५६ वर्षांपूर्वीचे हे मुखपृष्ठ चित्र. या अंकाची तारीख आहे १ फेब्रुवारी १९७०. प्रजासत्ताक दिनाच्या नंतर प्रकाशित झालेला हा अंक. हा काळ काँग्रेस पक्षातल्या धामधुमीचा होता. केंद्रात आणि बहुतेक राज्यांमध्ये याच पक्षाची सत्ता होती आणि त्यामुळेच या पक्षातील अंतर्गत कलहालाही देशाच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झालेले होते. सिंडिकेट आणि इंडिकेट अशा दोन भागांमध्ये काँग्रेसची दुफळी झाली होती. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष के. कामराज यांनी १९६६ साली इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग प्रशस्त केला होता. त्यांच्यासह नीलम संजीव रेड्डी, सका पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांना वाटलं होतं की आपण या ‘गुंगी गुडिया’ला ताब्यात ठेवू, ती आपल्या इच्छेने कारभार हाकेल. पण, इंदिरा गांधींकडे स्वतंत्र प्रज्ञा होती, त्यांनी या ज्येष्ठांच्या सिंडिकेटपुढे शरणागती न पत्करल्यामुळे ज्येष्ठांची काँग्रेस (ओ) आणि इंदिराजींना मानणार्या युवा नेत्यांची काँग्रेस (आर) स्थापन झाली. देश प्रजासत्ताक बनून अवघी २० वर्षे झालेली असतानाच देशातल्या सर्वात मोठ्या, सत्ताधारी पक्षाची ही स्थिती होणे देशासाठी फार घातक होते, तेच बाळासाहेबांनी या चित्रातल्या निष्पर्ण झाडाला आलेल्या दोन फळांच्या माध्यमातून दाखवले आहे… त्या झाडासमोर, सावली, अन्न या अपेक्षेने बसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर जेमतेम एक कपडा आहे… २०१४ साली जणू देश नव्याने स्वतंत्र झाला अशा आविर्भावात वावरणार्या आणि देशात अमृतकाळच सुरू आहे, असा आविर्भाव असलेल्या अवसानघातकी मोदी सरकारच्या काळात बाळासाहेबांनी हे झाड, धर्मविद्वेष, गरीबी, विषमता, बेरोजगारी, सार्वभौमत्वाची हानी, हुकूमशाही, लोकशाहीच्या स्तंभांचं पतन, जातीयता, अंधश्रद्धांचा बुजबुजाट, थापेबाजी अशा असंख्य कडवट फळांनी भरून गेलेले दाखवले असते आणि त्याच्या समोर बसलेल्या माणसाच्या अंगावर लज्जारक्षणार्थ तरी एखादा कपडा दाखवता आला असता का, हा प्रश्नच आहे.

