भारतात चहा बंद झाला तर काय होईल?– अशोक परब, ठाणे
सगळेच चहावाले राजकारणात येतील… मग जे होईल ते सगळ्यांच होईल. यहा हमारा अकेले का मकान थोडी है…
भोंदूबाबाला भोंदूबाबा म्हणतात, तर त्यांच्या भक्तांना काय म्हणावे?– अमोल कांबळे, कोल्हापूर
काय वाटेल ते म्हणा, आम्हा भक्तांना काही फरक पडत नाही! संत महात्म्यांनी काय काय म्हटले कोणाला काय फरक पडला? फक्त तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही चारचौघात किंवा सोशल मीडियावर म्हणून दाखवा. मग आम्ही तुम्हाला काय काय म्हणतो ते बघा… आणि परत आम्हा भक्तांना काही म्हणून दाखवा!
एखादा भोंदूबाबा कोणत्या जातीचा आहे, त्यावरून तो गुन्हेगार आहे की त्याला फसवलं गेलंय, त्याला गोळी घालून संपवायचं की कायदेशीर कचाट्यातून त्याची अलगद सुटका करायची, त्याला हवा तेव्हा पॅरोल द्यायचा, हे कसं ठरवता येतं?-सिद्धार्थ सोनवणे, रोहे
त्या भोंदू बाबाला कोणाकोणाचा भूतकाळ माहित आहे, त्यावरच भोंदू बाबाचं भविष्य ठरतं. आतापर्यंत पकडल्या गेलेल्या प्रत्येक भोंदू बाबाच्या कुंडलीचा अभ्यास केला तर हेच दिसेल. अशा बाबांची कुंडली भविष्याच्या अभ्यासक्रमाला ठेवली तर तुमच्या प्रश्नांसारखे कित्येक प्रश्न संपुष्टात येतील.
भारताला इस्रायल अमेरिका वि. इराण युद्धात मध्यस्थी करण्यासाठीही स्थान मिळालेलं नाही. ते काम पाकिस्तान करतो आहे. आपण दलाल नाही अशी टिप्पणी यावर परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली आहे. युक्रेनच्या युद्धात आपण कोण होतो? जगात कुठलंही युद्ध थांबवण्याची शक्ती भारतात आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणत होते, तेव्हा ते दलालीबद्दल बोलत होते का? आमच्यासारख्या सामान्य माणसांचा फार गोंधळ होतो हो!- बाळकृष्ण जोशी, ठाकुर्ली
यातलं कुठलंही कोणाचंही वक्तव्य अमेरिका, इराण, इस्राइल, किंवा पाकिस्तानने तरी गंभीरपणे घेतलंय का? तुम्ही का गंभीरपणे घेताय? यातलं आपल्याला काही कळत नाही असं बेअरिंग, घ्या, मग कळेल अज्ञानात किती सुख असतं. आपल्या पीएमचं उदाहरण घ्या… म्हणजे… ते काही बोलतात का बघा…मग तुम्ही कशाला बोलताय?
मी गेल्या काही महिन्यांत भरपूर लांब केस वाढवले आहेत. दाढीही वाढवलेली आहे. मला पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून काम करायला जायचं आहे. मी कुठे अर्ज करू?– सागर वेळापुरे, नवी मुंबई
सागर बाळा जरा धीर ‘धर’. तोवर २०१४पूर्वीच्या काही घटना शोध. त्या २०१४नंतरच्या कथेमध्ये बेमालूमपणे मिसळ. २०१४नंतरच्या ज्या घटनांना लोक शिव्या घालतात, त्या घटना, त्याच लोकांच्या कशा फायद्याच्या होत्या, अशा पद्धतीने रंगव आणि मग त्या लिखाणावर ‘चित्रपट’ असं लिही आणि अशा माणसांना ‘धर’, ज्यांना अशा स्क्रिप्टची गरज आहे. फक्त त्या चित्रपटाला फाईल असं नाव देऊ नको. कारण काही मूर्ख लोकं आता शहाणी झालीयेत… त्यांना वेडं बनवण्यासाठी कुठलं तरी नवीन नाव शोध… (सरेंडर सोडून शेवटी र असलेलं कुठलंही नाव घे)… नाहीतर लोकांना तुझ्या चित्रपटाचा अजेंडा कळेल) तुझा अजेंडा लपवून ठेवलास तर तुझा ‘धर’ तूच बनशील.
आपल्या देशाने गो करोना गो म्हणून एके दिवशी थाळ्या टाळ्या वाजवून करोना घालवला. तसे, कम गॅस कम असं म्हणत टाळ्या थाळ्या वाजवल्या तर गॅसची टंचाई दूर होणार नाही का झटपट?- वसुंधरा शेवाळे, बीड
नाही नाही असा वेडेपणा स्वतःहून करायचा नाही… कोणीतरी करायला सांगितला की करायचा…की मग त्याला देशप्रेम म्हटले जाते.
देशात गॅसची टंचाई आहे, हे कळल्यापासून आमच्या बिल्डिंगचे देशभक्त सेक्रेटरी काका सकाळ दुपार संध्याकाळ चणे-फुटाणे आणि पावट्याची भाजी खात सुटले आहेत. त्यांना कसं समजावायचं आता?- रवींद्र आकूत, परभणी
काका आता चणे फुटाणे(च) खातायत, त्यामुळे गॅसटंचाई आहे हे कुठल्या तोंडाने कबूल करावं त्यांना कळत नसेल. तुम्ही चणे फुटाणे नका खाऊ… पण काकांना देश प्रेम शिकवायला नका जाऊ, तुम्हीच देशद्रोही ठराल भाऊ, तुम्ही तुमच्या देशप्रेमाच्या औकातीत रहा आकूत, त्यांच्या ‘देशभक्तीची’ औकात फार मोठी आहे. ‘देश’ खड्ड्यात गेला तरी ते ‘भक्ती’ सोडत नाहीत.

