राहुल गांधीवर टीका करताना भाजप नेते आणि गोदी मीडिया ही गोष्ट पूर्णपणे विसरताहेत की, मुळात पंतप्रधान किंवा सरकारवर टीका म्हणजे लष्करावर टीका नाही. शस्त्रसंधीचा निर्णय हा लष्करी नसतो, तर राजकीय असतो.
– – –
‘मी भाजप आणि आरएसएसच्या लोकांना चांगलं ओळखतो. त्यांच्यावर थोडा दबाव टाकला की ते पळ काढतात. तिकडून ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हटलं की, मोदीजी काय करताय? नरेंदर, सरेंडर! आणि इकडे मोदीजींनी ट्रम्प यांच्या इशार्याचं पालन केलं…’
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन जून २०२५ रोजी भोपाळ येथे काँग्रेसच्या ‘संगठन सृजन अभियान’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या शब्दांत टीका केली. त्यांनी, विशेषत: ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरच्या घडामोडींवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यावरून राजकीय वाद-प्रतिवाद सुरू असतानाच शुक्रवारी (६ जून) पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी, नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या दबावात येऊन शस्त्रसंधी केल्याची टीका केली. बिहारमधील राजगीर इथे संविधान सुरक्षा संमेलनात बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की, ‘ट्रम्प यांनी किमान ११ वेळा म्हटलं आहे की त्यांनी पंतप्रधान मोदींना निर्णय घ्यायला भाग पाडलं. पण आपल्या पंतप्रधानांनी मात्र त्याविरोधात एकही शब्द उच्चारला नाहीये…’
राहुल गांधी एवढीच टीका करून थांबले नव्हते. त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतरच्या घडामोडींच्या संदर्भाने १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचं उदाहरण दिलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यावेळी अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या दबावाला न जुमानता स्वतंत्रपणे निर्णय घेत बांगलादेशची निर्मिती केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतरच्या घडामोडींबद्दल पंतप्रधानांना प्रश्न विचारताना, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना इंदिरा गांधींची आठवण काढणं, त्यांच्याशी पंतप्रधानांची तुलना करणं ही केवळ भाषणापुरतीची तात्कालिक प्रतिक्रिया नव्हती, तर त्यामागे एक सुनियोजित राजकारण असल्याचंही जाणवत होतं. दुसरीकडे या निमित्ताने भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अपयशही अधोरेखित झालं.
ज्या मध्य प्रदेशात बोलताना राहुल यांनी पहिल्यांदा ‘नरेंदर सरेंडर’ ही टीका केली, त्या राज्यात काँग्रेस पक्ष गेल्या २३ वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. तीन वर्षांनी म्हणजेच २०२८ साली मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पक्षाला नव्याने ऊर्जा देण्याच्या उद्देशाने ‘संगठन सृजन अभियान’ सुरू करण्यात आलं आहे. या अभियानातून राहुल यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचा आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर आक्रमक टीका केली.
लोकसभेच्या निवडणुका असोत की विधानसभा किंवा अगदी स्थानिक पातळीवरील निवडणूक असो, भाजपसाठी नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे यशाचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच देशाची सर्व आघाडीवर आगेकूच होत असल्याचा प्रचार भाजपकडून होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर देताना मोदींनी त्यांच्या पोलादी नेतृत्वाचा पुन्हा परिचय दिला, उरी असो, बालाकोट असो की ऑपरेशन सिंदूर… मोदींमुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो, असा प्रचार सातत्याने भाजपकडून केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपने मोदींची जी कणखर प्रतिमा निर्माण केली आहे, त्यावरच राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शिवाय त्यांची तुलना इंदिरा गांधींशी करून त्यांनी याचीही आठवण करून दिली की इंदिरा गांधी केवळ सर्जिकल स्ट्राइक करून थांबल्या नाहीत तर त्यांनी पाकिस्तानचे थेट दोन तुकडे केले. हा संदेश केवळ आपल्या कार्यकर्त्यांना नव्हता, तर ‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणणार्या भाजपच्या मतदारांसाठी सुद्धा होता.
भाजपकडून मोदी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे, हाही एक प्रचार केला जातो. पण ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी कृत्यांबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानबद्दल विरोधी मत तयार करणं भारताला आजतागायत जमलं नाही. इराण, तुर्कीये या देशांनी तर या संघर्षात थेट पाकिस्तानची बाजू घेतली. आयएमएफकडून पाकिस्तानला कर्ज मिळालं. आणि ज्या डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख पंतप्रधान ‘आपले जवळचे मित्र’ म्हणून करतात, त्यांनीच स्वतःहून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, व्यापाराची धमकी देत भारत-पाकिस्तानवर दबाव आणल्याचा उल्लेख केला.
परदेशांत भारताची बाजू मांडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात पाठवण्यात आलं होतं. त्यांपैकी एक शिष्टमंडळ २७ मे रोजी कुवेतला पोहोचलं होतं. आणि कुवेतने २८ मे रोजी पाकिस्तानच्या व्हिसा एन्ट्रीवर १९ वर्षांपासून जे निर्बंध लावले होते ते सैल केले. मग आपल्या शिष्टमंडळाचा काय उपयोग झाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचा वर्षानुवर्षांचा मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तानसोबत शस्त्रखरेदीचा करार केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या फोन कॉलचा उल्लेख करून राहुल गांधींनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरच एकप्रकारे प्रश्न उपस्थित केले.
अपेक्षेप्रमाणेच भाजपने राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांनी केलेली टीका म्हणजे ‘देशद्रोह’ असाच (आणि एवढाच) प्रचार भाजप नेते आणि सोशल मीडियावर भाजप समर्थकांनी केला. असे प्रश्न विचारणं म्हणजे लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आहे, अशी टीकाही भाजपने केली. भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधी यांना ‘ब्लंडर’ (चुकीचा निर्णय घेणारा) म्हणत पलटवार केला, तर पंतप्रधान मोदी यांना ‘थंडर’ (शक्तिशाली) असे संबोधले. भाटिया यांनी एक पोस्टर प्रसिद्ध केले, ज्यामध्ये मोदी यांना राफेल विमानासोबत दाखवले, तर राहुल गांधी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दाखवले. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांचं विधान म्हणजे लष्कराच्या शौर्याचा अपमान असल्याचं म्हटलं. राहुल यांनी जे विधान केलं ते पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही केलं नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यांना गांभीर्य आलं नाही, असाही टोला त्यांनी लगावला. त्रिवेदी इथेच थांबले नाहीत, तर काँग्रेसच्या कारकीर्दीत कधीकधी शस्त्रसंधी केली गेली, याचीही यादी त्यांनी सांगितली. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही सगळा देश एकजूट होऊन उभा असताना राहुल गांधी हे भारतविरोधी शक्तींच्या सोबत उभे राहात असल्याची टीका केली.
भाजपने राहुल यांच्यावर टीका करणं हा त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून समजूही शकतो, पण माध्यमं, ज्यांचं कामच सत्तेला प्रश्न विचारणं असतं तेही मोदींना, भाजपला प्रश्न न विचारता राहुल गांधींवर टीका करत आहेत, पंतप्रधानांवर टीका म्हणजे देशाचा अपमान हा सूर लावला जात आहे, तो विशेष आहे. अर्थात, भारतीय प्रसारमाध्यमांनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात जे लाजिरवाणे दिवे लावले आहेत, ते पाहता त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणं व्यर्थ आहे.
राहुल गांधीवर टीका करताना भाजप नेते आणि गोदी मीडिया ही गोष्ट पूर्णपणे विसरताहेत की, मुळात पंतप्रधान किंवा सरकारवर टीका म्हणजे लष्करावर टीका नाही. शस्त्रसंधीचा निर्णय हा लष्करी नसतो, तर राजकीय असतो. अशावेळी शस्त्रसंधी का केली गेली, त्यासाठी कोणती चर्चा झाली, काय अटी-शर्ती लागू झाल्या हे विरोधी पक्षांनी विचारायचं नाही का? तो देशद्रोह कसा? जे सुधांशू त्रिवेदी यापूर्वी किती वेळा शस्त्रविराम केला गेला, याची यादी सादर करत होते, ते मग त्या त्या वेळेच्या लष्कराचा अपमान करत नव्हते का? ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू होतं, त्यावेळी सगळा देश सरकार आणि नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभा होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांनी तर पीओके ताब्यात घेण्याची हीच वेळ आहे, असं म्हटलं होतं. मग ही मोहीम संपल्यानंतर त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही का?
भाजपच्या या सगळ्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं की, भारताचं नाव इतिहासात कायम वेगवेगळं राहिलं आहे. कधी जम्बुद्वीप, कधी आर्यावर्त, भारत, हिंदुस्तान… पण या देशाचं नाव नरेंद्र मोदी कधीच नव्हतं. त्यामुळे नरेंद्र मोदींचा अपमान हा देशाचा अपमान कधीपासून व्हायला लागला? राहुल गांधींनी भोपाळमध्ये मोदींवर टीका करणं म्हणजे लष्करी मोहिमेचं राजकारण करणं असेल तर मोदींनी बंगाल, बिहारमध्ये राजकीय प्रचारसभांमध्ये ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करणं हे राजकारण नाही का? त्यांचे लष्करी वेशातले फोटो प्रसिद्ध करून या मोहिमेचं श्रेय त्यांना देणं हे राजकारण नाही का? सत्ताधारी म्हणून श्रेयवादाचं राजकारण करणं हा भाजपचा अधिकार असेल तर विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार का नसावा? तो त्यांच्या राजकारणाचा भाग का नसावा?
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. सरकारला प्रश्न विचारणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि सरकारला प्रश्न विचारले जातात म्हणूनच आपली लोकशाही पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे. पण गेल्या काही काळात पंतप्रधानांचा अपमान हा देशाचा अपमान हेच नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे. कदाचित ज्यापद्धतीने राहुल गांधींनी ‘सूट बूट की सरकार’ म्हणून केलेली टीका भाजपच्या वर्मी लागली होती, त्याचपद्धतीने आता ‘नरेंदर सरेंडर’चाही घाव बसला आहे. आता याचा काँग्रेसला राजकीय फायदा आणि भाजपला फटका बसेल का हा प्रश्न आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या घोषणेतून भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जे अपयश ठळक होत आहे, ते अधिक विचार करायला लावणारं आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात होत आहे. पण सरकारने हे अधिवेशन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ठेवलं आहे. कारण जितका हा विषय थंड होईल तितका सरकारला हवा आहे. राहुल यांनी ‘नरेंदर, सरेंडर’ असा वर्मी घाव घालून हा विषय थंड करण्याचे मोदींचे मनसुबे उधळून टाकले आहेत.