किरण माने
‘छे छे… अरे किरण, मित्रा दोन हजार पंचवीस साल आहे हे. आता कुठं राहिलीय बुवाबाजी? हवेतून अंगारा काढणं वगैरे थोतांड आहे हे कळलंय लोकांना. लोक हुशार झालेत. विज्ञान वगैरे शिकलेत. ते अशा गोष्टींना भुलत नाहीत,’ तर्जनीतल्या अंगठीशी चाळा करत माझा एक अभिनेता मित्र म्हणाला.
मी विषय बदलत त्याला विचारलं, ‘तुझ्या अंगठीत खडा आहे तो माणिक आहे का?’
तो खळखळून हसला. ‘पुष्कराज आहे,’ असं म्हणत त्यानं तो खडा कपाळाला लावला, ‘को ऊं बृं बृहस्पती नम:’ असं काहीतरी पुटपुटला आणि म्हणाला, ‘गुरुजींनी घालायला सांगितला. मनासारखं कामच मिळत नाही रे. पैसा मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही. पुष्कराजमुळे फरक पडेल असं म्हणालेत गुरुजी. जरा ओढाताण करून वडिलांच्या पेन्शनचे पैसे उसने घेऊन घेतली अंगठी. बघू.’
पुन्हा तो खडा त्यानं कपाळाला लावला.
मला काय बोलावं हेच कळेना… ‘हीच ती बुवाबाजी.’ असं त्याला सांगावंसं वाटलं. आपल्या अख्ख्या लाइफची सगळी झंझट मिटवायला आपलं कर्तृत्त्व पुरेसं नाही, तर एखाद्या ज्योतिषानं चमत्कार करावा असं वाटणंच बुवाबाजीला जन्म देतं. कुणीतरी बुवाबापू जादूची पोतडी घेऊन येईल आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स मिटतील, या आशेपोटी माणूस कशावरही विश्वास ठेवायला लागलाय.
लोकांची फसवणूक करणार्या अशा अनेक चमत्कारांसारख्या निर्बुद्ध गोष्टींना तुकोबारायांनी कायम नाकारलं. बहुजनांनी यात अडकू नये, आपला बहुमुल्य वेळ आणि पैसा अनाठायी खर्च करू नये यासाठी अनेक अभंग लिहिले. लोकांना भुलवण्याचे कपट करणार्या वृत्तीविरोधात लिहिताना तुकोबाराया म्हणतात,
कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक ।।
तुमचे करितो कीर्तन । गातो उत्तम ते गुण ।।
दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी ।।
नाही शिष्यशाखा । सांगो अयाचित लोकां ।।
नव्हे मठपति । नाही चाहुरांची वृत्ति ।।
नाही देवार्चन । असे मांडिले दुकान ।।
नाही वेताळ प्रसन्न । काही सांगो खाण खुण ।।
नव्हे पुराणिक । करणे सांगणे आणीक ।।
नेणे वाद घटा पटा । करिता पंडित करंटा ।।
नाही जाळीत भणदी । उदो म्हणोनि आनंदी ।।
नाही हालवीत माळा । भोवते मेळवुनि गबाळा ।।
आगमीचे कुडे नेणे । स्तंभन मोहन उच्चाटणे ।।
नव्हे यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ।।
…मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट करत नाही.
…मी तुमच्यासाठी कीर्तन करतो आणि तुम्ही उत्तम गुणांचा अंगीकार करावा यासाठी गायन करतो.
…मी दु:ख किंवा संकट निवारणासाठी जडीबुटी देत नाही. हवेतले, बिनबुडाचे चमत्कार करून दाखवत नाही.
…माझी शिष्यशाखा नाही. अवचित माझ्याकडे कोणी लोक आले, तर त्यांना काही सल्ले देतो, इतकंच.
…मी मठपती नाही, कुणाकडून चाहुरभर जमीन उकळावी अशी माझी वृत्ती नाही.
…मी देवपूजेच्या नावावर धंदा करणारं दुकान मांडलेलं नाही.
…मला वेताळ वगैरे प्रसन्न आहे अशा गोष्टी सांगून मी तुम्हाला काही खाणाखुणा सांगून फसवणार नाही.
…मी तसला पुराणिक नाही, जो सांगतो वेगळंच आणि करतो वेगळंच.
…मी घटा-पटाचा वाद करणारा करंटा पंडित नाही.
…मी ‘उदो’चा जयघोष करत आनंदानं धूप जाळत नाही.
…मी अवतीभवती भोळ्या गबाळ्या लोकांना जमवून माळा हलवत नाही.
…मी धर्मशास्त्रात असलेल्या गूढ दुर्बोध गोष्टी जाणत नाही. मी लोकांना जागेवर बसायला लावणं, संमोहित करणं, मंत्र म्हणून दु:ख, रोगाचं उच्चाटन करणं अशा विद्या जाणत नाही.
…तुका अंधश्रद्धेच्या नरकात वास्तव्य करणार्या लोकांसारखा वेडापिसा नाही.
तुकोबारायाच्या काळात बहुजन अज्ञानी होते. अशिक्षित होते. गरीबी आणि शोषणामुळं त्रासलेले होते. त्यामुळे त्यांना फसवणं सोपं होतं. दुर्दैव असे आहे की आज शिक्षण घेऊनसुद्धा लोकांची मानसिकता गुलामगिरीचीच राहिली आहे. आजही चमत्कार दाखवणार्या बुवाबापूंची चलती आहे. शिकलेले लोक भ्रामक आणि बिनडोक गोष्टींवर विश्वास ठेवतात.
‘रोज चमचाभर शेण खा, तुम्हाला मुलगा होईल.’
ठेवला विश्वास.
‘रोज गोमूत्र प्या, कॅन्सर होणार नाही.’
ठेवला विश्वास.
‘अमकीकडं गुप्त खजिना आहे. पाच लाख रुपये खर्चून विधी करावा लागेल.’
ठेवला विश्वास.
लोक राहत्या घराच्या भिंती पाडून किचन इकडे आणि पलंग तिकडे अशा गोष्टी करायला लागले आहेत. कमोडवर बसल्यावर आपलं तोंड कुठल्या दिशेला पाहिजे हेसुद्धा लोक ‘गुरुजीं’ना विचारून ठरवतात तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही.
हे सगळं कुठपर्यत पोहोचतं माहीतीये?
‘ही क्रीम वापरा, सात दिवसात गोरा रंग!’
‘हा साबण वापरून अंग धुवा, दिवसभर फ्रेश!’
‘हा परफ्युम अंगावर मारल्यावर मुली दणादणा पळत तुमच्यामागे लागतील?’
हे काय आहे? दोन हजार पंचवीस सालीही असल्या खोट्या स्वप्नांना भुलणारी माणसं आहेत, म्हणजेच इथं अंधश्रद्धा आहे. विज्ञानानं दिलेल्या मोबाईलपासून चष्म्यापर्यंत सगळं रोज आपण वापरतो, पण आपला मेंदू दिवसेंदिवस तर्कशुद्ध आणि विवेकी विचारांपासून कित्येक मैल दूर चालला आहे.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकलेले तरुण-तरुणी पत्रिका जुळवून लग्न करतात. अमकीला वा तमक्याला ‘मंगळ’ वगैरे आहे म्हणून नकार देतात. ज्योतिषाला कुंडली दाखवून नोकरी किंवा व्यवसायासारखे अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतात. अशा काळात साडेतीनशे वर्षांपूर्वीचे तुकोबाराया काळाच्या किती पुढचे आणि विवेकी होते हे दाखवणारे अनेक अभंग आहेत.
काही लोक आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडे नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम महाराज अशा लोकांवर टीका करतात. सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावं, असंच सांगू इच्छितात. एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे,
सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।।१।।
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।२।।
रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ।।३।।
तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ।।४।।
शकुन-अपशकुनांवर तुकोबांचा अजिबात विश्वास नव्हता. अंतर्ज्ञानानं, भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगणार्या ज्योतिषी, मांत्रिक वगैरेंचा पोकळपणा त्यांनी जाणला होता. त्यामुळे अशा लोकांचं थोबाडही पाहायला आपल्याला आवडत नाही असं तुकोबाराया म्हणतात. आपल्याला रिद्धिसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, आपण ‘वाचासिद्ध’ आहोत, म्हणजेच आपण बोलतो ते घडतं असं काही भोंदू म्हणतात. हे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं तुकाराम महाराज म्हणतात.
तुकोबा विवेकी विचारसरणीचे होते. विवेकी माणूस ऐकलेली गोष्ट नीट पडताळून पाहून, परीक्षा करून मग खरं-खोटं, योग्य-अयोग्य ठरवतो. मूर्ख माणूस दुसरा सांगेल ते ऐकून आंधळा विश्वास ठेवतो. आज आपण सगळे सुशिक्षित आहोत. कुठलीही गोष्ट असूद्या…
व्हॉटसअपवरचा फॉर्वर्डेड मेसेज असू द्या किंवा न्यूज चॅनलवरची बातमी असू द्या. त्या गोष्टीची नीट, चारही बाजूंनी, मेंदू वापरून चिकित्सा केल्याशिवाय आंधळेपणानं विश्वास कसा ठेवू शकतो आपण? ‘बहुजनांनो, ‘आपली बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य’, ‘आपला विवेक वापरायचा अधिकार’ या निसर्गानं आपल्याला दिलेल्या खूप मोलाच्या देणग्या आहेत, त्याचा व्यवस्थित वापर करा.’ हे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या चार्वाक, बुद्ध, बसवण्णा, चक्रधरस्वामींपासून साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या तुकोबारायांपर्यंत सगळ्या महामानवांनी आपल्याला कानीकपाळी ओरडून सांगितलं. चार्वाकाला लोकांनी जाळून मारलं. चक्रधरस्वामी अचानक बेपत्ता झाले. आपल्या तुकोबारायांविषयी सांगितलं की, ‘तुकोबा गरूडावर बसून वैकुंठी गेले’ आणि आपण ‘विवेकबुद्धी’ गहाण ठेवून विश्वास ठेवला!
मित्रहो, आता तरी आपण तुकोबांनी दिलेला हा विवेकाचा आवाज बुलंद करूया. तुकाराम गाथेतला अनमोल विचार पुढच्या पिढीत रूजवूया, मुरवूया, भक्कम करूया. गाथेतले अभंग वाचून किमान आपल्या घरात तरी ते आपण करू शकतो. एवढं जरी आपण केलं, तरी या महापुरुषांचं आपल्यासाठी जगणं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी मरणंसुद्धा सार्थकी लागेल!
आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करू नाश आयुष्याचा!
सकळांच्या पाया माझे दंडवत.. आपुलाले चित्त शुद्ध करा!!
तुका म्हणे हित होय तो व्यापार.. करा, फार काय शिकवावे?