डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
‘मासिक पाळी’ हा शब्द ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतात. काहीजण संकोचतात, तर काहीजण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, केमिस्ट सॅनिटरी पॅड देताना वर्तमानपत्रात गुंडाळत लपवून देतो. एवढंच काय अगदी काही डॉक्टरही रुग्ण म्हणून आलेल्या शाळकरी विद्यार्थिनीला ‘पाळी आली का?’ असं थेट विचारण्याऐवजी तिच्या आईला ‘ही शहाणी झाली का?’ असं विचारतात. जणू तिला याविषयी काही कळलं तर जणू आभाळच कोसळणार आहे.
मित्रहो, खरं सांगायचं तर मासिक पाळी ही निसर्गाची एक ‘कमाल’ आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. चला, आपण आज या विषयावर थोडं बोलूया आणि मासिक पाळीला एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन देऊया.
मासिक पाळी म्हणजे काय रे भाऊ?
मासिक पाळी म्हणजेच मेनस्ट्रूएशन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला घडते. याला मराठीत ‘पाळी येणं’ किंवा ‘महिन्याचा रज’ असंही म्हणतात. ही प्रक्रिया गर्भाशयाशी संबंधित आहे आणि सामान्यत: वयाच्या ११ ते १५ वर्षांपासून सुरू होऊन ४५-५५ वयापर्यंत अर्थात रजोनिवृत्तीपर्यंत चालते.
सोप्या भाषेत सांगायचं तर :
– दर महिन्याला, स्त्रीच्या गर्भाशयात एक थर तयार होतो, जो गर्भधारणेसाठी तयार होतो.
– गर्भधारणा झाली नाही तर हा थर रक्त आणि ऊतकांच्या स्वरुपात योनीमार्गातून बाहेर पडतो. यालाच मासिक पाळी म्हणतात.
– ही प्रक्रिया साधारण २ ते ७ दिवस चालते आणि दर २१ ते ३५ दिवसांनी पुन्हा येते. अर्थात प्रत्येक स्त्रीचं सायकल हे वेगवेगळं असतं.
पाळीच्या काळात काही स्त्रियांना पोटदुखी, कंबरदुखी, मूड स्विंग्स किंवा थकवा जाणवू शकतो, याला पीएमएस म्हणजेच प्री मेनस्ट्रूरल सिंड्रॉम असं म्हणतात. मासिक पाळी ही फक्त रक्तस्त्राव नाही तर एक संपूर्ण ‘जैविक’ प्रक्रिया आहे जी स्त्रीच्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते.
या दिवसांत स्त्री शरीर आतून जणू काही एक अविश्वसनीय बॅले करत असतं ज्यात संप्रेरकं अर्थात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन
यांचं संतुलन असतं, गर्भाशयाची तयारी असते आणि जर गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात होते. ही प्रक्रिया म्हणजे निसर्गानं स्त्रियांना दिलेली एक हक्काची ‘सुपरपॉवर’ आहे, कारण यातूनच नवजीवनाचा जन्म होऊ शकतो. पण थांबा याचा अर्थ असा नाही की ‘मासिक पाळी’ म्हणजे फक्त गर्भधारणा. मासिक पाळी ही प्रक्रिया स्त्रीच्या एकूण आरोग्याशी जोडलेली आहे. ती तिच्या संप्रेरकं, तिचे मूड्स आणि अगदी तिच्या ऊर्जेच्या पातळीवरही परिणाम करतं. म्हणूनच तिला समजावून घेणं आणि तिच्याशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे.
विशेषत: आपल्या भारतीय समाजात मासिक पाळीभोवती अनेक समज-गैरसमज आहेत उदा. मासिक पाळी काळात मंदिरात जाऊ नये, स्वयंपाकघरात प्रवेश करू नये, हा विटाळ आहे- आजार आहे ब्ला ब्ला… पण दोस्तहो, मासिक पाळी हा आजार नाही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. खरं तर हे एक चिन्ह आहे की स्त्रीचं शरीर निरोगी आहे आणि व्यवस्थित काम करतंय.
आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे मासिक पाळी ही सगळ्याच स्त्रियांमध्ये एकसारखी नसते, कुणाला ३ दिवस, तर कुणाला ७ दिवस अंगावरून जातं, कुणाला जास्त वेदना होतात तर कुणाला फक्त मूड स्विंग्स. प्रत्येकाची मासिक पाळी ही तिची स्वत:ची अनोखी गोष्ट आहे जसं आपलं व्यक्तिमत्त्व!
मासिक पाळी दरम्यान स्वच्छता ही कुठल्याही स्त्रीची खरी सुपरपॉवर आहे. यासाठी बाजारात अनेक सॅनिटरी प्रॉडक्ट्स आहेत, जसं सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स किंवा मेर्न्स्ट्युअल कप्स यापैकी जे सोयीचं वाटेल ते स्त्रीनं बिनधास्त निवडावं आणि त्यांचा यथायोग्य वापर करावा. विशेषत: या काळात सौम्य साबण आणि पाण्यानं स्वच्छता राखावी. कारण जास्त सुगंधी साबणं किंवा अतिरिक्त रसायनं यामुळे हकनाक त्रास होऊ शकतो. या कालावधीत शक्यतो सैल आणि सुती कपडे परिधान करावे यामुळे आरामासोबतच संसर्गाचा धोकाही कमी होतो. या काळात एरवीपेक्षा थोडं अधिक पाणी पिणं, पौष्टिक आहार आणि हलका व्यायाम अशा सवयींमुळे वेदना कमी होऊ शकतात.
मित्रहो, मासिक पाळी हा काही लपवाछपवीचा विषय नाही, पण अनेकदा मुलींना याबद्दल बोलायला लाज वाटते किंवा भीती वाटते. वास्तविक, यात लाजण्यासारखं काहीच नाही. मुलींनी याबाबत किमान आई, मैत्रिणी, बहिणी किंवा विश्वासातील व्यक्तींशी मोकळेपणाने बोलावं, अधिकाधिक शिक्षित व्हावं. पाळीविषयी जर काही समस्या असेल, उदा. जास्त वेदना, अनियमित पाळी किंवा अतिरिक्त रक्तस्त्राव तर डॉक्टरांशी बोलायला अजिबात संकोच करू नये. कारण यावर स्त्रीचं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. आणि हो मुलांनो आणि पुरुष मित्रांनो, तुम्हीही या विषयात सहभागी व्हावं, तुमच्या बहिणी, मैत्रिणी किंवा जोडीदाराला समजून घ्यावं, त्यांना आधार द्यावा. मासिक पाळी समजावून घेणं म्हणजे तुम्ही खर्या अर्थानं एक सजग नागरिक आणि समजूतदार मुलगा, भाऊ, काका, मामा, पती, दीर, सासरा होणं.
२८ मे हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आहे आणि हा दिवस आपल्याला मासिक पाळीविषयी जागरुकता पसरवण्याची संधी देतो. भारतात अनेक ठिकाणी सॅनिटरी पॅड्सचे वितरण, स्वच्छतागृहांची निर्मिती आणि जागरूकता कार्यक्रम होतात, पण आपण वैयक्तिक स्तरावर काही करू शकतो. उदा.:
– समाजात याबद्दलचे गैरसमज दूर करणे.
– या विषयावर खुल्या मनाने बोलण्यास प्रोत्साहन देणे.
– शाळा, महाविद्यालयात किंवा परिसरात मासिक पाळीविषयी चर्चा आयोजित करणे.
– स्वस्त आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी उत्पादनांबद्दल माहिती शेअर करणे.
शेवटचं, पण महत्त्वाचं म्हणजे ‘मासिक पाळी’ हा फक्त स्त्रियांचा विषय नाही, तर ती अत्यंत जिव्हाळ्याची अशी ‘मानवी’ गोष्ट आहे ती साजरी करायला हवी, कारण ती जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.
प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने याबद्दल आत्मविश्वासाने बोललं पाहिजे आणि हो, जर तुम्हाला कधी वाटलं की तुमची मासिक पाळी तुम्हाला त्रास देतेय तर थोडं थांबा, स्वत:ला जपा, चॉकलेट खा, तुमचं आवडतं गाणं ऐका आणि स्वत:वर प्रेम करा.
चला दोस्तहो, मासिक पाळीला एक सकारात्मक दृष्टिकोन देऊया आणि तिला एक ‘सुपरपॉवर’ म्हणून स्वीकारूया!
(लेखक पुण्यात जनरल प्रॅक्टिश्नर आहेत)