□ ठाण्यातील भाजपच्या माजी शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा.
■ मुळात त्याला खंडणी म्हणणं चूक आहे, शहराध्यक्ष केअर फंड म्हणायला पाहिजे… मग गुन्हा कसा दाखल होईल?
□ मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकार्यांची सारवासारव.
■ ते तरी वेगळं काय करू शकतील? एकदा सत्ताधारी पक्षाची शाखा बनायचं ठरवल्यानंतर काही पर्याय आहे का?
□ देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे भेटीमुळे मिंधेंना टेन्शन.
■ आपण फार मोठे चाणक्य आहोत, असं सिद्ध करण्यासाठी आटापिटा चालू आहे. शांत राहून मौज बघतात शहाणी माणसं! मिंधेंनी जे गद्दारीनाट्य केलंय ते पाहता त्यांना आयुष्यभर टेन्शनमध्येच राहावं लागणार आहे. गरज सरली की लोक वैद्यालाही सोडत नाहीत.
□ धर्मादाय रुग्णालयांतील राखीव खाटांसह सर्व हिशेबाची कडक तपासणी होणार.
■ मग पुढे काय होणार? ते सांगा. हे असले कडक तपासणी वगैरे ड्रामे पुढे जाऊन तोडबाजीत आणि सेटिंगमध्ये रूपांतरित होतात, हे सगळ्या जनतेला माहिती आहे.
□ ‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही; कर्मचारी संपाच्या तयारीत.
■ यात बिचार्या रुग्णांचे हाल होणार. पण, सामान्यजनांनी आपल्यासारख्याच सामान्यजनांचे हाल केल्याशिवाय कशाचीच कसलीही तोशीस न पडणार्या सत्ताधारी वर्गाचे डोळे उघडत नाहीत, हे किती वाईट आहे.
□ निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच; नव्या प्रभागरचनेचे काम अडीच महिने चालणार.
■ कधीही फोडा, विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळणार!
□ मोदींच्या चाहत्यांची संख्या घटतेय; तरुणांमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली.
■ मुळात मोदींचे चाहते म्हणून जे आकडे सांगितले जातात, तेही बेडकीचा बैल करण्याचेच प्रकार आहेत. त्या बनावट आकड्यांना भुलून बेसावध लोक आपणही चाहते आहोत, असं सांगतात. अशी ही बनवाबनवी आहे.
□ मंत्रालयाबाहेर आंदोलक दिव्यांगांवर सरकारची दडपशाही.
■ आपापल्या घरात मरा, फास लावून घ्या, उडी मारा; मंत्रालयासारख्या अतिमहत्त्वाच्या लोकांच्या जागी येऊन त्यांचं काम का डिस्टर्ब करता. केवढी महान कामं तिथे चाललेली असतात, याची कल्पना नाही का तुम्हाला?
□ मोदींनी ११ वर्षांत केल्या ३३ चुका; काँग्रेसचा जबरदस्त प्रहार.
■ मोदींनी ३३ हजार चुका केल्या असल्या तरी सध्या जनता मोदुलीला दुदुली पाजण्याच्याच मूडमध्ये असेल, तर काँग्रेसने किंवा कोणत्याही शहाण्या माणसाने कितीही आपटून उपयोग काय?
□ अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट टीडीआर देण्याचा सरकारचा घाट.
■ एकदाच काय तो देशाचा सातबारा एकदमच करून टाका ना नावावर. निदान तो नवे तरुण चौकीदार तरी नेमेल, किमान लोकांना सुरक्षित ठेवण्याचं तरी काम करणारे!
□ पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कवडीमोल भावात ३ भूखंड लाटले; एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा आरोप.
■ एकदा पालक मंत्री आहे म्हटल्यावर बाकीचे सगळे शेपू, आंबट चुकाच की हो जलील भाई! पालक आहे, त्याचा हक्क आहे. त्याला कोण अडवणार?
□ रायगडमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकांची १ हजार ७३ पदे रिकामीच.
■ काय करायचे आहेत शिक्षक? मुलांनी तरी काय करायचं आहे शिकून? भजी तळा, चहाचे ठेले टाका.
□ ट्रम्प पुन्हा नडताहेत… म्हणे आता काश्मीर प्रश्नही निकाली काढणार!
■ तो वेडा काहीही बडबडू दे, आपल्याकडचे सर्वोच्च नेते तोंडाला कुलूप लावून का बसलेले आहेत… असं ट्रम्पच्या बुडाखाली त्यांचं अडकलंय तरी काय?
□ कांदिवलीत पालकमंत्र्यांसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी.
■ अजून तरी काही फार झालेलं नाही. जसजशा निवडणुका जाहीर होतील, तसतशा या लाथाळ्या बाहेर यायला लागतील. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तो याहून भयंकर असेल.
□ अॅपल आयपॅडअभावी सरकारची ई-कॅबिनेट प्रणाली कागदावरच.
■ कशाला हवंय ई कॅबिनेट? जी काही थोर कामं सुरू आहेत गुजरातची झोळी भरण्याची, ती थोड्या कमी गतीने झाली तर बिघडतं काय? दिल्ली आणि अहमदाबादवाले सांगतील त्याला डोकी हलवायची आहेत, तर उगाच
आयपॅडचा खर्च कशाला?
□ हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला होऊ शकतो – संरक्षणतज्ज्ञ प्रवीण साहनी यांचा सावधगिरीचा इशारा.
■ त्या हल्ल्यापेक्षा त्याचं वार्तांकन करण्याच्या नावाखाली वृत्तवाहिन्या काय नंगानाच करतील, त्याचीच भीती जास्त वाटत असेल शहाण्या माणसांना.
□ नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला; भूमीपुत्र रस्त्यावर उतरणार.
■ दीनदयाळ उपाध्याय विमानतळ नाव द्या, विषय संपवा. ते कोण आहेत आणि त्यांचा संबंध काय, हे विचारण्याच्या फंदात पडू नका.