पंतोजी आज भल्या पहाटे उठले. तरीही त्यांना अनिवार्य …. (सॉरी हं!)
अनावर झोपेने वेढलंच आहे. ते त्या झोपेला सर्वसाधारण आळसाने झटकून स्नानादी नित्योपचार उरकून आपल्या दिल्लीश्वर पूजेला पितांबर नेसून बसलेत.
तसं आधुनिक समयीच्या पूजा ह्या श्वेतांबर परिधान करून केल्या तरी चालतात. (गुग्गुळवाले तर नुसत्या टॉवेलवर उरकतात म्हणे!) पण नुसत्या दिल्लीश्वराच्या नामोच्चाराने त्या श्वेतांबराचे पितांबर होतेच की हो! त्यामुळे नको ते संकट म्हणून पंतोजींनी सरळ पितांबर नेसण्याचा मार्ग अवलंबिला आहे.
दिवसेंदिवस दिल्लीश्वराच्या पूजा फार खर्चिक आणि खडतर होत चालल्या आहेत. म्हणजे दिल्लीश्वरांना नमन करावं तर त्यांचा भ्राता कम मित्र कम पार्टनर इन क्राइम यांस काही नैवेद्य द्यावाच लागतो. त्यामुळे दुधाची मलई देण्यापरीस दूध डेअरीच्या भूखंडाचे श्रीखंड देणं अधिक सोयीस्कर वाटून ते देऊन बघितलं. आधी भक्ती धरावीच्या नादात अख्खी ध्रावी मित्रवर्यास सुपूर्दे (खाक?) करून बघितली. तपश्चर्येत वरची पातळी गाठण्यासाठी एक लक्ष वैदर्भीय वृक्ष होम करविला. पण अजूनही मित्र तोष पावला नाही.
तेव्हा दिल्लीश्वराची मर्जी राखण्याची चिंता पंतोजींना फार सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी आणखी निकराचे यत्न सुरू केलेत. त्याच अंतर्गत माय मराठी माऊलीच्या रक्ताने अभिषेक करवून हिंदी माऊलीला दरबारी अभिषिक्त पद देण्याची त्यांची योजना आहे. निदान ह्या प्रयासाने तरी दिल्लीपती चरण कमलांत अढळ पद देऊन अमरत्व बहाल करतील नि इंद्रपदाइतकी म्हम्है सुभेदारी सुरक्षित आणि वंशपरंपरागत होईल हा भाबडा आशावाद त्यामागे असावा. एकूणच आशा वाईट.
पंतोजी आरतीचं तबक उचलतात. नित्योपचार समयी कानात अडकवलेलं जानवं काढून बेंबी नावाच्या अश्लील अवयवावर सोडतात. दुसर्या हाताने किणकिण करणारी घंटी हातात धरून अर्वाचीन (चीन? नुसतं चीन नको रे बाबा! ती प्रतिमा झटक्यात अंतर्धान पावायची!) विचारांच्या आधुनिक नरअधमाचा धावा करत पंतोजी मख्खासारखं मंत्र पुटपुटत राहतात. ही मंत्रावली म्हणजे आहे तरी काय? मर्हाटी भूला वाहिलेल्या लाखोल्याच त्या! दिल्लीपती खुश करावयाचा म्हणजे मर्हाटी भू, मर्हाटी प्रजा, मर्हाटी भाषा यांस प्रताडित करावयाचे, मर्हाटी मुलुख खणत्या लावून लुटावयाचा नि दिल्लीपतीच्या मित्रवर्याच्या झोळीत नेऊन घालायचा. हाच तो नित्यपूजाविधीचा भाग!
आज त्या लाखोल्या मनोभावे वदल्या. त्यावर किणकिणाट आसमंतात घुमविला. मर्हाटी भू ओरबाडून जो धूप-दीप बनविला, तो अधमाचार्यच्या तसबिरी पुढे लावून त्याच्या कृपाकटाक्षासाठी डोळे किलकिले करून पंतोजींनी ध्यान लावले. पण किती वेळ? इथे दिल्लीपतीच्या समक्ष इतका वेळ कधी घालविला नाही. त्यांच्या तसबिरीची काय बात? पंतोजी अखेर पूजा उरकून उठतात. नवीन घेतलेला अंगरखा घालून डोईवर काळी टोपी परिधान करतात. (ह्या टोपीखाली दडलंय काय? हे गीत गाणं आता गैरलागू होऊन बसलंय. हा भाग अलाहिदा!)
पंतोजी बाहेर येतात. दिवाणखान्यात जातात. तिथे आसनावर बसलेल्या माय मर्हाटीस लाथ घालून हाकीलतात. दूर उभ्या हिंदी माँसाहिबला मानाचं आसन देववून तिचा गुणगौरव करितात. दरबारी मंडळीस तृतीय स्थानासंबंधीच्या दिल्लीपतीच्या धोरणाचा दाखला देतात. नुसत्या दिल्लीपतीच्या नावाने दरबारी पंतोजींनी केलेल्या कृत्यास समर्थन देतात. (तशीही जन्मदात्यांच्या पाठीत वार करून जमलेली टोळकी! त्यांना आई मरो वा बाप! फरक पडतो काय? दिल्लीपतीच्या शिळोप्याच्या कढीने तहान भागवणारी ही बेणी! माय मर्हाटी धाय मोकलून रडली तरी दुःशासनी वृत्तीची ती मंडळी दात विचकून टाळ्या पिटण्यात धन्यता मानतात.) माय मर्हाटीच्या चीरहरणाच्या नि हिंदीच्या आसनग्रहनाच्या खबरा देशोदेशी धाडल्या जातात.
त्याने व्हावं काय? चारदोन जाणती लोकं त्यामुळे अस्वस्थ झाली. ती महालाकडे येऊन माय मर्हाटीची विचारपूस करू लागली. त्यानं दरबारी मंडळी गांगरून गेली. लोकांच्या संख्येनं आणि त्यांच्या नित्य येण्यानं दरबारी मंडळीं भयग्रस्त झाली. पंतोजींना ही खबर पोहोचताच त्यांनी घाईने माय मर्हाटीस पुन्हा महालात घेतली. किमान दिखाव्यासाठी जुनीच वस्त्र नव्याने देववून तिची ओटी भरवली. (त्यातले खोबरे रात्रीच पंतोजींनी हडप केले होते. लोकांना वरून करवंट्या दिसल्या की होतं. हात लावून कोण बघतं?) त्यांच्या दिखाव्याला न भुलून काही मंडळी माय मर्हाटीच्या तब्येतीच्या चौकशीसाठी दुसर्या दिवशीही अगत्याने महालाकडे येतात. नेमके वाटेत त्यांना पंतोजी दिसतात. घाईने ती मंडळी पंतोजींना गाठून जाब विचारू बघतात. अशी मर्हाटीची लेकरं तत्परतेनं आपल्याकडे येऊन जाब विचारतील याची पंतोजींना खात्री नव्हती. त्यामुळे पंतोजी गडबडून जातात. त्यात ती माय मर्हाटीच्या दुरावस्थेबद्दल पोटतिडकीने भांडू लागतात.
‘हे बघा, दिल्लीपतींच्या आदेशाने हिंदी माँसाहिबांना अनिवार्य तृतीय स्थान द्यायचं ठरलेलं होतं. पण इथे सर्वांची नाराजी बघता तृतीय स्थान रिक्त ठेवण्यात येईल. माय मर्हाटीच्या मानात कुठलीही कमतरता होणार नाही, याची मी ग्वाही देतो.’ निदान पंतोजींच्या ह्या भूमिकेने काही वेळ वातावरण निवळतं. लोकं माघारी फिरतात.
पण पंतोजी हा प्राणीच मुळी अवसानघातकी, पाठीत खंजीर खुपसणारा दगाबाज! टोपी आणि शब्द फिरवणारा फसव्या! जात्याच खोटा, मतलबी भामटा!
लोकं माघारी फिरून घरात येतात कुठे नाही तोच पंतोजी दुसरं फर्मान काढून दवंड्या पिटवतात. तृतीय स्थानी पूजनाचा आणि दरबारी मानाचा आदेश काढतात. लोकं पुन्हा अस्वस्थ होतात दुसर्या दिवशी दफ्तरी विचारू जातात.
हे बघा, तृतीय स्थान हे खरोखरी तृतीय असेल, तिथे वीस अधिक बाळ मुंज्यांच्या संमतीने कोणीही एक माता बसेल. ती कन्नडी असेल वा पंजाबी असेल, वा आसामी असेल. ते ठरवण्याचा अधिकार बालकांस राहील.’ दफ्तरीचा कारकून.
‘बाबा ठरविणार बालक असले तरी तिला मान आमच्याकडून देवविला जाईल ना? पहिली अमृतदायिनी दुसरी ज्ञानवर्धिनी असताना ही तिसरी का मानायची? त्याने साधणार काय आहे?’ एक जाणता वयस्क.
‘हे बघ! निवडायची संधी बालकांना आहे. यात हिंदी माँसाहिबांना कुठेही दरबारी मानाचं अनिवार्य स्थान नसेल. केवळ साधारण सहमतीने वा त्यांपेक्षा अधिकने कुठल्या मातेस पसंती मिळाली नाही तर त्यांना बोलावलं जाईल. इतकंच!’ कारकुनाची चापलुशी.
‘ही त्या पंतोजीची अनिवार्यता आणि अगतिकता आहे. दिल्लीपतीच्या चरणी पडीक असण्याच्या धडपडीतून आलेली. ती आमच्या माथी का मारता?’ दुसरा व्यक्ती. तोच मागून दरबारी चंपेश्वर येतात.
‘हे बघा. इतक्या दिवस माय मर्हाटीला मानाचं लुगडं दिलं. मदर इंग्रजीला मानाप्रमाणे वस्त्र दिलीत. मग हिंदी माँसाहिबा तर दिल्लीपतींची माता! तिचा थोडा सन्मान केल्याने बिघडतं कुठं? तुम्ही सातसमुद्रापारच्या मदर इंग्रजीला विरोध केला का कधी’ चंपेश्वर मध्येच अक्कल पाजळतात.
‘मदर इंग्रजी ज्ञानवर्धिनी, विश्वदर्शिनी आहे. तुमच्या हिंदी माँसाहिबा काय करणार आहेत? चंपेश्वर? बुद्धी तेलात वाहिली का?’ लोकांच्या तिखट बोलण्याने तात्काळ दफ्तर बंद केलं जातं. चंपेश्वर पाय लावून पळ काढतात.
लोकं त्याने अधिक संतापून पंतोजींना शोधू जातात. तो पंतोजी बुरुजावरून टेहळणी करत दिल्लीपतीच्या मित्रवर्यास आणखी कुठले भूखंडाचे श्रीखंड वाटायचे याचे नियोजन करण्यात व्यस्त असतात. लोकांस बघून ते बुरुज उतरतात. त्यांच्या भोवती संतापलेल्या लोकांचा गराडा पडतो.
‘शांत व्हा! शांत व्हा! माय मराठी महालात पहुडल्या आहेत. त्यांच्या निद्रेत व्यत्यय येईल, इतका गोंगाट करू नका. तुमच्या भावना मला कळाल्या. पण माझा नाईलाज आहे. दिल्लीपतींचे फर्मान आले आहे. एक समयी तीन माता दरबारी बसवाव्या म्हणून. त्याची बालकांना सवय होण्यासाठी आधी त्यांचा परिचय त्यांनाच करून देण्यात येईल. बाकी अनिवार्य असं काही नसेल. साधारण सहमती आणि कळण्यातली सुलभता म्हणून केवळ हिंदी…’ पंतोजी त्यांच्याच थाटात काही बोलू बघतात.
‘ही अनिवार्यता आम्हांसही नाही. की माय मर्हाटीचा लेक म्हणून तुम्हास पद भोगू द्यावं. पण सर्वसाधारण गाढवांच्या आणि दगाबाजांच्या मदतीने तुम्ही सत्ता भोगताय. ही दिल्लीपतींच्या केलेल्या खूषमस्करीची पोचपावती असेल. त्यांच्या तळव्यांची सफाई करण्याची किंमत असेल. पण तुम्ही माय मर्हाटीच्या दुधाचे ऋण विसरताय. ही एकच गोष्ट तुम्हांस आमच्या प्रमुख पदावरून हाकलण्यासाठी पुरेशी आहे. अभिजात माय मर्हाटीला मिळालेला तुम्ही डाग आहात. तुमचं कर्तृत्व मातृभाषा, मातृभूमीशी द्रोह करणारं आहे. तेव्हा सर्वसाधारणपणे तुम्हांस ह्या दरबारातून पिटाळून का लावू नये?’ चारदोन दांडकी घेऊन माय मर्हाटीचे पूत पुढे उभे ठाकतात.