पावसाळा म्हणजे निसर्गाचं नवं रूप, नवसंजीवनी आणि सृष्टीला पुन्हा बहरण्याची एक सुवर्णसंधी. हिरवाईने नटलेली सह्याद्रीची रांग, दर्याखोर्यात गुंजणारे धबधबे, चिंब भिजलेली झाडं आणि त्यावरून निथळणारे पाणी… अशा निसर्गाच्या कुशीत काही खास पाहुण्यांचं आगमन होतं, ते म्हणजे पावसाळी पक्षी!
पावसाच्या आगमनाने केवळ माती सुगंधित होत नाही, तर आकाशही पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून जातं. ही पावसाळी पाहुणेमंडळी काही आठवड्यांसाठी आपल्याकडे येतात, प्रजनन करतात आणि निसर्गाच्या अद्भुत चक्रात आपला सहभाग नोंदवून जातात. त्यांच्या रंगीबेरंगी पिसांमध्ये, विशिष्ट हाकेच्या सुरात आणि अनोख्या वागण्यात निसर्गाचं गूढ सामावलेलं असतं.
ठाणे शहराला निसर्गाचे वरदान मिळाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, २७ किमीचा खाडी किनारा यासोबतच तलावांची मांदियाळी या ठिकाणी बघायला मिळते. मात्र वाढते नागरीकरण या निसर्गाला कुठे तरी बाधा पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे कधी काळी जवळ दिसणारे पक्षीदेखील डोळ्यांच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. मात्र असतानाही काही खास पक्षी पावसाळ्यात दूरवरचा प्रवास करून शहराच्या आसपास आलेले बघायला मिळतात.
१. पावसाळ्यात येणार्या खास पक्ष्यांमध्ये कायमच आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतो तो वामन खंड्या अथवा तिबोटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher/Black Backed Dwarf King Fisher).
वामन खंड्या म्हणजे पक्षीविश्वातील एक बहारदार रत्न. अत्यंत लहान अगदी चिमणीच्या एवढा एखाद्याच्या हाताच्या तळव्याएवढ्या आकाराचा, पण सौंदर्याने भरलेला. याला ‘ज्वेल ऑफ द वुड्स’ असेही म्हटले जाते. निसर्गाने त्याच्या अंगावर सप्तरंगांची उधळण केलेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तो केरळ, श्रीलंका येथून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्रीच्या पर्वतरांगा नदी ओढे अशा पाणथळ जागांमध्ये स्थलांतर करतो. काहीशी लालसर चोच, निळसर पाठ, पिवळसर पोट आणि कानाजवळ निळा पट्टा असलेला हा दिसायला देखणा आहे.
याचा विणीचा हंगाम देखील पावसाळ्यात असतो. त्यामुळे काही वेळा गमतीने बोलले जाते ‘येताना दोघे मात्र जाताना तिघे…’ याची मादी पावसाळ्यात नदीकाठी मातीमध्ये सुमारे एक फूट खोल बीळ खणते आणि तीन ते सात अंडी घालतो. १७-१८ दिवसात पिल्लं बाहेर येतात. खाण्यासाठी छोटे मासे, बेडूक, किडे, पाल, कोळी, खेकडे हे त्याचे मुख्य खाद्यपदार्थ. हा पक्षी अत्यंत चपळ, आणि क्वचितच दिसणारा, त्यामुळे त्याचे फोटो टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची झुंबड उडते, अशी माहिती पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली.
२. हिमालयाच्या उपत्यकांतून दक्षिण भारतात स्थलांतर करणारा चातक हा छोटा पक्षी. पियू-पियू नावानेही ओळखला जातो. त्याच्या विशेष वर्तनामुळे तो लोककथांमध्ये आणि काव्यांमध्ये पावसाची चाहूल देणारा शुभदूत मानला जातो. हा पक्षी आफ्रिका खंड किंवा मुंबई ठाणे परिसरात येतो. खाडीकिनारी, गवताळ भागात, जंगलात याचे वास्तव्य असून स्वतःचे घरटे तो कधीच बांधत नाही, इतर पक्षांच्या विणीच्या हंगामात म्हणजे पावसाळ्यात दुसर्या पक्षांच्या घरट्यात अंडी देतो. किडे, छोटे सरीसृप हे त्याचे आवडते खाद्य आहे. काळा-पांढरा रंग, डोक्यावर मोहक तुरा आणि पंखांवर पांढरे डाग त्यामुळे अतिशय देखणा दिसतो. चातक दिसला म्हणजे पाऊस दूर नाही, लवकरच पडणार हे संकेत मिळतात.
३. पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गात नवे रंग खुलू लागतात. अशावेळी काही दुर्मिळ पक्ष्यांचं दर्शन हे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच असते. अशाच पक्ष्यांमध्ये ठळक नाव आहे, केमकुकडी (Watercock) या लाजाळू, पण उठून दिसणार्या पाणथळ पाहुण्याचं. हा पक्षी सामान्यपणे फारसा उघड्यावर दिसत नाही. तो दाट गवताआड राहणारा असून फक्त सकाळी व संध्याकाळी विशिष्ट आवाजात ओरडत असतो. त्यामुळे त्याचं अस्तित्व बहुतेक वेळा त्याच्या आवाजावरूनच लक्षात येतं.
केमकुकडीचा रंग पिंगट तपकिरी असून शेपटीखालचा भाग पिवळसर असतो. त्याचे हिरवट पाय आणि तांबडी चोच लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे कपाळावर त्रिकोणी लालसर तुरा असतो, जो त्याला इतर पक्ष्यांपेक्षा वेगळं रूप देतो. भारतात विशेषतः पावसाळ्यात, हिमालयाच्या पायथ्यापासून कोकण, विदर्भ आणि दक्षिण भारत व श्रीलंकेपर्यंत तो आढळतो. पण पावसाळ्यात विणीच्या हंगामात हमखास दृष्टीस पडतो. त्याचे आवडते खाणे लहान मासे, जलकिडे आणि गवतबी.
स्वागत करू या पक्षीगणांचे!
पावसाळा हा केवळ सरसर सरींचा ऋतू नाही, तो जीवनाचा उत्सव आहे. आणि त्या उत्सवात हे पावसाळी पक्षी आपल्या अस्तित्वाने रंग भरतात. त्यांच्या दर्शनाने निसर्गाचं संगीत अधिकच मधुर वाटतं आणि माणूस म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीवही होते. ती असते निसर्गाचं आणि जैवविविधतेचं जतन करण्याची… या वर्षी पावसाच्या सरींसोबत या निसर्गातील पाहुण्यांचे स्वागत करा… कदाचित त्यांच्या गाण्यात तुम्हालाही नवा सूर मिळेल.
– वीरेंद्र घरत (पक्षी अभ्यासक, ठाणे)