीन. नार्वेकर वाचताना बरेच अडखळत होते, हे सत्य आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडून जिभेची तपासणी करून घ्यावी. रोज काही तास किंवा मिनिटे मंत्रोच्चार केल्यास उच्चार अधिक स्पष्ट होतात. रात्री जागरण झाल्यास किवा झोप पूर्ण न झाल्यास दुसर्या दिवशी दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो, हे मी अनुभवातून सांगतो. त्यांच्या यापुढील सर्व भाषणांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
एकनाथ शिंदे : माननीय विधानसभा अध्यक्षांविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही. मी त्यांना पूर्वीपासून ओळखतो. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा मी साक्षीदार आहे. हे विरोधकांकडून मुद्दाम घडवण्यात आलेले षड्यंत्र असावे, असा माझा दाट संशय आहे. ते इंग्रजी चांगले बोलतात, वाचतात. कधी कधी भाषण करताना, समोरचा कागद किंवा त्यावरील मुद्दे वाचताना माझीही धांदल उडते; पण आदरणीय मोदीजींचे मनोमन नामस्मरण करून मी धैर्याने पुढच्या मुद्द्याला भिडतो. सभागृहात भाषण करताना तारतम्य बाळगावे लागते, पण सवयीने मी त्यातही पारंगत झालो. माझे अनुकरण नार्वेकरजींनी करावे, असे मला वाटते. आता विरोधी आमदार-खासदारांची फोडाफोड केल्यामुळे माझ्यात नवा उत्साह संचारला आहे. नार्वेकरांनी गौहातीला जाऊन तिथल्या देवीचे आशीर्वाद घ्यावे, असे मी त्यांना सुचवतो.
आ. संजय गायकवाड : वो भाजपाका आदमी है। मराठी भाषा कशी बोलावी हे त्यांनी माझ्याकडून शिकावे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नाही, तसा महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा, कलावंताचा अपमान सहन करणार नाही. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा. मानसाची भाषा शुद्ध पायजे. माझ्यासारखी. कोणी काहीही वाकडे करू शकत नाय आपल्या भाषेचे. भाषा ज्युडो-कराटेसारखी पायजेल. कोणालाही लोळवता आला पायजे.याच्यापुढे मराठी भाषेचा कसलाच अपमान सहन करणार नाय अशी शपथ पुन्यांदा घेतो. जय महाराष्ट्र, जय शिंदेसाहेब.
तिरकीट थोमय्या : त्या दिवशी विधानसभेत कोण काय बोल्ला हे मला समजावून सांगण्यासाठी मी ईडीच्या माणसांना सांंगितले आहे. हॉटेलमधल्या प्रायव्हेट रुममधली गोष्ट असती तर मी ताबडतोब रिअॅक्शन दिली असती. पण हा मामला मला नीट समजलेला नाही आहे. नशीब, माझ्यावर कधी विधानसभा चेअरमन होण्याची पाळी आली नाही. नसत्या भानगडी नकोच आपल्या गळ्यात. मग तळ्यात-मळ्यात करावे लागते. बोल्लो की नाही मी मराठी चांगला?
संजय शिरसाट : होतात माणसाच्या हातून चुका. पण त्यामुळे त्याला इतका धारेवर धरण्याची गरज मला वाटत नाही. कुणाला कसले कसले टेन्शन असते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तसेच कशावरून घडले नसेल! घरातली नवरा-बायकोची भांडणे असोत, खरेदी-विक्रीचा व्यवसाय असो, मुलांचे हट्ट पुरवताना आईबापाची उडणारी त्रेधातिरपिट असो, शेजार्यांकडून होणारा त्रास असो, कुणाची प्रेमप्रकरणाची लफडी असोत; टेन्शन होतेच. मग कामावर लक्ष लागत नाही. नार्वेकरांच्या बाबतीत नेमके काय झाले याचा नेमका शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, असे मी सुचवू इच्छितो.
चंद्रशेखर ५२कुळे : या प्रश्नाला दोनच नव्हे तर अनेक बाजू असू शकतात. मा. नार्वेकरजींविषयी आम्हाला अपार आदर आहे. असे कसे झाले हे त्यांच्याकडूनच समजावून घ्यावे, असे मला वाटते.
नीलम गोर्हे : मी विधान परिषद सभापती असताना अशी चूक कधीच केली नाही. कारण माझा अभ्यासच बालपणापासून दांडगा होता. त्याशिवाय शिंदेसाहेबांसारखे आदर्श मार्गदर्शक मला लाभले हे माझे भाग्य. त्यांच्या आशीर्वादाने कधी काळी मी विधानसभा अध्यक्ष झाले तर कोणताही कागद वाचण्यापूर्वी मी रंगीत तालीम करीन हे आश्वासन देते.

