मार्मिकची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षातलंच हे मुखपृष्ठचित्र आहे. बाळासाहेबांच्या तेव्हाच्या शैलीच्या सगळ्या खुणा त्यात दिसतात. १९६१ सालात हे व्यंगचित्र त्यांनी रेखाटलं तेव्हा भारत हा नवजात देश होता, ब्रिटिशांनी पार लुटून खंक केलेला होता, जाताना भारताबरोबरच पाकिस्तान या देशालाही जन्म देऊन त्यांनी फाळणीच्या रूपाने कायम राजकीय सोयीने भळभळवता येईल, अशी जखम दिली होती. या सगळ्यातून वाट काढत हा अनेक राज्यांचा, भाषांचा, धर्मांचा आणि संस्कृतींचा मिळून बनलेला देश गरिबीतून खेचून वर आणायचा, त्याला भारतीयत्वाची ओळख इतर सर्व ओळखींपेक्षा मोठी ठेवायला शिकवायचं, परस्पर आदर, सहकार्य शिकवायचं, अशी अनेक आव्हानं देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समर्थपणे पेलली होती. त्याचबरोबर अंगचटीला जाऊन मिठ्या मारणे, हात दाबत बसणे, निरर्थक तोंडातल्या तोंडात बोलून स्वत:च मोठ्याने हसणे, असले उद्योग न करता त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायातही मोठा सन्मान मिळवला होता. ते तटस्थ राष्ट्रांचे, अलिप्ततेच्या चळवळीचे प्रणेते बनले होते. त्या काळात अमेरिका आणि रशिया हे जगातले दोन महासत्ता असलेले देश होते. त्यांच्यापैकी कोणाही एकाकडे झुकणं म्हणजे दुसर्याची खप्पामर्जी ओढवून घेणं ठरलं असतं. या दोन्ही गटांमध्ये संतुलन साधून आपण मध्यममार्गी राहणं, ही तारेवरची कसरत होती आणि सुदैवाने देशाला नेहरूंसारखा पहिला पंतप्रधान लाभला म्हणूनच ती कसरत यशस्वीपणे करुन देशाने अलिप्ततेचे सूत्र जपून आपला लाभ करून घेतला. व्यक्तिगत स्वार्थ आणि संबंध जोपासण्यासाठी देशहिताचा बळी देऊन, अमेरिका, इस्रायल यांचं मांडलिकत्व पत्करणारे दिशाहीन परराष्ट्र धोरण आज देशाची जगभरात लाज काढत असताना नेहरूंचे माहात्म्य अधिकच उजळून निघते.

