आपल्याकडे आपलो नेता आपल्याक खंय नेता ह्या म्हायत नसतानाही सगळे कार्यकर्ते त्या ‘ने’त्याबरोबर तेच्या मागून-पुढून घोषणा देत, तर कायजाण तेच्या डोक्यावर छत्रीचा छत्र धरून जात असतंत; काय त्यागमूर्ती तर स्वत: धो-धो पावसात भिजतील पण आपल्या नेत्याच्या डोक्यावर एकय पाण्याचो थेंब पडू देणार नाय की एक सूर्याचो किरणसुद्धा तेच्या डोक्याक शिवू देणानाय. ह्या सगळा दृश्य पायल्यानंतर आणि त्या नेत्याची तेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाणारी सुसृषा पायल्यानंतर साक्षात तो स्वर्गाधिपती इंद्रसुद्धा त्या नेत्याची ईर्षा करत आसतोलो की काय असा म्हाका कधी कधी वाटू लागता.
आमच्या केळुरीत सगळे केळुरीतले पुरूषमंडळी गजा न्हाव्याच्या ‘द केळुरी हेअरपोर्ट’ या सलूनात आसताना अचानक हरि पेडणेकराक कोरोना झालो हा ह्या कळल्यानंतर सगळे पंढरी कामताच्या नेतृत्वाखाली कोरोनावर कायतरी कायमचो उपाय करूक व्हयो ह्या डोक्यात ठेवन सरपंचांच्या घरी जावक लागले. पंढरी कामताक आतल्या आत आपल्या नेतेपणाच्यो गुदगुल्यो होत होत्यो. जसा अनेक राजकीय नेते बर्याच वेळेक लोकांपुढे तोंडावर पडल्यानंतरसुद्धा, तेंची आश्वासना देणा काय थांबत नाय, तसाच काल सकाळपासून सुरू झालेलो धो-धो पाऊस इतको धो-धो पडानसुद्धा आजूनपर्यंत थांबूक तयार नव्हतो. सगळ्यांनी गजा न्हाव्याच्या सलूनाच्या भायर पडल्यावर आपापल्यो छत्र्यो उघडल्यो. शर्यतीक उभे आसलेले घोडे जशे शर्यतीच्या आधी ऐटीत उभे आसतंत तसाच पंढरी कामत सलूनाच्या पायरीवर अगदी ऐटीत उभो होतो. कोणीतरी आपल्याक छत्री घेवन रिसिव्ह वैगेरे करूक येतोलो असा तेका वाटत होता. पण एकटोसुद्धा पंढरी कामताच्या पुढ्यात गेलो नाय. सगळेजण आपापल्यो छत्र्यो उघडून जावक लागले. जनू नाडकर्ण्यान तेच्या आजोबांनी तेका तेच्या मुंजीत दिलेली छत्री हातात घेतली. तिच्यो बर्याचश्यो तारो कधीच्याच रिटायर झालेल्यो होत्यो. त्या छत्रीचा वैशिष्ठ्य म्हणजे ती छत्री कधी बंदच होत नव्हती. एकदा ती छत्री बंद करूचो प्रयत्न आमच्या बाबूराव गोखल्यांनी केलो होतो, पण जनू नाडकर्ण्याच्या त्या छत्रीच्या तुटलेल्या एका तारेन बाबूरावांच्या शर्टाचो मुको घेतलो आणि तो शर्ट बोटांपासून ते खांद्यापर्यंत टराटरा फाटलो गेलो. तेव्हापासून जनू नाडकर्ण्याच्या त्या छत्रीच्या वाटेक सहसा कोणीही जात नाय. असो, तर जनू नाडकर्णी ती छत्री घेवन पंढरी कामत उभो होतो त्या दिशेक जावक लागलो. जनू नाडकर्णी आपल्या दिशेक येता ह्या बघताच पंढरी कामत खांद्यावरचो पंचा सावरत अजूनंच ऐटीत उभो रवलो. तेका वाटला कदाचित जनू नाडकर्णी आपल्याक रिसिव्ह करूक येताहा की काय! जनू नाडकर्णी थंय इलो, तेना पंढरी कामताकडे पायल्यान आणि मुकाट्याने आपली चपलां घालून थयसून निघून गेलो. छत्रीतून जात असलेल्या प्रत्येकाक पंढरी कामतान हाक मारण्याचो खूप प्रयत्न केलो, पण जसा निवडणूको झाल्यानंतर खुर्चीमधून येणार्या हवेमुळे मतदारांचे आवाज नेते लोकांपर्यंत पोहोचत नाय तसाच पावसाच्या आवाजामुळे या आमच्या केळुरीतल्या स्वयंघोषित नेत्याचो, पंढरी कामताचो आवाज एकाही केळुरी ग्रामस्थाच्या कानापर्यंत पोहोचलो नाय. शेवटी पंढरी कामताने खांद्यावरचो पंचा डोक्यावरती घेतलो आणि तो वाटेत मधे मधे थांबत थांबत एकदाचो सरपंचांच्या घरी येवन पोचलो.
‘अरे बापरे! ह्यो आणि कोण येता हा काय सुटलेलो वसू कसो?’ सरपंचांचे ऐंशी वर्षांची घोडदौड केलेले वडील दिनकर मास्तर तंबाखूची चिमटी तोंडात कोंबत बोलूक लागले. ‘वसू नाय वासुचो झिल!’ जनू नाडकर्ण्याशिवाय ह्या असा अचरट बोलणा अजून कोणच बोलल्यानी नसात. ‘काय हो कामत, अहो भिजत भिजत कित्या इलंत?’ सदा गावड्यान तोंड वर करून हो प्रश्न विचारलो मात्र लगेच जनू नाडकर्णी, ‘नायतर काय? अहो एवढो पाऊस पडताहा आणि छत्री नाय आणलीन तर येऊचा ना कोणाच्या तरी छत्रीत? कोणी नाय थोडीच म्हटल्यानी असतां? तुमचो स्वाभिमान म्हणजे खंयसरंय आडवो येताहा.’ जनू नाडकर्णी ह्या बोललो मात्र पंढरी कामत म्हणजे चवताळलोच. एखाद्या कुत्र्याच्या शेपटीवर नकळत पाय दिल्यावर तो कुत्रो आपल्या अंगावर जसो येयत तसोच पंढरी कामत म्हणजे जनूच्या अंगावरतीच धावलो. ‘मेल्या अरे माज्या पुढ्यातून गेलंस पण म्हाका छत्रीत येता काय म्हणून विचारल्यान नाय. आणि मेल्यांनो तुमी तरी कसले रे कोडगे? आं? कितल्यो हाको मारल्यो पण एकटो मायचो झिल मागे वळून बघेल तर शपथ.’ पंढरी कामत असा बोलल्यानंतर सगळे जण म्हणजे, ‘नाय नाय आमचा तसा काय नाय… ऐकल्यान नसात कदाचित…’ अशी कायतरी वाक्या फेकूक लागले.
ह्या होता ना होता तोच सरपंच आतून भायर इले. ‘काय हो मंडळी, काय झालां? काय नवीन नाटक बिटक काडतंत की काय? नाय अशे सगळे एकत्रंच इलात म्हणून विचारल्यान.’
अहो काय तरी काय हो सरपंच तुमी पण. अहो नाटक कसला काडल्यानीत? अहो जां नाटक झालां हां ता निस्तरा आधी.’ आण्णा अडसूळ आपल्या बनयनाच्या आत हात घालत पोट खाजवत पुढे येत म्हणाले.
‘काय हो अडसूळ काय पोराचा लग्न बिग्न काडल्यान की काय?’ सरपंच. ‘अहो लग्न खंयचा काढलात अहो घटस्पोट हवो हा आता.’ झिलू गावकर खिशातले शेंगदाणे काढत म्हणालो.
‘काय रे झिल्या आं? अरे जरा भांडणां झाली म्हणान काय कोण घटस्पोट घेतंत काय रे?’ विधानसभेत जसा बर्याच वेळेक कायतरी असंगतंच बोलल्या जाता तसाच, हयसरपण होवक लागला. नेमकी गोष्ट काय ता कोणंच सरपंचांका नीट सांगत नव्हतो आणि सरपंचसुद्धा आपलेच काहीतरी तर्क काढत होते. तेवढ्यात ‘थांबा म्या सांगतंय काय तां?’ प्रत्येक गावात भांडणा वैगेरे झाली की समझोतो करणारो म्हणान एक कुणीतरी आसता तसाच आमच्या केळुरीतले श्रीमान पंढरी कामत त्याच डौलात आपल्या खांद्यावरचो पंचा सावरत आणि थोडासो घसो खाकरत पुढे येवन म्हणाले. पंढरी कामत हे समझोतो करण्यात नंबर एक. समझोतो करण्यात हेचो हात कोणीही धरू शकणा नाय, हे आमच्या सर्व केळुरीवासीयांनी तेच्याबाबतीत मान्यंच केल्यानी, नवरा-बायकोची भांडणां सोडून पंढरी कामताक सगळ्या प्रकारची भांडणं मिटवण्याचो अनुभव आसा. ‘युधिष्ठीर धर्मराजान श्रीकृष्णाऐवजी जर पंढरी कामताक दुर्योधनापाशी समेट करूक पाठवल्यानी असता तर कदाचित महाभारताचा युध्द टळला असता.’ ह्या आमच्या विसुभाऊ जोशींचा पंढरी कामताच्या बाबतीत एक आत्यंतिक मत आसंय. तर पंढरी कामत घसो खाकरत पुढे इलो. ‘हा तर सरपंच म्या म्हणंत होतंय की आता करूचां काय?’
‘कशाचा? अहो सांगा तरी नीट काय सांगताय तां?’
‘अहो हरि पेडणेकराक कारोना झालो हां. वाचलीत नाय काय तुम्ही तेच्या झिलान टाकलेली मेसेज?’ पंढरी कामत आवाज चढवत अगदी पोटतिडकीनं म्हणालो.
‘हां ती अहो ती मघाशीच वाचल्यान.’ सरपंच.
‘अरे अरे अरे अरे अरे अरे आणि ह्या एवढ्या बिंधास्तपणे सांगतंत तुम्ही सरपंच?’ संस्कृतीरक्षक निरंजनपंत वालावलकर म्हणजे एवढ्या मोठ्यांदा खेकसले की तेंच्या त्या खेकसण्याच्या आवाजामुळे झिलू गावकाराच्या खिशातले सगळे शेंगदाणे पृथ्वीक प्रिय झाले, दिनकर मास्तरांच्या तोंडातली तंबाखूची पिचकारी तेंच्या नकळत धर्मा धाकणकराच्या लेंग्यावर येऊन पडली आणि जनू नाडकर्ण्याच्या छत्रीची दोन दिवसांपूर्वी कार्यतत्पर झालेली तार परत रिटायर झाली. ‘अहो हीच काय तुमची निष्ठा ह्याच का तुमचा केळुरीवरचा प्रेम?’ निरंजनपंत थांबूकंच तयार नव्हते.
‘अहो पण आता म्या काय करूचा तेका? तो कॉरंटाईन रवलो हा ना घरात? मगे?’ सरपंच आपली बाजू मांडूक लागले.
‘अहो सरपंच पण ह्या जर असाच चलत रवला तर करूचा काय सांगा तुमी. आज एक सापडलो, उद्या दोन सापडतील परवा चार मग आठ मग एका दिसा सगळो गावंच.’
तेवढ्यात सरपंचांचो फोन वाजूक लागलो, ‘हां बोला शेट काय खबरबात आंबेरीची?’ आंबेरीच्या सरपंचांचो फोन इलो होतो. ‘काय?.. अहो आयकूक येत नाय… आयकूक… आयकूक! हॅलो हा… काय सांगतास काय? अरे देवा माज्या कर्मा’ एवढा म्हणून सरपंचांनी फोन ठेवलो. सगळेजाण लगेच, ‘काय हो काय झालां?’ ‘आंबेरी गावाकडे तोंड करून असलेल्या धरणाचा पाणी सोडल्यानी खंय! सगळीकडे पाणी साचलां हा.’ हे सरपंच बोलले असतील नसतील तोच, ‘धावा रे धावा सगळ्यांनी, जीव वाचवा.’ अगदी दुरून ‘एवरीडे वीथ कृष्णा नाईक’ या साप्ताहिकाचो संपादक कृष्णा तेचो शिष्य फोटोग्राफर कमलाकर जवळकर बरोबर धावत-पळत आणि अगदी मोठमोठ्यान ओरडत येवक लागलो. ते दोघे सरपंचाच्या अंगणात इले आणि कृष्णा नाईक म्हणालो, ‘सरपंच अहो, केळुरीच्या बाजूक असलेला धरणाचा तोंड पण उघडलेला हां.’
हे ऐकल्यावर सगळेजण आपापलो जीव वाचवत वाट सापडात थयसर सैरावैरा पळूक लागले.
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)