कोणत्याही वर्षात दहीहंडी अर्थात गोकुळाष्टमीच्या दिवशी मार्मिकचा अंक प्रकाशित होणार असेल, तर साहजिकच आठवण होते ती मार्मिकच्या अगदी पहिल्या वहिल्या अंकाची. बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे या व्यंगचित्रकार बंधूंनी मराठीतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ६६ वर्षांपूर्वी, आचार्य अत्रे यांच्यावरच्या परमभक्तीपोटी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित केले, तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावर ‘मोरारजीची दहीहंडी’ होती. १४ ऑगस्ट १९६० या तारखेच्या या अंकाच्या मुखपृष्ठावर सरकारी कर्मचार्यांवर स्वार झालेले मोरारजी नव्या वेतन आयोगाचे म्हणजे वेतनवाढीचे गाजर दाखवून या कर्मचार्यांना पळवतायत, असं हे चित्र होतं. मोरारजी देसाई यांनी लांब काठीला लावलेली ही हंडी कधीच फुटणार नाही, हे बाळासाहेबांनी मोठ्या खुबीने दाखवले होते. त्यानंतरही हा सण काही वेळा मुखपृष्ठांवर ‘न फुटणार्या हंड्या’ दाखवत झळकायचा. सरकारच्या आटोक्याबाहेरची आश्वासनं किंवा सरकारला आवरता येणार नाहीत, अशा प्रश्नांच्या या हंड्या इतक्या उंचावर टांगलेल्या असायच्या की कितीही थर लावले तरी तिथपर्यंत मजलच जाणार नाही. इतक्या वर्षांत इतक्या गोष्टी बदलल्या, पण न फुटणार्या हंड्या काही कमी होत नाहीत, उलट वाढतच चाललेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई, रस्त्यांची दु:स्थिती, गोरगरीबांच्या शिक्षणातल्या अडचणी, भ्रष्टाचार, उद्योगपतींवर कर्जांची लयलूट या गोष्टी नव्या प्रगत भारतात बदलल्या असतील, प्रश्न आटोक्यात आले असतील, असे वाटणे हा भ्रमच ठरला आहे. उलट न फुटणार्या हंड्यांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांचे आता, देशाच्या दुर्दैवावर भेसूर प्रकाश टाकणारे, झुंबरच बनेल!

