दिल्लीत न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱया शेतकऱयाला, अन्नदात्याला जर देशद्रोही ठरवत असाल तर असा तुघलकी कारभार हा देश कदापि सहन करणार नाही. विरोधात बोललं आणि त्याला तुरुंगात टाकलं ही जर विरोधकांना आणीबाणी वाटत असेल तर न्याय्य हक्कासाठी लढय़ात उतरणाऱयांना देशद्रोही ठरवणं हे आणीबाणीपेक्षा मोठं पातक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात अघोषित आणीबाणी आहे असे म्हणत असतील तर देशात घोषित आणीबाणी आहे काय, असा जोरदार पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विरोधकांवर केला.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अघोषित आणीबाणी सुरू आहे. विरोधी पक्षाची मुस्कटदाबी सुरू असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती दिसत आहे. पण जर राज्यातील जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाही. पण तिकडे दिल्लीच्या सीमेवर ज्या पद्धतीने शेतकरी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्याशी बोलणं तर सोडाच; परंतु भरथंडीत त्यांना उघडय़ावर बसावं लागतंय. त्यांच्यावर गार पाण्याचे फवारे मारले जातात ही कुठली सद्भावना आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
अन्नदात्याला अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही!
भाजपच्या सर्व स्तरावरच्या नेत्यांनी ठरवायचं, लेफ्टिस्ट आहेत अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत का चिनी आहेत? याबाबत त्यांची हेर यंत्रणा प्रभावी मानावी लागेल. परंतु आपल्या अन्नदात्याला अतिरेकी, देशद्रोही ठरवणं हे आपल्या संस्पृतीत बसत नाही. अन्नदाता आपल्या न्याय्य हक्कासाठी लढय़ात उतरलाय. त्याला जर देशद्रोही म्हणत असतील तर ते माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
हा तुघलकी कारभार जनता सहन करणार नाही
न्याय्य हक्कांसाठी येणारा अन्नदाता रस्त्यावर उतरत असेल आणि त्यालाच देशद्रोही ठरवणार असाल… पाकिस्तानमधून कांदा आणला, साखर आणली… आता शेतकरी पण आणायला लागलात का? आपल्या शेतकऱयांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागलात? असा कारभार जर चालत असेल तर हा तुघलकी कारभार हा देश सहन करणार नाही, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला.
विरोधी म्हटल्यावर विरोधाचा सूर काढावा लागतो
विरोधकांचं गेलं वर्ष त्यांचं सरकार कधी पडतंय, सरकार कधी पडणार याचा मुहूर्त काढण्यात गेलं आहे. त्यामुळे सरकारने काय काय चांगली कामं केली आहेत त्यांची त्यांना कल्पना नसेल. पुठेही जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान नाही. पण विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात विरोधी आहे म्हणून त्यांना तसा सूर काढावा लागतो, अशी टिपणी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जलयुक्त शिवाराची चौकशी करून सरकार मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याचे पत्रकारांनी सांगताच त्यांनी काही केलं तरी चालू द्यायचं असं त्याचं मत आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये
मराठा आरक्षणाबाबत होणाऱया टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणाचे प्रकरण कोर्टात आहे. मराठा समाजाच्या विविध संघटना, नेत्यांशी चर्चा करतोय. वकिलांशी चर्चा करतोय. सर्वानुमते कोर्टात जे काही मांडायचं ते मांडलं जात आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांची लढाई पूर्ण ताकदीने लढतो आहोत. असे असताना ओबीसी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्याही संघटनांशी चर्चा होत आहे. मंत्रिमंडळाची उपसमितीही नेमलेली आहे. पण राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे त्यांनी काही करू नये. ओबीसी समाज किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या हक्काचं आहे ते आम्ही कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
राज्यपालांचा अधिकार मर्जीनुसार मान्य करता येतो का?
विधिमंडळ राज्याचं भवितव्य घडवणारे ठिकाण आहे. त्यातील सदस्यसंख्या ही कारभाराला आवश्यक असते. या संख्येनुसार यातील 12 जागा राज्यपाल नियुक्त असल्या तरी त्याला मंत्रिमंडळाची शिफारस असते. मात्र उद्याच्या अधिवेशनात या बारा जागा रिकाम्या राहणार. या जागा रिकाम्या ठेवणं त्यांचा अधिकार असला तरी या 12 जागा मान्य केल्यानंतरसुद्धा त्या मंजूर केल्या जात नाहीत. रिटायरमेंटला कालावधी असतो तसा नेमणुकीला कालावधी का नसावा, असे सवाल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे असेल तर यासाठी घटनेमध्ये तरतूद करावी लागेल. राज्यपालांचा अधिकार मान्य मग तो अधिकार मर्जीनुसार मान्य करता येतो का? यामुळे नागरिकांच्या अधिकारावर गदा येते. मर्जी आणि अधिकार यात फरक आहे. तो त्यांनी समजून घ्यायला हवा, अशी समजच विरोधकांना दिली.
देशभरात यंत्रणांचा घरगुती कामगाराप्रमाणे वापर
आमदार प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पूर्वेश सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, देशभर या यंत्रणांचा घरगुती कामगाराप्रमाणे वापर केला जातो की काय, अशी शंका आता जनतेला येऊ लागली आहे. जनता ही जागरूक आहे. सत्तेचे खेळ जनता बघते आहे; जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
विरोधकांचे चेहरे पडलेत, त्यांचं अवसान गळालंय! उपमुख्यमंत्री अजित पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सुशिक्षित वर्गाने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. सरकारचं कामकाज योग्य नसतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढय़ा मोठय़ा मताधिक्याने निवडून आले ही वस्तुस्थिती नाकारता येईल का? यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पडला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या उजवी-डावीकडे बसलेल्या चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचे तर अवसान गळाल्यासारखे विरोधकांच्या पत्रकार परिषदेत दिसत असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लगावला.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेत कोणताही उत्साह नव्हता असे सांगतानाच, राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक अडचणींतून मार्ग काढीत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या सरकारला 12 महिन्यांपैकी चार महिनेच वर्षभरात मिळाले. आठ महिने तर कोरोनामध्ये गेले. एकीकडे पेंद्र सरकारकडून 28 हजार कोटी जीएसटी तसेच वेगवेगळ्या टॅक्सचे येणे बाकी आहे. केंद्राकडून येणाऱया रकमेचा ताळमेळ बसत नाही. तरीही एवढी नैसर्गिक संकटं आली, पिकांचं नुकसान झालं. सतत सरकार अडचणीतून मार्ग काढत कोरोनाशी मुकाबला करीत पुढे चाललेले आहे, असे अजित पवार म्हणाले.
विरोधक राजकारण करीत आहेत
राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांकडून राजाकरण सुरू आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स, मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र अद्यापही तिथे अधिक लोक जात नाहीत. 9वी, 10वी व 12वीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली तरी पालक मुलांना पाठवायला तयार नाहीत. अशा प्रकारची स्थिती आहे. मंदिराबद्दल विरोधी पक्षांनी राजकारण केलं. भाविक, भक्तगण, वारकरी सहकार्य करीत आहेत. आता मंदिरे सुरू केली, पण मंदिरात तेवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भाविक जायला तयार नसल्याचे चित्र अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरेकरांना ताब्यात घेण्याविषयी फडणवीस सुचवतायेत का?
मुंबई बँकेप्रकरणी दरेकरांना कारवाईची धमकी दिली जात आहे. सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे, असा सवाल पत्रकारांनी केला असता अजित पवार म्हणाले, आधी कोण म्हणतंय ते सांगा? हाच धागा पुढे पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तसं देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला सुचवायचं आहे का? त्यांच्या पक्षात कोण हवेत किंवा नकोत हे त्यांनाच कळेनासं झालं आहे. देवेंद्र फडणवीस असं काही आम्हाला सुचवत असतील आणि काही माहिती देत असतील तर त्यांनी जरूर द्यावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सौजन्य- सामना