• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंभीर आणि मिश्कील एनडी सर!

- हेरंब कुलकर्णी (व्हायरल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 28, 2022
in व्हायरल
0

एकदा एन डी पाटील सर आमच्या गावात आले. लेखनामुळे मला ओळखत होते. गप्पा मारल्या. त्यांनी थेट विचारले तू कुठे नोकरी करतोस? मी शाळेचे संस्थेचे नाव सांगितले.तेव्हा तू माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ये तिथे मी तुला प्रकल्प प्रमुख करतो. वेगवेगळे उपक्रम संपूर्ण संस्थेसाठी राबव असे ते म्हणाले. मी थोडी टाळाटाळ केली. सर काहीच बोलले नाहीत त्यावेळी मोबाईल नव्हते. आठ दिवसानंतर सरांनी माझा त्यावेळचा लँडलाईन घरचा नंबर मिळवला. मी नोकरीला नगरला होतो. रात्री माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला व तुम्ही मुलाला का सोडत नाही, त्याला सोडा अशी विनंती केली. वडिलांनी मला हे नंतर सांगितल्यानंतर आम्ही थक्कच झालो. ज्या शिक्षण संस्थेत हजारो शिक्षक प्राध्यापक होते तिथे एक शिक्षक आपल्या संस्थेला मिळावा म्हणून इतका पाठपुरावा करत होते. मी नाही म्हणालो तर वडील अडवतात का? म्हणून वडिलांना फोन करणे ही या माणसाची शिक्षणविषयक तळमळ होती.
एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत जाणे व तिथे ही केवळ शिक्षक म्हणून न राहता वेगळी जबाबदारी घेणे यामध्ये कायदेशीर तांत्रिक अनेक अडचणी होत्या. तो विषय पुढे गेला नाही पण सरांचे प्रेम कायम राहिले. पेपरमध्ये येणार्‍या माझ्या राजकीय कविता त्यांना आवडायच्या. वात्रटिका न म्हणता ते त्याला चिन्तनिका असे नाव त्यांनी ठेवले त्यात तुझी राजकीय समज व चिंतन मला दिसते असे ते म्हणायचे. कोल्हापूरला गेल्यावर भेट व्हायची. खूप वेळ द्यायचे.
ग्रामीण रुपक वापरुन ते जी उदाहरणे द्यायचे ती मोठी सुंदर असायची. वेतन आयोगाचे एकीकडे प्रचंड पगार व दुसरीकडे किमान वेतनाचे अतिशय कमी दिले जाणारे दर याबाबत एकदा मी त्यांना बोललो. कष्टकर्‍यांच्या बाबतीत सरकार इतके कठोर का? असे विचारताच त्यावर ते हसून म्हणाले की कामाला जुंपलेल्या जनावराला मर्यादित चारा टाकला जातो की तो मेलाही नाही पाहिजे आणि काम पण केले पाहिजे. इतकीच कोणत्याही सरकारची कष्टकर्‍यांकडे बघण्याची भूमिका असते.. उद्या कामावर आला पाहिजे इतकी मजुरी दिली की बस!!! सरांच्या त्या विनोदी बोलण्याला ही वेदनेची किनार असायची.
समाजाचे क्रीम कोणते? याविषयी बोलताना ते म्हणायचे की मूठभर लोक शिकले; त्यांच्यातूनच समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार झाले आणि त्याला बुद्धिवादी वर्ग समाजाची क्रीम म्हणतो. हे क्रीम आम्हाला मान्य नाही. असे सांगताना सर म्हणायचे ‘मोठ्या कढईत दूध उकळत ठेवल्यावर पातेलेभर दूध त्यातून बाजूला काढायचं, ते गॅसवर ठेवायचं आणि त्याची साय येईल त्याला क्रीम म्हणायचं.. असला खोटेपणा आम्हाला मान्य नाही. तुम्ही संपूर्ण कढईभर दूध उकळा आणि त्याची साय येईल त्याला आम्ही क्रीम म्हणू. तेव्हा समाजातील सर्व स्तरातील माणसे शिकल्यानंतर जे समाजाचे नेते बनतील. ते खर्‍या अर्थाने समाजाचे क्रीम असेल. इतकी मूलभूत दृष्टी सरांची असायची. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या सरकारी शब्दाचीही ते खूप टिंगल करायचे. एकदा एका भाषणात ते म्हणाले ‘सरकारची सार्वत्रिकीकरण व्याख्या काय? तर प्रत्येक गावात शाळा पोहोचली की झाले सार्वत्रिकीकरण!! म्हणजे विजेचे खांब प्रत्येक गावात टाकायचे आणि पाटलाच्या घरी लाईट लागली की खेड्यापाड्यात वीज पोहोचली असं म्हणायचे… असा हा प्रकार. झोपडीत जेव्हा दिवा लागेल, ते विजेचे सार्वत्रिकीकरण आणि प्रत्येक घरातला पोरगा पदवीधर होईल तेव्हा ते शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण अशा सुंदर भाषेत सर बोलत राहायचे. शेवटी भेटलो तेव्हा ते म्हणाले की समाज नेहमी सोप्या उत्तरांना भुलतो आणि प्रत्यक्ष व्यवस्थेशी टक्कर घेणे त्याला नको असते. हे सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले ‘एकदा एक वेडा पोलीस आयुक्तांकडे गेला आणि म्हणाला मला तातडीने संरक्षण द्या कारण रेल्वे कंपन्यांचे मालक माझा खून करणार आहेत. आयुक्त म्हणाले का? तो म्हणाला ‘मी असा शोध लावला आहे की कदाचित रेल्वेची दुकानदारी मोडीत पडेल. आयुक्त म्हणाले ‘कसे काय?’ तो म्हणाला ‘मी वीज आणि कोळसा न वापरता रेल्वे कशी चालवता येईल? याचा शोध लावला आहे. त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी विचारले कसे काय? तो म्हणाला ‘एक मोठा चुंबक रुळावर रेल्वेपासून समोर एक किलोमीटरवर ठेवायचा आणि चुंबकाच्या अलीकडे मोठा लाकडी ठोकळा ठेवायचा. लाकडी ठोकळा काढला की रेल्वे जोराने लोहचुंबकाकडे ओढली जाईल. आयुक्त म्हणाले ‘इथपर्यंत समजलं, पण तिथून पुढे रेल्वे कशी पुढे सरकेल? तो म्हणाला ‘रेल्वे इतक्या जोरात येईल की त्या धक्क्याने चुंबक परत पुढे एक किलोमीटर ढकलले जाईल आणि रेल्वे पुन्हा पुढे सरकेल!!!
ही गोष्ट सांगताना सर हसायचे आणि आम्हीही खूप हसलो आणि नंतर सर त्यांचा खास पॉज घेऊन म्हणाले ‘अशी सोपी उत्तरे देणारे जादूगार प्रत्येक समाजाला हवे असतात. त्यांचा राजकीय फायदा नक्कीच होतो परंतु समाजबदलाची प्रक्रिया ही दीर्घकाळ असते त्याची उत्तरे इतकी सोपी असत नाहीत… गंभीर प्रश्नावर लढताना तुम्हीही खूप गंभीर असले पाहिजे असा समज सरांकडे पाहून मोडीत निघायचा अतिशय मिस्कील शैलीत ते बोलत राहायचे प्रत्येक वाक्य सूत्ररूप असायचे.. याच शेवटच्या भेटीत सरांशी बोलताना रयत शिक्ष्ाण संस्थेच्या एकूणच वाटचालीबाबत काहीसे मतभेद असावेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते इतकेच म्हणाले ‘रयतने मेडिकल कॉलेज काढावे असे सल्ले मला दिले जातात, पण रयतचा जन्म त्यासाठी नाही. मेडिकल कॉलेज काढायला शिक्षणसम्राट गावोगावी पडले आहेत. आमचा जन्म खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षण देण्यासाठी झाला आहे आणि तेच त्याचे उत्तरदायित्व आहे… आणि तेच मी करत राहणार…’
कर्मवीर भाऊराव पाटलांना केलेल्या कृतीमागचे तत्वज्ञान सरांच्या शब्दाशब्दातून पाझरत असायचे…
सर गेल्यानंतर जाणवते की मंत्रालयात गेल्यानंतर सगळे मंत्री उठून उभे राहतील असे आता कोणाला सोबत घेऊन जायचे? अशी नावे दिवसेंदिवस खूप खूप कमी होत आहेत. प्रश्न गंभीर होत आहेत आणि चळवळींचे पाठीराखे मात्र निघून जात आहेत..
ही वेदना सरांच्या जाण्याने अधिक गहिरी झाली…

– हेरंब कुलकर्णी

Previous Post

लढाऊ, कनवाळू एनडी

Next Post

लोणच्यात मुरलेले मर्ये!

Next Post

लोणच्यात मुरलेले मर्ये!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.