राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबईची बोलीभाषा हिंदी हीच आहे. आपका इस विषय के बारे में क्या कहना है?
– श्रीकांत पांडे, भाईंदर
त्यांना ‘कोणीतरी’ असं म्हणायला सांगितलं तसं ते म्हणाले. त्यावर तुम्ही कशाला काय म्हणताय? मुंबईची बोलीभाषा गुजराती आहे असं ते नाही म्हणाले, यात समाधान माना ना. की त्यांनी असंच म्हणायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे. थोडा धीर धरा. ते तसंही म्हणतील, जरा त्यांना थोडं तरी गुजराती बोलता यायला लागू दे. फिर देखो सेवा मे कोई कमी नही होगी.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आपल्या सरकारने विरोधकांची शिष्टमंडळं नगण्य देशांमध्ये पाठवली. त्या देशांनी या शिष्टमंडळांना भेटायला नगण्य माणसंच पाठवली. इतक्या गंभीर विषयावर बोलायला गेलेले लोक फिल्मी गाणी गात होते चर्चेच्या टेबलांवर… यातून आपण काय साधलं?
– पुरुषोत्तम पाटील, विटेगाव
असं का बोलताय पाटील? आमच्या नगण्य लोकांनाही गाणी गाता येतात, आपल्या प्रमुख लोकांना इंग्लिश बोलता आलं नाही तरी नगण्य लोकांना इंग्लिश बोलता येतं, आमच्याकडे फक्त प्रमुख लोकच जग फिरतात, बाकी नगण्य लोक नगण्य देश फिरतात इत्यादी गोष्टी जगाला दाखवून दिल्या की. आणि आपल्या प्रमुख लोकांना परदेशात रिसीव करायला नगण्य लोक येतात, मग आपल्या नगण्य लोकांना परदेशात प्रमुख लोक भेटायला आले असते तर ते आपल्या प्रमुख लोकांना चाललं असतं का? यावरून समजा की आपण सगळेच नगण्य आहोत हे आपण दाखवून दिलं… फक्त जगाने आपल्याला दाखवून दिलं की आपण जगाला दाखवलं, यात कन्फ्युजन आहे… पण ते आपण जगावर सोडूया ना, आपण सगळंच का आपल्यावर ओढून घ्यायचं?
इतर देशांमध्ये एआय, रोबोटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी यांच्यावर संशोधन सुरू आहे आणि आपल्या देशात पौरोहित्याचे अभ्यासक्रम काढले जातायत… काय होणार आपल्या देशाचं?
– विलास बंडगर, सोलापूर
त्या इतर देशांमध्ये पौरोहित्याचे अभ्यासक्रम काढले जातायत का? कारण त्यांना ते येतच नाही. जमणारच नाही. त्या मूर्खांना फक्त एआय, रोबोटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी यांच्यावरच संशोधन करायला जमेल… शोधा म्हणावं किती शोधता ते, त्यांनी शोधलं की त्याचाच वापर करून आपण आपला अभ्यासक्रम आपल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना अतिशहाणं करायचं.. तुम्ही कितीही चिंता करा, कोणाला काही फरक पडत नाही, ना शिकणार्यांना, ना शिकवणार्यांना. तेव्हा उगाच नको त्या गोष्टीविरुद्ध बंड करू नका बंडगर. पौराहित्याला कमी लेखू नका. हल्ली सगळ्यात जास्त कमाई कोणाची आहे ते बघा आणि देशाचं टेन्शन घेण्यापेक्षा ‘त्या’ अभ्यासक्रमात तुम्हाला कसा प्रवेश मिळेल याचे टेन्शन घ्या.
एक बाई सांगतात की देवानेच मला विमान अपघातातून वाचवलं… बातम्या चालवल्या जाताहेत की अपघातात दोन धर्मांचे धर्मग्रंथ वाचले… दोन्हीकडच्या देवांनी माणसांचे प्राण का वाचवले नाहीत, असा प्रश्नही कोणाला कसा पडत नाही?
– रागिणी पाटील, गुलबर्गा
अशा प्रसंगीही जे देवाला श्रेय देतात ते त्यांच्या देवाच्या दयेवर जगत असतात. मेहनत करून जगणारे अशा प्रसंगी रडताना देवाला दोष देतात आणि सुतक संपलं की त्याच देवाची पूजा करतात. फरक एवढाच आहे की देवाच्या दयेवर जाणार्यांचा देव आणि मेहनत करून जगणार्यांचा देव वेगळा वेगळा आहे. तुम्हाला जसा प्रश्न पडलाय तसा प्रश्न आपल्या देवाला कोणी विचारू नये, म्हणूनच देवाच्या दयेवर जगणारे, देवाला पुढे करून त्याच्या मागे ‘त्यांच्या देवाला’ लपवतात, हे आमच्या सामान्य बुद्धीला सुचलेलं उत्तर आहे. बाकी अपघात कसा झाला या प्रश्नाचं खरं उत्तर ‘जर’ मिळालं, ‘तर’ तुमच्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीला वाटतं. बाकी देवाच्या हातात. आता कुठल्या देवाच्या हातात ते मात्र विचारू नका. उगाच देवाला पुढे करणार्यांचा कोप होऊ नये म्हणून आम्हीही देवाचं नाव पुढे केलंय हे समजून घ्या.
मला दारू सोडायची फार इच्छा आहे… पण त्यासाठी मला आधी दारू प्यायला सुरुवात करावी लागेल, असं मित्र म्हणतायत… आता कसं करावं?
– अथर्व दामगुडे, जामनेर
मित्रांचं ऐकून दारू प्यायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला दारू सोडायची इच्छाच होणार नाही, याची काळजी तेच मित्र घेतील. माणूस आपल्याच इच्छेने सगळं काही करतो, मित्र हे फक्त बिल भरण्यासाठी नसतात, तर त्यांच्या नावाने बिल फाडण्यासाठीही असतात. तेव्हा उगाच मित्रांच्या नावाने बिल फाडू नका. आणि कितीही घ्यावीशी वाटली तरी दारूची परीक्षा घेऊ नका, असा सल्ला मित्र म्हणून आम्ही तुम्हाला देतो. आता कुठल्या मित्राच ऐकायचं तुम्ही ठरवा.