– राजेंद्र भामरे
अवैध शस्त्रे वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले होते. शहरभर त्याचे लोण दिवसेंदिवस पसरत चालले होते. पोलीस काहीच करत नाहीत, पोलिसांची गुन्हेगारांवरची पकड ढिली होत चालली आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या, त्यामुळे पोलिसांवर मान खाली घालण्याची वेळ येत होती. ते वर्ष होते सन २०१४… तेव्हा मी पुणे पोलीस क्राइम ब्रँचमध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होतो.
शहरात सुरू असणारे हे गुन्हे थांबवण्यासाठी क्राइम ब्रँचची टीम कंबर कसत होती. शहराच्या विविध भागामध्ये पोलिसांनी खबर्यांचे जाळे घट्ट केले होते. त्यावेळी पुण्यात आठ गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या, त्याच्या सदस्यांना पोलिसांनी उचलून आणले होते, शहरात येणारी ही अवैध शस्त्रे कुठून येत आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. या टोळ्यांमध्ये कार्यरत असणारी मंडळी कुठून पैसे आणतात, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो, या माहितीपासून ते त्यांचा संपर्क कुणाशी होतो, कुणाशी बोलतात, याकडे इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आमचे बारकाईने बारीक लक्ष होते. सर्व सदस्यांना क्राइम ब्रँचला बोलावून त्यांची बारकाईने चौकशी सुरू होती.
माझ्या अंतर्गत असणारी क्राइम ब्रँचची दहाही युनिट्स त्यांचा शोध घेण्यासाठी जिवाचे रान करून जंगजंग पछाडत होते, पण अपेक्षित यश मिळत नव्हते. अधून मधून एखाद दुसरे अग्निशस्त्र जप्त केले जात होते. पण त्याद्वारे घडणारे गुन्हे थांबण्याचे काही नाव नव्हते. त्यामुळे सगळेजण हैराण झाले होते. वरिष्ठांची बोलणी खात होते. आणि एके दिवशी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार (सध्याचे सहायक पोलीस आयुक्त) यांना मध्य प्रदेशातील खबर्याने एक बातमी दिली, आम्ही केलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सशी (सीडीआर) पडताळून पाहता ती बातमी सत्य असल्याची खात्री झाली.
शिवाजीनगर एसटी स्टँडच्या परिसरात मध्य प्रदेशातील बडवानी अमराथी गावातील बेकायदा शस्त्रे पुरवणारा एकजण येणार असून तो नगरमध्ये एका इसमाला शस्त्राची डिलीव्हरी देणार असल्याची खबर मिळाली. त्यानंतर ती गाडी कधी येणार आहे, स्टॅण्डमध्ये कुठे थांबते, आरोपीला कुठे पकडता येईल, याची रेकी करण्यात आली. एके दिवशी क्राइम ब्रँच युनिटची सर्व टीम त्या चंद्रसेनला पकडण्यासाठी बस स्थानकात तयार बसलेली होती. दरम्यान, वाघोलीपासून पोलिसांची एक खासगी गाडी या बसच्या पाठीमागे होती. त्या गाडीत त्याला ओळखणारा खबर्याही बसला होता. तसेच एक खबर्या त्या बसमध्येच बसून मोबाईलवरून इत्यंभूत माहिती पोलिसांना पुरवत होता. शस्त्र पुरवणारा चंद्रसेन चुकून मध्येच बसमधून उतरला तर त्याला पकडता यावे, म्हणून ही खास योजना तयार केली होती. परंतु चंद्रसेनची बस शिवाजीनगर स्थानकात आली.
बसमधील खबर्याने त्याचे वर्णन कळवले होते. त्यामुळे आमच्या रेडिंग टीमने त्याला पकडले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, १६ फायरिंग राऊंड मिळाले, त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तो ज्याला डिलीव्हरी देणार होता त्या नगरच्या इसमालाही आम्ही अटक केली. त्याने नगर आणि पुण्यात विकलेली दहा पिस्तुले आणि त्याच्या गोळ्या जप्त करण्यात आले. त्याने हा सारा माल गोविंदसिंग बर्नाला, रा. अमराथी, जिल्हा बडवानी यांच्याकडून आणला आहे. गोविंद याचा त्याच्या गावी शस्त्र तयार करण्याचा कारखाना आहे, अशी माहिती त्याने आम्हाला दिली होती.
अवैध शस्त्र पकडणे ही कारवाई बर्याचदा वरवरची मलमपट्टी ठरते. पण आम्ही त्याच्या मुळाशी घाव घालण्याचे ठरवले. म्हणून एपीआय जालिंदर तांदळे व क्राइम ब्रँच युनिट-३ची संपूर्ण टीम तपासकामासाठी मध्य प्रदेशात रवाना केली. त्याआधी आमचा खबर्या तिथे जाऊन जागेची रेकी करून आलेला होता. तेथील रस्ते, भोगौलिक परिस्थिती आदीचा नकाशा तयार करून तो तपास टीमबरोबर दिला होता. टीम तिथे गेली, स्थानिक पोलिसांच्या मदतीने उमराथी येथे त्या कारखान्यावर छापा टाकून गोविंदसिंग याला अटक केली. त्या ठिकाणी सात पिस्टल, २६ राऊंड मिळाले. हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. या ठिकाणी सापडलेल्या साहित्यांत सायकलच्या प्रâेमच्या नळ्या होत्या, त्यापासून सिंगल नळीचा कट्टा तयार करतात, त्यामधून १२ बोअरचे काडतूस उडवले जाते. या काडतुसात शिशाचे अनेक गोळे असतात. त्यामुळे ते उडून एकाच वेळी अनेकजण जखमी होऊ शकतात, त्यासाठी नेम धरण्याची गरज नसते. त्यामुळे त्याला सर्वाधिक घातक समजले जाते. त्याच्याकडे आठ बारी पिस्तूल तयार करण्याचे साहित्य मिळाले. त्याला अटक करून पुण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा, त्याने पुणे आणि नगरमध्ये विक्री केलेल्या शस्त्रांच्या साह्याने सहा गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये तीन गुन्हे हे खुनाचे तर तीन गुन्हे हे अटेम्प्ट टु मर्डरचे होते.
अशा रीतीने मुळावर घाव घालून शस्त्र तयार करणारा हा कारखाना उद्ध्वस्त केल्यामुळे पुण्यामध्ये येणारी अवैध शस्त्र येण्याचे पूर्णपणे थांबले होते. आता ही शस्त्रे मध्य प्रदेशातच का बनतात, याचा उहापोह करूया.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४७च्या पूर्वी मध्य प्रदेशात अनेक संस्थाने होती. उदा. इंदोर, ग्वालेहर, देवास, धार, इत्यादी. या संस्थानिकांच्या पदरी त्यांचे सैन्य असे. सैन्यासाठी लागणारी शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले, धनुष्यबाण, ठासणीच्या बंदुका हे तयार करण्याचे काम तेथील स्थानिक शिकलगार मंडळी करत असत. वर्षाचे १२ महिने ते काम करून त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्यावेळी ब्रिटिशांच्या लक्षात आले की इथल्या प्रत्येकाच्या घरात शस्त्रे आहेत, ती काढून घेतली तर पुन्हा सशस्त्र उठाव होण्याची शक्यता राहणार नाही. यासाठी त्यांनी १८७८मध्ये भारतीय शस्त्रास्त्र कायदा लागू केला, त्याच्या तरतुदीनुसार सरकारच्या परवान्याशिवाय शस्त्र, अस्त्र, हे तयार करता येत नव्हते आणि बाळगता येणार नव्हते. त्यामुळे या शिकलगार मंडळींचे शस्त्र बनवण्याचे काम पूर्णपणे बंद पडले. त्यांचा रोजगार बुडाला. त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे नाईलाजाने ज्या कामात ते वाकबगार होते, ते काम म्हणजे शस्त्र बनवण्याचे काम त्यांनी अवैधरित्या चालूच ठेवले होते. त्यावर ते उपजीविका करत होते. सध्या त्यांच्यातील काहीजण अवैध शस्त्रांच्या धंद्यात आहेत. कोणत्याही विदेशी शस्त्राला टक्कर देऊ शकतील, अशी शस्त्रे बनवण्याची कला खरंतर त्यांच्यामध्ये आहे. वास्तविक, सरकारने त्याचे हे गुण हेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे होते. पण, तसे आजपर्यंत झालेले दिसत नाही.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)