केंद्र आणि राज्य सरकार इतकी पावलं जी सतत उचलत असतात ती ठेवतात तरी कुठे?– अशोक परब, ठाणे
का? त्या पावलांचे पाय धुवून पाणी प्यायचंय का? सध्या पाय धुवून ते पाणी प्यायल्यावरच डिमांड पूर्ण होतात. म्हणून पाय धुवून पिण्याला डिमांड आहे, म्हणून विचारलं… त्यात तुमचं नाव अशोक आहे म्हणून वाटलं… पण अशोकच्या आधी कॅप्टन नाही लिहीलंय, म्हणून जे खरं वाटलं ते नाही म्हटलं…
पंतप्रधान देशाचे असतात की पक्षाचे? ते निवडणुकीच्या काळात टीव्हीवर येऊन दुसर्या पक्षाची बदनामी आणि स्वत:च्या पक्षाचा प्रचार कसे करू शकतात?- माधव पोंक्षे, सीताबर्डी, नागपूर
त्यांना जे आणि जेवढे येतं ते आणि तेवढेच ‘ते’ करतात. त्याव्यतिरिक्त त्यांना काही करताना किंवा बोलताना तरी पाहिलंय का तुम्ही? कधी कुठल्या प्रश्नाला उलटून उत्तरही देत नाहीत बिचारे. मग तुम्ही का प्रश्न विचारताय? ते जे बोलतात, ते त्यांना लिहून दिलेलं असतं ते वाचतात बिचारे. आणि हे माहीत असूनही तुमच्यासारखे लोक, ते विरोधकांची बदनामी आणि स्वतःचा प्रचार करतात म्हणून त्यांना नावं ठेवतात.
भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणाचा एवढा कढ आला असेल, तर त्यांनी आत्ता आहे त्या संसदेत आधीच पास केलेलं महिला आरक्षण का लागू केलं नसेल?– स्वाती पाठक, बेलापूर
तुमच्या म्हणण्याप्रमाणे आधीच पास केलेलं महिला आरक्षण लागू केलं असतं, तर ‘शिळ्या कढीला ऊत आणला’ म्हणून तुम्हीच नावं ठेवली असतीत.
अमेरिकेतल्या मित्राने भारतातल्या मित्राला परवा फोन केला म्हणे! त्याला इंग्लिशपलीकडे काही बोलता येत नाही, यांना इंग्लिशचा गंध नाही. कुणीतरी लिहून दिल्याशिवाय काही बोलता येत नाही… यांनी ४० मिनिटं गप्पा कशा मारल्या असतील?– विश्वास काळे, कोल्हापूर
ह हा हि ही… ख खा खि खी… हसू नका… ही बाराखडी आहे. मोठे मोठे ‘विश्व’नेते या बाराखडीत बोलतात. तुमच्या मित्राचा कसला मोठेपणा सांगता?
राजस्थानात लोकसेवा परीक्षेत पहिल्या आलेल्या आणि ‘लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचं स्वप्न पाहणार्या’ तरुण अधिकारी महिलेला पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाच खाताना पकडलं गेलं. याचा काय अर्थ समजायचा?– बीना शेळके, अचलपूर
बदल नेहमी स्वतःपासून करावा हे कोणाचे तरी वचन त्या महिलेने वाचलं असेल. ते कृतीत आणलं असेल. किंवा लोकांच्या आयुष्यात बदल घडवताना, स्वतःच्या आयुष्यात बदल करायला वेळ नाही मिळाला तर? म्हणून त्या महिलेने स्वतःच्या आयुष्यापासून सुरुवात केली असेल. तिच्या कृतीच्या ‘अर्था’चा अनर्थ पकडणार्यांनी केला. यात पकडणार्यांचा दोष आहे. त्या महिलेचा नाही.
महात्मा फुले यांना महात्मा गांधी ही पदवी दिली, असं एक वेगळंच संशोधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मांडलं आहे… शाळेत इतिहासाच्या तासाला ही मंडळी काय करत असतील?– आनंद पाष्टे, शिराळा
इतिहास घडवण्यासाठी रक्त सांडण्याची गरज नाही, हे इतिहासाच्या तासाला त्यांना कळलं असेल. त्यामुळे इतिहासात बदल करून इतिहास घडवतायत ‘ते’… असा विचार करा ना. तुमचं काय म्हणणं आहे, ‘त्यांनी’ काय, इतिहासातील ज्या ज्या महात्म्यांवर जे जे आरोप केले जातायत, त्या त्या महात्म्यांनाही क्लीन चिट द्यायची का? एवढंच काम करायचं का त्यांनी?
जो बायकोशी भला, तो खाई तूपकाला, अशी म्हण वाचनात आली. तुमच्या नशिबी आहे का तूपकाला?– जालिंदर ताथवडे, हडपसर, पुणे
याचे उत्तर आम्ही हो असं दिलं, तर लगेच तुम्ही स्वतःच्या डोक्याच्या दहीकाल्याची आमच्या तूपकाल्याशी तुलना करणार ना? करा… करा. आपल्यासारख्यांच्या हातात तेवढंच असतं. दुसर्याच्या नशिबाच्या काल्यापेक्षा, आपल्या आयुष्याचा काला बरा आहे असं स्वतःला समजवायचं असतं.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

