गुरुदत्त खूपच कल्पक होते. पण त्यापेक्षा अधिक भावनाशील होते. ‘प्यासा’ ही कवीची शोकांतिका तर ‘कागज के फूल’ ही चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकाची शोकांतिका, जी त्यांच्याही आयुष्यात सत्यात उतरली. १९५९ मधील ‘कागज के फूल’ची चित्रपट कथा आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव जीवन यात कमालीचे साम्य राहिले.
– – –
संवेदनशील असणे हे मानवतेच्या मूल्यांपैकी एक मूल्य. मात्र कधीकधी अति संवेदनशीलता टोकाच्या भावनेत बदलते. माणसाने हळवे वा भाविनक असावे, पण भावनेच्या पुरात वाहून जाऊ नये. आत्मघाताचे विचार बहुतेक अशा वेळीच मनात थैमान घालत असावेत. ती व्यक्ती साहित्य, कला या क्षेत्रांतील विचारवंत असेल तर त्यांच्या लेखनातून, विचारातून वा कलाकृतीतून हे सर्व झिरपत राहते.
१९५७मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाची सुरुवात अशी आहे… ‘नायक एका बागेत झाडाखाली पहुडलेला आहे. त्याची नजर आकाशावर. आकाशात ढगांचे पांढरे पुंजके तर कधी पखं पसरून उडणार्या घारी तो बघतोय. मग बागेतल्याच एका फुलावर त्याची नजर जाते, ज्याच्यावर एक भुंगा घिरट्या घालतोय. अचानक तो भुंगा जमिनीवर बसतो आणि त्यावर कुणाचा तरी बूट घातलेला पाय पडतो… नायक एक क्षण त्या भुंग्याकडे बघतो, आकाशाकडे एक कटाक्ष टाकतो आणि उठतो’… चित्रपटातील हे दृष्य अवघ्या दोन मिनिटांचे, पण आशयाच्या दृष्टीने अत्यंत संपन्न असे. आकाश हा आपल्या स्वप्नांचा कॅनव्हासच असतो तर आकाशात उंच विहरणारे पक्षी म्हणजे आपली स्वप्ने… ही स्वप्ने म्हणजे खूप उंचावर असलेल्या ढगांच्या पुंजक्यासारखी इकडून तिकडे हलणारी. ती स्थिर नसतात. कधी त्याचे बरसणारे ढग होऊ शकतात, तर कधी वार्याने वाहून जाणारे न बरसणारे ढग. दिग्दर्शकाच्या या एकाच दृष्यातून चित्रपटात आपण काय पाहणार आहोत त्याची झलक दिसते. त्याच्या सोबतीला नायकाच्या गुणगुणण्यातून उमटणारी कविता… ये हँसते हुए फूल, ये महका हुआ गुलशन, ये रंग में और नूर में, भीगी हुअी राहें… नायकाचे आणि त्यांच्या स्वप्नांचे पुढे नेमके काय होणार आहे हे या दोन मिनिटांच्या प्रसंगातून अत्यंत समर्पकपणे मांडणारा संवेदनशील दिग्दर्शक अभिनेता म्हणजे गुरुदत्त… ‘प्यासा’च्या या पहिल्याच दृष्याने त्यावेळी सर्वांची मने जिंकून घेतली होती.
शिवशंकर पादुकोण व वासंती पादुकोण हे गुरूचे आईवडील. हे कुटुंब मूळचे कोकणातल्या चित्रपूरचे चित्रपूर सारस्वत. शाळेत मुख्याध्यापक असलेले त्याचे वडील नंतर बँकेत नोकरीला लागले तर गृहिणी असलेली आई नंतर शिक्षिका झाली. आईच्या अवघ्या सोळाव्या वर्षी झालेला मुलगा म्हणजे वसंतकुमार, जो नंतर गुरुदत्त झाला. आई घरी शिकवणी घ्यायची व सोबत अनेक बंगाली कथांचा कन्नडमध्ये अनुवाद करत असे. वसंतकुमारचा गुरुदत्त होण्यामागे आईच्या या लेखनाचा महत्वाचा वाटा आहे. लहानपणी आजी समईच्या प्रकाशात आरती म्हणत असे, तेव्हा किशोरवयीन वसंत आरतीसमोर बोटे नाचवून विविध मुद्रांची सावली भिंतीवर बघत बसे. यातूनच पुढे त्याच्यात नृत्याची आवड निर्माण झाली. कलेची आवड निर्माण होण्याला कधीकधी काळ्या प्रतिमा प्रेरणा देऊ शकतात. गुरुदत्तच्या चित्रपट कारकीर्दीत तर असंख्य प्रतिमांचा वापर झाला आहे.
वसंतकुमारचे बालपण खूपसे कलकत्त्यात गेले त्यामुळे असेल, पण बंगाली संस्कृती त्यांच्या हृदयात कोरली गेली. अभिनय आणि दिग्दर्शनाचा प्रवास सुरू होण्यापूर्वी तो ७५ रुपयांच्या शिष्यवृत्तीवर संगीत, नृत्य व नाटकाच्या तालमीसाठी अल्मोडाला पोहोचला. कुमाऊ हिमालय शृंखलेच्या एका पहाडावरील हे गाव साहित्यिक व सांस्कृतिक दृष्टीने प्राचीन काळापासून महत्त्वाचे. ‘उदय शंकर इंडिया कल्चरल सेंटर’ इथे वसंत पोहोचला तेव्हा तो होता १६ वर्षांचा आणि ते वर्ष होते १९४१. प्रसिद्ध सतारवादक पं. रवि शंकर यांचे ज्येष्ठ बंधू, प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांचं हे केंद्र. आपण कॉलेजचे शिक्षण पूर्ण हाईपर्यंत सहसा आपलं गाव सोडत नाही. ध्यासाने पछाडलेला वसंतकुमार १६व्या वर्षीच इतक्या दूर गेला. उदय शंकर व वसंतकुमार या दोघांनाही एकमेकांचे स्वभाव खूपच आवडले वसंतने उदय शंकर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. इथेच त्याने बंगाली संस्कृतीच्या प्रभावातून गुरुदत्त हे नाव वापरायला सुरुवात केली.
१९३९मध्ये सुरू झालेल्या दुसर्या महायुद्धाच्या झळा १९४४पर्यंत भारतातही पोहचल्या. परिणामी कलेचे हे केंद्र बंद झाले. गुरुदत्त परत कलकत्त्यात आला. काही काळ कलकत्त्याच्या ‘लिव्हर ब्रदर्स’ या कंपनीत टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं पण त्यात मन रमलं नाही. कलावंतांना कामाचा बंदिस्तपणा भावतच नसावा… कलकत्त्यातच त्याचा चित्रपट माध्यमाशी परिचय झाला. १९४४मध्ये तो आईवडिलांकडे मुंबईत परतला. तिकडे जपानमध्ये १९४५ साली जगातला पहिला अणुस्फोट झाला आणि साधारण याच काळात गुरुदत्तच्या आयुष्यातील एक कोंडी फुटली… पुणे येथील नामांकित प्रभात फिल्म कंपनीत त्याचा तीन वर्षांचा करार काकांनी करून दिला. व्ही. शांताराम हे प्रभातच्या मुख्य आधारस्तंभापैकी एक. इथे गुरुदत्त नृत्य दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी सर्वच कामे करायचा. इथेच त्याला देव आनंद आणि रहमान यांच्यासारखे मित्र मिळाले, जे आयुष्यभर सोबत रााfहले. देव आनंदशी तर मैत्री एकदम घट्ट झाली. दोघांमध्ये एक करारही झाला की आधी देव निर्माता झाला तर दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तला घेणार आणि आधी गुरुदत्त दिग्दर्शक बनला तर नायक म्हणून देव आनंदला घेणार. दोघांनीही वचन पाळले. देव आनंदने बाजी त्याच्या नवकेतनच्या दुसर्या निर्मितीमध्ये गुरुदत्तला दिग्दर्शक म्हणून पहिली संधी दिली. त्यानंतर गुरुदत्तने ‘सीआयडी’ या त्याच्या बॅनरच्या तिसर्या चित्रपटात देव आनंदला नायक म्हणून घेतले.
त्याआधी १९४४च्या काळात ‘श्रीकृष्ण’ व ‘चाँद’सारख्या चित्रपटांत गुरुदत्तने छोट्या भूमिका केल्या होत्या, तर १९४५मध्ये विश्राम बेडेकर यांच्या ‘लाखाराणी’मध्येही तो होता. १९४६मध्ये ‘हम एक हैं’ या चित्रपटासाठी त्याने नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पी. एल. संतोषी. (‘दामिनी’, ‘घायल’, ‘घातक’ या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे त्यांचे पुत्र). प्रवास वेडावाकडाच सुरू होता. त्याचा प्रभातचा करार १९४७ला संपला. पण आईने प्रभातचे सीईओ बाबूराव पै यांच्याकडे सहाय्यकाची फ्रीलान्स नोकरी मिळवून दिली. अमिया चक्रवर्ती (गर्ल्स स्कूल) आणि ग्यान मुखर्जी (संग्राम) या दोन दिग्गजांकडे त्याने काम केले. या कामानंतर तो १० महिने बेरोजगारच होता आणि माटुंग्याच्या घरी आईवडिलांसोबत बसून असायचा… आता काय करायचे? मग बसल्या बसल्या इंग्रजीतून लेखन सुरू केले. ‘दी इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या नियतकालिकात त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध व्हायला लागल्या.
खरा ब्रेक मिळाला तो जिवलग मित्र देव आनंदच्या ‘बाजी’ या चित्रपटात. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद बलराज सहानी यांचे होते. कथा क्राईम थ्रिलर. नायक बेकार तरुण… पैसे कमविण्यासाठी जुगार खेळणारा. हल्ली सोशल साईटवर चित्रपटातील गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाबद्दल बरेच वाचायला मिळते. पण चित्रपटसृष्टीने १९४२मध्येच अशा नायकाला जन्म घातला होता व त्या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडीतही काढले होते. नंतर प्रत्येक प्रसिद्ध अभिनेत्याने किमान एकदा तरी अशी भूमिका केली आहे. ‘चित्रपट बघून लोक गुन्हे करतात’ असे मानणार्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की या चित्रपटसृष्टीला वास्तवातल्या गुन्हेगारांनी भरपूर मॅटर उपलब्ध करून दिले आहे… असो… या चित्रपटातील मुख्य गायिका गीता रॉयबरोबर गुरुदत्तचे सूर जुळले आणि ते दोघे १९५३मध्ये विवाह बंधनात अडकले. याच चित्रपटातील सहनायिका कल्पना कार्तिकशी १९५४मध्ये देव आनंद विवाहबद्ध झाला. ‘बाजी’ सुपरहिट झाला. १९४६मधील ‘गिल्डा’ या हॉलिवुड चित्रपटावर हा चित्रपट बेतलेला होता. चार्ल्स विडॉर या दिग्दर्शकाचा हा चित्रपट अमेरिकेने ‘कल्चरली, हिस्टोरिकली आणि अॅस्थेटिकली सिग्निफिकंट’ म्हणून जपून ठेवला आहे.
१९५२मध्ये ‘जाल’ आणि १९५३मध्ये ‘बाज’ अशी परत दोन वेळा गुरुदत्तकडे दिग्दर्शनाची धुरा आली. मात्र हे चित्रपट त्याची जादू दाखवू शकले नाहीत. मात्र त्या तीन-चार वर्षांच्या काळात गुरुदत्तने आपली एक उत्तम टीम तयार केली. जॉनी वॉकर
(हास्य अभिनेता), व्ही. के. मूर्ती (छायाचित्रकार) आणि अबरार अल्वी (दिग्दर्शक, पटकथा आणि संवादलेखक) व नंतर आलेली वहिदा रहमान. नंतर यातील वहिदा रहमान हा दुवा मध्येच निखळला, मात्र बाकी सर्व गुरुदत्तच्या शेवटपर्यंत सोबत होते. ‘बाज’मध्ये गुरुदत्त पहिल्यांदा नायक म्हणून झळकला. १६व्या शतकातील मलबार बेटावरील ही कथा चांदोबा मासिकात शोभावी अशी. हा चित्रपट गुरुदत्तच्या पुढील चित्रपटांशी नाळ जोडणारा अजिबात वाटत नाही. डोक्यावर भली मोठी चायनी टोपी ठेवून घोड्यावर बसणारा गुरुदत्त नंतर कधी दिसला नाही. अर्थात ही त्याची जातकुळीही नव्हतीच… तो काही नायिकेच्या मागे गोलगोल फिरणारा नायक असणं शक्य नव्हतं… मुळात त्याच्यातील नायकावर दिग्दर्शक अधिक वरचढ होता. ‘बाज’मध्ये दुसरा कुणी अभिनेता सापडत नव्हता म्हणून ही भूमिका गुरुदत्तने केली. खरं तर अशा भूमिकेसाठी पी.जयराज, रजंन, दारासिंग, शेख मुख्तारसारखे नट अधिक योग्य ठरले असते.
१९५४मध्ये गुरुदत्त स्वत:च निर्माता झाला. ‘आरपार’ हा चित्रपटातून त्याने गाण्यांच्या टेकिंगवरची आपली मास्टरी दाखवून दिली. ‘प्यासा’मधील ‘जाने वो कैसे लोग थे जिनको…’ ट्रॅक इन आणि ट्रॅक आऊट या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर सिनेमाटोग्राफर व्ही. के. मूर्ती यांनी केला आहे. गाण्याच्या ओळीनुसार जेव्हा जेव्हा नायक तिच्याकडे कटाक्ष टाकतो तेव्हा तेव्हा फ्रेममधील नायिका हळूहळू फ्रेममधून लांब जाताना दिसते. शरीराने ती नजरेच्या टप्प्यात आहे पण हृदयापासून दूर होत जातेय… मूर्ती आणि गुरुदत्त यांची नाळ अप्रतिम जुळलेली होती. गुरुदत्त यांच्या मनातील सर्व संवेदना जणू काही मूर्ती यांच्या दृष्टीला दिसत असाव्यात, इतक्या उत्कटपणे ते चित्रण करीत असत. गुरुदत्त यांनीच त्यांना स्वतंत्रपणे छायाचित्रणाची पहिली संधी दिली आणि मग ते शेवटपर्यंत एकत्रच राहिले.
गुरुदत्त खूपच कल्पक होते. पण त्यापेक्षा अधिक भावनाशील होते. ‘प्यासा’ ही कवीची शोकांतिका तर ‘कागज के फूल’ ही चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकाची शोकांतिका, जी त्यांच्याही आयुष्यात सत्यात उतरली. १९५९ मधील ‘कागज के फूल’ची चित्रपट कथा आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव जीवन यात कमालीचे साम्य राहिले.
१९४४ ते १९६४ या कालावधीत ‘चाँद’, ‘लख्खा राणी’, ‘हम एक हैं’, ‘बाज’, ‘आरपार’, ‘मि. अँड मिसेस ५५’, ‘प्यासा’, ‘१२ ओ क्लॉक’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चाँद’, ‘सौतेला भाई’, ‘साहब बीबी और गुलाम’, ‘भरोसा’, ‘बहुरानी’, ‘सुहागन’ आणि ‘सांज और सवेरा’ अशा अवघ्या १६ चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला. यापैकी फक्त नऊ चित्रपटांत ते प्रमुख नायक होते. तर ‘बाजी’, ‘जाल’, ‘बाज’, ‘आरपार’, ‘मि. अँड मिसेस ५५’, ‘सैलाब’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ अशा फक्त आठ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. पण तरीही भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्वाचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. परदेशातही त्यांचे नाव आदराने घेतले जाई. भारताचा ‘ऑर्सन वेल्स’ (हे एक प्रतिभावान अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व निर्माते होते) अशीही त्यांची एक ओळख होती. लेखक अबरार अल्वी आणि जॉनी वॉकर हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र.
गुरुदत्त नायक असणार्या चित्रपटांची यादी बघितली तर लक्षात येते की त्यांचे कमर्शिअल चित्रपट चांगलेच चालले आणि कलात्मक म्हणून गौरविल्या गेलेल्या चित्रपटांची जागतिक स्तरावर दखलही घेतली गेली. जागतिक १०० क्लासिक चित्रपटात त्यांच्या ‘प्यासा’ आणि ‘साहब बीबी और गुलाम’चा अंतर्भाव आहे. म्हणजे ते यशस्वी कलावंत आणि दिग्दर्शक होते. मग असे का घडले असावे की त्यांना आपल्या आयुष्याला पूर्णविराम द्यावासा वाटला? अत्यंत भरात आलेली कारकीर्द अशी एका झोताने भिरकावली गेली? असे म्हणतात की प्रेमातली विफलता आणि आयुष्याचे वास्तव हे कलावंताचे दोन महाभयंकर शत्रू असतात. १९५१ मध्ये देव आनंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट ‘बाजी’चे काम सुरू झाले. चित्रपटाचे संगीतकार एस. डी. बर्मन यांनी गायिका गीता रॉयकडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होते गुरुदत्त. गाणी रेकॉर्ड होत असताना गुरुदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. नंतर गीता रॉयही त्यांच्या प्रेमात पडली. नंतर दोघांनी लग्न केले. गीता रॉय त्यांची पत्नी गीता दत्त झाली.
अनेकजण गुरुदत्त यांच्या आत्महत्येला वहिदा रहमान या अभिनेत्रीला जबाबदार धरतात पण ते खरे वाटत नाही. वहिदा त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता व ते गीता दत्तवर मनापासून प्रेम करत. पण एकाच क्षेत्रातील दोन यशस्वी व्यक्ती जेव्हा पती पत्नी म्हणून एकत्र राहू लागतात, तेव्हा बहुतेकदा इगोचे प्रश्न निर्माण होतात. गुरुदत्त यांना वाटायचे की गीता दत्त यांनी त्यांच्या चित्रपटाशिवाय इतरत्र गाऊ नये. बहुदा हाच मुद्दा वादाचा झाला असावा आणि ते एकमेकांपासून दुरावत गेले. अशा काळात नेमकी वहिदा त्यांच्या आयुष्यात आली. स्वत: वहिदाजींना हे माहीत होते की गुरुदत्त विवाहित आणि मुलांचे पिता आहेत. त्यांचा संसार विस्कटू नये म्हणून खरे तर त्या गुरुदत्तपासून लांब गेल्या असाव्यात. असो.
गुरुदत्त आणि गीता दत्त यांना तरुण, अरुण आणि नीना ही तीन मुलं. गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या निधनानंतर या मुलांचा सांभाळ गुरुदत्तचे बंधू आत्माराम आणि गीता दत्तचे बंधू मुकुल रॉय यांनी केला. आत्माराम हेही चित्रपटसृष्टीत निर्माते दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. ‘शिकार’, ‘चंदा और बिजली’, ‘उमंग’, ‘मेमसाहब’, ‘आरोप’, ‘रेशम की डोरी’ यासारखे यशस्वी चित्रपट त्यांनी केले, मात्र गुरुदत्त यांच्या प्रतिभेच्या जवळपासही ते फिरकू शकले नाहीत. गुरुदत्त यांचा मोठा मुलगा तरुण दत्त यांनी १९८४ मधील रेखा अभिनीत ‘बिंदिया चमकेगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दुसरा मुलगा अरुण दत्त यांची ‘साहब बीबी और गुलाम’चा रिमेक करायची इच्छा होती, पण ही दोन्ही मुले आता हयात नाहीत. दुर्दैवाने अरुण यांचा मृत्यू हीसुद्धा आत्महत्याच होता. गुरुदत्तची गादी ते चालवू शकले असते, पण तेही दारूच्या आहारी गेले होते. प्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी या गुरुदत्त यांची बहीण ललिता लाजमी यांच्या कन्या. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार आहेत. अमीर खान यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘तारे जमीन पर’मध्ये त्या पाहुणी कलाकार म्हणून दिसल्या. दीपिका पादुकोणही गुरुदत्तची नातेवाईकच आहे.
चित्रपटात शिस्त बाळगणारे गुरुदत्त खाजगी जीवनात मात्र अत्यंत बेशिस्त होते. प्रचंड धूम्रपान होतेच, त्यात त्यांना दारूचेही व्यसन लागले. खाजगी समस्येबद्दल मात्र ते कोणालाच काहीच सांगत नसत. अगदी जवळचे मित्र जॉनी वॉकर आणि अबरार अल्वी यांनादेखील. गुरुदत्तच्या मृत्यूनंतर दुर्दैवाने गीता दत्त यांनाही दारूचे व्यसन लागले. त्यांचे निधनदेखील वयाच्या ४१व्या वर्षी झाले. चित्रपटातला हळवा गुरुदत्त आणि वास्तवातला संवेदनशील गुरुदत्त हे सारखेच निघाले. वहिदा रहमान या अभिनेत्रीचे दूर जाणे ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी भळभळणारी जखम ठरली.
१० ऑक्टोबर १९६४च्या सकाळी गुरुदत्त मृत अवस्थेत आढळले. डॉक्टरांच्या अहवालानुसार अति मद्यसेवन आणि अति झोपेच्या गोळ्या त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. मृत्यूच्या वेळी ते अवघे ३९ वर्षांचे होते. ‘कागज के फूल’चा शेवटही असाच होता.