वृत्तपत्रांतील प्रदीर्घ कामगिरीबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदाचा अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा पुरस्कार वृत्तपत्र छायाचित्रकार प्रदीप धीवार यांना जाहीर केला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ फोटो जर्नलिस्ट मित्राने मांडलेला हा लेखन प्रपंच… केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या दिवशी प्रदीपचा जीव वाचला…
– – –
तो ‘मिड डे’ या सायंदैनिकात वृत्त छायाचित्रकार म्हणून नोकरीला होता. २६/११ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा प्रदीप सीएसटी स्थानकात थांबून फलाट क्रमांक एकवर फोटो काढत होता… दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल हे दोघे गोळीबार करत रेल्वे स्थानकाबाहेर आले तेव्हा त्यांना चुकवून प्रदीप भिंतीच्या आडोशाने रस्त्यावर झोपला. समोरच्या फुटपाथवर महापालिका मुख्यालयाच्या इमारतीखाली दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कसाबवर नेम धरला आणि त्यांच्यात समोरासमोर गोळीबार सुरू झाला. प्रदीप ज्या भिंतीखाली लपून झोपला होता, त्याच भिंतीजवळ येऊन कसाब सावज शोधत होता. तेव्हा त्याचे लक्ष प्रदीपकडे गेले असते तर अवघ्या पंधरा-वीस फुटावरून त्याने प्रदीपवर हल्ला केला असता.
त्यावेळी सुदैवानेच प्रदीप वाचला.
पण तसं होण्याची ती काही पहिलीच वेळ नव्हती.
१९९२ साली मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीत जोगेश्वरीच्या मजासवाडीत दंगेखोरांचे फोटो काढत असताना प्रदीप जमावाच्या तावडीत सापडला होता. त्याने वाढवलेल्या दाढीमुळे जमावात गैरसमज निर्माण झाला. त्याने ओळख सांगूनही जमाव शांत बसेना. एकजण म्हणाला, हा कटेला आहे, याची चड्डी काढून बघा, याचा सुंता झाला असेल. हे ऐकून प्रदीपची पाचावर धारण बसली. लोकांनी पँटमध्ये हात घातला. इतक्यात प्रभू नावाचा मित्र धावून आला, त्याने जमावाची समजूत घातली आणि ओळख सांगितली. तेव्हा कुठे प्रदीपचा जीव भांड्यात पडला. खरंच प्रभू, प्रभू देवासारखा धावून आला; नाहीतर भर रस्त्यात वस्त्रहरणाचं नाटक झालं असतं…
हाच प्रसंग मिरा भाईंदरमध्येही घडला होता… अनेक वर्षं मिरा भाईंदरला पाण्याचा दुष्काळ होता. लोक हंडे घेऊन घराबाहेर टँकरची वाट पाहत बसायचे. जेव्हा केव्हा, वेळी अवेळी टँकर येईल तेव्हाच पाणी मिळेल अशी परिस्थिती होती. नशिबाने पाणी मिळाले तरी ते पिण्याच्या लायकीचे आहे की नाही याची खात्री नव्हती. १९९९ साली सलग दहा दिवस तोंडचे पाणी पळाल्यानंतर अकराव्या दिवशी लोकांचा संयम सुटला आणि बायाबाप्ये मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर धावले. रागाचा उद्रेक झाला. दिसेल त्या वाहनावर दगडफेक होऊ लागली. भाईंदर रेल्वे स्थानकातील स्टॉल आणि इंडिकेटर तोडण्यात आले. लाकडी स्लीपर्स रेल्वे रुळावर टाकून पेटविण्यात आले. आग विझविण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे बंबही लोकांनी जाळून टाकले. रस्ता रोको आणि रेल्वे रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. प्रदीप तेव्हा दै. सामनासाठी फ्रीलान्स काम करत होता. आंदोलनाचे फोटो घेण्यासाठी तो मालाडच्या घरून मोटरसायकलने निघाला.
मिरा रोड रेल्वे स्थानकात दगडफेक चालूच होती. प्रदीपचा कॅमेरा पाहून लोक सांगायचे, पुढे जाऊ नका, जमाव संतप्त झाला आहे. त्याच्या गाडीवर प्रेस लिहिलेले असल्यामुळे तो प्रेस फोटोग्राफर आहे हे लोकांना कळून चुकले होते. यापूर्वी अशीच आंदोलने झाली तेव्हा वृत्तपत्रात छापून आलेले फोटो पाहून पोलिसांनी दंगेखोरांना शोधून पकडून गजाआड केले होते. हे फोटो पोलीस पुरावा म्हणून वापरतात, या गोष्टीचा राग मनात ठेवून लोक फोटोग्राफरना मारायला टपले होते. मिरा रोडपेक्षा भाईंदरची परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जाळपोळ, दगडफेक आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांचा लाठीचार्ज अश्रुधुराच्या नळकांड्या, गोळीबार यांचा धडाम धडाम आवाज येत होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. जिवाची बाजी लावून, पुढे जाऊन प्रदीप फोटो काढत होता. ते पाहून संतप्त जमाव त्याच्या अंगावर धावून आला.
जीव वाचवण्यासाठी प्रदीप सैरावैरा धावू लागला. रेल्वे मार्गाजवळच असलेल्या चार मजली इमारतीत प्रदीप घुसला. प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट होते. प्रत्येकाचा दरवाजा ठोकत तो जिना चढून वर जात होता. जो चटकन दरवाजा उघडेल त्याच्या घरात आश्रयासाठी जायचे अशा बेताने चौथ्या मजल्यापर्यंत गेला. सुदैवाने एका बाईने दरवाजा उघडला. धापा टाकत प्रदीपने आपली ओळख दिली. तुम्ही मला घरात घेतले नाहीत तर लोक मला मारून जाळून सुद्धा टाकतील, हे सांगितलं. बाई हुशार, समजदार आणि संवेदनशील होती. तिने प्रदीपला आत घेऊन दरवाजा चटकन लावून घेतला आणि पायातल्या बुटासह स्वयंपाकखोलीत जाऊन लपण्याचे सांगितले.
हातात लाठ्याकाठ्या घेऊन लोक आरडाओरडा करत एक एक जिना वर येत होते. भीतीने प्रदीपची छाती धडधडू लागली. काही लोक दरवाजावर दणादण हात आपटून दरवाजा उघडण्याची जबरदस्ती करू लागले. या क्षणी ही बाई कोणता निर्णय घेते यावर प्रदीपच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. बाई खंबीर होती. तिने आपलं बाळ कडेवर घेतलं आणि दरवाजा उघडला. तसे दोन-चार जण दांडगाई करत घरात घुसले. त्यांनी पाहिलं, बाई घरात एकटीच आहे. एकटेपणी परपुरुषाला कोणी घरात घेणार नाही, असा अंदाज करून ते परत गेले.
प्रदीपचा जीव भांड्यात पडला. त्याने सामना कार्यालयात फोन करून आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीचे वर्णन केले. त्यावर फोटो मिळाला नाही तरी चालेल, पण जीव सांभाळ असे त्याला सांगण्यात आले. त्या सौ. शास्त्री नावाच्या बाईच्या घरी प्रदीप दीड तास बसला होता. तोपर्यंत पोलिसांची जादा कुमक आली आणि दंगेखोरांची पांगापांग झाली. प्रदीपने हात जोडून बहाद्दूर शास्त्री बाईंचे आभार मानले आणि निरोप घेतला.
सचिन तेंडुलकरला भेट म्हणून मिळालेल्या एक कोटी रुपये किमतीच्या फेरारी मोटारीला करमुक्तीची सवलत मिळावी म्हणून सचिनचे प्रयत्न चालू होते. सचिनसारख्या श्रीमंत खेळाडूला ही सवलत द्यावी की न द्यावी यावर अनेक वृत्तपत्रात उलटसुलट प्रतिक्रिया छापून येत होत्या. ही फेरारी दिसते तरी कशी अशी प्रचंड उत्सुकता सर्वांनाच होती. तिचा फोटो मिळावा म्हणून प्रदीप बरेच दिवस धडपडत होता. सहार विमानतळावरील कार्गो विभागात ही मोटार नुकतीच आली आहे, अशी खबर लागताच मिड डेच्या फोटोग्राफरांनी फील्डिंग लावायचे ठरवले. त्यावेळी प्रदीप तिथेच काम करत होता.
फेरारी कार्गोमध्ये आली आहे, म्हणजे एक दोन दिवसांत सचिन ती आणायला नक्कीच जाईल, अशा अंदाजाने फोटोग्राफरांनी आपापल्या जागा निश्चित केल्या. बांद्रे पूर्वेकडील साहित्य सहवासमधील सचिनचे जुने घर तसेच पश्चिमेकडील माउंट मेरी रोडवरील नवीन घर, गेटवेजवळचे तेंडुलकर रेस्टॉरंट आणि सहार येथील कार्गो विभागाबाहेर सर्व फोटोग्राफर आलटून पालटून ड्युटी करत होते .
तेंडुलकर हॉटेलचे एक पार्टनर संजय नारंग यांचे कार्यालय विमानतळाशेजारील ग्रँड इंटरनॅशनल हॉटेलजवळ आहे. तेथे नारंग, सचिन, त्याची बायको अंजली हे आल्याची नवी खबर मिळाली, फेरारी गाडी तेथेच ठेवलेली आहे असे समजले. म्हणून सर्व फोटोग्राफर तेथे पोहोचले. कार्यालयाबाहेर मोठे कंपाऊंड आहे. त्याच्या मुख्य दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे प्रदीपला आत जाता आले नाही. संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदीप गेटबाहेर ताटकळत उभा होता. रात्री सव्वा दहा वाजता आतून मोटारीचा वेगळाच आवाज येऊ लागला, फेरारी स्पोर्ट्सकार असल्यामुळे तिच्या इंजिनचा आवाज इतर मोटारींसारखा येत नाही. तो वेगळा आवाज ऐकून प्रदीपने आपली गाडी स्टार्ट केली. अचानक गेट उघडले गेले आणि अपेक्षेप्रमाणे लाल चुटूक रंगाची फेरारी मोठा आवाज करत सुसाट पळाली. ही रेसची गाडी, तिचा पाठलाग करणे कठीण, तरीही प्रदीपने त्याची गाडी भन्नाट वेगाने चालवली. आश्चर्य म्हणजे फेरारी सचिन स्वतः चालवत होता. या गाडीमुळे वादंग माजला होता. म्हणून तिच्याबरोबर आपला फोटो वृत्तपत्रात छापून येऊ नये अशी, दक्षता त्याने घेतली होती. परंतु फोटोग्राफर स्वतःचा जीव धोक्यात घालून पाठलाग करत असल्याचे पाहून सचिनने गाडीचा वेग कमी केला आणि प्रदीपला हवे तसे फोटो काढून दिले.
अशा जीवघेण्या शर्यतीत सचिनलाही मागे टाकणारा आमचा प्रदीप धीवार गळ्यात कॅमेरा टाकला की सर्वांच्या पुढे असतो. त्याच्या कारकीर्दीचा, कष्टांचा आज योग्य सन्मान होतो आहे, याचा आनंद फार मोठा आहे.