आचार्य अत्रे यांचे विश्वविक्रमी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक म्हणजे थेट कोर्टात घडणारं नाट्य होतं. महाराष्ट्राला चक्रावून सोडणार्या ‘माधव काझी या माणसाने अनेक भूमिका बदलून तरुणींशी लग्ने केली’ या वनलाइनवरलं हे सत्यघटनेवरलं नाट्य, जे फिरत्या रंगमंचामुळेही वळणे देणारं ठरलं. १९६२ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने नाबाद प्रयोगांची पताका फडकविली. त्यातला बनेल, बहुरुपी, खलनायक लखोबा हा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी तुफान गाजविला. ‘खलनायक’ रसिकांचा लाडका ‘महानायक’ ठरला.
मराठीत कोर्ट ड्रामांची परंपरा आहे. नानावटी खून खटल्याच्या आधारे नाटककार मधुसूदन कालेलकर यांचे १९६४च्या सुमारास ‘अपराध मीच केला’ हे नाटक रंगभूमीवर प्रगटले. ते न्यायालयातच घडते. यातील कमांडर अशोक वर्टी ही मध्यवर्ती भूमिका मूळ प्रयोगात अरुण सरनाईक यांनी केली होती. ५२ वर्षानंतर म्हणजे २०१६च्या प्रयोगात रमेश भाटकर यांनी ती रुबाबात पेश केली. दोन पिढ्यांनी हे नाटक अनुभवलं.
विजय तेंडुलकर यांचे १९६७ साली रंगभूमीवर आलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक म्हणजे एक काल्पनिक खटला किंवा अभिरूप न्यायालय. भृणहत्येचा आरोप आणि एका स्त्रीची कोंडी, घुसमट सुन्न करून सोडणारी. त्यातील लीला बेणारे ही भूमिका सुलभा देशपांडे यांनी अभिनयातून जिवंत केली. जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक शंभू मित्र यांनी मुंबईत प्रयोग बघितला आणि बंगालीतही त्याचा प्रयोग केला.
राज्य नाट्यस्पर्धेत १९६७ साली उदय कला केंद्रातर्पेâ रत्नाकर मतकरी यांचे ‘निखारे’ हे नाटक वेगळ्या आकृतिबंधांमुळे चर्चेत आले. नाट्याचे कूळ-मूळ हे परकीय. नाटककार रेजिनॉल्ड रोज यांच्या ‘ट्वेल्व्ह अँग्री मॅन’ यावर बेतलेले. त्यावर ‘एक रुका हुवा फैसला’ हा चित्रपटही आला. जन्मदात्या वडिलांच्या खुनाचा आरोप असणार्या गुन्हेगारावरलं कथानक. चक्क ‘ज्युरी रूम’मध्ये नाटक घडते. त्यातून मानवी स्वभावांचे अनेक कंगोरे नजरेत येतात. स्पर्धेतल्या प्रयोगात रवींद्र दिवेकर, शशिकांत कारेकर, सदानंद दाते यांच्या भूमिका होत्या. पुढे अनेकदा हे नाटक स्पर्धेत सादर झाले.
आजवर किमान डझनभर ‘कोर्ट ड्रामा’ मराठी व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीवर आले आहेत. न्यायालय हा लोकशाहीचा कणा. त्यातील वाद-विवाद, साक्षी-पुरावे तसेच एकूणच कार्यपद्धती याला महत्त्व असते. बर्याच दिवसांनंतर नाटककार राजन मोहाडीकर लिखित आणि ‘सबकुछ’ पुरुषोतम बेर्डे यांचे नवे कोरे ‘गंगा यमुना सरस्वती’ हा कोर्टरूम ड्रामा यंदाच्या वर्षात रंगभूमीवर आलाय. त्यात अॅड. कावेरी आंबेगांवकर ही रसिका वेंगुर्लेकर हिने केलेली भूमिका म्हणजे बहुरूपी भूमिकांचा देखणा आविष्कारच आहे!
पडदा उघडतो आणि हुबेहूब कोर्ट नजरेत भरतं. बारकाव्यांसह सारी रचना केलेली. कोर्टाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी तिघे कुटुंबीय इथे जमलेत. त्यांना न्याय हवाय. या तिघांची अशी फसवणूक की त्यामुळे त्यांचं जगणं मुश्कील झालय. जबरदस्त आर्थिक फटका बसलाय. या तिघा फिर्यादींची आरोपी एकमेव आहे… या कोर्टातील वकील अॅड. कावेरी आंबेगांवकर! ती स्वत:च स्वत:ची बाजू मांडणार आहे. अॅड. एरंडे हे टिपिकल वकील फिर्यादींची बाजू मांडण्यास उभे आहेत. यातून तीन कथानकांचे उत्कंठावर्धक दर्शन घडते.
पहिली गोष्ट. नाना देवस्थळींची. वयोवृद्ध दांपत्य. त्यांची पत्नी आजारी. नानांना एकट्याने सांभाळणे कठीण बनलेले. तिची देखभाल करण्यासाठी त्यांना एका मदतनीसची गरज आहे. अखेर गंगा नावाची एक कामवाली नेमण्यात येते. काही दिवसातच ‘गंगा’ घरातलीच एक सदस्य बनते. या श्रद्धाळू दांपत्याच्या घरातला देव्हारा चक्क सोन्याचा आहे. घरात दागदागिनेही बरेच आहेत. एके दिवशी गंगा हे सारं काही गोळा करून फरार होते. तिने विश्वासघात केल्याने देवस्थळी कुटुंब हादरून जाते. नाटकी गंगेची सेवा ही निव्वळ ‘मेवा’ खाण्यासाठी होते हेच उघड होते.
दुसरे प्रकरण जनार्दन स्वामी यांच्या कुटुंबाचे. या मद्रासी दांपत्याला वैजयंती नावाची तरुण कन्या आहे. हिंदी सिनेमाच्या चंदेरी-रुपेरी दुनियेचं तिला वेड. चित्रपटात काम मिळवण्यासाठी तिला नृत्याचं प्रशिक्षण हवंय. त्यांच्या घरातच नृत्यांगना यमुनादेवीला निमंत्रित करण्यात येते. नृत्यकलेत नंबर वन असलेली ही यमुना या घरात ‘घरोंदा’ करते. विश्वास संपादन करते. एके दिवशी वीस लाख रुपये हाती मिळताच ही स्वार्थी नृत्यशिक्षिका यमुनादेवी गायब होते. मुलीचं करिअर आणि पैशांची फसवणूक यामुळे हे कुटुंब संकटात सापडलंय.
तिसरी गोष्ट रणजीत देशमुख यांची. अस्सल कोल्हापुरी बाजाचे राजकारणी. त्यांची मुलगी नेहा देशमुख. तिला गाण्याचं वेड. त्यासाठी शिकवणी. चॅनलवरल्या गाण्याच्या स्पर्धेत तिला विजेतेपद हवंय. या कुटुंबात सरस्वती ही गानसुंदरी प्रगटते. गाण्याचे धडे देते. पैसा वसूल करते आणि अचानक नेहाला घेऊन पसार होते. सारे हैराण… देशमुख घराणं गोंधळलेलं. त्यांनाही न्याय हवाय. सरस्वतीच्या कारस्थानाला हे बळी पडलेत.
कोर्टात न्याय मिळेल या आशेवर तिघे कुटुंबीय आले आहेत. त्यांच्यासमक्ष खटला नाट्यपूर्ण वळण घेत कळसापर्यंत पोहचतो. सत्य-असत्य यातील सीमारेषा अंधुक होतात. आता या तिन्ही गोष्टींमध्ये प्रमुख आरोपी आहे ती म्हणजे अॅड. कावेरी. स्वत:ची बाजू वकील म्हणून ती मांडते आणि काहीवेळा विरोधी पक्षकारांची बोबडीच वळते. शब्दांचे खेळ आणि संवादातली हुकमत यामुळे उलटतपासणीत बाजी मारते. शेवटचा निर्णायक क्षण निकालाचा. तो या कथानकाला, त्यातील नाट्याला एका उंचीवर घेऊन जातो.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घरोघरी पोहचली आहे. या कार्यक्रमाने अनेक नव्या पिढीचे कसदार विनोदवीर रसिकांना दिलेत. महिलाही त्यात आघाडीवर आहेत. बरेच जत्रेकरी आज रंगभूमीवर चमकत आहेत. ‘टायमिंगची अचूक समज’ ही या सार्यांची जमेची बाजू. त्यातील रसिका वेंगुर्लेकर हिने या नाटकातली अॅड. कावेरीची मध्यवर्ती भूमिका केलीय. चार भूमिकांचे आव्हान तिने पेलले आहे. प्रत्येकातील वेगळेपण देहबोलीतून प्रकाशात येते. विनोदी भूमिकेभोवती मर्यादित न राहता ‘हट के’ धाटणीच्या भूमिका रंगविण्यात रसिका यशस्वी झालीय. हे नाटक तिच्या वाटचालीतील एक मैलाचं निशाण ठरेल, यात शंकाच नाही. अॅडव्होकेट म्हणून बेअरिंग चांगलं असून संयमाने आरोप फेटाळण्यातलं कसब नजरेत भरतं. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघींमधला बदल विलक्षणच! चार भूमिकांमधला तोल तिने चांगला सांभाळला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेतलं वैशिष्ट्य हे ‘सही रे सही’ म्हणावं लागेल.
नाटक, चित्रपट, मालिका यामुळे प्रदीर्घ काळ परिचित असलेले ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांचे अनेक वर्षानंतर या नाटकाच्या निमित्ताने न्यायाधीशांच्या भूमिकेत आगमन झालंय. डझनभर कलाकारांचा सहभाग या नाट्यात आहे. पात्र निवड अचूक. घाबरट नाना देवस्थळीच्या भूमिकेत प्रभाकर वर्तक शोभून दिसतात. त्यांची मुलगी होती धनश्री पाटील आणि सतत बडबड करणारी नानी भक्ती शेठ. जनार्दन स्वामींची भूमिका गणेश रेवडेकर यांनी मद्रासी भाषेचा खेळखंडोबा करून मस्त केलीय. वाक्याच्या शेवटी शिव्यांनी हसे वसूल केलेत. वैजयंतीमाला बनलेली ऋतिका चाळके हिनेही चांगली साथ दिलीय. रणजित देशमुख याचा रुबाब दुर्गेश आकेरकर यांनी उभा केलाय. पत्नी कमळाबाई (प्रतिभा वाले) आणि मुलगी नेहा (भक्ती शेठ) याही उत्तम. वकील एरंडे याच्या भूमिकेत सुनील जाधव यांची देहबोली वकील म्हणून फिट्ट आहे. अनेक बारकावे त्यात आहेत. इन्स्पेक्टर बनलेले संदेश आयरे यांचीही हजेरी यात आहे. एकूणच डझनभर कलाकारांची ‘टीम’ उत्तम.
‘टुरटूर’पासून व्यावसायिकवर ‘रंगटूर’ सुपरफास्ट गतीने नेणारे ज्येष्ठ रंगधर्मी पुरुषोत्तम बेर्डे हे एक सर्वार्थाने गतिमान रंगकर्मी आहेत. ‘सबकुछ पुरु’चे बिरुद घेऊन रसिकांना दर्जेदार निर्मिती देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात ‘अमेरिकन अल्बम’ ही राजन मोहाडीकर यांची संहिता त्यांनीच सजविली तर ‘मुक्काम पोस्ट आडगांव’ हा गावरान ठसकाही त्यांनी दिलाय. शैलीप्रधान आविष्कारांमध्ये त्यांची हातोटी आहे. याही संहितेवर त्यांनी बरेच परिश्रम घेतल्याचे दिसते. जाहिरातींपासून ते प्रयोगापर्यंत ‘सबकुछ’ वन मॅन शोचा बहारदार खेळच जणू! कोर्टाचा भास असणारी नेपथ्यरचना, फिरत्या रंगमंचाऐवजी थेट प्रसंगातून फ्लॅशबॅक, पात्रनिवडीत अचूकता आणि नेमकेपणा, वेशभूषा, रंगभूषा यातून भूमिकेला न्याय, अशी चौरंगी वेगवान भूमिका त्यांनी पडद्यामागे पार पाडली आहे.
शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना प्रसंगांना उठाव देणारी आहे. रंगसंगतीचाही विचार त्यामागे दिसतो. प्रसंगबदलात अॅड. कावेरीची चपळताही आहे. ‘बॅकस्टेज’ची मंडळी चांगलीच तरबेज आहेत. राजन मोहाडीकर यांचे संवाद खटकेबाज आहेत. कुठेही नाट्य रेंगाळू दिलेले नाही. ‘कोर्ट ड्रामा’ प्रकारात काही संकेत, मर्यादा याचे पालन करावे लागते, ते पुरेपूर केलंय. निर्मितीत कुठेही तडजोड केलेली नाही. नाटकाचे टायटलही लक्षवेधी ठरते.
फसविणारे फसवत असतात. ते वीकपॉईंट शोधत राहातात आणि त्याचाच फायदा उठवतात. हे काहीसं रंजक पद्धतीने मांडून अंजन घालण्याचा प्रयत्न या ‘कोर्ट ड्रामा’त आहे. ‘तो मी नव्हेच’ किंवा ‘अपराध मीच केला’ याप्रमाणे ही जरी सत्यघटना नसली, तरीही अशा घटना आजही जवळपास घडताना दिसतात. अशा बनेल मंडळींना भुलून त्यांच्या षडयंत्राला बळी पडायचे की सावधानता बाळगायची हे ज्याचे त्याने ठरवावे.
गंगा, यमुना, सरस्वती
दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा : पुरुषोत्तम बेर्डे
लेखन : राजन मोहाडीकर
प्रकाश : शीतल तळपदे
निर्माते : लालासाहेब शिंदे / राजेंद्र शिंदे
निर्मिती संस्था : कलाविहार नाट्यमंडळ
सूत्रधार : दीपक जोशी, शशांक कुलकर्णी, नितीन नाईक