• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोमीताईचा सल्ला

- प्रसाद ताम्हनकर

Nitin Phanse by Nitin Phanse
June 27, 2025
in भाष्य
0

सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –

सर्वज्ञानी कसे बनावे…

प्रश्न : ताई, मी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. खूप काही वाचत असतो. इथल्या चर्चा, सल्ले, वाद सगळे अनुभवत असतो. लोक जे काही भरभरून लिहितात, त्यांचे ज्ञान, त्यांचा आवेश हे सगळे बघून मी थक्क होतो. मला देखील खूप काही लिहावेसे वाटते, पण माझ्या अंगात लेखनकला नाही, मला वाद देखील घालता येत नाहीत आणि ज्ञानाची तर बोंब आहे. पण लिखाणाची खुमखुमी काही जात नाही. मी काय करावे?
उत्तर : माझ्या सोनुल्या भावा, सोशल मीडियावर लिखाणासाठी अंगात लेखनकला हवी, वाद घालण्यासाठी धमक हवी आणि सल्ले देण्यासाठी ज्ञान हवे ही अंधश्रद्धा आहे; त्यावर विश्वास ठेवू नकोस. सोशल मीडियाने प्रत्येकाला जर कोणता विश्वास दिला असेल तर तो हाच की आपल्या प्रत्येकात एक लेखक, एक कवी, एक समाजसेवक, एक रांगडा पैलवान, एक हळुवार रसिक, धूर्त राजकारणी, सर्वज्ञानी, ब्रह्मर्षी लपलेला आहे. असा कोणताही विषय नाही ज्यावर आपण सोशल मीडियावर बोलू शकत नाही. ’अझरबैजानचे युद्धातील महत्त्व’ या विषयातले अझरबैजान कुठे आहे हेदेखील आपल्याला माहिती नसते आणि युद्ध कोणते तेदेखील. पण डगमगायचे नाही. सरळ गुगलवर जायचे आणि पटकन मिळेल ते वाचून काढायचे. नाही काही समजले तर सरळ ’ट्रान्सलेट टू मराठी’ करायचे. दहा मिनिटात २० ओळी लिहिण्याचे ज्ञान तुला मिळून जाईल. ’पहिल्यांदाच व्यक्त होण्याचे धाडस करतो आहे’ या सारख्या बावळटपणाने वाक्याची सुरुवात न करता, ’बराच वेळ इथली चर्चा वाचत आहे, पण एका मुद्द्याकडे स्वयंघोषित विचारवंतांचे दुर्लक्ष होत आहे असे वाटते’ अशी सुरुवात करायची आणि मग अझरबैजानची उत्तर सीमा, अझरबैजान आणि युरोपचे संबंध यावर १५ ओळी खरडून टाकायच्या. तू काय लिहिले आहेस हे तुला कळले नाही तरी चालते; कारण समोरच्यालाही ते कळण्याची आवश्यकता वाटत नसते. त्याला फक्त वाद घालायला आणि स्वत:चे ज्ञान दाखवायला नवा भिडू मिळाला यातच आनंद असतो आणि चला आता दोन नव्या खेळाडूंमध्ये वाद बघायला मिळणार याचा इतरांना आनंद असतो.
आता मुद्दा आला वाद घालण्याचा. तर वाद घालण्यासाठी धमक, खुमखुमी या सगळ्याची काही एक आवश्यकता नाही. अंगात फक्त थोडी सहनशीलता हवी आणि चिमटा काढून पळून जायची युक्ती जमायला हवी. एखाद्याने अगदी प्रभावीपणे आपले म्हणजे खोडून काढले, चुका दाखवून दिल्या तरी मागे हटायचे नाही. त्याच्या पन्नास ओळीच्या प्रतिसादावर ’कोण बोलतंय बघा..’, ’तुमचे ज्ञान परवा नेहरूंच्या पोष्टवरच लक्षात आले’, ’मेंदूला विश्रांती दिली असेल तर आता बोटांना पण थोडी विश्रांती द्या’, ’मी मूर्खांशी वाद घालत नाही’ असल्या एकोळी फेकून मारायच्या आणि मजा बघत बसायचे. त्याच्या प्रतिसादाला नाही, पण तुमच्या असल्या बिनडोकपणाला पन्नास लाईक नक्की येतात. दहा बारा लोक खिदळूनही जातात. जा तर मग आता लाग तयारीला.
– डांबिस सोमी

आपल्या अंगणात आपलेच नियम!

प्रश्न : सोमी, मी एका पेजचा अ‍ॅडमिन आहे. मी पेजला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी दिवसरात्र राबतो आहे. हे पेज आज जागतिक दर्जाचे बनले असते, पण जुन्या अ‍ॅडमिन लोकांनी त्याची वाट लावली. सदस्यांना फसवले, धाकात ठेवले, भुलवले. मी आता अत्यंत उत्तम आणि पारदर्शक कारभार करतो आहे, पण या विरोधकांचे करायचे काय? प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात, प्रत्येक लेखनावर अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात, प्रत्येक कृतीवर संशय घेतात. या लोकांना आवर घालायचा कसा?
उत्तर : हे बंधो, सुदृढ लोकशाहीसाठी विरोधक महत्त्वाचे असतात हे कायम लक्षात ठेव. अर्थात हे जरी खरे असले तरी सत्ता तुझ्याकडे आहे ना? मग लोकशाही म्हणजे काय, तिची व्याख्या काय आणि विरोधक कोण होणार हे आपण ठरवायचे असते हेदेखील कायम लक्षात ठेव. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ससा कायम तुझ्या हातात कसा राहील त्याची काळजी घे. विरोधक काय बोंबा मारणारच. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करायचे. आपल्याला काही ऐकायला येतच नाही असे दाखवायचे. विरोध फारच वाढला तर विरोधक पेजद्रोही आणि दुसर्‍या पेजच्या अ‍ॅडमिनला मिळालेले आहेत, असे पसरवायला सुरुवात करायची. विरोधकांच्या पोस्ट सरळ डिलीट करून टाकायच्या किंवा त्यावर कोणाला टिपण्या करता येणार नाही असे सेटिंग करून टाकायचे. आपण आणि आपले साथीदार जास्तीत जास्त पोस्ट टाकून विरोधकांच्या पोस्ट पेजच्या तळाला कशा जातील त्याची काळजी घ्यायची. दहा बारा लोकांचा जमाव जमवून अशा पोस्टवर तुटून पडायचे. वैयक्तिक टीका करायच्या, धमक्या दिल्या तर अजून उत्तम.
तू काही २४ तास या सगळ्यावर लक्ष ठेवू शकणार नाहीस. त्यासाठी मग पेज निरीक्षक, पेज समीक्षक, पेज संरक्षक असली बिनपगारी आणि फुल अधिकारी पदे तयार कर आणि आपल्या बगलबच्च्यांना वाटून टाक. तुझ्यावरच्या टीकेला ते तुझ्यापेक्षा जास्त जहरी प्रत्युत्तर द्यायला लागतील आणि पाहुण्यांच्या काठीने साप मारायची कला तुला आत्मसात व्हायला लागेल. जोडीला विरोधकांच्या खाजगी आयुष्यात न घडलेल्या घटनाही कशा घडल्या आहेत या कानगोष्टी करायची सोय करता आली तर बघ. पेजचा एकमेव रक्षक, कर्ता करविता, पेजचा विकास करणारा, पेजला जागतिक सोशल मीडियावर टॉपला नेणारा आणि पेजच्या प्रत्येक सदस्याचे आयुष्य घडविणारा तू आणि फक्त तूच आहेस आणि असणार आहेस हे सतत त्यांच्या मनावर ठसवायला विसरू नकोस. तुला विरोध म्हणजे पेजच्या एकतेला आणि समृद्धीला विरोध हा विचार सर्वत्र कसा पसरेल ह्याची काळजी घे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतके करूनही विरोधक हतप्रभ होत नाहीत असे वाटले तर नवे विरोधक तयार कर. तुझ्याच माणसांना तुझ्याविरुद्ध उभे कर. काही आतून विरोध करतील आणि काही बाहेरून. त्यांनी काय विरोध करायचा आणि कसा करायचा हे मात्र तू ठरव. त्यांना दर आठवड्यासाठी एक नवा अजेंडा देत चल. या विरोधकांचा मात्र सन्मान कर, त्यांच्या विरोधाची तत्परतेने दखल घे. आधी होते त्यांच्यात काही दम नव्हता, आता विरोध करत आहेत, तेच खरे विरोधक आहेत, धाडसी आहेत असे पेजच्या प्रत्येक सदस्याला वाटेल असे वातावरण तयार कर. आपल्या अंगणात आपलेच नियम चालले पाहिजेत! बरोबर ना?
– विश्वसोशलगुरू सोमी

आपली गरज काय?

प्रश्न : सोमीताई, तुझ्या नावाने एक पेज चालू करावे असा विचार आहे. जिथे तू लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देशील आणि एकदा का सदस्यसंख्या वाढली की आपण प्रिमियम प्रश्न वगैरे सोयी चालू करू आणि चार पैसेही कमवू. तुझा काय विचार आहे?
उत्तर : माझ्या व्यापारी भाऊराया, हे करण्यासाठी मला तुझी काय गरज आहे?
– उद्योगश्री सोमी

लोकानुनय शीक!

प्रश्न : ताई, मी अनेक विषयांवर अनेक ग्रुप चालू करून पाहिले, पण प्रतिसाद काही मिळत नाही. उलट काही दिवसांत जमलेले चार लोकही दिसेनासे होतात.
उत्तर : खंतावलेल्या दादुस, अरे आयुष्यात असे निराश होऊन कसे चालेल? सोशल मीडिया आणि खरे आयुष्य यातला फरक लक्षात घे. सोशल मीडियावर तुला काय हवे आहे ते महत्त्वाचे नसते तर लोकांना काय हवे आहे ते महत्त्वाचे असते. त्यांना हवे ते देऊ शकलास तर मग तुझ्या ग्रुपच्या लोकप्रियतेला तोड राहणार नाही. लोक सोशल मीडियावर कशासाठी येतात? ते येतात मनोरंजनासाठी आणि इथे चालू असलेले माकडचाळे बघण्यासाठी. आजकाल बरेचसे लोक स्वत: माकडचाळे करायला येतात हा भाग वेगळा. लोकांना ज्ञान द्यायच्या भानगडीत पडू नकोस तर त्यांना करमणूक द्यायचा प्रयत्न कर. मुंबईकर विरुद्ध पुणेकर, पुरणपोळी विरुद्ध ऑम्लेट, पापा की परीयॉं, तेंडुलकर विरुद्ध कोहली अशा आकर्षक नावाचे ग्रुप चालू करून बघ. जमले तर एकच ग्रुप चालू करून त्यात हे विषय सुरू करून दे. सध्या रील्सचा जमाना आहे. लोकं फारफार तर ३० सेकंद एखादी गोष्ट आवडीने बघतात आणि लगेच पुढे स्क्रोल करतात ह्याची जाणीव ठेव.
एकच विषय रोज रोज लोकांना आवडत नाही. त्यांच्या माकडचाळ्यांसाठी रोज नवे मैदान उपलब्ध करून देत चल. बायकांनी गाडी चालवावी का? लोकलच्या टायमिंगवर आयुष्य बांधल्या गेलेल्या मुंबईकरांनी पुण्याला नावे ठेवावीत का? वरणभात खाणार्‍यांनी मटण थाळी हॉटेलवर बोलावे का? भक्त कोण आणि अंधभक्त कोण? अमका तमका कलाकार अर्बन नक्षल असण्याची शक्यता आहे का? प्राचीन भारतात समलैंगिकता होती का? क्रिकेट हा तद्दन फालतू खेळ वाटतो का? आयपीएलवाले किती टॅक्स भरतात? निवृत्तीनंतर कोहली आणि शर्माने काय करावे? कबड्डी आणि हॉकीला सोन्याचे
दिवस कसे येतील? बुद्धिबळावर दाक्षिणात्यांचे वर्चस्व वाढू लागले आहे का? परप्रांतीयांना हाकलल्यास मुंबईतील लोकलची गर्दी आणि रस्त्यावरचे खड्डे कमी होतील का? शेती हा व्यवसाय आहे की काळ्या आईची सेवा? तुम्हाला पालखी सोहळ्याला जावेसे वाटते का? देशातली मंदिरे आता व्यापारी अड्डे बनू लागली आहेत का? हिंदुस्थानच्या अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानची किती हानी होईल? पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करावेत का? रशिया आपला मित्र राहिला आहे का नाही? या निवडणुकीच्या आधी कोणता पक्ष फुटेल? कोण कोणाची साथ देईल आणि कोण कोणाची सोडेल? मेड इन इंडिया उत्पादने खरंच दर्जेदार आहेत का? लाडका भाऊ योजना चालू व्हायला हवी का? बायकोने घरात मोठा पिंप आणला तर जीवाची काळजी कशी घ्यावी, अवकाशयानावर खर्च करावा का सरकारी शाळांची अवस्था सुधारावी, हिंदी राष्ट्रभाषा आहे का? हे असले विषय रोज चर्चेला घ्यावे. बघ.. बघता बघता मी तुला सहा महिन्यांचे विषय देऊन पण टाकले.
एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सोशल मीडियावर येणार्‍या १० मधल्या आठ जणांना ते ब्रह्मर्षी असल्यासारखे वाटत असते. या त्यांच्या गैरसमजाला जमेल तसे खतपाणी घालायचे काम तेवढे जोमाने कर. बाकी जसा काळ पुढे पुढे जाईल तसे तसे तुला काय करायचे ते कळायला लागेल. समजा नाही कळाले तर सोमीताई आहे ना! सांगेन गोष्टी युक्तीच्या चार…
– शकुनी सोमी

Previous Post

करंडकाच्या नामांतराचा तिढा!

Next Post

चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शक : फातिमा बेगम

Next Post

चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शक : फातिमा बेगम

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.