२०१६ सालातली गोष्ट.
कोलकात्यात एक फ्लायओव्हर कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ लोक मरण पावले होते. परिधानमंत्री, प्रचारमंत्री, विदेशात संचार-मंत्री आणि मग उरलेल्या वेळात पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी म्हणाले होते, हा फ्लायओव्हर कोसळण्याची घटना म्हणजे देवाचा संदेश आहे… आता तरी तृणमूल काँग्रेसपासून पश्चिम बंगालला वाचवा, असा संदेश…
…त्यानंतरचं त्यांचं इतिहासात अजरामर होण्याच्याच योग्यतेचं वाक्य होतं, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निर्लज्जपणे या दुर्घटनेचं राजकारण करत आहेत!!..
…नऊ वर्षांनी गुजरातमध्ये अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनकडे झेपावलेलं एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर विमान अवघ्या ४० सेकंदांमध्ये एका मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर कोसळलं आणि त्यात विमानातले एक सोडून सगळे प्रवासी, कर्मचारी आणि होस्टेलमधले विद्यार्थी, कर्मचारी मरण पावले… मोदी यांच्या प्रवचनांनुसार विरोधी पक्षात इतके निर्लज्ज, सत्तापिपासू नेते असतानाही त्यांच्यापैकी कोणीही यावेळी मोदींना विचारलं नाही की आता गुजरातच्या जनतेसाठी देवाने काय संदेश दिला आहे?
मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा राज्याचे गृहमंत्री आरआर आबा पाटील हे ‘बडे बडे शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे होते हैं’ असं म्हटल्याचं प्रसृत झालं. आपण असं कधी काही बोललोच नाही, हे नंतर त्यांनी अनेक मित्रांना, पत्रकारांना सांगितलं. पण आबांना राजीनामा द्यायला लागला.
याच हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी तीन वेळा, तीन ठिकाणी वार्ताहरांशी बोलताना वेगवेगळे कपडे घातले होते. तेव्हा प्रसंग कोणता आणि हे करतात काय, अशी टीका त्यांच्यावर झाली होती. त्यांनाही राजीनामा द्यायला लागला होता.
या हल्ल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे ताजमहाल हॉटेलच्या पाहणीला आपले अभिनेते चिरंजीव रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना सोबत घेऊन गेल्यानंतर त्यांना हल्ल्याचं गांभीर्य नसल्याची टीका झाली होती. त्यांनाही राजीनामा द्यायला लागला होता.
हे सगळे आता त्रेतायुगातले प्रसंग वाटतात. असे हल्ले, अशा दुर्घटना घडल्यानंतर सरकारने जबाबदारी घ्यायची असते, नेत्यांनी फोटोजीवी इव्हेंटबाजी करायची नसते, याचं प्रखर भान या देशातल्या जनतेला, प्रसारमाध्यमांना कधीकाळी होतं.
ते कुठे आणि कसं हरवलं?
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विमान पडण्याच्या दुर्घटनेचं कारण निश्चित होण्याच्या आधीच, तो अपघातच आहे, असं ठरवून टाकलं. वर ‘अपघात हे अपघात असतात, ते कोणीच थांबवू शकत नाहीत’ असलं अशास्त्रीय आणि बेजबाबदार विधान केलं. विचार करा, जगातल्या सगळ्या वाहनांची सर्व प्रकारची तपासणी बंद करून, वाहतुकीचे नियम आणि वाहतूक पोलिस विभागच रद्द करून मग वाहतूक सुरू केली तर काय होईल? सगळ्या जगभर अपघातांची मालिकाच सुरू होईल आणि लक्षावधी माणसं मरतील. आज तसं होत नाही, कारण अनेक अपघात टळतात. ते का टळतात, तर सतत उपाययोजना केल्या जातात म्हणूनच ना! अपघात कोणी थांबवू शकत नाही, असं देशाच्या गृहमंत्र्याने म्हणणं म्हणजे एखाद्या चौकातल्या, आपलं काम सोडून चहावाल्याबरोबर गप्पा छाटत बसलेल्या वाहतूक हवालदाराने एखादा अपघात झाल्यावर हात वर करून मोकळे होण्यासारखे आहे.
पंतप्रधान मोदी विमान अपघाताच्या ठिकाणी गेले हे त्या मृतांचं भाग्यच; आजवर मणिपूरला जाऊ न शकलेल्या नॉनबायॉलॉजिकल सत्पुरुषाने इकडे भेट दिल्यामुळे वर त्यांना मोक्षच लाभला असणार! त्यांनी जाऊन विमानाच्या अवशेषांच्या खाली उभे राहून कलात्मक अँगलने फोटो काढून घेतले. दुसर्या दिवशीच्या पेपरांमध्ये पहिल्या पानावर मीच पाहिजे. मला पाहिलं नाही तर देशवासियांना चहा गोड लागणार नाही, नाश्त्याचा घास त्यांच्या घशाखाली उतरणार नाही, असा परोपकारी दृष्टिकोन. २६/११चा हल्ला झाला तेव्हा हा देशावरचा हल्ला आहे, सगळ्यांनी एकजुटीने त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना दाखवण्याच्या ऐवजी तेव्हाच्या भाजपने आणि तेव्हाच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी (जे आज पंतप्रधान आहेत) पत्रकार परिषदा घेऊन तत्कालीन सरकारवर टीकेची झोड उठवली होती. देशावरच्या हल्ल्याचं नीच राजकारण करू नका, असा सल्ला तेव्हा त्यांना कुणी दिला नव्हता. पहलगामच्या हल्ल्यानंतर मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीने सरकारला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. ऑपरेशन सिंदूरची पाठराखण केली. खुद्द सरकारप्रमुख आणि परराष्ट्र मंत्री हे दोघेही सगळं जग फिरत असताना आणि नेत्यांना बळेबळे पकडून मिठ्या मारत असताना भूतानसारखा देशही भारताच्या मागे उभा राहिला नाही. तेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेलीच शिष्टमंडळं पाठवावी लागली. शशी थरूर यांनी जेवढा प्रभाव त्या दौर्यात पाडला, तेवढा देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांना संपूर्ण कारकीर्दीत पाडता आला नव्हता.
आता निवडणुका आल्या, प्रचार सुरू झाला की मोदी आणि शाह त्यांच्या मूळ वळणावर जातील आणि याच विरोधी पक्षांबद्दल, त्यांच्या नेत्यांबद्दल गलिच्छ शब्दांत गरळ ओकण्याचा कार्यक्रम जोरात सुरू होईल. आश्चर्य वाटते ते यूपीए सरकारच्या काळात सरकारचा संबंध असो वा नसो, हातात कसलाही पुरावा असो वा नसो, उठसूट याला त्याला धारेवर धरणार्या प्रसारमाध्यमांचे आणि फॉरवर्डबहाद्दर रिकामटेकड्या पेन्शनर काकांचे. पहलगामचा हल्ला असो की अहमदाबादचा अपघात- दोन्ही वेळा अतिरेक्यांच्या बंदुकांचा धूर विरून जायच्या आत आणि विमानाच्या ज्वाळा शमायच्या आत सरकारला क्लीन चिट देण्याचं काम या दोघांनी करून टाकलं. गोदी मीडियात आधी जमिनीवरची माणसं मेली, याची दखलच घेतली गेली नाही, मग विमानातली माणसं मेली, हे सोडून बातम्या कशाच्या तर दोन धर्मग्रंथ कसे सुरक्षित राहिले त्याच्या. कोणीतरी उद्वेगाने सोशल मीडियावर म्हणाल्याप्रमाणे आता त्या धर्मग्रंथांच्या पानांची विमाने बनवायची का? ती सगळ्यात सुरक्षित असतील कदाचित!
इतक्या मेंदूबधीर आणि संवेदनाबधीर झालेल्या देशात देवाने संदेश देऊन तरी उपयोग काय आहे म्हणा! तो ऐकणार कोण? शिवाय तो यांच्या मनासारखा नसेल तर देवालाही देशद्रोही ठरवून त्याची पाकिस्तानात रवानगी व्हायची!