• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काकांच्या काँग्रेसकृत जन्मयातना!

- विश्वंभर चौधरी (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 20, 2025
in भाष्य
0

नोकरी ते नोकरी, वर पेन्शनचा ताप डोक्याशी आला. इंदिरा गांधींनी पेन्शन सुरू केली नसती तर आज काका एखाद्या खाजगी संस्थेत अकाऊंट लिहिण्यासाठी जाऊन यशस्वी उद्योजक होऊ शकले असते. पण ती संधीही घालवली नेहरू परिवारानं.
– – –

आ त्ता सकाळी काका कमला नेहरू पार्कात भेटले तेच घोडकेंचा पेढा देत. काकांनी आज वयाची पासष्ठ वर्षं पूर्ण केली. काका बरेचदा पेढा देतात. तो चितळेंच्चाच्च असतो. आज घोडकेंचा दिल्यामुळे चितळेंनी काकांच्या लाडक्या प्रखर राष्ट्रवादी चॅनलच्या जाहिराती तर बंद केल्या नाहीत ना, अशी शंका मला आली. असो.
मुद्दा असा की काका आज पासष्ठीचे झाले. काका प्रचंड नेहरू विरोधक. म्हणून काकांशी बोलताना मी नेहरूंचा विषय टाळतो. पण काका हमखास त्या विषयावर येतात.
नेहरूंवर काकांचा राग स्वाभाविक आहे. नेहरूंनीच काकांना जन्मयातना दिल्या! १९४७ साली भारतातलं सरासरी आयुर्मान चांगलं ३२ वर्षांचं होतं. नेहरूंनी कुठेतरी रोड शो काढ, कुठे सैनिकाचा वेष करून फोटो काढ, कुठे भारताच्या क्रिकेट संघापासून सैन्याच्या पराक्रमापर्यंत सगळ्यांचं श्रेय स्वत:च्या नावावर करत बस अशी अतिमहत्वाची कामं न करता, आयुष्यभर पेनीसिलीनचा कारखाना काढ वगैरे भंपक उद्योग करत तेच आयुर्मान विनाकारण ५० वर्षांचं करून ठेवलं! त्याचमुळे काकांना जन्मयातना भोगाव्या लागल्या! काका त्यांचे वडील ३६ वर्षांचे असताना झालेले लेट चाईल्ड. नेहरूंनी भंपकपणा केला नसता तर काकांचे वडील बत्तीसाव्या वर्षीच गुडूप होऊन काकांचा जन्मच होऊ शकला नसता आणि जन्मयातना टळल्या असत्या. काकांना संसाररूपी भवसागरात गटांगळ्या खाव्या लागल्या त्याला जबाबदार नेहरूच! नेहरूंच्या अठरा वर्षात आयुर्मान अठरा वर्षांनी वाढलं. मोदीजींच्या अकरा वर्षात ते मोदीजींनी फक्त ६९ ते ७२ असं फक्त तीन वर्षांनी वाढू दिलं! लोकसंख्या नियंत्रणात मोदीजींचा हा मास्टरस्ट्रोक आठवला तरी काकांच्या डोळ्यात पाणी येतं.
आणि हे नेहरू इथंच थांबले नाहीत. त्यांनी स्वस्तातल्या शाळा काढून ठेवल्या. काकांच्या वडिलांनी त्यांच्या न कळत्या वयात त्यांना शाळेत घातलं. काका शाळेत गेले नसते तर आज बाबा बुवा होऊन करोडो रुपये कमावते, पण नेहरूंनी ती संधीही घालवली.
काका बी.कॉम झाले १९८० साली. मग नेहरू परिवार तिथंही आडवा आला. इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकृत करून ठेवलेल्या एसबीआयमध्ये काका चिकटले आणि काकांनी स्वत:ची प्रगती खुंटवून घेतली. मोदीकाळात असते तर बँकेत जन्मभर नोकरी करून काकांनी जे कमावलं ते एकच बँक लुटून त्यांना कमावता आलं असतं, मग जेटलींच्या कानावर घालून लंडनमध्ये स्थायिक पण झाले असते. मात्र नेहरू परिवारातली इंदिरा आली आडवी! काकांचं एसबीआयमधलं एसी आयुष्य फार त्रासदायक होतं. लंचटाईम, टी टाईम वगैरे वजा करता काकांना तिथं अडीच अडीच तास काम करावं लागायचं! वर्षात जेमतेम निम्मं वर्ष सुट्ट्या! ग्राहकांवर वसकता वसकता आयुष्य झिजत गेलं. पुण्याच्या बाहेर बदली कधी झाली नाही पण एका शाखेतून दुसर्‍या शाखेत बदली व्हायचीच. एकदा तर सर्वदूर अशा गुलटेकडी ब्रँचला पण त्यांची बदली झाली होती! पेठेतून तिकडे स्कूटरवरून जाण्यात दररोज पंधरा पंधरा मिनिटांचा प्रवास काकांना करावा लागायचा.
काकूंची अट होती. नवरा करीन तर बँकेतलाच. म्हणून मग काकांना संसाराच्या भवसागरात येऊन पडावं लागलं ते केवळ या राष्ट्रीयकृत झालेल्या बँकेच्या नोकरीमुळेच.
नोकरी ते नोकरी, वर पेन्शनचा ताप डोक्याशी आला. इंदिरा गांधींनी पेन्शन सुरू केली नसती तर आज काका एखाद्या खाजगी संस्थेत अकाऊंट लिहिण्यासाठी जाऊन यशस्वी उद्योजक होऊ शकले असते. पण ती संधीही घालवली नेहरू परिवारानं. मोदीकाळात काका असते तर पेन्शनच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका झाली असती. पैशांची आसक्तीच संपवून काका झोला उठा के इकडे तिकडे फिरले असते. मात्र बँकेनं फुकट भावात लोन दिल्यामुळे काका पेठेतल्या चाळवजा घरातून प्रभात रोडच्या दोन बीएचकेमध्ये आले आणि संसाररूपी रहाटगाडे चालू राहिले. अन्यथा काका अंगाला भस्म लावून हिमालयात तपाला जाते झाले असते. निरिच्छ झाले असते.
इंदिरा गांधी कशाबशा जात नाहीत तोच राजीव गांधी आले आणि त्यांनी कॉम्प्युटर आणले. इथं वेगळंच दु:ख काकांच्या मागे लागलं. बँकेचे मोठमोठे लेजर वगैरे फडताळातून काढताना काकांना सर्वांगसुंदर व्यायाम व्हायचा, तो राजीव गांधींनी नतद्रष्टपणे संपवला. पेनानं लिहिताना बोटांना छान व्यायाम व्हायचा, तो थांबला. जीवनयातना संपायला तयार नव्हत्या.
नाही म्हणायला वाजपेयी आले तेव्हा बँकांचं पण निर्गुंतवणुकीकरण होऊन बँका खाजगी होण्याची आशा पल्लवित झाली होती, पण काकांच्या कर्मचारी असोसिएशननं मोर्चे वगैरे काढून ती शक्यताही संपवली. काकाही मोर्चांना जायचे, पण मनात तेव्हाही खाजगीकरणाचा प्रखर राष्ट्रवाद रुंजी घालत असायचा.
नंतर मनमोहन सिंग आल्यावर तर कळस झाला! मनमोहन सिंगांनी काय ते जागतिकीकरण की काय ते स्वीकारलं आणि काकांच्या जन्मयातनांत भर पडली. काकांच्या संसारवेलीवर फुललेली दोन्ही फुले, कौस्तुभ आणि कौमुदी सॉफ्टवेअर इंजिनीयर होऊन सिलिकॉन व्हॅलीत स्थिर झाली. मनमोहन सिंग ना येते तर कौस्तुभ आज देशकार्यासाठी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बनून वर्गणी, खंडणी वगैरे गोळा करत फिरत असता आणि देशाला एक जाज्वल्य कार्यकर्ता मिळाला असता. कौमुदी एखाद्या सेविका समितीची अथवा टनाटनची कार्यकर्ती होऊन नदीपात्रात पत्रकं वाटण्याचं राष्ट्रकार्य करताना दिसली असती आणि काकांचा ऊर अभिमानानं भरून गेला असता. पण…
अशा या काकांच्या काँग्रेसकृत जन्मयातना. आणि हो, ही काँग्रेस काकांना फक्त जन्मयातनाच देऊन थांबली नाही. वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनी लावून काकांना मरणोत्तरसुद्धा लवकर ‘संपवण्याचं’ कारस्थान करून काकांना मरणयातनाही दिल्या आहेत.
यातनाच यातना म्हणजे ही नतद्रष्ट देशद्रोही काँग्रेस! असो.
(जाता जाता : काकांच्या नशीबी बाग आली ती पण ‘कमला नेहरू उद्यान’!)

Previous Post

हवाई वाहतूक का अधांतरी?

Next Post

वाहतूक नियमन

Next Post

वाहतूक नियमन

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.