अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि कसल्या कसल्या निवडणुकीत भाजपाला कधी नव्हे ते मिळालेल्या पलंगतोड यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा आदेश मी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला दिला आणि त्याने तो कसलीही खळखळ न करता पाळला. तीच ही मुलाखत –
-अभिनंदन फडणवीस साहेब.
-नमो नमः आभारी आहे. एवढं दणदणीत घवघवीत यश भाजपाला कसं काय मिळालं हाच तुमचा प्रश्न असेल ना! तर ते मिळणारच होतं. या शिंदेंनी काड्या घातल्या नसत्या ना कोकणात आणि इतर ठिकाणी तर गिनीज बुकात नोंद झाली असती आमच्या विक्रमाची. आमच्याच जिवावर मोठे झाले आणि आमच्या जिवावर उठले स्वार्थासाठी. त्यांचा हवा भरलेला फुगा फुटलेला दिसेल तुम्हाला थोड्या दिवसांतच. निवडणूक असली की साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून सर्वशक्तीनिशी ती कशी लढवायची हे आमच्या पक्षाला कोणी शिकवण्याची गरज नसते. म्हणूनच या निवडणुकीत आम्ही खोलवर मुसंडी मारली. भाजपाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हे आम्ही पटवून दिलं. आमचे विरोधी पक्ष आमच्या महायुतीतच होते. त्यांनाही फार डोकं वर काढू दिलं नाही. विकासकामांचा पुकारा करत स्थानिक समस्यांवरून जनतेचे लक्ष उडवण्यात आम्ही यशस्वी झालो, त्याचं फळ आम्हाला मिळालं.
-या निवडणुकीत मतदारांना पैसेवाटप करून त्याबदल्यात मतांची बेगमी भाजपाने केली, असे आरोप केले जातात…
-माझ्याकडे तशा तक्रारी नाहीत आणि पुरावेही नाहीत. निवडणुका म्हटल्यावर असे प्रकार थोड्याफार प्रमाणात होत असतील हे मी नाकारत नाही. पण केवळ पैसे वाटून निवडणुका जिंकता येतात असं मी मानत नाही.
-का मानत नाही? बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधरा-पंधरा हजार टाकून निवडणुका जिंकल्याच ना तुमच्या पक्षाने! महाराष्ट्रात तर लाडक्या बहिणींवर पैशाची खैरात केलीच ना तुमच्या सरकारने! त्यावेळी तुमचा हेतू कुठे शुद्ध होता? या निवडणुकीत तर पैशाचा बाजार मांडला होता तुमच्या पक्षाने.
-लक्षात घ्या, त्यापलीकडेही काही गोष्टी होत्या ना विकासकामाच्या. एवढ्या कमी वर्षात जलदगतीने सरकारने केलेल्या विकासकामांना जनतेने दाद दिली. ती मतांमधून मिळणारच होती.
-ते करताना तुमच्या सरकारने केलेल्या लोकशाही स्वातंत्र्याच्या मुस्काटदाबीची, जनतेवर केलेल्या अन्यायाची, वाढत चाललेल्या महागाईची, सरपंच संतोष देशमुख यांच्यासारख्या निष्पाप सरपंचाच्या निर्घृण हत्येची दखलच जनतेने घेतली नाही? गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या मंत्र्यांची सतत पाठराखण करून न्यायाची गळचेपी करणार्या सरकारची ही कामगिरी कुठल्या लोकशाही तत्त्वात बसते? मारे जनतेच्या भल्याच्या गोष्टी करता आणि जनतेचा आक्रोश ऐकू आला तर कान बंद करून घेता. निवडणुकीच्या अफाट यशाला गुलालाऐवजी लागलेले हे काळे डाग कधीच पुसले जाणार नाहीत; तुम्ही जनतेला विकासाची, पैशाची कितीही गाजरं दाखवली तरीही! याला निवडणुकीतील महाविजय म्हणत नाहीत. तर सत्तेचा आसुरी माज आणि उन्माद म्हणतात, याने फार तर निवडणुका जिंकता येतील पण जनतेची मने कधीच जिंकता येणार नाहीत. जनतेच्या मनातील तुमच्या पक्षाच्या एकंदर हुकूमशाही वृत्तीची सल मात्र कधीच कमी होणार नाही.
-पोक्या, तू तर मला शहाणपणा शिकवायला लागलास. पण त्याचा माझ्यावर काडीचाही परिणाम होणार नाही, इतका मनाने निगरगट्ट बनलोय मी गेल्या काही वर्षात. आता महापालिका निवडणुकीत पुन्हा कळेलच तुला आमच्या पक्षाची ताकद.
-ते मुळीच शक्य नाही. तुम्ही मुंबईकरांना नीट ओळखत नाही, पण मुंबईकर तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत. आता मनसे आणि असली शिवसेना एकत्र आल्यामुळे तुमच्या पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागलीय हे दिसतंय सार्यांना. मुंबईकरांचा राग आहे गद्दारांवर आणि फोडाफोडी करणार्या तुमच्या पक्षावर. मुंबईकर शंभर टक्के उट्टे काढतीलच तुमच्यावर. प्रशासकाची सत्ता मुंबई पालिकेत आल्यावर गेल्या तीन वर्षांत मुंबईची कोट्यवधींची तिजोरी रिकामी करायला लावली तुमच्या पक्षाने. तुमची अदृश्य सत्ता होतीच महापालिकेचे वाटोळे करायला टपलेली. आज नव्हे तर गेली काही वर्षे मुंबई-ठाण्यातील उखडलेले रस्ते नाही दुरुस्त करता आले तुम्हाला. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन किती जण मेले असतील त्याची मोजदाद करून पाहा. ते शिंदे फिरतायेत ठाण्यावरून ठाण्यात हेलिकॉप्टरने. माणसांचे जीव घेणारा हा तुमचा कसला विकास? भकास करून टाकलंय ठाणे-मुंबई तुम्ही. तुमच्या गलथान कारभारामुळे रोज राज्यात मरताहेत कितीतरी माणसे. गुन्हेगारीला धरबंदच उरलेला नाहीय. वाट लागली सगळ्या कायदा सुव्यवस्थेची. ज्यावेळी मुंबई महापालिकेत अस्सल शिवसेनेबरोबरच्या युतीची सत्ता असताना तुमच्या पक्षाने किती मराठी उपमहापौर दिले मुंबईला, याची यादी जाहीर करा एकदा. सगळे एका विशिष्ट जातीसमूहाचे. पंतप्रधान गुजराती असले म्हणून मराठी माणसाच्या मुंबईत या समाजाला कुरवाळण्याचे किती प्रयत्न करतोय तुमचा पक्ष आणि सरकार. वर मुंबईत मराठी माणसाला सन्मानाने वागवू म्हणता. मुंबईचा मराठी माणूस हे कधीच सहन करणार नाही. तो धडा शिकवणारच. तुमची दिवास्वप्ने उधळणारच!

