महाराष्ट्रात मराठी अस्मितेची पहाट उगवली. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन करून मराठी मनात स्वाभिमानाची ठिणगी टाकली, यातून ज्वालामुखीचे रूप धारण केले. त्यातून उसळलेल्या लाव्हारसासारख्या या ठिणग्या शिवसेनेच्या आंदोलनातून, चळवळीतून अधिकाधिक उडवल्या गेल्या.
‘महाराष्ट्रात मुंबई होती परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता,’ अशी परिस्थिती ६०च्या दशकात होती. मुंबईवर हक्क भूमिपुत्राचा म्हणजे मराठी माणसाचा होता. परंतु दुर्दैवाने सर्वच क्षेत्रात तो त्याचा जन्मसिद्ध हक्क डावलला जात होता. भारतीय घटनेने दिलेल्या संवैधानिक हक्कावर गदा आणली जात होती. परप्रांतीयांसाठी मुंबई ही दुभती ‘गाय’ होती, तर मराठी माणसासाठी ती ‘माय’ होती. त्यामुळे मुंबईवर होणार्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एका आक्रमक संघटनेचा जन्म होणे ही काळाची गरज होती. ही गरज व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी ओळखली. मग त्यांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम सुरू केले. हाती कुंचला आणि लेखणी होतीच. त्याचे फटकारे ‘मार्मिक’ साप्ताहिकात प्रथम दिसू लागले. १९ जून १९६६ शिवसेनेचा जन्म म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीची वङ्कामूठ ठरली.
शिवसेनाप्रमुखांनी शून्यातून शिवसेनेचे ब्रह्म निर्माण केलेले आहे. बाळासाहेबांच्या जीवनातील तपस्या म्हणजेच शिवसेना. त्यांनी अभ्यास करून, चिंतन करून महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील जनतेची नाडी पकडली. शिवसेना उभी करीत असताना बाळासाहेबांनी अपार कष्ट घेतले. मराठी माणसांचा आणि विशेषत: मुंबईतील मराठी माणसांच्या मनाचा वेध घेऊनच शिवसेना प्रक्षेपित झाली आणि क्रमाक्रमाने ती मराठी माणसांचा हुंकार ठरली.
शिवसेनाप्रमुखांच्या हाकेला मुंबई-ठाण्यातील मराठी माणसाने भरभरून प्रतिसाद दिला. ती मुंबईत-ठाण्यात प्रथम वाढली. तिचे पडसाद नंतर महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उमटू लागले. मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिवसेना फोफावली. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे सूत्र सुरुवातीपासून अंगिकारल्यामुळे शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही चांगला प्रतिसाद मिळाला. १९६७ साली प्रथम ठाणे नगरपरिषद आणि नंतर १९६८ साली मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम लढलेल्या निवडणुकीत शिवसेनेला देदीप्यमान यश प्राप्त झाले. शिवसेनेची घोडदौड सुरू झाली.
१९८४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांनी विधानसभेत ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला जात आहे’ असे विधान केले. या विधानातला गर्भित धोका इतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना कळला नाही, उमगला नाही. पण तो बाळासाहेबांनी ओळखला. मग शिवसेनाप्रमुखांनी त्या विरोधात जोरदार आवाज उठवला. झोपी गेलेला मराठी माणूस जागा केला, संघटित केला. केंद्रात आणि राज्यात पाशवी बहुमत असलेल्या काँग्रेसला हादरा दिला आणि १९८५ साली मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा प्रथम फडकवला.
१९८५ साली शिवसेनेने मुंबईवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. ‘मुंबई जिंकली, आता महाराष्ट्र जिंकणार,’ अशी गर्जना करीत शिवसेनेची महाराष्ट्रात घोडदौड सुरू झाली. महाराष्ट्रात शिवसेनेचा पसारा वाढू लागला. मराठवाड्यातील जुलमी निझामाच्या अन्यायाचा इतिहास मराठवाड्याच्या जनतेच्या मनातून जात नव्हता. तिथे काँग्रेस मजबूत होती. तेथील जनतेचे प्रश्न मार्गी लागत नव्हते. त्याचबरोबर तेथील हिंदूंवरील अन्याय हा एक महत्वाचा प्रश्न होता. ‘जिथे प्रश्न तिथे शिवसेना’ हे समीकरण तोवर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रुजले होते. मुंबई-ठाण्यात मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध लढणार्या शिवसेनेविषयी मराठवाड्यातील जनतेला आकर्षण वाटत होते. तिथे शिवसेना कार्यरत होती, पण मुंबईएवढा प्रभाव तिथे नव्हता. १९८७च्या शिवसेनाप्रमुखांच्या संभाजीनगरमधील पहिल्याच जाहीर सभेने तेथील जनता प्रभावित झाली. ही विक्रमी सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात यशस्वीरित्या पार पडली. सभेला ‘न भूतो, ना भविष्यती’ अशी गर्दी उसळली होती. या गर्दीचे रूपांतर मतदानात होणार नाही असा अंदाज शिवसेना विरोधकांनी आणि काही राजकीय भाष्यकारांनी व्यक्त केला. पण १९८७च्या संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेत शिवसेनेने मुसंडी मारली आणि पदार्पणातच सर्वाधिक शिवसेना नगरसेवक निवडून आले.
एव्हाना महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेनेने आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते. मुंबईतील मराठी माणसांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब-वंचित समाजालाही शिवसेनाच आपली तारणहार आहे असे वाटू लागले. कारण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संकटसमयी सर्वप्रथम शिवसेनाच धावून येत होती आणि मदतीचा हात देत होती. १९८७ची मुंबईतील विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि जिंकली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी दाखवून दिले. त्यावेळी भाजपाचे चाणक्य प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांची आणि शिवसेनेची महाराष्ट्रातील ताकद ओळखलाr. भाजपाने शिवसेनेशी युती करण्याचे महत्त्व-गरज भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांना प्रमोद महाजनांनी पटवून दिले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती झाली.
१९९१-९२मध्ये अतिरेक्यांनी मुंबईत घडवलेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर उसळलेली धार्मिक दंगल यामुळे मुंबईकर हादरला, तेव्हा हिंदूंच्या रक्षणार्थ शिवसेना रस्त्यावर उतरली आणि प्रतिकार केला. त्यामुळे शिवसेना हिंदूंची तारणहार बनली.१९९५ सालची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्रित लढवली आणि यश संपादन केले. महाराष्ट्रात प्रथमच खर्या अर्थाने काँग्रेसविरोधी सरकार सत्तेवर आले. शिवसेनेचे प्रिं. मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेना प्रथमच महाराष्ट्राच्या सत्तेवर आली. पण सत्ता पुढे टिकली नाही. यानंतर २००५-०६ साली नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी १९९१ साली छगन भुजबळ तर १९९७ साली गणेश नाईक यांनीही शिवसेनेपासून फारकत घेतली होती. एखादी संघटना वाढत असताना पडझड होतेच, हा निसर्गानियम आहे. पण ज्यांनी शिवसेना सोडली ती सर्वार्थाने स्वार्थासाठी, सत्तेसाठी सोडली. आत्मसन्मान वगैरे फक्त पक्ष सोडण्यासाठीचे कारण होते. अपमान होतो हा त्यांचा बहाणा होता.
ज्यांनी गद्दारी केली, शिवसेना सोडली, त्या सर्वांनी बाळासाहेब व उद्धवजींच्या सान्निध्यातच जीवनाला आकार दिला होता आणि बाळासाहेबांच्याच कृपेमुळे त्यांना आमदारकी प्राप्त झाली होती. बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने नारायण राणे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. एकनाथ शिंदे यांना तर उद्धवजींनी विरोधी पक्षनेता, मंत्री केले. स्वत: मुख्यमंत्री असतानाही शिंदे यांना नगरविकास खाते दिले. ही बहुतेक मंडळी नावलौकिकास आली आणि ‘रंकाचे राव झाली’ ती फक्त बाळासाहेबांच्या कृपेमुळे आणि शिवसेनेच्या कृपेमुळेच, आपल्या कर्तबगारीने नाही. शिवसेनाप्रमुख नसते तर या मंडळीतील काही वरळीत मटक्याचे दुकान थाटून बसले असते, तर काहींनी दारूची दुकाने चालविली असती. काही मंडळी सुपार्या घेऊन मुडदे पाडणारी झाली असती आणि काही गजाआड राहिली असती. यांनी आपल्या कातडीचे जोडे शिवून बाळासाहेबांच्या पायात घातले असते तरी ते कमी पडले असते. संघटना, पक्ष म्हटले की मतभेद आलेच. मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु शिवसेनेने एक तोल राखलेला आहे हेही विरोधकांना मान्य करावे लागेल.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने शिवसेनेशी असलेली २५ वर्षाची जुनी युती तोडली. मग शिवसेना स्वतंत्र लढली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारासाठी महाराष्ट्र ढवळून काढला आणि स्वबळावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. सत्तेची चटक लागलेले खोटे-नाटे आरोप करून पक्षाशी गद्दारी करतात. याचा प्रयत्न जून २०२२मध्ये पुन्हा आला. नोव्हेंबर २०१९मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपाचे ११५ आमदार निवडून आले असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवता आले नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तयार होऊन बलाढ्य भाजपाला पर्याय उभा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार व्यवस्थित चालू असणे हे भाजपाला पाहवत नव्हते. त्यांनी एकसंघ शिवसेनेला फोडण्यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आदी शासकीय यंत्रणांचा खुनशी वापर केला. शिवसेनेतील काही राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारी मंडळी त्यांच्या गळाला लागली. शिवसेनेत फूट पडली. फुटीर आणि गद्दार टोळीच्या हाती महाराष्ट्र गेला. त्यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला. भाजपाच्या वळचणीला गेलेल्या निवडणूक आयोगाने उफरटा न्याय दिला. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या फुटीर शिवसेनेला मिळाले. त्यासाठी शिवसेनेची न्यायालयीन लढाई अजूनही सुरू आहे.
सत्ता आणि पैशाच्या जोरावर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शिवसेना संपणार नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊ खासदार निवडून आले. भाजपाचे आठ तर शिंदे सेनेचे सात खासदार निवडून आले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले नसले तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे २० आमदार निवडून आले. त्यापैकी एकट्या मुंबईतून १० आमदार निवडून आणून आणि लोकसभेचे तीन खासदार निवडून आणून उद्धव ठाकरे यांनी मुंबईवरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे सर्व ताकदीनिशी सज्ज झाले आहेत. मुंबईवरचा मराठी ठसा पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल.
गेल्या ५९ वर्षात शिवसेनेने अनेक वादळे पाहिली, झेलली आणि वादळांना तोंड देत पुढे गेली आहे आणि जाणार आहे. सत्ता ही शिवसेनेची गरज कधीच नव्हती. पण शिवसेनेची गरज महाराष्ट्राला आहे. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. ‘शिवसेना’ एक विचार आहे, आचार आहे, एक शक्तिशाली प्रवाह आहे. शिवसेनेचा एक ‘धाक’ आहे. महाराष्ट्रातील घसरलेल्या आणि गोंधळलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला शिवसेनेचा हा धाकच तारणार आहे.