• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

करंडकाच्या नामांतराचा तिढा!

Nitin Phanse by Nitin Phanse
June 27, 2025
in खेळियाड
0

भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिका मैदानावर खेळण्यापूर्वीच नामांतरामुळे ती वादाच्या भोवर्‍यात सापडली. इंग्लंडमधील मालिकेचे असलेले पतौडी करंडक आणि भारतामधील मालिकेचे अँथनी डिमेलो चषक ही नावे बदलून दोन्ही मंडळांनी अँडरसन-तेंडुलकर चषक मालिका असे नामकरण केले. हे नेमके काय प्रकरण आहे?
– – –

अँडरसन-तेंडुलकर भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेला प्रारंभ झाला असला तरी तिच्या नामांतरामुळे निर्माण झालेले वादळ अद्याप शमले नाही. पतौडी करंडक हे आजवरचे नाव बदलले गेल्याने पतौडी यांचे वारसदार कुटुंबीय दुखावले आहेत. दोन्ही देशांमधली मालिका पतौडी करंडक या नावाने व्हावी, यासंदर्भात दिवंगत क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या अभिनेत्री पत्नी शर्मिला टागोर यांनी २०२१ साली आणि पुन्हा २०२४-२५मध्ये आग्रह धरला होता. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांच्यापैकी कुणीही आपल्याशी चर्चा न करता करंडकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे पतौडी कुटुंबाचा अनादर झाल्याचेही शर्मिला यांनी म्हटले आहे.
हे प्रकरण आता फक्त या कुटुंबापुरतेही मर्यादित राहिलेले नाही. पतौडी करंडकाच्या नामांतराच्या वादात माध्यमे आणि समाजमाध्यमांवरही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. नेमेची प्रतिक्रिया देण्यासाठी सज्ज असलेल्या माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही ‘ईसीबी’ आणि ‘बीसीसीआय’वर टीका केली आहे, तर सचिनने गावस्कर यांना ‘‘आधी विषय नीट समजून घ्या आणि मगच टीका करावी,’’ अशी विनंती केली आहे.
ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधील कसोटी मालिका ही अ‍ॅशेस मालिका म्हणून क्रिकेटजगतात गेली सव्वाशेहून अधिक वर्षे ज्ञात आहे, तर भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका १९९६-९७पासून बोर्डर-गावस्कर चषक मालिका म्हणून ओळखली जाते. सुनील गावस्कर आणि अ‍ॅलन बोर्डर या दोन्ही माजी कर्णधारांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले. २०१५पासून भारत आणि दक्षिण आप्रिâका यांच्यातील कसोटी मालिकेला गांधी-मंडेला (महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला) करंडक संबोधण्यात येऊ लागले. याचप्रमाणे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला बेसिल डीऑलिव्हेरिया करंडक मालिका म्हटले जाते. हेच नाव आप्रिâका-इंग्लंड मालिकेलाही दिले गेले आहे. परंतु, भारत-इंग्लंडमधील कसोटी मालिकेत दोन देशांमध्ये दोन स्वतंत्र नावांनी ही मालिका खेळवली जायची. इंग्लंडमधील कसोटी मालिकेचे २००७पासून पतौडी करंडक असे नामकरण करण्यात आले, तर भारतातील मालिका जिंकणार्‍या संघाला अँथनी डि’मेलो चषक प्रदान केला जात असे.
इंग्लंडमधील मालिकेला पतौडी करंडक हे नाव देण्याचे कारण म्हणजे नवाब ऑफ पतौडी सीनियर आणि ज्युनियर यांची क्रिकेटमधील कामगिरी. यापैकी सीनियर म्हणजे इफ्तिखार अली खान पतौडी, ज्यांनी १९३२मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आणि अ‍ॅशेस मालिकेत सिडनीमध्ये शतकी खेळीसुद्धा साकारली. परंतु गाजलेल्या ‘बॉडीलाइन’ मालिकेसंदर्भात त्यांनी इंग्लिश संघ व्यवस्थापनाला धारेवर धरल्याबद्दल इंग्लंडकडून त्यांना वादग्रस्त पद्धतीने संघातून वगळण्यात आले. पुढे १९४६च्या इंग्लंड दौर्‍यात त्यांनी भारताचे कर्णधारपद सांभाळले होते. इफ्तिखार यांचे पुत्र, शर्मिलाचे पती, सैफ-सोहा अली खान यांचे वडील आणि साराचे आजोबा म्हणजे मन्सूर अली खान पतौडी. १९५२मध्ये मन्सूर यांच्या ११व्या वाढदिवशी इफ्तिखार यांचे दिल्लीत पोलो खेळत असताना आकस्मिक निधन झाले. फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातल्या प्रावीण्याबरोबरच मन्सूर हे निष्णात क्षेत्ररक्षकही होते आणि तेच त्याचे सामर्थ्य होते. सीमारेषेवरून त्यांनी फेकलेला थ्रोही थेट यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावायचा. क्षेत्ररक्षणातील या तत्परतेमुळेच त्यांना ‘टायगर’ ही उपाधी मिळाली होती. १९६२मध्ये परदेश दौर्‍यावर संघनायक नरी काँट्रॅक्टर यांना दुखापत झाली आणि नेतृत्वाची धुरा २१ वर्षीय मन्सूर यांच्याकडे सोपवण्यात आली. याच्या एक वर्ष आधी एका अपघातात त्यांना एक डोळा गमवावा लागला; परंतु त्यानंतरही त्यांची कारकीर्द टिकून राहिली. नवाबी मन्सूर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मानसिकतेत आक्रमकता बिंबवली. असे हे पतौडी पितापुत्र म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचे शिलेदार होते.
भारतामधील मालिकेला दिले गेलेले अँथनी डि’मेलो कोण? हा तसा सर्वांनाच पडलेला प्रश्न. परंतु डि’मेलो यांचे कार्य समजून घेतल्यास त्याचे उत्तर मिळू शकेल. १९२८मध्ये डि’मेलो यांनी आरई ग्रँट गोव्हन यांच्या साथीने ‘बीसीसीआय’ची स्थापना केली. गोव्हन हे संघटनेचे पहिले अध्यक्ष, तर डी’मेलो सचिव बनले. पुढे डि’मेलो यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा सांभाळली. मुंबईत भारतीय संघ पहिला अधिकृत कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला, याचे श्रेयही डि’मेलो यांनाच जाते. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या निर्मितीमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता. क्रिकेटच्या पलीकडे हॉकी आणि अ‍ॅथलेटिक्समध्येही त्यांची प्रशासकीय कौशल्ये दिसून आली. पतियाळामधील राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या जडणघडणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. म्हणूनच ‘बीसीसीआय’कडून त्यांच्या नावाने मालिकेच्या विजयी संघाला चषक देण्याची प्रथा ‘ईसीबी’च्याही आधीपासून सुरू होती.
दोन संघांमधील द्वंद्वात्मक कसोटी मालिकेसाठी दोन देशांमध्ये दोन नावे कशासाठी, हे काही माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांना खटकत होते. त्यामुळे पतौडी करंडक याच नावाने ही मालिका दोन्ही देशांत चालू राहिली असती, तर उत्तम झाले असते. पतौडी कुटुंबाच्या क्रिकेटमधील योगदानाचा आदर करावा, हेच शर्मिला यांचे मत होते. परंतु तसे करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आल्या ते अद्याप गुलदस्त्यात आहे. अँडरसन-तेंडुलकर असे करण्यात आलेले नामकरण क्रिकेटरसिकांना पुरेसे रुचलेले नाही. सचिन तेंडुलकर हा अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा भारताचा एकमेवाद्वितीय फलंदाज. तर अँडरसन हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज. क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गजांची नावे वगळून गेल्या दशकभरात निवृत्त झालेल्या तेंडुलकर-अँडरसनची नावे देण्याची घाई दोन्ही मंडळांना का झाली आहे? याच कारणास्तव टीका होत आहे.
पतौडी यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. अशा प्रकारे करंडकाचे नाव बदलणे, हे संवेदनशीलतेचा अभाव दर्शवते, असे भाष्य गावस्कर यांनी केले आहे. करंडकाचे नाव बदलणे हे थोडे विचित्र आहे. पतौडी यांचे नाव क्रिकेटमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत माजी कर्णधार कपिल देव यांनी ताशेरे ओढले. त्यानंतर सचिनने माजी क्रिकेटपटूंना सुनावले. मी स्वत: पुढाकार घेऊन पतौडी कुटुंब, बीसीसीआय, ईसीबी आणि जय शहा यांच्याशी बोललो. पतौडी यांच्या कर्तृत्वाचा आदर करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली. त्यानुसार भारत-इंग्लंड मालिकेतील विजयी संघाच्या कर्णधाराला पतौडी पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सचिनने स्पष्ट केले. काळानुसार बदलायला हवे, असे मत माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त करून दोन्ही मंडळांची पाठराखण केली आहे. परंतु या मालिकेत पतौडी पदक दिले जाणार असल्याबद्दल समाधान प्रकट करायलाही ते विसरलेले नाहीत.
तूर्तास, पतौडी प्रकरणाला वादग्रस्त वळण मिळाल्यानंतर ‘बीसीसीआय’ने त्यावर जालीम औषधही शोधून काढले आहे. अँडरसन-तेंडुलकर करंडक मालिका हे नामांतरण कायम ठेवत पतौडी पदक देण्याची परंपरा इंग्लंडमध्ये सुरू होईल. भारतीय कर्णधार शुभमन गिल किंवा इंग्लिश कप्तान बेन स्टोक्स पतौडी पदकाचा विजेताही होईल. परंतु त्याने हा वाद शमेल? पतौडी कुटुंबाचा आदर या कृत्यातून होऊ शकेल?

[email protected]

Previous Post

वाईच्या नागरिकांनी घडवला रस्ता आराखड्यात बदल!

Next Post

सोमीताईचा सल्ला

Next Post

सोमीताईचा सल्ला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.