□ चीनला जाण्यासाठी मोदी बॅगा भरत असतानाच ट्रम्प यांनी भारतावर लादला ५० टक्के कर.
■ सापनाथाचा फणा चुकवायला नागनाथाशी दोस्ती करून उपयोग काय? भाबडेपणाने हिंदी चिनी भाई भाईची घोषणा देणार्या नेहरूंची आयुष्यभर निर्भर्त्सना करून शेवटी त्याच वाटेने जाण्याची वेळ आली?
□ फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये वॉर; बेस्ट महाव्यवस्थापक पदावर दोघांनीही केल्या परस्पर नेमणुका.
■ त्यातली फायनल कोणती राहिली? म्हणजे बॉस कोण आहे, ते दुसर्याने समजून जावे आणि दिल्लीतले उंबरे आणखी झिजवावे.
□ मतचोरीच्या पुराव्यांचा सात फुटांचा ढीग दाखवला; राहुल गांधी यांनी बॉम्ब फोडला.
■ निवडणूक आयोगाची वेबसाइटच आता चालेनाशी झाली. आणि महाराष्ट्रातले कोणी सुसंस्कृत पुढारी, गरज नसताना, आपली नोकरी नसताना निवडणूक आयोगाची प्रवक्तेगिरी करताना राहुल यांच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे, अशी सभ्य शालीन टीका करत होते.
□ बिहारमध्ये वगळलेले ६५ लाख मतदार कोण? – सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागवले स्पष्टीकरण.
■ तेच जे भाजपला मतदान करणार नाहीत, अशी भाजपला शंका आहे, असं याचं खरं उत्तर आहे. पण मालकांची गुपितं त्यांचा घरगडी फोडू शकतो का?
□ न्यायालयाचा आदेश धुडकावत जैन समाज झाला आक्रमक; बंदी मोडून पोलिसांसमोरच कबुतरांना दाणे घातले.
■ कबुतरखान्यासमोरच्या देरासरच्या खिडक्यांवर मात्र कबुतररोधक जाळ्या? म्हणजे आम्ही कबुतरांपासून सुरक्षित राहणार, त्यांना दाणे टाकण्याचं पुण्य कमावणार, बाकी जबाबदारी आणि त्रास शहराने आणि इतरधर्मीयांनी निमूटपणे भोगावे. धर्म रस्त्यावर आणणारी राज्यव्यवस्था नंतर देश रस्त्यावर आणते. तेच इथे होणार आहे.
□ कबुतरांना दाणापाणी घालण्यास उच्च न्यायालयाची तूर्त बंदीच.
■ बंदी कायमचीच असली पाहिजे. जे काही प्राणीप्रेम, पक्षीप्रेम दाखवायचं असेल, ते आपल्या घरात दाखवा, पाळा पाचदहा कबुतरं. काढा त्यांची घाण. कबुतरांना मुळात या सवयी लावून बिघडवता कशाला? ती आपलं अन्न शोधू शकतात.
□ महायुती सरकारचे आर्थिक व्यवहार आता खाजगी बँकांमधून होणार- अमृता फडणवीस यांची अॅक्सिस बँक यादीत प्रथम.
■ अजून अदानी काकांनी बँक काढलेली नाही, म्हणून या चिरकुट बँकांचा फायदा होतोय. एकदा त्यांची बँक येऊ द्या, भारत सरकारचं अकाऊंटच त्या बँकेत जाईलष्ठ आता पण तिकडेच आहे, पण ऑफिशियली जाईल ना मग?
□ भाजप प्रवक्ता आरती साठे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती रद्द करा – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची मागणी.
■ जिथे न्यायमूर्ती पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात तिथे प्रवक्ते न्यायाधीश झाले तर हरकत काय? नाहीतरी न्यायालयाच्या निकालांची अंमलबजावणी करायची की नाही, केली तर कशी करायची, हे कोण ठरवतं?
□ १५,९८,००० नोकर्या गेल्या कुठे? – जयंत पाटलांचा सवाल.
■ अहो जयंतराव, आमचे १५ लाख रुपये तर २०१४पासून थकीत आहेत, आता व्याज धरून किती झाले असतील? ते आले की नोकर्यांची गरज काय?
□ गणेशोत्सव तोंडावर आला, कार्यकर्ते वेटिंगवर; ठाण्यात ८८ गणेश मंडळांच्या मंडप परवानगीचे अर्ज महापालिकेच्या टेबलावर पडून.
■ जिथे टेबलावर वजन ठेवलंच जाण्याची सोय नसते, तिथे अर्ज उडून जातात किंवा रेंगाळतात. एखाद्या बिल्डरमार्फत पाठवून बघा.
□ या आमदाराने आम्हाला फसवले – मिंध्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अजित पवार गट आणि भाजप आक्रमक.
■ एक दुसर्याला फसवतो, दुसरा तिसर्याला फसवतो, तिसरा पहिल्याला फसवतो आणि सगळे मिळून जनतेला, मतदारांना फसवतात. बनावट निवडणुकीतून बेकायदा निवडून आलेले सगळे लोकशाहीला फसवतात.
□ अमेरिकेने टेन्शन वाढवले असतानाच डोवाल आणि पुतीन यांचे ‘शेकहँड’.
■ मुळात पुतीनशी बोलायला डोवाल कशाला? त्यांचं पद काय? ते काम काय करतात? हे ज्यांचं काम आहे ते जयशंकर कुठे आहेत? डोवाल महोदयांना आधी आपलं काम सांभाळता आलेलं नाही. अर्थात, ते यांच्याकडे कुणाला जमलं आहे म्हणा!
□ दंड ठोठावाल तर आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकेन – शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची अधिकार्याला धमकी.
■ कायद्याचं राज्य ठेवूच नका कुठेही.
□ गुंडगिरी करू नका, कायद्याच्या चौकटीत राहा – सुप्रीम कोर्टाचे ईडीवर कठोर शब्दात आसूड.
■ ईडीच्या जागेवर एखादा माणूस असता तर त्याला काही लाज असली असती आणि निव्वळ हे सततचे ताशेरे ऐकून ऐकूनच त्याने आत्महत्या केली असती. पण, निगरगट्टपणा अंगी बाणवल्याशिवाय हुकूमशहांची चाकरी करता येत नाही.
□ मिंधे गटाच्या आमश्या पाडवींनी पत्नी व मुलाच्या नावे घेतले सरकारी घरकुल- भाजपच्या आरोपामुळे मिंधे टेन्शनमध्ये.
■ यांनी त्यांची लफडी बाहेर काढायची, मग त्यांनी यांची कुलंगडी बाहेर काढायची आणि आपण डोक्यावर हात मारून घ्यायचा, ही माणसं आहेत की भस्म्या रोग झालेले राक्षस?
□ अजितदादा घेणार ऊसतोड महामंडळाचा ताबा; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांना धक्का.
■ काय आपापसात धक्के देत बसलेत सगळ्या राज्याला धक्क्याला लावून!