अर्ध्या कामावर जायला लवकर निघाला, पण आज कंपनीपर्यंत जायला कुणी भेटायचे चान्स नाही. अर्ध्या चौफुलीवर उभा राहून गाड्यांच्या प्रतीक्षेत जागच्या जागी फेर्या मारतोय. मागच्या आमदाराच्या काळात इथं एक बस स्टॉप बांधला गेला. तो ह्याच साली नवीन रस्ता बांधण्यासाठी अर्धा तोडला गेलाय. आता तो स्टॉप आडोश्यापुरता उरलाय. तिथं ना बसण्याची सोय ना धड उभं राहण्याची. अर्ध्या अगदी त्याच्या जवळ उभा. समजा आले पहाळे तर आडोश्याला पळता येईल हा हेतू.
अर्रर्रर्र! हा कंपनीच्या मागं राहणारा माणूस… लक्ष नसल्यानं हॉर्न वाजवत निघून गेला. अर्ध्यानं डोक्याला हात मारला. चांगलं डायरेक कंपनीच्या गेटपर्यंत लिफ्ट मिळालं असतं. बरं त्यानं हॉर्न पण दिला. आता? अर्ध्या जरा आणखी रस्त्याच्या कडेला सरकला आणि मग दिसेल त्या गाडीला हात करून बघू लागला. इथं वेळेच्या आधी येऊन उपयोग नाही. कंपनीत वेळेवर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याची धडपड चालली.
त्यानं एका ट्रकला हात दिला. तो आला त्याच वेगात निघून गेला. एका रिक्षाला हात दिला, ती हळू झाली अन् पुन्हा वेग पकडून निघून गेली. एका स्कुटीला हात दिला, एक तरुणी चालवत येतेय. तिनं बघितलं आणि गोड हसून सर्कलला गरका घेऊन समोरल्या बाजूला निघून गेली. आता रे? अर्ध्या ढिम्म बघत राहिला.
‘अय यंटम! येयचंय का?’ एक पीक अप थांबली, त्यातून एकजण डोकावला. आणि त्यानं शेलक्या शब्दांत उद्धार केला. त्याचंही बरोबर आहे. अर्ध्याचं लक्ष स्कुटीकडं लागलेलं. हा उभा राहून हॉर्न वाजवतोय, आवाज देतोय. अर्ध्यानं आधी मानेनं नकार दिला. माघारून पळत गाडीकडं निघाला. पीक अप फुल्ल लोडेड असंल. मागं भारी ओळ लिहिलीय, ‘येतीस का जाऊ?’ ‘का’च्या पुढं प्रश्नचिन्ह पाहिजे का शेवट बरोबर आहे? हेच अर्ध्याला आठवेना. पण ड्रायव्हर लोकांना व्याकरण कोण शिकवणार? सरन्हाहीकच म्हणतील!
अर्ध्या दाराजवळ पोहोचला, दारावर दुसरं वाक्य आहे, ‘एकदा बसून तर बघ!’ पण अर्ध्याची नजर आत कोणे? त्याला शोधते आहे. तर आत वामन!
अर्ध्या लागलीच दार उघडून आत बसला. खिडकीजवळच्यानं ड्रायव्हर साईडला सरकून घेतलं. वामन स्टेरिंग धरून बसलेला.
‘कुठं पाहात राहतो रे तू? एवढा हॉर्न देऊ राहिलो. हा बारक्या आवाज देतोय. तुझं लक्ष नाही.’ वामननं टेप वाजवायला सुरुवात केली. आणि ब्लूटूथ चालू करून परत गाड्यांतले दर्दभर नगमे, ‘दिल के सौ तुकडे, हमने करके देखे है!’ की काय वाजायला लागलं.
‘तू कसा काय ह्या येळेला?’ अर्ध्यानं वामनच्या गियरसंग विषय बदलला.
‘मी? मुंबईला! वाटी वाटी चाललो…’ वामननं सोन्याच्या दोन-चार अंगठ्या घातलेल्या हातानं दिशा दाखवली. गडी बनियनवरच गाडी चालवायला बशेल. गळ्यात चांदीची चैन आहे. गाडीत स्पीकरचा दणदणाट. पुढं एक लंगोटवर असलेल्या बाबाची तसबीर चिपकवलेली. तिथं अगरबत्तीची काडी खोचलेली. बाबाला प्लास्टिकची दोनचार फुलं वाहिलेली. शेजारचा बारक्यानं बसल्या बसल्या तिथं चुन्याची आणि तंबाखूची पुडी ठेवली. आणि पूजा पार पडली.
‘मुंबईला? मागं तर इथं पटट््यावर चालवायचा ना गाडी?’ अर्ध्याला राहवलं नाही.
‘त्याला? आता खूप दिवस झाले. त्याच्यानंतर मार्वेâटला कांद्याच्या ट्रीपा मारल्या अन् मग हीच लाईन धरली.’ वामननं सांगितलं.
‘ह्या अंगठ्याबिंगठ्या… भारी सुधारला राव तू! नाहीतर आम्ही खेटा मारू मारू थकलो.’ अर्ध्या हळहळला.
‘आपल्या बाबांचं नाव घ्यायचं.’ वामननं फोटोला एक हाताने स्पर्श केला. ‘आपुन जिथं कुठं पोहोचंल ना आयुष्यात तर बाबांमुळं. तू का येत नाही? एखाद्या पौर्णिमेला दरबारात? तुला पण अशी लाईन मिळंल.’ वामननं बाबारायण सुरू केलं.
‘पण म्हणजे तू आता डायरेक मुंबईला चालला का?’ अर्ध्यानं बाकीची अवांतर चर्चा टाळली.
‘हां थेट मुंबई!’ वामननं सहज उत्तर दिलं.
‘हा पंटर कुठला?’ अर्ध्यानं बारक्याकडं बघत विचारलं.
‘मी इथलाच ना!’ बारक्यानं लागलीच उत्तर दिलं.
‘अरे वरच्या आळीतला! तबेल्याशेजारी राहतो तो. त्यानंच लाईन बसवून दिली मला!’ वामननं माहिती दिली.
‘म्हणजे?’ अर्ध्याला प्रश्न पडला.
‘आधी मी भाडे मारायचो. कांद्याचे! मग मार्वेâटमधी बारक्याशी ओळख झाली. मग काय ठरवलं. केली डेरिंग अन् गेलो!’ वामन सांगायला लागला.
‘काय केलं नेमकं?’ अर्ध्याला उत्सुकता!
‘काही नाही. कांदे भरले अन् विकून आलो.’ बारक्यानं मधीच चोच मारली.
‘कांदे कुठून घेतले तुम्ही?’ अर्ध्याला महत्त्वाचा प्रश्न सुचला.
‘हे मार्वेâटात जायचं अन् लिलावात जाऊन माल उचलायचा. बाकी काय?’ वामननं रुटीन सांगितलं.
‘म्हणजे तू बोली लावतो का?’ अर्ध्या.
‘नाही रे! आपण कुडमुडा व्यापारी शोधायचा. पट्टी आपण भरू असं सांगून बोली लावायची. कांदा उचलायचा. अन् निसूनपुसून पाच-दहा किलोच्या गोण्या भरायच्या अन् नेऊन विकायच्या.’ वामन.
‘पण कांदे भारी एक नंबर क्वालिटीचे लागत असतील ना?’ अर्ध्याला खुदबुद वेगळीच.
‘नाही! आम्ही खादाड भरतो.’ बारक्या मधीच बोलला.
‘म्हणजे?’ अर्ध्यानं आ वासला.
‘अरे पाणी लागेल माल. टरलं उडालेले कांदे. चोपडा माल घ्यायचा! फार खराब पण नाही. आणि खूप चांगला पण घ्यायचा नाही.’ वामननं माहिती दिली.
‘का बरं असं?’ अर्ध्या कोड्यात पडला.
‘चांगला माल परवडत नाही न्यायला. मग ती लोकं पार चिंगळ्या चाफीत बसत्या. ये इत्ता महँगा क्यू? अमवंâ क्यू अन् तमकं क्यू? त्यापेक्षा हा माल न्यायचा पंचवीस-तीसला विकला तरी लै झालं! भाव असलाच तर चाळीस-पन्नासला तोच माल चालतो.’ वामननं डिटेल कला सांगितली.
‘म्हणजे आपल्याकडं जो टॉप क्वालिटीचा माल राहतो त्या किंमतीत इथलं खादाड विकायचं. बरोबर ना?’ अर्ध्याला हळूहळू उकलायला लागलं.
‘हां तेच!’ वामननं पॉईंट क्लिअर केला. ‘त्याच्यात माहित्ये का?’ वामननं उलट अर्ध्याला विचारलं.
‘काय?’ अर्ध्या.
‘हे मोठमोठ्या कंपन्या चिप्स वगैरे बनवायला आणि हॉटेलवाले ग्रेव्ही बनवायला ही खादाडच वापरत्या. तिथं भारी कांदा कोणी घेत नाही.’ वामननं माहिती पुरवली.
‘यायला मग हॉटेलीत खावा की नाही?’ अर्ध्याला नुसतं कल्पनेनं शिसारी आलीय.
‘त्याला काय होतं? ते पार रटरटून शिजवत्या. त्याच्यात मसाले-बिसाले मारत्या. मग आणखी काय पाहिजे? लोकांना फक्त टेस्ट लागती.’ वामन सांगायला गेला.
‘तिथं पण लोकं जागेवर घेत्या कारे? आपल्याकडं उकाड्यावर फेकून देतील.’ अर्ध्याला उकिरडा आठवला.
‘त्याला काय होतं? एक साली कांदा पार वर गेला होता पहाय? त्या साली मी उकाड्यावरून कांदे गोळा करून मार्वेâटात निले होते. तव्हा भाव पार तीन-साडेतीनचा मिळाला होता.’ बारक्यानं त्याच्या मेमरीतल्या आठवणी सांगितल्या.
‘पण तेव्हा कांदा मिळतच नव्हता…’ अर्ध्यानं त्यावेळची परिस्थिती सांगितली.
‘कसंय अर्ध्या! कितीबी चांगला माल घे मार्वेâटात जाय. तिथं पुकारणारे- व्यापारी तो एकदा का होईना पायदळी तुडवत्या. ही आपली सिस्टीम आहे. अन् तू आपल्याकडचे मार्वेâट पाहिले तं राम आठवशील का नाही माहीत नाही, पण तुकाराम तुकाराम जपशील. त्याच्यात फक्त पावसाळ्यात मार्वेâटात जायचं. वर्षभर तू काही खायचाच नाही.’ वामन अर्ध्याकडं बघून हसायला लागला.
‘नाही मार्वेâटची अवस्था बघितलीय मी! मोकाट गायी, डुकरं, कुत्रे आणि तंबाखू-गुटखा खाणारी हमाल-मापारी-व्यापारी-शेतकरी प्रजा. जी जागोजाग पचापचा थुकत राहते. त्याच्यात कचरा-कुंड्या भरेल नाहीतर गायब. त्यात प्रसाधनगृह असून उपयोग नाही. लोकं भिंत बघून कुठेही उभे-आडवे होतात. बाकीची अवस्था न सांगितलेली बरी.’ अर्ध्यानं बघितलेलं मार्वेâट आठवलं.
‘बाबा ते महत्त्वाचं आहे का?’ वामननं अर्ध्याला प्रश्न केला.
‘नाही, म्हंटलं तुझा धंदा बरा असंल तर त्याच्यात यायचा विचार केला असता…’ अर्ध्या अंगठ्या पाहून तसाही आधी हुरळला होताच की!
‘ये की मग! चारपाच दिवस थांबू, एवढा माल खपला म्हणजे झालं! मग यायचं दोनचार दिवस थांबायचे. परत माल भरायचा अन् विकून यायचा.’ वामननं लागलीच ऑफर दिली. ‘वर तुला दीडेक हजार देतो मी!’
‘नको! थांबव!’ अर्ध्यानं कंपनीचं गेट बघून गाडी थांबवायला लावली.
‘चाल येतो रे!’ बारक्यानं दार लावत हात हलवला.
अर्ध्या मात्र त्याच्या गाडीतली सडकी खादाड डोक्यात घेऊन कंपनीत घुसला. आता ती कुठल्या उकिरड्यावर कुठल्या डुकराला खाऊ घालायची? हाच त्याला पडलेला प्रश्न आहे.

