नकोशा माणसांना बदनाम करायचं. आरोप ठेवून त्याला दोषी ठरवायचं, तुरुंगात ढकलायचं, फासावर लटकवायचं, लेनिन श्रमिकांची हुकूमशाही म्हणत असत. स्टालिननं श्रमिकांच्या नावावर स्वतःची हुकूमशाही तयार केली.
– – –
कुलक हा रशियन शब्द. मूळ तुर्की शब्दाचं रशियन रूपांतर. मूळ शब्दाचा अर्थ वङ्कामूठ. म्हणजे ताकदवान व्यक्ती. रशियन लोकांनी त्याचा अर्थ लावला होता शोषक जमीनदार. जमीनदार कष्टकर्यांना लुटत असत, त्यांचं शोषण करत असत हे खरं आहे. रशियातला शेतकरी हा गुलामच होता. जमीनदार वेळप्रसंगी सावकारीही करत. त्यामुळं सावकारी करणारा शोषक जमीनदार म्हणजे कुलक. जमीनदार बाजाराशी खेळण्यासाठी काही प्रमाणात काही वेळा धान्याची साठेबाजी करत. पण साठेबाजी शेतकरीही करत होते. काही धान्य ते आपल्या घरात, अंगणात पुरून ठेवत.
आधीच्या भागात आपण पाहिलेलं सरकारी त्रिकूट गावात पोचत असे. त्रिकुटाला असीम अधिकार होते. कोणाला कुलक ठरवायचं आणि कोणाला नाही हे या कमिटीच्या मर्जीवर अवलंबून असे. स्टालिनचं राज्य सुरू होण्याआधी रशियात एक स्वतंत्र न्यायव्यवस्था होती, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्व होतं, जाहीर सुनावणी होत असे, ज्युरी पद्धत होती. न्यायव्यवस्था मोडकीतोडकी होती, पण होती. स्टालिननं ती पूर्ण मोडीत काढली. पक्ष, पक्षाचा नेता सांगेल तसं पोलिस वागत. पोलिसच न्यायाधीश होते.
शेतकरी समोर उभा केला जाई. तो कुलक आहे असं त्रिकूट ठरवे. उभ्या असलेल्या व्हॅनमध्ये त्याला कोंबण्यात येत असे. व्हॅन सायबेरियाकडं रवाना.
तुरुंगवास? गावात तुरुंग कुठं होते? शहरात एखादा तुरुंग असे, पाच पन्नासपेक्षा जास्त कैदी ठेवायची सोय नव्हती. स्टालिननं तुरुंग बांधले.
उदा. आर्कटिक समुद्राच्या काठावर सोलोवकी नावाचं एक गाव होतं. गाव म्हणजे एक भूभाग. या सोलोवकीत गावोगाव अटक केलेले कुलक-शेतकरी हज्जारोंच्या संख्येनं पोहोचवले. फकाट रानावर त्यांना राबवलं आणि कामचलावू घरं बांधून घेतली. घरांच्या भोवती कुंपण बांधून घेतलं. झालं एक गाव तयार. गावतुरुंग. कुंपणाच्या पलिकडं आणखी एक कुंपण. त्यात वस्तू तयार करणारे कारखाने. तुरुंगातल्या लोकांनी तिथं काम करायचं. तुरुंगगावाची क्षमता काही हजार माणसांची. नवनवी माणसं यायची, कुंपण विस्तारायचं, घरांची संख्या वाढायची.
सोलवकी हे एक मॉडेलच तयार झालं होतं. या मॉडेलच्या धर्तीवर सायबेरियातले तुरुंग तयार झाले.
शेतकरी व्हॅनमधून रेलवेत ट्रान्सफर होत. कित्येक दिवसांनी सायबेरियात पोचत. ट्रेन आपल्या गतीनं सरकत असे. ट्रेनमध्ये माणसं कोंबलेली होती, हालचालीलाही जागा नाही इतकी गच्च भरलेली. वाटेत गाडी एखाद्या गावातून पास होत असे, एखाद्या स्टेशनवर थांबत असे. ट्रेनमधले लोक उपाशी असत. खिडकीतून डोकं बाहेर काढून दिसेल त्या माणसाकडं अन्न मागत. स्टेशनवरचे पोलिस त्यांना बंदुकीनं ढुसकून आत ढकलत. सायबेरियात पोचेस्तोवर गाडीतले कित्येक मेलेले असत.
त्रिकूट देहदंडाचा निर्णय देई. शेतकर्याला ओढत गावाबाहेर नेलं जात असे. खांबाला लटकवलं जात असे किंवा गोळ्या घातल्या जात.
हे सर्व उद्योग दिवसाढवळा, गाव गोळा करून केले जावेत असा आदेश होता. त्यामुळं गावाला दहशत बसे, सरकारशी सहकार्य केलं नाही तर आपलं काय होईल ते लोकाना कळत असे.
पेपरात बातम्या छापायला परवानगी नव्हती. काही लोकांनी चोरून फोटो काढले. रशियाबाहेरच्या बातमीदाराना रशियात बातम्या गोळा करायची परवानगी नव्हती. लंडन आणि न्यूयॉर्क टाईम्सचे बातमीदार कसे तरी करून रशियात फिरले. त्यांनी बातमीपत्रं लिहिली, काही फोटो स्मगल केले.
काही गावात शेतकर्यांनी त्रिकुटाला जुमानलं नाही. विरोध केला. विरोध करणार्या जमावाला गोळ्या घालण्यात आल्या. गावभर प्रेतं पसरली. रस्त्यात पोलिसांच्या गाडीला अडथळा होऊ नये यासाठीच काही प्रेतं उचलून गावाबाहेर टाकण्यात आली, नाल्यांत फेकण्यात आली.
स्टालिनला श्वेत समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा एक कालवा करायचा होता. वाहतुकीसाठी. त्या कामासाठी त्याला मजूर हवे होते. त्या ठिकाणी स्टालिननं बेलोमोर या जागी एक श्रम छावणी उघडली. छावणी म्हणजे तुरुंगच.
स्टालिनला औद्योगीकरणासाठी, सरकारी कामं फुकट पार पाडण्यासाठी मजूर हवे होते. युक्रेनमधले १.७ लाख शेतकरी स्टालिननं बेलोमोर श्रम छावणीत पाठवले. खडकाळ जमीन, खडक फोडत फोडत पुढं सरकावं लागे. साधी कुदळ फावडी वापरायची, खडक माती हातानंच बाजूला करायची. काम करताना माणसं जखमी होत. तीन वर्षं काठावर बांधलेल्या तुरुंगगावात राहून लोकांनी कालवा पूर्ण केला. तुरुंगात या लोकांना जेमतेम १३०० कॅलरींचं अन्न मिळत असे. अशा अर्धपोटी अवस्थेत त्यांच्याकडून कामं करवून घेतली. दर वर्षी वीसेक हजार कैदी मरत असत.
हा कालवा म्हणजे एक मूर्खपणाच होता. त्याचा वाहतुकीसाठी उपयोग झालाच नाही.
– – –
सरकारीकरणाच्या मोहिमेत लाखो शेतकरी मेले. लाखो शेतकरी कुलक ठरवून सायबेरियात पाठवले. परिणाम काय? शेती करायला माणसंच नाहीत. शेतातच धान्य नाही म्हटल्यावर वसुलीला तरी धान्य कुठून मिळणार. जप्तीचा अादेश तर पाळलाच पाहिजे. दिसलं ते धान्य त्रिकुटानं गोळा केलं, दिसतील तेवढे शेतकरी मारले किंवा सायबेरियात रवाना केले.
गावात धान्य शिल्लक नाही, दुकानात ब्रेड शिल्लक नाही.
दुष्काळ गडद होत गेला.
युक्रेनमधल्या लोकांनी वर्णनं लिहून ठेवली. ती वर्णनं कित्येक वर्षं पडून होती. नंतर रशियातली परिस्थिती बरी झाल्यावर म्हणजे १९९०नंतर कधी तरी युक्रेनी शेतकर्यांचे वारस गावात गेले तेव्हा त्याना फोटो, वर्णनं मिळाली.
एक शाळकरी मुलगी. शाळेत जाताना तिला वाटेत एक भुकेनं तडफडणारा माणूस दिसला. शाळेतून परतताना तो माणूस रस्त्यावर मरून पडला होता.
गावातलं दुकान. ब्रेडसाठी दुकानासमोर रांग. दुकानात ब्रेड नसे किंवा अगदीच मोजका असे. माणसाचा नंबर येईपर्यंत कधी कधी दोन दिवस लागत. दोन दिवस माणूस रिकाम्या पोटी रांगेत उभा. अपंग, वृद्ध, गरोदर महिला, आजारी. कोणालाही सवलत नाही, रांगेत उभं राहावंच लागे. त्यातले काही रांगेत मरत. टिकला, नंबर आला, तर दुकानदार हाकलून देत असे, नाही तर मारझोड करत असे. कारण? दुकानदार सांगत नसे.
पायात ताकद होती, पोटात अन्न होतं तोवर माणसं गाव सोडून जाऊ शकली असती. ते शक्य नव्हतं. प्रत्येक नागरिकाला एक पासपोर्टसारखी पुस्तिका देण्यात आली होती. त्या पुस्तिकेवर पोलिसांनी शिक्का मारून गावाबाहेर जायची परवानगी दिली असेल, तरच गावाबाहेर जाता येत असे.
माणसं गावातच अडकून पडली.
अन्न नाही. बाळगलेल्या कोंबड्या संपल्या. मग बकर्या संपल्या. मग गायी आणि घोडे संपले. कुत्रे उरले होते. तेही मरतुकडे झाले होते कारण त्यांनाही खायला मिळत नव्हतं. तेही लोकानी मारून खाल्ले. झाडाची पानं ओरबाडून खाल्ली. उंदीर खाल्ले.
लोक म्हणतात की काही ठिकाणी प्रेतंही फाडून त्यांचं मांस लोकानी खाल्लं.
– – –
शेतकरी मेले तरी चालतील, सक्तीनं धान्य वसूल केलंच पाहिजे असा धोरणात्मक निर्णय स्टालिननं घेतला.
असंही म्हणता येईल की शेतकर्यांबद्दल कम्युनिस्ट पक्षाला दुरावा होता, प्रेम नव्हतं. सुमारे १० कोटी लोकसंख्येमध्ये ८० टक्के लोक शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारे होते. कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांत शेतकर्यांना महत्वाचं स्थान नव्हतं.
तो काळ पुस्तकातून वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते की स्टालिन, लेनिन, मार्क्स इत्यादी मंडळींच्या शेती आणि शेतकर्यांबद्दलच्या कल्पना कोरड्या, काहीशा क्रूर होत्या. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यात याचा प्रत्यय येतो. शेतकरी निर्बुद्ध असतात, ते शिकायला तयार नसतात, त्यांचं ज्ञान मर्यादित असतं, जनावरांसारखे ओझं वाहणारे प्राणी असतात, रशियाची पश्चिमी संस्कृतीकडं प्रगती होण्यात रशियन शेतकरी हा अडथळा आहेत, ते स्वार्थी असतात अशा शब्दात गॉर्की, प्लेखानेव इत्यादी मार्क्सिस्ट पुढारी बोलत. स्टालिननं तर शेतकर्यांचा उल्लेख मळ, घाण, अशा शब्दात केला आहे.
शेतकरी हा काही टिकणारा घटक नाही, तो काळाच्या ओघात नष्ट होणार आहे असं मार्क्सवाद्यांना वाटत असे. तसं लेनिनचंही मत होतं. त्यामुळं एवीतेवी ती नकोशी असलेली आणि अस्ताला जाणारी घाणच असल्यानं ती नष्ट केली तर काय बिघडलं असं स्टालिनला वाटत असणं शक्य आहे. सार्वजनीकीकरण, कुलकनिर्दालन करणं या मोहिमेत स्टालिन क्रूरपणे कां वागला याचं संभाव्य कारण त्याच्या आणि त्याच्या सहविचारी लोकांच्या शेतकर्यांबद्दलच्या कल्पनामध्ये सापडतं.
कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ग्रामीण भागात अगदी कमी होता. कम्युनिस्ट पार्टीची रचना कामगारांची पार्टी अशी होती. मोठ्या शहरात, औद्योगिक शहरांत कम्युनिस्ट पक्षाची संघटना मजबूत होती. कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यतेचे आकडे तपासले तर ग्रामीण भागात एक टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. त्यामुळं सोवियेत म्हणजे मंडळांमध्येही शेतकर्यांची संख्या अल्पमतापेक्षाही कमी होती.
दुसरं कारण म्हणजे झारशाही असो की सोवियेत युनियन, रशिया एकसंध नसल्यानं अनेक राष्ट्रगट केंद्रीय सत्तेपासून दूर असत. युक्रेनचं उदाहरण घेता येईल. युक्रेनला झारशाही, नंतरची कम्युनिस्ट सत्ता मान्य नव्हती, त्यांना स्वत:चं युक्रेनत्व जपायचं असे. युक्रेन हा विभाग इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून एक स्वतंत्र राष्ट्रगट, सांस्कृतिक गट होता, या गटाचं स्वत:चं राज्यही एकेकाळी होतं. सायबेरिया, कॉकेशस या विभागातले लोक स्लाव वंशाचे नव्हते. तातार, चेचेन, आर्मेनियन, कझाक हेही स्लाव वंशाचे नाहीत. त्यामुळे ही सर्व मंडळी एकमेकांपासून तुटलेली असत, केंद्रीय सत्तेनं दादागिरी केलेली त्यांना आवडत नसे. बाय द वे स्टालिन कॉकेशियन होता. स्टालिनचे धान्य गोळा करणारे लोक युक्रेनमध्ये पोचले तेव्हा युक्रेनी लोकांना आपल्यावर बाहेरून आलेलं आक्रमण झालंय असं वाटलं. कारण, स्टालिन, कॉकेशियन, बाहेरचा.
– – –
कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक ट्रॉट्स्की स्टालिनच्या धोरणाला विरोध करत होता. त्याच्या मते अर्थव्यवस्था वेगानं औद्योगिक व्हायला हवी होती, त्यासाठी शेतीव्यवस्था स्थिर असायला हवी होती. ती स्थिर असण्यासाठी शेतकर्यांना सांभाळायला हवं होतं. म्हणून सक्तीचं सार्वजनिकीकरण न करता शेतकर्यांना विश्वासात घेऊन सहकारी शेतीचं मॉडेल घ्यायला हवं होतं असं ट्रॉट्स्कीचं म्हणणं होतं. त्याचबरोबर पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा ट्रॉट्सकीचा आग्रह होता.
लोकशाही हा कम्युनिस्ट विचारधारेत एक प्रॉब्लेमच होता. युरोपात, अमेरिकेत तयार झालेल्या लोकशाहीबद्दल कम्युनिस्ट खूष नव्हते. शेवटी ही लोकशाही म्हणजे बूर्झ्वा लोकांनी चालवलेलं राज्य असे आणि ते श्रमिकांचं शोषणच करत असे असं कम्युनिस्ट नेत्यांचं म्हणणं होतं. तर्काच्या आधारे समाजात श्रमिकच बहुसंख्य झाले की आपोआपच श्रमिकांचं राज्य येणार होतं. परंतु अशा स्थितीचा अनुभव जगात पूर्वी कधी आलेला नसल्यानं त्या बद्दल कोणतीही निश्चित मांडणी शक्य होत नव्हती. मार्क्स, लेनिन आणि एंगल्स वाढले लोकशाहीतच. त्यांना अभ्यास करण्याचं आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते पश्चिमी लोकशाहीतच. त्या लोकशाहीतले दोषही त्यांना दिसत होते. पण लोकशाही या लोकव्यवहाराचं पुरेसा अभ्यास त्यांनी केला नव्हता. उत्पादन संबंध अणि उत्पादन साधनांची मालकी याच बिंदूभोवती कम्युनिस्ट विचारवंत फिरले. भांडवल, उत्पादन तंत्र, व्यवस्थापन, समाजातल्या इतर सेवा आणि व्यवस्था इत्यादी गोष्टी करणारी माणसं कोण आणि किती असतील, त्यांचं समाजातलं स्थान काय असेल, त्यांना स्वातंत्र्य असेल तर समाजाचा गाडा त्यांच्यासह कसा चालेल याचा विचार त्यांनी केला नाही.
त्यातून कम्युनिस्ट विचारवंतांनी एक सोपा मार्ग काढला, तो म्हणजे उत्पादन साधनांची मालकी समाजाची झाल्यावर, श्रमिकच अर्थव्यवस्था चालवणार म्हटल्यावर, श्रमिकांनीच समाज चालवायचा असेल. म्हणजे श्रमिक सांगतील तसा समाज चालणार. एका परीनं ही श्रमिकांची हुकमशाही असेल.
क्रांतीची धुमश्चक्री होती. प्रयोग कशाकशाचे करायचे? लोकशाहीचा प्रयोग करायचा की आधी समाजवादी अर्थव्यवस्था आणायची?
लेनिननी सरकारी भांडवलशाहीची वाट धरली, त्यांना दुसरा इलाज नव्हता. ही भांडवलशाही सरकार चालवणार, सरकार श्रमिकांच्या वतीनं चालवणार, भांडवलशहांनी आज्ञांचं पालन करायचं येवढंच. त्यामुळं श्रमिकांची हुकूमशाही हा विचार लेनिनवादी विचार म्हणून प्रचलित झाला.
व्यवहारात सरकारचा प्रमुख हेच निर्णयाचं केंद्र असतं. त्यामुळं तो हुकूमशहाच ठरतो. भले कितीही कमिट्या असोत, कितीही सल्लागार असोत. प्रमुखाचा शब्द हाच अंतिम शब्द ठरत असतो. गाव, विभाग, राष्ट्र या पातळीवर मंडळं होती, त्या मंडळात चर्चा होत. देशाच्या पातळीवर होणार्या निर्णयात सर्व पातळ्यांवरील कमिट्यांचा, सभासदांचा सहभाग असे. हे खरं. पण शेवटी सर्वोच्च नेत्याच्या हाती अंतिम निर्णय असे.
एकूण मानवी स्वभाव पहाता सर्वोच्च पातळीवर ठरणार्या निर्णयाबरोबर राहायचं असं खालच्या पातळीवरच्या लोकांचा कल असतो, कारण त्यातच त्यांचा फायदा असतो. त्यामुळं सर्व पातळीवर घनघोर चर्चा होत असल्या तरी सर्वोच्च नेत्याचा प्रभाव समाज पातळीवरच्या निर्णयावर असतोच. सर्वोच्च पातळीवरचा माणूस बरा असेल, मनापासून इतरांचं ऐकत असेल, मिळून मिसळून वागणारा असेल तर तो खुबीनं त्याचे निर्णय आणि इतरांची मतं मिळती जुळती आहेत असं भासवू शकतो, मामला गुण्यागोविंदानं पार पडतो. हे तंत्र लेनिनना काहीसं जमलं. हेही खरं की क्रांतीची धकाधकी, क्रांतीनंतर रशियात माजलेलं अराजक आणि नंतरची यादवी, या अस्थिर वातावरणात लेनिन यांचं नेतृत्व कोणाला बोचलं नाही.
लेनिन यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलली. नेतृत्वाच्या स्पर्धा गुन्हेगारी टोळीतली माणसं वागतात तशी वागली. स्टालिन हा हडेलहप्पी करणारा माणूस आहे, तो नेतृत्वाला लायक नाही असं लेनिनचं मत होतं. लेनिनच्या या मतामुळं स्टालिनमध्ये आपल्यावर अन्याय झालाय असा एक गंड तयार झाला होता. पण लेनिननी स्टालिनला चांगलं ओळखलं होतं.
स्टालिन त्याला हवी ती माणसं जवळ बाळगत असे, नको ती माणसं सत्तास्थानापासून दूर ढकलत असे. माणूस नकोसा असला की त्याला मॉस्कोतून काढायचं, दूर सायबेरियात एकाद्या फालतू कामात पाठवून द्यायचं. नको असलेल्या माणसांबाबत कंड्या पिकवायच्या, त्याला बदनाम करायचं. नको असलेल्या माणसावर आरोप ठेवून चौकशीचा देखावा करून त्याला दोषी ठरवायचं, तुरुंगात ढकलायचं, फासावर लटकावायचं, गोळ्या घालायच्या.
लेनिन श्रमिकांची हुकूमशाही म्हणत असत. स्टालिननं श्रमिकांच्या नावावर स्वतःची हुकूमशाही तयार केली.
संदर्भ असा की ट्रॉट्स्की आर्थिक सुधारणांबरोबरच लोकशाहीची मागणी करत असे कारण स्टालिनचं वागणं त्यानी अनुभवलं होतं. ट्रॉट्सकीना लोकशाहीच्या आडून स्टालिनवर नियंत्रण हवं होतं. १९२८ च्या सामूहिकीकरणाला ट्रॉट्स्कीचा विरोध सुरू झाल्यावर स्टालिनची यंत्रणा कामाला लागली. ट्रॉट्स्कीला देशाबाहेर घालवण्यात आलं. नंतर यथावकाश मेक्सिकोत त्याचा खून झाला.
ट्रॉट्स्कीचा विरोध डाव्या बाजूनं होता असं म्हणत. उजव्या बाजूनं बुखारीनचा विरोध होता. बुखारीनही संस्थापक कम्युनिस्ट होता, विचारवंत होता. शेती सहकारी पद्धतीनं करावी, जमिनीचं सरकारीकरण करू नये असं त्याचं मत होतं. पक्षाच्या बैठकीत बुखारीन मत मांडत असे, त्याच्या बाजूनंही बरेच नेते होते. सामान्यत: ही मंडळी लेनिनवादी म्हणून ओळखली जात. १९२८च्या सामूहिकीकरणाला बुखारीननं विरोध केला होता.
बुखारीनचा छळ झाला. यातना देऊन त्याच्याकडून आपण क्रांतिद्रोही कृत्यं केल्याचा कबुलीजबाब घेण्यात आला. त्याच्यावर एक देखावा खटला भरण्यात आला, खटला आठवड्याभरात उरकण्यात आला. शेवटी त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.