– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर
होय होय वारकरी।
पाहे पाहे रे पंढरी ।।१।।
काय करावी साधने।
फळ अवघेची तेणे ।।२।।
अभिमान नुरे।
कोड अवघेची पुरे ।।३।।
तुका म्हणे डोळा।
विठो बैसला सावळा ।।४।।
प्रस्तुत अभंगात तुकोबाराय वारकरी होण्याचे फायदे सांगतात. त्यासाठी ते वारकरी होऊन पंढरपूर बघण्याचं आवाहन करतात. वारकरी पंढरपूरकडे केवळ एक तीर्थाचे ठिकाण म्हणून पाहत नाहीत. तीर्थाच्या ठिकाणी लोक पापक्षालनासाठी जातात. नवस करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी जातात. काहीजण श्राद्धतर्पणादी विधी करण्यासाठी जातात. काहीजण धार्मिक पोथ्यापुराणातील ज्ञान मिळवण्यासाठी जातात. यापैकी कोणत्याही कारणाने पंढरपूरला गेलात तर तुम्ही एक तीर्थभ्रामक ठराल पण वारकरी ठरणार नाही. वारकरी झाल्यानंतर पंढरपूरला जायचं ते विठ्ठलाचं भक्तिप्रेम अनुभवण्यासाठी. ‘गात जा गा गात जा गा। प्रेम मागा विठ्ठला ।।’ असं म्हणून फक्त प्रेम मागण्यासाठीच वारकरी पंढरपूरला जातात. विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचा लाभ झाल्यानंतर जी तृप्तता मिळते ती इतर साधनांनी मिळत नाही.
सहसा तीर्थांच्या ठिकाणी अनेक कर्मकांडी विधी असतात. पंढरपुरात मात्र कोणत्याही कर्मकांडी विधीला वारकरी संप्रदायाने मान्यता दिलेली नाही. इतर तीर्थांच्या ठिकाणी जातिभेदाचं प्राबल्य आहे, धार्मिक ज्ञान देणार्या शाळा आहेत. अशा वेदपाठशाळांतील पंडितांच्या ठिकाणी वर्णाभिमान आहेच. वेदपाठशाळेत ब्राह्मणेतरांना प्रवेश नसतो. अनेक ब्राह्मणेतर जात लपवून, जन्माने ब्राह्मण असल्याचं सांगून अशा वेदपाठाशाळांमधून शिकत होते. अगदी अलीकडच्या काळातही अशा तीर्थांच्या ठिकाणी जातिभेद पाळला जात असेल तर संतांच्या काळात तो किती भयंकर असेल? याउलट संतांच्या विचारांनुसार वारकरी झाल्यानंतर अभिमान निघून जातो. किंबहुना अभिमान निघून जाणं म्हणजेच वारकरी होणं. वारकरी झाल्यानंतर जातवर्णाच्या आणि विद्वतेच्या अहंकाराचा निचरा होतो. त्यामुळेच तुकोबाराय ‘अभिमान नुरे। कोड अवघेची पुरे।।’ असं म्हणतात.
अलीकडेच एक ‘युटोपिया’ नावाची संकल्पना उदयाला आली. थॉमस मूर या विचारवंतांने मांडलेली ही संकल्पना. युटोपिया म्हणजे कल्पितादर्श. आदर्श काल्पनिक समाजाची मांडणी म्हणजे युटोपिया. पंढरपूर हा वारकरी संतांनी मांडलेला एक युटोपियाच होता. कोणत्याही प्रकारचे कर्मकांडी विधी, सामाजिक विषमता आणि कामक्रोधादी विकार नसलेल्या माणसांचा कल्पितादर्श समाज म्हणजे पंढरपूर. ‘पंढरीच्या लोका नाही अभिमान। पाया पडती जन एकमेका।।’ असं तुकोबाराय म्हणतात. या अभंगातील ‘पंढरीचे लोक’ म्हणजे पंढरपुरात राहणारे लोक नव्हे तर संतविचाराला अभिप्रेत आचरण असणारे ‘वारकरी लोक’ आहेत.
संतांनी जातिविषमता संपवण्यासाठी वारीच्या माध्यमातून दोन प्रयोग केलेले आहेत. पहिला प्रयोग म्हणजे जात्याभिमान विसरून एकमेकांच्या पाया पडणं आणि दुसरा प्रयोग म्हणजे गोपाळकाल्याच्या माध्यमातून आंतरजातीय सहभोजन करणं. ‘अठरापगड याती सकळही वैष्णव। नाही दुजाभाव पंढरीसी।।’ असा पंढरपुरातला वारकर्यांचा व्यवहार संतविचारात अभिप्रेत आहे. असे प्रयोग इतर कोणत्याच तीर्थक्षेत्रात होत नव्हते. त्यामुळेच ‘वाराणसी गया पाहिली द्वारका। परि नये तुका पंढरीचा।।’ असं म्हणून तुकोबाराय वाराणसी आणि गयेच्या तुलनेत पंढरपूरला श्रेष्ठ ठरवतात. त्याचं कारणही त्यांनी त्याच अभंगाच्या दुसर्या चरणात नमूद केलेलं आहे. ‘पाया पडती जन एकमेका’ हे त्याचं कारण आहे. ‘तुका म्हणे काला। कोठे अभेद देखिला।।’ असं म्हणत भेदभावमुक्त काला पंढरपूर सोडून कुठेच नाही असंही सांगतात.
काशीत मरण आल्यानंतर मोक्ष मिळतो अशी धारणा आहे. गयेत पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्धतर्पणादी विधी आहेत. प्रयागात दंडणमुंडण आणि व्रतोपवासादी देहदंडणाच्या साधना आहेत. पंढरपुरात या प्रकारच्या कोणत्याही साधना करण्याची गरज नाही. काशी, गया आणि प्रयाग या तिन्ही ठिकाणी सांगितलेला लाभ अनुभवता येत नाही. मोक्ष आणि पितृऋणाचा नाश हे लाभ मानवाला जिवंतपणी अनुभवता येत नाहीत. एका अर्थाने हे लाभ ‘उधार’ आहेत ‘रोख’ नाहीत. त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात ‘मरणमुक्ती वाराणसी । पितृऋण गया नासी। उधार नाही पंढरीसी। पायापाशी विठोबाच्या।।’ पंढरपुरात विठोबाच्या पायापाशी काहीही ‘उधार’ नाही. उलट पंढरीत ‘खळा पाझर रोकडे’ असा खळाला म्हणजे दुष्ट माणसालाही प्रेमाचे पाझर फोडण्याचा रोकडा अनुभव आहे. एकनाथ महाराजांनीही त्यांच्या अभंगातून हेच मांडलं आहे.
‘काशीक्षेत्र सर्वात पवित्र।
परि तेथे वेचे जिवित्व श्रेष्ठ तेव्हा ।।१।।
तैसे नोहे जाण पंढरी हे।
पेठ वैकुंठ वैकुंठा जुनाट हे ।।२।।’
ते म्हणतात, ‘प्रयागादी क्षेत्रे आहेत कल्पकोडी। तया आहे खोडी एक एक।।’ प्रयागादी क्षेत्रे भरपूर असली तरी त्या ठिकाणी एक खोड आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. ती खोड म्हणजे, ‘मुंडन ती काया निराहार राहणे। येथे न मुंडणे काया काही।।’ प्रयागादी क्षेत्रात मुंडण वगैरे विधी आणि निराहारी तीर्थोपवास करावा लागतो. पंढरपुरात असा कोणताही प्रकार नाही. अर्थात नंतरच्या काळात पंढरपुरातही असे विधी नकळत सुरू झाले. वारकरी नसलेले लोक आणि अजाणतेपणाने काही वारकरीही पंढरपुरात असा विधी करायला लागले. त्याविषयी मामासाहेब दांडेकर लिहितात, ‘चंद्रभागेत दर्शन घ्यावयाचे व गावप्रदक्षिणा करावयाची व बाकीचा वेळ कीर्तनात व भजनात घालवायचा, असा पंढरपुरातील मुख्य कार्यक्रम आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे येथे तीर्थोपवास करावा लागत नाही. एवढेच नव्हे तर केल्यास पातक सांगितले आहे. त्याचप्रमाणे येथे श्राद्धमुंडण वगैरे काही एक करत नाहीत. काही वर्हाडातील व कोकणातील लोक हा विधी करतात. परंतु, पंथाची ज्यास योग्य माहिती आहे, ते कोणी करीत नाहीत.’ थोडक्यात वारकरी पंथाच्या विचारांची योग्य माहिती असलेले म्हणजेच वारकरी होऊन पंढरपूर बघणारे लोक श्राद्धमुंडणादी विधी पंढरपुरात करत नाहीत. वारकरी विचारांचे निष्णात अभ्यासक गोपाळ शंकर राहिरकर यांनीही हीच बाब नोंदवली आहे. ‘इतर सर्व क्षेत्रात पुण्यकर्मांच्या विधींनाच प्राधान्य आहे. पंढरीला मात्र ‘न लगे दंडन मुंडन ते काही’ असा स्पष्ट निर्बंध संतांनी घातला आहे. यातही अन्य हेतूने शिरून या क्षेत्रात श्राद्धपिंडे घालण्याचे विधी चालतात हा तेवढ्यापुरता पुरोहित वर्गाचा विजयच आहे. साच वारकरी यात सापडावयाचे नाहीत. पंढरीला जे इतर क्षेत्रांप्रमाणेच मानतात ते पापाला भ्यालेले लोक मात्र या जाळ्यात गुंतत असल्यास त्यास इलाज नाही.’
वारकरी होऊन पंढरपूर पाहिल्यानंतर होणारे तीन फायदे तुकोबाराय सांगतात. पहिला फायदा म्हणजे इतर कोणत्याही कर्मकांडी साधना करण्याची गरज राहत नाही. दुसरा फायदा म्हणजे अभिमानी वृत्तीवर मात करता येते. तिसरा फायदा म्हणजे सावळा विठ्ठल डोळ्यात बसतो म्हणजेच त्याचं भक्तिप्रेम अनुभवता येतं. वारकरी होऊन पंढरपूरची वारी करणारे लोक संपूर्ण वारीच्या काळात आनंदाने गात आणि नाचत त्याच्या प्रेमाचा अनुभव घेत असतात. त्यांच्या हा भावविभोर भक्तिप्रेमाचा उत्कर्ष म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागतात. ‘नेत्री अश्रुचिया धारा। कोठे रोमांच शरीरा।।’ असं तुकोबाराय सांगतात. इतर क्षेत्राच्या ठिकाणी हे घडत नाही.
न्या. महादेव गोविंद रानडे हे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील महान विचारवंत होते. उच्चशिक्षित होते. एकदा पुण्याच्या नगरवाचन मंदिराजवळून जाणार्या पालख्या त्यांनी पाहिल्या. वारकर्यांची भावविभोरता आणि भक्तिप्रेमाचा उत्कट अविष्कार पाहून रानडे भारावले. त्यांच्या डोळ्यातून आपोआप आसवांच्या धारा वाहू लागल्या. पुढे रानड्यांनी या पालखी सोहळ्यातील दिंड्यांचा आणि इतरही पालखी सोहळ्यांचा अभ्यास केला. त्यावर आधारित ‘पंढरीची यात्रा’ या विषयावरील व्याख्यान त्यांनी १८८२ साली प्रार्थना समाजात दिले आणि वारीचं महत्त्व सांगितलं. या व्याख्यानामुळेच पालखी सोहळ्याचं दस्तावेजीकरण झालं आहे.
वारकर्यांना पंढरपूरच्या या वेगळेपणाची जाणीव होती. त्यामुळेच वारकरी लोक इतर तीर्थांना तीर्थयात्रा करण्यासाठी जात नसत. त्यासाठीची तीन प्रातिनिधिक उदाहरणं सांगता येतील. पहिलं उदाहरण वै. सुभादेव यांचं आहे. सुभादेव हे आजरेकर फडावरील विख्यात वारकरी. दरवर्षी आजरेकर फडातर्फे शिरोळ तालुक्यातील जांभळीला त्यांची पुण्यतिथी साजरी होते. ते आजरेकर फडाचे मूळ पुरुष बाबासाहेब आजरेकर यांच्या काळात होऊन गेले. ते बेळगावच्या चिकोडी तालुक्यातील कमतनूर गावचे. ते काशीयात्रेला जाणार होते. त्यापूर्वी पंढरपूरची वारी करावी म्हणून कार्तिकी वारीला ते पंढरपूरला आले. त्यावेळी त्यांनी आजरेकर फडावर बाबासाहेब आजरेकर यांचं ‘सांडुनी पंढरी जासी आणिक तीर्था। लाज तुझ्या चित्ता कैसी न ये।।’ या अभंगावरचं कीर्तन ऐकलं. त्या कीर्तनातला काशीयात्रेचा फोलपणा सांगणारा वारकरी विचार त्यांना पटला. त्यांनी काशीयात्रा रहित करुन बाबासाहेब आजरेकर यांच्याकडून वारी घेतली. त्यानंतर ते आजरेकर फडाचे वारकरी बनले. साधारणपणे १८७८ साली त्यांचं निधन झालं.
विदर्भात सखाराम महाराज इलोरेकर हे प्रख्यात वारकरी सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या जवळच्या गावात भिकू शेठ नावाचे भाविक राहत. त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या होत्या. त्यांनी सखाराम बाबांना चारधाम यात्रेला यायची विनंती केली. सखाराम बाबांची पंढरपूरवर अनन्य निष्ठा. त्यांनी चारधामाच्या यात्रेला जायला स्पष्ट नकार दिला. ‘पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या अभंगाचा आधार दिला. पंढरीशिवाय कोणत्याच क्षेत्राला जाणार नसल्याचं सांगितलं.
वारकरी संप्रदायातील विख्यात फडकरी वै. धोंडोपंत दादा अत्रे यांचीही पंढरपूरवर अशीच निष्ठा होती. एकदा त्यांचा मुलगा काशीयात्रेला निघाला. धोंडोपंत दादांनी त्याला विरोध केला. धोंडोपंत दादांचे न ऐकता मुलगा काशीला निघून गेला. पुढे दादांनी आयुष्यभर त्या मुलाचं तोंडही पाहिलं नाही.
वारकरी परंपरा ही तात्विक आत्मभान असलेली परंपरा आहे. त्यामुळेच वारकरी संतांनी दिलेला पंढरपूरनिष्ठेचा हा वारसा लाखो वारकरी जपत आहेत. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला जातात. आता आषाढी वारी सुरू आहे. विविध संतांच्या पालख्या निघालेल्या आहेत. काही इतरही पालख्या आणि दिंड्यांच्या माध्यमातून लाखो वारकरी वारीच्या वाटेवर विठ्ठलाच्या भक्तीचा आनंद घेत आहेत. वारी हा महाराष्ट्राचा महासोहळा आहे. या सोहळ्यानेच आपलं मराठीपण जिवंत ठेवलंय.